महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

भोंदूंच्या देवळाला मेंदूंचे दगड

हे ‘साप्ताहिक चित्रलेखा’च्या ३ जानेवारी २०२२च्या अंकातील ‘संपादकीय’ आहे.
ज्ञानेश महाराव

आज (३जानेवारी २०२३) विदर्भातील वाशीम येथून भोजने ह्या वाचकांचा फोन आला. त्यांनी सोबतच्या दोन वर्षांपूर्वी ‘सा.चित्रलेखा’त प्रकाशित झालेल्या लेखाची आठवण काढली. “तुम्ही लिहिलेले आज खरे झालेले पाहावे लागतेय. तुमच्या लेखनाची आज गरज आहे,” असे म्हणाले. हे ‘चित्रलेखा-मुक्त’ झाल्यापासून गेले वर्षभर रोज ऐकतो. असो. भोजने यांनीच माझ्या विनंतीनुसार सोबतचा लेख पाठवला. त्याचे शीर्षक लक्षात होते; त्यातील तपशील विसरलो होतो. वाचल्यावर भोजने यांची मन:स्थिती मीही अनुभवली. तुम्हीही अनुभवावी, यासाठी हा लेख पुन्हा प्रकाशित करतो. त्यातील मुद्दे पटल्यास आपल्या ग्रुपमध्ये शेअर/फॉरवर्ड करा, विनंती. आज प्रकाशित करण्यास खास कारण आहे. ते शेवटी कळेलच.

???? लेखक : ज्ञानेश महाराव

हिंदू धर्म हा पुराणी-सनातनी असल्याने त्याची चर्चा आणि त्यावर वाद-विवाद; हे अत्याधुनिक तंत्र-विज्ञान -सज्ज एकविसाव्या शतकातही होणार आणि पुढेही होत राहणार! त्यासाठी हिंदूना मानसिक गुलामीत फसवण्यासाठी भट-भिक्षुकशाहीने कोणत्या लबाड्या केल्या आणि करीत आहेत; ते ‘प्रबोधन’कार के.सी.ठाकरे यांनी ‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ ह्या तीस पानांच्या पुस्तिकेत नेमक्या शब्दांत मांडलंय. १९२६ मध्ये ही पुस्तिका प्रकाशित करताना त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, ”हिंदुस्थानातला तरुण जेव्हा स्वयंप्रज्ञेने (स्वत:च्या बुद्धीने) उभा राहील; तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला हातोडा देवावर आणि देवळावर पडेल!” ह्या अपेक्षेला १०० वर्षं व्हायला आली तरी ती पूर्ण झाली नाही. दृष्टिपथातही नाही. किंबहुना, ह्या अपेक्षेच्या विपरीत देशात घडत आहे. गेले ३५ वर्षं आपला देश ’देव आणि देवळं’ यांच्या राजकीय फेर्‍यात भ्रमिष्टासारखा गोते खातोय. या काळात पडिक-दुर्लक्षित देव-देवळं जागृत झालीत. तरुणाईच्या दोन-तीन पिढ्या पत्थरी देवधर्माच्या नादाला लागून वाया गेल्यात. त्यांना अयोध्येत ’राम जन्मभूमी मंदिर’ बांधायला जमवून, मुस्लीम आक्रमकांच्या क्रूरपणाची साक्ष देणारी बाबरी मशीद जमीनदोस्त करवून घेतली. देव-धर्म रक्षणार्थ आणि ‘हिंदू जागृती’साठी तरुणांना बॉम्ब बनवण्याचं, स्फोट घडवून आणण्याचं; समाज सुधारणेचं काम करणार्‍या हिंदूंना मारण्याचं प्रशिक्षण देऊन ते कृतीत आणण्यात आलं. ते सत्यासाठी नव्हतं; ते सत्तेसाठी होतं, हे स्पष्ट झाल्याने वर्षापूर्वी ‘राम जन्मभूमी मंदिर’ निर्माणाच्या कार्याचा घाट घालण्यात आला. यासाठी कोर्टाच्या बाहेर करोडोच्या तडजोडी झाल्या. कारण कोर्टात हे प्रकरण जमिनीच्या हक्कवादाचे होते. रामाचा जन्म बाबरी मशिदीच्या बुडाखालच्या जागेत झाला होता का, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी नव्हते. पण तसे भासवण्यात आले. असो. अयोध्येतील राम मंदिर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण होईल. तेव्हा हिंदू मन-मताला कुरवाळणारी तोंडं वाजतील. यात्रा-फेऱ्या निघतील. मंदिर बांधकामासाठी दान-देणगीच्या नावाने करोडो रुपयांची लूटमार होईल! त्याची झलक नुकतीच, वाराणशीत झालेल्या ’काशी विश्वेश्वर मंदिर’ व परिसराच्या पुनर्विकास सोहळ्यात पाहायला मिळाली. वाराणशी हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ. तिथला ’काशी विश्वेश्वर’ मंदिराचा परिसर दुकान-मकानांनी गजबजलेला होता. त्याने वाहतुकीला आणि भाविकांच्या रहदारीला अडथळा होत होता. ह्या ठिकाणची बरीचशी बांधकामं अनाधिकृत होती. ती मोदी यांनी सत्ता-ताकद वापरून दूर केली. कोर्टबाजी टाळण्यासाठी कायदेशीर-बेकायदेशीर बांधकामधारकांना, रहिवाशांना पुनर्वसनासाठी भरपूर मोबदला देण्यात आला. देवासाठी कुणीही मोफत जागा दिली नाही. हा ७०० कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प होता. पण त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशाच्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून ’प्रसिद्धी’ची आंघोळ करून घेतली, ती दिव्य होती! श्रद्धा- आस्था- भक्तिभाव ठायी असणे, हे माणूसपणाचं लक्षण आहे. पण त्याचं प्रदर्शन किती करायचं, ह्यालाही मर्यादा आहेत. तथापि, ’सत्तातुराणां भयं ना लज्जा’ हा मंत्र नरेंद्र मोदी कोळून प्यायल्याने, ते तसे वागले नसते, तर ते गैर ठरले असते. मतांचे राजकारण करण्यासाठी मोदींना असे जातीय व धार्मिक ध्रुवीकरण घडविणारे प्रदर्शन करणे, ही मजबुरी असेल. पण त्याने देशाच्या एकतेला-अखंडतेला तडा जातो, ह्याचे भान प्रधानमंत्री म्हणून मोदींनी ठेवायला नको का? २० जुलै १९६९ रोजी अमेरिकेच्या ’अपोलो’ यानातून नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पोहोचला. त्याने चांद्रभूमीवर पहिल्यांदा मानवी पावलाचा ठसा उमटवला. जॉन.एफ.केनेडी यांनी, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना २५ मे १९६१ रोजी ’माणसाला १९७० पर्यंत चंद्रावर पाठवणार!’ अशी घोषणा केली होती. ती १९७० पूर्वीच पूर्ण झाली. आपल्या देशात निवडणुकांचा हिशेब करून देवळांची बांधकामं पूर्ण करण्याची प्रथा ’मोदी सरकार’ने सुरू केलीय. २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी अयोध्येतील राममंदिर आणि त्यापुढच्या निवडणुकांसाठी मथुरेचं कृष्ण मंदिर आणि ३३ कोटी देव-देवतांची देवळं ’बाकी’ आहेत. भारत हा सध्या तरुणाईची संख्या सर्वाधिक असणार्‍यांचा देश आहे. पण तरुणाईची बुद्धी-शक्ती अधिकाधिक पत्थरी देव-देवळात अडकवून ठेवण्यात आलीय. चंद्रावर माणूस जाऊन ५० वर्षं होत असतानाच, भारताचं माणूस नसलेलं चांद्रयान २२ जुलै २०१९ रोजी श्रीहरिकोटा येथून चंद्रस्वारीवर निघालं. ते निर्धोक चंद्रावर उतरावं, यासाठीच्या पूजाविधीकरिता ’इस्रो’चे प्रमुख सेल्वम यांनी चांद्रयानाची प्रतिकृती मठाधिपतीकडे घेऊन गेले होते. यान चंद्रकक्षेत प्रवेश करतानाच्या काळात प्रधानमंत्री ’त्राटकी’ डोळे लावून बसले होते. तरीही यान भरकटले. २००० कोटी रुपये खर्चाची मोहीम फसली. त्याबद्दल कुणाला लाज-लज्जा नाही; की कुणाला सजा नाही. देव-धर्माच्या नावाने मेंदूचे दगड केल्यावर यापेक्षा दुसरे काय घडणार? देव-देवळं हा साधू-संन्याशी आणि भट-भिक्षुकांचा पोट भरण्याचा उद्योग आहे. भक्त-भाविक त्याचे गिर्‍हाईक आहेत. हा उद्योग ’संघ-भाजप’ परिवाराने सत्तालाभासाठी आपल्या ताब्यात घेतलाय. म्हणजे, मुळातला खोटा धंदा सोंगाकडून ढोंगाकडे गेलाय. हे सोंगा-ढोंगाचे नाटक बिनदिक्कत चालू राहावे, यासाठी उमा भारती, आदित्य योगी यांसारख्या साध्वी-साधूंना राज्याचे मुख्यमंत्री बनवून परमार्थाचंही प्रदर्शन करण्यात आलेय. तथापि, ह्यातील मूळच्या खोटेपणाची हजामत करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, ”हिंदुस्थानातील साधू-संन्याशांनी गरिबांसाठी काय केलं? त्यांना अध्यात्म शिकवलं! भुकेल्या माणसाला परमार्थ सांगणं, ही धर्माची शुद्ध चेष्टा आहे! आज लक्षावधी लोक अन्नान्न करीत आहेत. ही जनता परमेश्वर नाही का? भारताचे भवितव्य ह्या जनतेवर अवलंबून आहे!” ‘देशातल्या साधू-संन्याशांचेही आपण बाप आहोत,’ असा समज भक्त मंडळीत निर्माण करण्यात नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. मात्र, त्यांचे हे ’सर्वोच्च साधू- संन्याशी’पण स्वामी विवेकानंद यांनी हजामत केलेल्यांच्या कसोटीवर बालंबाल उतरते. पाच वर्षांपूर्वी ५००-१००० रुपयांची अचानक लादलेली नोटाबंदी आणि २१ महिन्यांपूर्वी टाळ्या- थाळ्या वाजवत जाहीर केलेल्या ’कोरोना-लॉकडाऊन’ने देशातील लाखो उद्योग-धंदे बंद झाले. करोडो लोकांना बेरोजगार केले. त्यांचा पुनर्विकास तातडीचा असताना ’मोदी सरकार’ने ’कोरोना-लॉकडाऊन’ काळात अयोध्या राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा साजरा केला आहे. हा परमार्थ नाही; सत्तास्वार्थ आहे! आता देशावर ’ओमायक्रॉन’चे संकट येऊ घातले असताना ’काशी विश्वेश्वर’ मंदिराच्या पुनर्विकासाचा सोहळा घडवून आणला. माणसांचा देश आणि काल्पनिक-पत्थरी देव-देवता; यांची तुलना होऊ शकत नाही. म्हणूनच सत्तेसाठी माणसाऐवजी दगडाला किमती करणार्‍यांचा कारभार डोळसपणे समजून घेतला पाहिजे. यासाठी स्वामी विवेकानंद यांचा विचार सांगतो, ”जुन्या रूढीचं आणि इतिहासाचं समर्थन करणं, हे अत्यंत लज्जास्पद आहे. असे भोळसट होण्यापेक्षा तुम्ही नास्तिक झालात तरी चालेल! कारण नास्तिक हा खरा जिवंत मनुष्य असतो. निरीश्वरवादात एक प्रकारचं सामर्थ्य असतं. अंधश्रद्धा हा मात्र मृत्यू आहे. म्हणून नास्तिकतेनेच राष्ट्र वर येण्याचा जास्त संभव आहे.” स्वामी विवेकानंदांच्या हिंदुत्वाचा विचार असा स्वच्छ आहे. त्यात बनवेगिरी नाही. तो भारतीयांच्या अकलेची ‘काशी’ करणारा ‘मोदी सरकार’चा व्यवहार नाही. तो फक्त बुद्धी-शक्तीने सशक्त हिंदू बनवणारा विचार-आग्रह आहे!

■ (लेखनकाळ २०.१२.२०२१)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!