धर्मांतराने काय दिले;बौद्धांची प्रगती आरक्षणाने नव्हे तर आंबेडकरी विचारांमुळेच…!

—- लेखक-डॉ.कुमार लोंढे
मो.9881643650
हिंदू धर्म हा विषमतेवर आधारलेला धर्म आहे आणि या धर्मातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग कोणता असेल तर तो धर्मांतर आहे हे त्यांना उमगले होते आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर धर्मांतराची चळवळ आज ही पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. बौद्ध धम्म स्वीकारताना भारताचे पुनर्वैभव या देशाला मिळावं हा उद्देश त्यांनी डोळ्यापुढे ठेवला होता. त्यांनी भारताचा जो मुख्य धम्म आहे तथागत बुद्धांचा, सम्राट अशोकाचा जो धम्म आहे तोच त्यांनी स्वीकारला आणि या देशावरती तसं विचार करायला गेलं तर प्रचंड असे उपकारच केले. सामाजिक विषमता ही देशाला हानीकारक आहे त्यावर मार्ग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म घेतला तो धम्म चिकिस्तक,विवेकवादी,बुद्धीच्या तर्काला पटणारा दिला. आपल्या बांधवांना नवसंजीवनी दिली.मृत्य शरीरामध्ये जीव ओतण्याचे काम झालं त्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब चे कार्य अतुलनीय आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराने पूर्वाशश्रमीच्या महारांना व आताच्या बौद्धांना काय दिले या गोष्टीवर आपण थोडं विश्लेषण करणे पण महत्त्वाच आहे.
बौद्ध समाजाची प्रगती महाराष्ट्रातील व देशातील काही उच्चवर्णी व ब्राह्मणवादी लोकांना रीड की हड्डी ठरत आहे.या विचारसरणीच्या लोकांना असे वाटते की पूर्वाश्रमीचे महार व आताचे बौद्ध हे केवळ आरक्षणामुळे प्रगती करत आहेत पण या बाबतीमध्ये मी असं म्हणेन हा चुकीचा व सोयीचा अर्थ आहे.
आरक्षणाचा फायदा झालेला आहे परंतु त्यापेक्षा जास्त फायदा हा बौद्ध धम्माच्या स्वीकारण्याने झालेला आहे हे आपण अधोरेखित करणे महत्वाचे आहे कारण बौद्ध धर्मामध्ये कर्मकांडाला अजिबात स्थान नाहीये बाबासाहेबांनी जो नवयान हा नवीन धम्म दिलेला आहे. त्यामध्ये 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत । आंबेडकरांना माहीत होतं माझ्या जाण्यानंतर समाज दिशाभूल होईल ! समाजाला वेगळ्या वळणावर फसवणूक करून येथील व्यवस्था पुन्हा कर्मकांडांमध्ये अडकवेल म्हणून त्यांनी चिकित्सक पद्धतीने 22 प्रतिज्ञा दिल्या; त्या पद्धतीने त्यांनी माणसाच्या जगण्याच्या चिकिस्तक विचार यामध्ये केलेला आहे.बौद्ध समाज कर्मकांडामध्ये व दैवादामध्ये न अडकता प्रयत्न चिकाटी, जिद्द ,सातत्य व विज्ञानवादाच्या जोरावर यशाची शिखरे प्राप्त करत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मन मनगट आणि मेंदू या जोरावर असाध्य ते साध्य करता येऊ शकते हा विचारच जणू आज प्रत्येक आंबेडकरी तरुणांच्या डोक्यामध्ये आहे. शिक्षणामध्ये 1956 च्या अगोदर या समाजाचा कोणताही टक्का अथवा वाटा नव्हता
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरामुळे धर्मांतरामुळे या समाजातील शिक्षणाचे प्रमाण हे आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 86 टक्के आहे. ब्राह्मण समाजानंतर दोन नंबरला साक्षरतेमध्ये असणारा समाज आहे. न्यायाधीश या पदासाठी आरक्षण नसताना सुद्धा बौद्ध समाजातील न्यायाधीश संख्या आज वाढ होत आहे.
शासकीय नोकऱ्या मध्ये प्रशासनातील आयएएस, आयपीएस,प्रधान सचिव, सचिव आय आर एस ,परराष्ट्र दूत, डॉक्टर ,वकील, इंजिनिअर कुलगुरु व शिक्षकांची तर रेलचेल आहे अगदी क्लास वन पासून ते क्लास फोर पर्यंत या समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या मिळवलेल्या आहेत . बाबासाहेब आंबेडकरांचे जे वाक्य होतं मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकवल्या पाहिजेत त्या पटकवण्यामध्ये या समाजाला यश मिळाले आहे. बाबासाहेबांच्या उक्तीप्रमाणे यांनी वाटचाल केल्यामुळे हा समाज अग्रक्रमाला आलेले आहे. हे विसरून आपल्याला जमणार नाही . ज्या समाजाला चाकरी करणे, मेलेल्या जनावरांचा मास खाणं आणि गावामध्ये दवंडी करणे हे बारा बलुतेदारांपैकी एक काम या समाजाकडे होते.पाण्याचा स्पर्श व खरकट अन्न खाण्याचा सुद्धा अधिकार नव्हता तो समाज आज एवढ्या वेगाने पुढे जातो आहे.
आज कुठे ही तुम्हाला दिसणार नाही की महार व बौद्ध समाजाचा माणूस मेलेला जनावराचा मांस खातोय किंवा गावामध्ये दवंडी देतोय म्हणजे दास्यत्व ,गुलामगिरी यांनी कायमची सोडली.गावकी चिडून शहराकडे धाव घेतली आहे. चातुर्वर्ण व्यवस्था निर्मात्याच सगळं मुसळ केरात घालण्याच महान कार्य यांनीच केलं आहे बरं का! “बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.” या वाक्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समाजाला काय सांगायचं आहे हे नक्की जाणवते कारण बुद्धीचा विकास हे मानवी जीवनाचा अंतिम ध्येय असणे महत्वाचे आहे. या समाजाने कर्मकांड नाकारल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची बचत ,वेळेची बचत करून सांस्कृतिक गुलामी यापासून कायमची मुक्तता मिळवण्यात हे सफल झाले आहेत. हा समाज व्यसनानिधनता यामधून होऊ लागला आहे. रोटी व्यवहार व बेटी व्यवहार आज होत आहे.लहानपणी जातीयतेचे चटके बसले नाहीत असा इसम शोधून सापडणार नाही. या समाजाच्या गळ्यामध्ये गाडग आणी पाठीवर खराटा असताना गुलामगिरी चे साखळदंड निखळून पडले. हातामध्ये पाठी पेन्सिल आणि पुस्तक आले दीक्षाभूमीवरून येताना हे लोक करोडो रुपये चे पुस्तक घेऊन येतात.पहिली एक म्हण होती” महाराच्या घरी गाणं बामणाच्या घरी लिहणं आणि कुणब्याच्या घरी दान” पण या सर्व बाबीला छेद देण्याचं काम या समाजाने केलेला आहे लोक विनोदांन म्हणतात ब्राह्मणांनी मटन महाग केलं व आंबेडकर वाद्यांनी पुस्तकं महाग केली. आता काळ बदललेला आहे महाराच्या घरी लिहिणं बामना घरी गाणं अशी वाक्यरचना केली तर ते अतिशोयक्ती ठरणार नाही. ब्राह्मण समाजातील जास्तीत जास्त मुली या बौद्ध समाजातील मुलांबरोबर लग्न बंधनात आहेत .ही किमया शिक्षणाची व केवळ शिक्षणाची आहे. विज्ञानवाद आणि विचाराची तर्कसंगत पद्धती हा विचार आज घराघरात आहे. फिनिक्स पक्षा प्रमाणे घेतलेली भरारी ही अतुलनीय आहे .हजारो वर्षाच्या गुलामगिरीचे साखळदंड एका क्षणात तोडण्याचं काम या महामानवाने केले आहे.
शिक्षणाचे प्रमाण,राहणीमान दर्जा,क्रयशक्ती,उत्त्पन्न, आरोग्य,सजगता,आक्रमकता,डावपेच,साहित्य, कला,क्रीडा,सांस्कृतिक व समाजातील प्रत्येक आघाडीवर आज आंबेडकरवादी आरूढ आहे.स्थानिक,राज्य ,देश,विदेश पातळीवर आपला ठसा उमटवण्यात पूर्वश्रमीच्या महार व आत्ताच्या बौद्ध समाजाने केलेली प्रगती ही फुटपटीत मोजता येऊ शकत नाही. सामाजिक चळवळ, राजकीय चळवळ सांस्कृतिक चळवळ,आर्थिक,सेवा,उद्योग या सर्व बाबीवर हा समाज पुढे आहे.समाजाच्या प्रगतीची कारणे जर आपण बारकाईने विचारात घेतली तर एक गोष्ट प्रत्यक्ष जाणवते ते म्हणजे धर्मांतर आणि विज्ञानवाद होय.आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे . या दिवसाच विशेष असं स्थान आहे. जगामधला असं एकही ठिकाण नसेल ज्या ठिकाणावर जर त्यावर्षी लाखोच्या संख्येने लोक येतात. कुठलेही निमंत्रण नसताना दीक्षाभूमीवर लाखो लोक येऊन धडकत असतात !विचाराच गाठोडं ,पुस्तकांचं ओझ डोक्यावर घेऊन बापाच्या आठवणीत म्हणजे बा भीमाच्या आठवणीमध्ये जर त्यावर्षी दीक्षाभूमीला, चैत्यभूमीला, महाडच्या चवदार तळ्याला व भीमा कोरेगाव ला जाऊन विचारांचं अमृत पिऊन ताजे तवाने होतात आणि वर्षभर त्यांच्या अंगामध्ये लढण्याचं बळ निर्माण होतं ! ज्याप्रमाणे एखाद्याच्या शरीरातील रक्त पूर्ण काढून घेतलं तर तू मरून जातो त्याप्रमाणे माणसाच्या शरीराला, माणसाच्या बुद्धीला जर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याची झालर नसेल तर तो जिवंत असून मृत असेल असं समजलं तर वावग ठरणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला तो विज्ञानवादी, विवेकी व जागृत असणारा धम्म दिला हा धम्म यशाचा शाश्वत चिरकाल टिकणारा मार्ग आहे.आंबेडकरी विचारांचे स्पिरिट व धम्माचे विवेकवादी पद्धतीने केलेले आचरण हा मानवतेचा उगम आहे.
दि.24 ऑक्टोबर 2023
चांदापुरी सोलापूर
Copyright@2023
(लेख आवडल्यास अभिप्राय द्या व नावासहित शेअर करा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत