महाराष्ट्रमुख्यपान

डॉ.प्रभाकर जाधव यांचे ‘मराठवाड्यातील निवडक जन आंदोलने’ हे पुस्तक प्रसिद्ध.

डॉ.प्रभाकर जाधव यांचे ‘मराठवाड्यातील निवडक जन आंदोलने (विकासविषयक)’हे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाचे मी स्वागत करतो. – डॉ अनंत राऊत

वर्तमान महाराष्ट्रातील मराठवाडा हा भूप्रदेश पूर्वीच्या काळी सरंमजामदारी निजामी राजवटीमध्ये होता. इंग्रजांची थेट सत्ता मराठवाड्यावर नसल्यामुळे इकडे आधुनिक विचारांचे वारेही फारसे फिरकले नाहीत. त्यामुळे इथे लोकशाहीला आवश्यक असा उदारमतवाद, समतावाद,बुद्धिवाद, विज्ञानवाद रुजवणाऱ्या परिवर्तनवादी चळवळीही उभ्या राहिल्या नाहीत. मराठवाड्यात नैसर्गिक साधन संपदा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत काहीशी कमी असेल परंतु आहे ती पुरेशी नाही असे म्हणता येत नाही. ती मराठवाड्यातील लोकांच्या गरजा सन्मानाने भागवू शकेल त्या प्रमाणात निश्चितच आहे, परंतु त्या साधनसंपदेचा वास्तववादी, बुद्धीवादी, सर्व समावेशक विकासवादी दृष्टिकोन ठेवून निष्ठेने विकास घडवून आणण्यासाठीची जी निष्ठा ,जिद्द आणि चिकाटी हवी असते तिचा अभाव असल्यामुळे मराठवाडा हा भूप्रदेश अनेक दृष्टीने मागासलेला राहिला. आजही तो मागासलेलाच आहे. मराठवाड्याच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक मागासलेपणाला इथल्या लोकांचा वैचारिक आणि बौद्धिक मागासलेपनाही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. मराठवाड्याचे सर्व प्रकारचे मागासलेपण घालवण्यासाठी इथली सुज्ञ मंडळी विचार करत आलेली आहे आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आंदोलनेही करत आलेली आहे. मराठवाड्यामध्ये झालेल्या अनेकविध पातळ्यांवरील आंदोलनांची शिस्तशीर अशी नोंद घेणे आवश्यक होते. अशी नोंद प्रभाकर जाधव यांनी आपल्या ‘मराठवाड्यातील निवडक जनआंदोलने’ या पुस्तकामध्ये काही प्रमाणात घेतली आहे. म्हणून या पुस्तकाचे मी स्वागत करतो. हे पुस्तक प्रारंभी मराठवाड्याची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक ओळख करून देते. राजकीय ओळख करून देताना मराठवाड्यातील सातवाहन घराणे वाकाटकानंतरचे बदामी, चालुक्य, यादव घराणे इत्यादी संदर्भातील माहिती देऊन निजामी राजवटीवर प्रकाश टाकते. मराठवाड्याच्या विकासामधील आधुनिक जन आंदोलनाचे महत्त्व स्पष्ट करते. मराठवाडा ग्राम विकास संघ, मराठवाडा विकास मंडळ, मराठवाडा विकास आंदोलन, मराठवाडा जनता विकास परिषद इत्यादी संघटनांनी मराठवाड्याच्या विकासासाठी केलेल्या आंदोलनांची, घेतलेल्या वैचारिक भूमिकांची ओळख करून देते. विशेषत: मराठवाडा जनता विकास परिषदेने मराठवाड्याच्या विकासासाठी कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली याची सविस्तर नोंद घेते. मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी राजकीय क्षेत्रातून प्रयत्न करणे, या प्रदेशाच्या विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, शासनाकडे मराठवाड्याच्या विकासाला पूरक असलेल्या विकास योजनांचा पाठपुरावा करणे, मराठवाड्यातील लोकांमध्ये विकास प्रश्नांबद्दल जाणिवा तीव्र करून त्यासाठी लोकमत सदैव जागृत ठेवण्याचा लोक लढा संघटित करणे, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना या विकास आंदोलनाच्या भूमिकेत सहभागी करून घेणे, मराठवाड्याच्या विकासासाठी राजकीय जनजागृती बरोबर सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेणे, आर्थिक शोषितांच्या गरजांचा विचार करणे आणि त्यांना सामाजिक दृष्ट्या प्रगतीची दिशा दाखवणे, महाराष्ट्राच्या समन्यायी विकासाचा आग्रह लावून धरणे, सांविधानिक प्राधिकरणाच्या निर्मितीचा पाठपुरावा करणे, मराठवाड्याच्या विकासासाठी संबंधित असलेल्या विविध क्षेत्रांचा अभ्यास करून त्यांचा कृतिशील आराखडा तयार करणे, भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी मागास विभागाच्या विकासाचा विचार त्या त्या राज्यातील विकसित भागाच्या तुलनेत झाला पाहिजे असा आग्रह धरणे, मराठवाड्याच्या विकासासाठी वेळोवेळी लोकशाही व समाजवादी मार्गांचा अवलंब करून अहिंसक लढा उभा करणे ही मराठवाडा जनता विकास परिषदेची उद्दिष्टे अधोरेखित केली आहेत. मराठवाडा जनता विकास परिषदेने घेतलेली सात अधिवेशने, त्या अधिवेशनांमध्ये घेतलेले ठराव व केलेल्या मागण्या आणि मराठवाडा जनता विकास परिषदेच्या प्रयत्नांना आलेले यश इत्यादी गोष्टींची सविस्तर मांडणी सदर पुस्तकात केलेली दिसते. मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती, बाभळी बंधारा निर्मिती कृती समिती यांच्या कार्याची नोंदही हे पुस्तक घेतो. सदरच्या पुस्तमध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासंदर्भात झालेल्या आंदोलनाची नोंद मात्र घेतलेली दिसत नाही. ती नोंद या पुस्तकात घ्यावयास हरकत नव्हती. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी इथे खूप मोठे आंदोलन झाले तसेच त्याच्या विरोधातही आंदोलन झाले. नामांतर समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये मराठवाड्यात झालेला जो संघर्ष होता तो संघर्ष मराठवाड्यातील लोकांच्या वैचारिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता हे विसरून चालत नाही. यात विकास विषयक आंदोलनांची नोंद घेतली आहे असे लेखकाने म्हटले आहे. विद्यापीठ नामांतर आंदोलन हे कदाचित भौतिक साधन संपत्तीच्या विकासासंदर्भातील नसेल, परंतु ते मराठवाड्यातील जनतेच्या शैक्षणिक, वैचारिक, बौद्धिक व मूल्यात्मक विकासासाठीचे आंदोलन होते, हे लेखकाने समजून घ्यावयास हवे होते. या आंदोलनामुळेच मराठवाड्याला दुसरे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मिळाले. हे मिळणे हे या आंदोलनाचे शैक्षणिक फलित आहे.

सकस अशा शैक्षणिक विकासातमधूनच भौतिक विकास होत असतो, हेही समजून घेतले पाहिजे.
या आंदोलनामुळे मराठवाड्यातील जनता वैचारिक दृष्ट्या काही प्रमाणात का होईना संकुचिततेकडून व्यापकतेच्या दिशेने विकसित झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच काही प्रमाणात बदलला.सदरच्या आंदोलनाकडे सर्वांगीण विकासविषयक भूमिकेतून लेखकाला पाहता आले असते. विषमतावादी व शोषणकारी अशा जातिव्यवस्थेने तळस्तरात ठेवलेली, अस्पृश्यतेचा कलंक लावलेली माणसेही मराठवाड्यात राहतात आणि या माणसांनी आधुनिक काळात विविध आंदोलने करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे.विशेषत: साहित्य क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण असे कर्तृत्व सिद्ध केले आहे, याकडे लेखकाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी सलग पन्नास वर्षे ‘अस्मितादर्श’च्या माध्यमातून चालवलेली साहित्य चळवळ ही इथल्या साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती.कोणतीही विकासविषयक भूमिका घ्यायची असते तेव्हा आधी कोणते समाज घटक विकासापासून सर्वाधिक दूर आहेत त्यांच्यापासून तिची सुरुवात करायची असते.(महात्मा फुले यांनी शोषितांच्याही शोषित असलेल्या अस्पृश्य मुलींच्या साठी पहिली शाळा काढली हा दृष्टिकोन ध्यानी घेतला पाहिजे.) अशी सुरुवात करण्याचे भान समाजातील प्रस्थापितांनी किंवा मध्यमस्तरीय लोकांनी ज्या चळवळी केल्या त्यांना होतेच असे या पुस्तकातील नोंदीवरून दिसत नाही.
मराठवाड्यातील तळस्तरातील लोकांनी केलेल्या आंदोलनाची नोंद लेखकाने केली असती
तर या पुस्तकाचे मोल अधिक वाढले असते.

डॉ. प्रभाकर जाधव यांचे सदर पुस्तक मराठवाड्यातील आंदोलनविषयक माहिती व तपशील पुरवणारे आहे. ही माहिती महत्त्वपूर्ण अशीच आहे. या पुस्तकात स्वतंत्र चिंतनशीलतेचा अभाव दिसतो. असे असले तरी हा तरुण प्राध्यापक आपल्या सभोवतालचा विचार करतो आहे. त्यावर अभ्यास करतो आहे आणि काही मांडू पाहतो आहे हे महत्त्वाचे आहे. सदर लेखकाच्या चिंतनशीलतेचा हळूहळू नक्कीच विकास होईल.

मराठवाड्यातील सर्वच विकासप्रेमी लोकांनी प्रा. जाधव यांचे हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे. आपल्या भूप्रदेशाच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात आपल्या मनात असलेली अनास्था आणि बेफिकिरी सोडली पाहिजे आणि सर्वांनी एकत्रित येऊन या भूप्रदेशाचा पाणी प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, आर्थिक प्रश्न रेल्वेच्या संदर्भातील मराठवाड्याची झालेली उपेक्षा इत्यादी अनेक गोष्टींच्या संदर्भामध्ये गंभीरपणे विचार करून विकासासाठीची आंदोलनात्मक कृती सातत्याने सुरू ठेवली पाहिजे.

-डॉ अनंत राऊत.

मराठवाड्यातील निवडक जन आंदोलने
(विकास विषयक)
प्रकाशक सौ सौ सुरेखा तानाजी हुस्सेकर नांदेड
पृष्ठसंख्या १५८
किंमत २००/₹

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!