
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
वरील संदर्भात सत्य काय आहे हे पडताळून पाहायचे झाल्यास आपल्याल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पत्रांचा आधार घ्यावा लागतो. त्यात पहिले पत्र हे दादासाहेब गायकवाड ह्यांना ७ सप्टेंबर १९५६ रोजी पाठवलेले पत्र मार्गदर्शनीय आहे. त्या पत्रात बाबासाहेबांनी धम्म दीक्षा सोहळ्याची तारीख अंतिम केल्याचा संदेश देतात. त्या पत्रात बाबासाहेब काय लिहितात हे बघूया !
“प्रिय भाऊराव,
आपले ता. ४/९/५६ चे पत्र मिळाले. माझ्या पोटात काहीसा बिघाड झाला असल्याने माझा सर्व कार्यक्रमच मला बदलाने भाग पडले. आता ठीक आहे. डिसेंबर पर्यंत तरी मी मुंबईस येण्याच्या विचारात नाही. दसरा सीमोल्लंघनाच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे मी निश्चित केले आहे. नोव्हेंबर मध्ये मी नेपाळ मध्ये (कांडमांडूला) होणाऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला जाणार आहे. त्यामुळे राजकीय कार्य करायला मला काही फुरसत नाही.” ह्या पत्रात “दसरा सीमोल्लंघन” हा असा महत्वाचा उल्लेख केलेला आढळेल.
दुसरे संदेश वजा पत्र बाबासाहेबांनी २६, अलीपूर रोड, दिल्ली येथून त. २३ सप्टेंबर १९५६ रोजी “प्रबुद्ध भारत” च्या संपादकांना पाठवलेले आणि ते प्रबुद्ध भारतच्या दिनांक २६ सप्टेंबर ५६ च्या अंकात छापलेले आढळेल. त्या पत्रात बाबासाहेब काय म्हणतात ते पाहूया !!
“बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस आणि ठिकाण मी आता निश्चित केले आहे. येत्या ‘दसऱ्यास’ तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म दीक्षा विधी समारंभ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जहिर व्याख्यान होईल.”
——बी. आर. आंबेडकर,
२३ सप्टेंबर १९५६
ह्या दोन्ही पत्रात बघितले तर दोन गोष्टी आढळतात. पहिल्या पत्रात दसरा सीमोल्लंघन तर दुसऱ्या पत्रात सीमोल्लंघन ह्या शब्दाला चाट देऊन फक्त दसरा आणि त्यापुढे तारीख १४ ऑक्टोबर १९५६ आहे. तर मुद्दा असा उरतो कि – डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना खरच धम्म दीक्षा सोहळा दसऱ्याला करायची होती का ?
त्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध जयंती १९५६ ला आपल्या अनुयायांना दिलेल्या संदेशाचा मजकूर मार्गदर्शनीय आहे. काय आहे हा संदेश ?
ते हि बघूया !!!
मी मागे जाहीर निवेदन काढून येत्या वैशाख पौर्णिमेला धर्मांतर करण्याचा माझा मनोदय जाहीर केला होता. त्या प्रमाणे अस्पृश्य समाजातील व इतर वर्गीयांपैकी शेकडो लोक धर्मांतर करण्यास तयार झाले आहेत, हे ऐकून मनाला समाधान वाटते व धर्मांतर करण्यास तयार झालेल्या सर्व लोकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तुमची सामुदायिक धर्मांतराची इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून मी अनेक ठिकाणी दौरा ही काढणार आहे.
असे आश्वासन देत ते पुढे म्हणतात —
“आपणा प्रमाणेच माझ्याकडे उत्तर भारतीयांची हि शेकडो पत्रे आली आहेत. त्यांच्या शाखा स्थापून त्या मार्फत प्रचंड बहुसंख्येने धर्मांतरास योग्य तो अवसर सर्वांना मिळावा. यासाठी आपले धर्मांतर चार – पाच महिने पुढे ढकलावे. अशी त्यांनी विनंती केल्या वरून मी माझे धर्मांतर येत्या ऑक्टोबर महिन्यात करण्यात योजिले आहे. आपण इतके दिवस थांबलात. तसे काही दिवस अजून थांबाल अशी आशा बाळगतो. येत्या वैशाख पौर्णिमेस सर्वांनी गतवर्षी प्रमाणेच २५०० वी बुद्ध जयंती साजरी करावी.” ह्या निवेदनातून दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.
१. बाबासाहेबांनी सुरुवातील २५०० वी बुद्ध जयंती ह्या दुर्मिळ पर्वणीला आपले धर्मांतर करण्याचे योजिले होते.
२. परंतु नंतर लोकांनी केलेल्या विनंती वरून त्यांनी तो बेत ऑक्टोबर महिन्या पर्यंत पुढे ढकलला.
वरील निवेदनात एक संकल्प स्पष्टपणे जाणून येतो तो म्हणजे बाबासाहेब यांना धम्मदिक्षा सोहळ्याची व्यापकता वाढवायची होती आणि त्याच बरोबर धम्मदिक्षा दिवसाची नोंद बुद्ध कालीन ऐतिहासिक संदर्भात होने आवश्यक होते म्हणूनच बाबासाहेबांनी दसरा सम्मोलंघन (अशोक विजयादशमी) दिवस निवडला १४ आॅक्टोबर तारिख नाही. असे असताना आज देखील आपण गोंधळी अवस्थेत आहोत कि बाबासाहेबांनी केलेल्या धम्मदिक्षा दिनाचे दिव्य स्मरण कधी करायचे? : १४ ऑक्टोबर कि अशोक विजयादशमी?”
ह्या प्रश्नच मागोवा घेताना सर्व प्रथम अशोक विजयदशमी नेमकी काय आहे? हे पाहावे लागेल.
अशोक विजयदशमी म्हणजे सम्राट अशोकाने कलिंग युद्ध जिंकले आणि त्या नंतर तो दिवस अशोक विजय दशमी म्हणून साजरा केला जाई. असे ढोबळ मानाने ऐतिहासिक संदर्भ न घेता मानले जाते. दसऱ्याला येणारी विजयादशमी हि तिथी नुसार असते, त्यात विजया हे दुर्गेचे नाव आहे आणि दशमी हि तिथी आहे. म्हणजे घटस्थापणे नंतर बरोबर ९ दिवसा नंतर दहाव्या दिवसाला येणारी तिथी म्हणजे दशमी
आता कलिंग युद्ध हे ९ दिवस चालले होते आणि दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला अशोकाने युद्ध जिंकले असं रेकोर्ड करून ठेवणारी कोणती तिथी नाही आणि तिचा इतिहासात कुठे संदर्भ देखील मिळत नाही सम्राट अशोकाचा इतिहास शिला लेखांतुन आणि प्रस्तराभि लेखांतुनच मिळतो, तेच अशोकाच्या इतिहासाचे Authentic संदर्भ मानले जातात. अशा कोणत्याही शिलालेख व प्रस्तराभि लेखा मध्ये संदर्भ मिळत नाही तेव्हा आपण कसे म्हणावे कि – -सम्राट अशोक कालीन लोकं अशोक विजयादशमी साजरी करत होते.
कलिग युद्धा संबधी गिरनार आणि शहाबाजगढ येथील तेरा नंबरचे प्रस्ताराभि लेख अभ्यासनीय आहेत. त्यातील गिरनारच्या प्रस्ताराभि लेखाच्या प्रारंभी येणाऱ्या ओळींचा अनुवाद असा देत येईल.
१. राजा कडून कलिंग जिंकले गेले. अप (हृत) तिथे एक लाख मारले गेले आणि बहुतांश मेले. त्या नंतर सांप्रत काळी कलिंग जिंकून घेतल्यावर धर्माचा तीव्र उपाय.
२. देवनाम प्रिय अनुताप (कलिंग) जिंकून (जो) जनतेचा वध, मरण अथवा अपहरण झाले ते देवनाम प्रियच्या मते अतीव दुखः प्रत आणि गंभीर होय.
शाहबाजगडच्या प्रस्ताराभि लेखात सुद्धा थोड्या फार फरकाने हेच कथन केलेले आहे. ते डॉक्टर राजबिल पांडेय यांच्याच शब्दात सांगणे हिताचे ठरेल.
१ अष्ट वर्षभिशिक्त देवानां प्रिय प्रियदर्शी राजा द्वारा कलिंग जीता था. डेढ लाख प्राणी (मनुष्य) वहासे अपहृत, एक लाख हत और उसासे कई गुणा मृत हुये.
२ उसके पश्चात आज जिते हुए कलीगमे देवानां प्रिय द्वारा प्रचुर धर्म का व्यवहार, धर्मका प्रेम तथा धर्मका उपदेश. (किया गया है) कलिंग पर विजय करके देवानां प्रिय को अनुताप (पश्चाताप) है.
आता आपण विचार करू शकतो ज्या अशोक विजय दशमीचा उल्लेख बाबासाहेबांनी न कधी आपल्या पत्रात केला न कधी आपल्या भाषणात तसेच अशोकाने देखील असला काही सन उत्सव करा.
अश्या आज्ञा दिलेल्या नाहीत तर मग धम्म दीक्षेच्या पूर्वी ‘विजयादशमी’ अथवा ‘अशोक विजयादशमी’ असं शब्द प्रयोग कुणी केला? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला धम्म दीक्षेच्या इतिहासाकडे डोकावे लागले आणि त्यात डोकावल्या नंतर आपल्या असे लक्षात येईल. धम्म दीक्षेच्या इतिहासात दोन प्रवाह सुप्तपणे कार्यरत होते
एक म्हणजे बाबासाहेब आणि दुसरे वामनराव गोडबोले भारतीय बौद्ध महासभेच्या स्थापणे अगोदर वामनराव गोडबोले ह्यांच्या अधिपत्या खाली “बुद्धदूत सोसायटी” या नावाची कार्यरत होती. परंतु नंतर धम्म दीक्षा सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिपत्या खाली “भारतीय बौद्धजन समिती” हि संस्था स्थापन करण्यात आली. त्यामुळे वामनराव गोडबोलेंना त्यांची संस्था बंद करून बाबासाहेबांच्या नवीन संस्थेची पताका आपल्या खांद्यावर घ्यावी लागली. त्याच प्रतिक म्हणजे दिनांक २१ सप्टेंबर १९५६ रोजी त्यांनी “भारतीय बौद्धजन समिती” याच मराठी नावाने, तिचा चिटणीस म्हणून काढलेले ‘मास कन्वर्शन’ विषयीचे काढलेले इंग्रजी पत्रक. त्या पत्रकात वामनराव गोडबोले हे बाबासाहेबांनी वापरलेल्या “दसरा सीमोलंघन” ह्या शब्दाचा पर्याय म्हणून ‘विजयादशमी’ या नव्या शब्द संहितेचा प्रथमच वापर करताना दिसतात.
त्या नंतर धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाचा तपशील सांगण्यासाठी वामनराव गोडबोले यांनी समिती द्वारे छापलेल्या पहिल्या पत्रिकेत ‘सामुदायिक धर्मांतर कार्यक्रम पत्रिका’ जाहीर केलेली आहे. ती अशी कि – “शनिवार ता. १३/१०/५६ रोजी सायंकाळी ५ ते ८ परित्राण, ८ ते १० महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी, श्री. डी. वलिसिन्हा यांचे भाषण; आणि भगवान बुद्धाचे चरित्र व भारतातील प्रसिद्ध बौद्ध स्थळे यावर म्युझिक ल्यानटर्न शो.”
त्यानंतरच कार्यक्रम पुढे नमूद करता वामनराव गोडबोले म्हणतात – “रविवार ता. १४/१०/५६ (अशोक विजयादशमी) सकाळी ८ ते ११ परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब आंबेडकर आणि इतर दीक्षार्थीची पुज्य भिक्षु चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्म दीक्षा.”
इथे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिवादाला न पटणारा असं ‘परित्राण’ पाठाच्या कार्यक्रमाचा उल्लेख झाला आहे. अशा वेळी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात पूजा विधी नि कर्मकांड विषयक नमूद केलेले विचार आठवतात. ‘धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. (IV:I:6:4) त्यामुळे धार्मिक असलेल्या वामनराव गोडबोले यांच्याकडेच या कार्यक्रम पत्रिकेच्या विषयाचे श्रेय जाते. आणि त्यांनीच या कार्यक्रम पत्रिकेत ‘अशोक विजया दशमी’ हा शब्द प्रयोग टाकला आहे आणि तो कसा? तर कंसात! म्हणजे बाबासाहेबांना आवडेल न आवडेल, या भीतीने!
अर्थात – धम्मदीक्षा समारोहाच्या इतिहासात ‘अशोक विजयादशमी’ या शब्दाला स्थान डॉक्टर आंबेडकरांनी दिलेले नाही. ते श्रेय या सामोरोहाचे चिटणीस वामनराव गोडबोले यांचे आहे याद वाद नाही.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा अशोक विजयादशमी या दिवशीच साजरा झाला पाहिजे. जे लोक १४ ऑक्ट. ला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतात त्यांनी कृपया डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८(३) पान क्रमांक 482,485 पाहावे
यात बाबासाहेब छोटेखानी संदेशात म्हणतात “बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे .येत्या दसऱ्यास तारीख १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे”
विजयादशमीचा दिवस धम्म दिक्षेसाठी साधण्यात अत्यंत औचित्य आहे. विजयादशमी ही महान बौद्ध सम्राट राजा अशोकाच्या विजयाचा दिवस म्हणून साजरी केली जाते. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८(३) पान क्रमांक 482)
या बौद्ध दीक्षेच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्धजन समितीच्या नागपूरच्या शाखेवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार समितीचे चिटणीस वा. मो. गोडबोले यांनी धम्म देक्षेचा कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने दिनांक २१ सेप्ट. १९५६ रोजी समितीच्या वतीने पत्रक प्रसिद्ध केले आणि ते भारतातील सर्व आंबेडकरी चळवळीतील लोकांना पाठविले. ते पत्रक खालील प्रमाणे – “Revered Dr.BABASAHEB AMBEDKAR, the founder and president of Buddhist society of India- The bhartaiya bauddha janata samiti- shall embrace buddhism at the ceremony to be held at Nagapur at 8 am on the Vijaya dashamai day sunday 14th Oct 1956. bhikku Chandramani Maha Thera of Burma, Now in India shall perform the ceremony”
आता हा संदेश नीट वाचला असता असे लक्षात येते की, वामनराव गोडबोले यांनी या पत्रकात ‘विजयादशमी ‘ हा शब्द प्रयोग केला आहे आणि डॉ.आंबेडकर यांना “दसरा सिम्मोलंघन”
(विजयादशमी) हा दिवस अपेक्षित आहे . साधी समज आहे कि दिवस मुकर्रर केला म्हणजे तारीख द्यावी लागेल त्या अर्थी बाबासाहेब यांनी पुढे तारीख दिली आहे १४ऑक्टोबर १९५६.
विशेष म्हणजे आधी तारीख व नंतर दिवस द्यायचा प्रघात आहे पण डॉ.बाबासाहेबांनी आधी दिवस आणि नंतर तारीख दिली आहे . डॉ.बाबासाहेबांच्या कोणत्याही पत्रात , साहित्यात , संदेशात अशी उलट मांडणी भेटणे कठीण आहे .कोणताही माणूस आधी तारीख आणि नंतर दिवस लिहितो . पण येथे आधी दिवस दिला त्याचा अर्थ स्पष्ट आहे . तारखेला खास असे महत्व कोठेही त्यांनी नमूद केलेले नाही पण दसरा सिम्मोलंघन (विजयादशमी) हा शब्द त्यांनी स्पष्ट नोंदविलेला आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘धम्मदिक्षा दिवस’ दसरा सिम्मोलंघन (अशोकविजयादशमी) चे महत्व ओळखून आणि त्यादृष्टीने येणारी तारीख १४ ऑक्टोबर १९५६ निवडली, ती १४ऑक्टोबर म्हणून नव्हे तर दसरा सिम्मोलंघन (‘विजयादशमी’) म्हणून त्यामुळे काही लोक म्हणत असतील कि धम्मदिक्षा दिन हा १४ऑक्टोंबर ला साजरा करायला हवा पण हे अत्यंत चूक आहे.
संग्रहित mn sonawane pune
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत