युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आपण..

डी. एस. सावंत
भारतातील विषमतावादी व्यवस्थेने, हजारोवर्ष शूद्रादीअतिशूद्र तसेच अस्पृश्य ठरवलेली माणसं त्यांच्यावरील अमानुष अत्याचाराने गांजून गेली होती आणि त्यामुळेच ते आपल्या उद्धाराची जणू काही वाटच पहात होते. त्यांचे ते अमानुष, रोज मरत मरत जगणे त्यांना असह्य होत होते, त्यामुळे त्यांना विषमतेचा संहार करणारा एक संहारक हवा होता,आकाशाततील सूर्य अंधाराचे साम्राज्य नष्ट करत होता परंतु, भारतातील अस्पृश्यांच्या जिवणातील अंधकार नष्ट करणारा एक प्रज्ञासूर्य, दुःखितांचे, पीडितांचे, शोषितांचे अश्रू पुसणारा एक क्रांतीसुर्य हवा होता. विषमतेची विषवल्ली ठेचणारा व समतेचा जागर करणारा, निराधारांचे दुःखअश्रू पुसून आधार देणारा, आधारवड हवा होता. त्यांची ही स्वप्नपूर्ती म्हणजे 14 एप्रिल हा दिवस….!
14 एप्रिल ही केवळ एक तारीख नव्हे, तर वर्णाश्रम धर्माच्या ठेकेदारांनी येथील कोट्यावधी लोकांना अमानुषपणे चिरडले होते, मुरडले होते आणि निर्दयीपणे भरडले होते, अशा सर्वांसाठी हा दिन मुक्तीदिनच होता आणि आहे!.
14 एप्रिलला एक महामानव जन्माला आला आणि त्यांनी विषमतेला समतेने, अन्यायाला न्यायाने, अंधकाराला स्वयंप्रकाशाने आणि अज्ञानाला स्वयंप्रज्ञने पराभूत केले. 14 एप्रिलला काळोखाच्या साम्राज्याला चिरणारा निखळ, तेजस्वी किरणोत्सव जन्माला आला. युगानयुगाच्या वर्णव्यवस्थाप्रणित गुलामगिरीतून मुक्त करणारा, मुक्तिदाता जन्माला आला. जीर्णरूढीचे साखळदंड तोडणारा, पाण्याला पेटवणारा, बहुजनपोषित परंतु धर्माधिष्ठित,
कर्मठीमंदिराचे साखळी तटबंध भिरकावून देणारा लढवय्या जन्माला आला, मनुस्मृतीला जाळून नालंदा, तक्षशिलेचा बदला घेणारा आणि पर्यायाने संविधानरुपी “रसद” पुरवणारा पालनहार जन्माला आला. येथील करोडो मुक्याना आपल्या सिंहगर्जनेने अश्वस्थ करणारा मूकनायक जन्माला आला. अशक्यतेला शक्यतेची झालर लावणारा, समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायाचा उद्घोष करणारा, मानवी हक्काचा वैश्विक चॅम्पियन, कल्पनेपेक्षाही भव्य, कल्पनातीत महामानव जन्माला आला आणि या देशातील शोषित, पीडित, वंचित, बहुजन घटकांचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा उद्धार झाला! त्या उद्धारकर्त्याचे नाव परमपूज्य, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.
डॉ बाबासाहेबांनी हे परिवर्तन काही जादूची कांडी फिरवून केलेलं नाही, किंवा कोणताही चमत्कार करून केलेले नाही तर, रात्रीचा दिवस करून, अपार अभ्यास करून, कष्ट करून, स्वतःला चंदनाप्रमाणे झिजवून, महाकाय प्रज्ञेचा यज्ञ पेटवून, स्वतःला जाळत राहिले, रोजचा जीवनमरणाचा संघर्ष करून पाच हजार वर्षाची विषमतावादी विषवल्ली ठेचून काढली, तेव्हा कुठे सामाजिक समतेची आणि स्वातंत्र्याची पहाट आपणाला पाहायला मिळाली आहे. तेव्हा कुठे ज्ञानाचा प्रकाश कोट्यावधींच्या घरापर्यंत, झोपड्यापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसत आहे.
परंतु ज्या महामानवाने आयुष्याचा ज्ञानकुंड पेटवून तुम्हाआम्हासाठी आयुष्यभर जळत राहिले, त्यांच्या स्वप्नांची पर्वा आम्ही कुणी केलेली नाही, याला काय म्हणावे? ज्यांच्या ज्ञानऊर्जेने भारताच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विकासाचा रोड मॅप तयार झाला त्यांच्या विविध ग्रंथांचा आधार घेऊन वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले त्यामध्ये भारतात रिझर्व बँक तयार झाली. ज्यांच्या ज्ञानाने देशात महाकाय धरणे उभारून पाण्याचा प्रश्न सोडवला गेला, एवढेच नव्हे तर सन 2000 पर्यंतच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची तजवीज झाली. देशातील या धरणाद्वारे वीज निर्मिती करून खेड्यापाड्यातील अंधकार दूर केला गेला. विजेचे नियोजन करून दिले. त्याच बरोबर कामगार क्षेत्रामध्येही आमुलाग्र बदल घडवून आणले. कामाचे तास, सुट्टी, रजा, स्त्रियांना समान वेतन, प्रसूती रजा इतकेच नव्हे तर, कामगारांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी ट्रेड युनियनला परवानगी देण्यात आली. देशातील तरुणांना नोकऱ्यासाठी त्यांच्या राखीव जागांच्या तरतुदी, रीजर्वेशन इंन प्रोमोशन, रिटायरमेंटल बेनिफिट, पेन्शन, बेकारभत्ता असे एक ना अनेक लोकउपयोगी कायदे त्यांनी तयार केले तसेच स्त्रियांच्या विकासासाठी हिंदू कोड बिल आणि संपूर्ण भारताच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय संविधान निर्माण केलं आणि त्याद्वारे हा देश,
आणि इथला माणूस समृद्ध करण्याचा प्रयत्न केला.
एवढेच नव्हे तर स्वतः झळ सोसून एकाद्या राजा महाराजाला लाजवेल अशी शैक्षणिक संकुले उभा करून येथील दलित, शोषित,पीडित, वंचित आणि बहुजन घटकाला हक्काचे ज्ञानपीठ तयार करून दिले. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन आज अनेकजण प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, आयएएस आयपीएस, पीसीएस सर्विसेसमध्ये आज आपणाला दिसतात. परंतु अपवाद वगळता आम्ही एवढे करंटे निघालो की, आम्ही काही नवनिर्माण तर केले नाहीच, परंतु जे बाबासाहेबांनी निर्माण केले ते सुद्धा आम्हाला टिकवता येईना, जतन करता येईना. ते प्रामाणिकपणे जतन करून त्याचे विस्तारीकरण करण्याची गोष्ट दूरच, उलट हजारो हेवेदावे, हे तुझे कि, माझे असे वाद करून आपली बौद्धिक आणि वैचारिक दिवाळखोरी घोषित करीत आहोत. या वास्तु साहेबांच्या निढळाच्या कमाईच्या आहेत तसेच त्यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या ह्या वास्तू आज विपन्नावस्थेत आहेत. बाबासाहेबांनी स्वतःच्या खिशाला टाच देऊन, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता पदरमोड करून ह्या संस्था निर्माण केलेल्या आहेत याची आम्हाला जाणीव राहिली नाही म्हणूनच असे विदारक चित्र आम्हाला पाहायला मिळत आहे.
सरकारमधील आपली भागीदारी म्हणजेच “प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन” या रिप्रेझेंटेशनला इथल्या प्रस्थापीत व्यवस्थेने “राखीव जागा” हे गोंडस नाव देऊन, इथल्या लाभार्थींची अमर्याद टिंगल-टवाळी केली आणि करत आहेत. राखीव जागा म्हणजे आपलं प्रतिनिधीत्व, बाबासाहेबांनी प्रस्थापित राजकीय मंडळींचा रोष पत्करून एससी-एसटीसाठी राखीव जागा आणि ओबीसीसाठी राखीव जागेसाठी विशेष तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये करून ठेवल्यामुळे आज आपण जे लायक झालो आहोत ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे, अन्यथा चाकरी आणि ढोर,बकरी शिवाय आपल्याला पर्याय नव्हता हे आपण सोयीने पूर्णपणे विसरलो आहोत. जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत राखीव जागा राहतील अशी आपली भूमिका असली तरी साडी आणि माडीत मशगुल असणारे रिझर्वेशन वाचवण्यासाठी किती जागरूक आहेत हा संशोधनाचा विषय आहे. एल.पी.जी.अर्थात लीबरलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेट डायजेशन यामधील जे प्रायव्हेडायजेशन म्हणजेच खाजगीकरणामुळे बाबासाहेबांनी कठोर परिश्रमाने निर्माण केलेला “सामाजिक संरचनेचा ढाचा” पूर्णपणे उध्वस्त केला गेला आहे, परंतु माझी पाळी आलेली नाही त्यामुळे मला त्याचे काय? अशा अविर्भावात आपले वर्तन चालू आहे. ही निद्रस्तता, ग्लानी आहे हे किंवा जे तुम्ही-आम्ही झोपेचे सोंग घेऊन बसलो आहोत याच्या सारखी एक दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही.
बाबासाहेबांच्या महान कार्यामुळे लाभान्वित झालेला संपूर्ण एससी एसटी ओबीसी समाज मिळालेल्या आर्थिक लाभांप्रति तसेच पुढच्या पिढ्यांप्रति गांभीर नाही हे फार दुर्दैवी आहे त्यामुळे आपली वाताहत होताना दिसत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थकारणाचा अभ्यास करून समाजामध्ये आर्थिक जागृती करण्याचा प्रयत्न केला ते लोन आपण पुढे नेऊ शकलो नाही समाजामध्ये छोटे-मोठे धंदे,उद्योग, व्यापार चालू करून समाजाच्या प्रगतीचा मार्गचोखाळता आला असता परंतु समाजातील कमी शिकलेली पिढीला व्यापार उद्योग सक्षम करू शकलो नाही. सर्विस इंडस्ट्रीचेही तसेच आहे सहकारी संस्था, सहकारी बँका, खाजगी विमा व्यवसाय, कोरियर सेक्टर अशा विविध सेक्टर मध्ये आपणाला बरंच काही करता आलं असतं तिथेही आपण काही लक्ष घालत नाही अशी स्थिती आहे बाबासाहेबांमुळे लाभान्वित झालेल्या पिढीने कमीत कमी 50 गरीब होतकरू लोकांचा गट करून त्यामध्ये कमीत कमी दहा कुटुंब तरी आपल्या पायावर उभा करता येतात का असे प्रयोग केले पाहिजे तरच समाज आर्थिक बाबतीत टिकून राहू शकतो स्वाभिमानाने वाटचाल करू शकतो पण तसे होताना दिसत नाही
आपण राजकीय ऐक्य प्रस्थापित करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असलो तरी आपणाला बाबासाहेबांनी सदधम्म दिला आहे त्या माध्यमातून आपण निष्ठेने काम करायला हवे होते मात्र आम्ही चिरीमिरीच्या राजकारणात व्यस्त आहोत. आज पर्यंत आपण समाजकारण आणि राजकारण यामध्ये फरक करू शकलो नाही, राजकारणात समाजकारण घुसळून राजकारणाचा पुरा बट्ट्याबोळ करून ठेवलाय आणि समाजकारणात राजकारण घुसडून तू या पक्षाचा आणि मी त्या पक्षाचा असे पक्षपात करून समाजाचे अधःपतन सुरू आहे या सर्वांच प्रमुख कारण म्हणजे आपण बाबासाहेबांना संपूर्णपणे अपवाद वगळता वाचलेले नाही. वाचत असलो तरी समजून घेतलेले नाही आणि समजत असेल तरी त्या पद्धतीने त्या मार्गाने कुणीही कृती करत नाही त्यामुळे आपली अधोगती कडे वाटचाल चालू आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये हे कुठेतरी बदलण्याची वेळ आलेली आहे
बाबासाहेबांनी समाजकारण, शिक्षण, राजकारण, अर्थकारण, संस्कृती, आरोग्य, कायदा अशा एक ना अनेक विषयांमध्ये आपल्या पराकोटीच्या ज्ञानाने भर घातली आहे परंतु लक्षात कोण घेतो? उपरोक्त ज्या विषयांमध्ये आपलं शिक्षण झालेल आहे असा विषय घेऊन समाजोपयोगी कार्य आपणाला करता आले असते पण मी एकट्याने करून काय होणार आहे, सगळ्यांचे होईल ते माझे होईल,मीच समाजाच्या उत्थानाचा मक्ता घेतला आहे काय अशी मनोवृत्ती समाजासाठी घातक आहे.
आता बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण आला 65 वर्ष होतील बाबासाहेबांच्या नंतर चे साधारण दुसरी ते तिसरी पिढी आहे परंतु आपणाला वरील प्रश्नांच गांभीर्य आहे काय? आपण फार लाईटली आणि इझीली घेतल्यामुळे अशी आपली ही परिस्थिती होते आहे असे आपणास वाटत नाही काय?
आज देशामध्ये प्रतिक्रांतीवाद्यांचे राज्य आलेले आहे देशात धर्मनिरपेक्ष संविधानिक लोकशाही असताना जबरदस्तीने हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व अशा वल्गना केल्या जात आहेत. म्हणून आपण एक होऊन या समरांगणात उतरले पाहिजे. शत्रु आपणाला एक एक करून संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक जीवन उध्वस्त करत आहे. खाजगीकरणामुळे आपले प्रतिनिधित्व संपुष्टात आणले आहे. संविधानिक संस्था मोडीत काढल्याचे चित्र दिसत आहे. लोकशाहीचे पिलर्स उध्वस्त होताना आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत. न्यायालयात न्याय मिळत नाही. ईव्हीएम सारखी व्यवस्था आपल्या लोकशाहीच्या मुळावर उठली आहे. येथील तथाकथित लोकशाहीवादी मंडळी ईव्हीएमच्या विरोधात बोलताना दिसते आहे, परंतु आपल्या राज्यात इलेक्शन लागले की चुपचाप सगळे कामाला लागत आहेत याचे गौडबंगाल कळेनासे झाले आहे. हे घातक आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये. लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी, त्या लोकशाहीचे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही मध्ये रूपांतर करण्यासाठी एकीने झुंजार पुणे लढा देणे, हीच खरी बाबासाहेबांची जयंती ठरावी!! बाबासाहेबांच्या आपार कष्टाची आपण जराजरी जाणीव ठेवली या देशातील एससी एसटी ओबीसी बेजबाबदारपणे वागणार नाहीत अशी आशा वाटते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत