मी स्वत: बौद्ध नाही… तरी..

प्रविण गाढवे पाटील
आज मी डॉ.बाबासाहेबांच्या प्रेरणेतून तयार झालेला आजच्या बौद्ध समाजाच्या बाबतीत लिहिणार आहे….
खरं सांगतो… हा संपूर्ण समाज नेहमीच मला प्रेरणा देतो… यांच्याशी कोणत्याही विषयांवर चर्चा करता येते व वाद घालता येतो… तो मारण्या मरण्याची भाषा करीत नाही… भारताच्या घटनेवर सगळ्यात मोठा विश्वास असणारा व इतरांना विश्वास ठेवायला लावणारा हा सर्वसामान्य लोकांचा समाज आहे…
त्यांच्यातले काही मूलनिवासी वगैरे सारखे प्रवाह जरूर पटत नाहीत… तरी… आजचा बौद्ध समाज हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातला चमकणारा हिरा आहे… स्वत:चे हरवलेले अस्तित्व स्वतंत्रपणे निर्माण करणारा स्वतंत्र भारतातला एकमेव समाज आहे हा…
पण… खूपदा काही जण बौद्ध समाजावर खार खातात… त्यांच्या बाबत काहीही बोलतात… त्यात कोणताच तर्क नसतो. असतो फक्त जातीय द्वेष… आणि इतिहासाचे ओझे असते… असे बोलणारे लोक कधी त्यांचा अभ्यास करीत नाहीत…
बारकाईने पाहिले तर आपल्या सगळ्यांनाच कळेल की हा समाज नुसता बाबासाहेबांचे नाव घेवून थांबला नाही तर,
- अतिशय कठीण काळात यांनी धर्म बदलला ,
- हालाखीच्या परिस्थितीतही गावकीची कामे सोडून दिली,
- पोटाला चिमटा घेवून मुलाबाळांना शिकविलं,
- आरक्षणाने निर्माण झालेल्या संधींचे सोने केलं,
- शहरांकडे जावून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून,
- राजकारणात सहभाग घेवून टिकून राहीला,
- स्वत:चे साहित्य निर्माण करून जगभर पोहचला,
- प्रत्येक सामाजिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरला,
- नेहमीच पुस्तके वाचत व वाटत राहिला, ज्ञान वाढवत राहिला …
बौद्ध समाज अनेक लढाया व संघर्ष करून इथपर्यत आला आहे… म्हणूनच त्यांची प्रगती झाली आहे… आरक्षणाने फक्त संधी निर्माण केली… पण समाजात शिक्षणाचा पगडा नसतांना, जमीन जुमला, इतर साधने नसतांना… उपाशी पोटी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा मंत्र सगळ्या समाजाने पाळला… म्हणून ते इथवर आले आहेत…
आपण सगळ्यांनी डोळे उघडून पाहिले पाहिजे की… इथवर येण्याचा कोणताच शॉर्टकट नाही… त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रयत्न हवे असतात… तो या समाजाने नेहमीच केलेला आहे… आणि महत्वाचे म्हणजे तो इतिहासातही जगत नाही… भूतकाळात त्याच्यांवर झालेल्या अन्यायाची जाणीव मनात ठेवून … भविष्याचा ते वेध घेतात… हा माझा अनुभव आहे….
त्यामुळे अशा समाजावर हल्ला करण्यापेक्षा त्यांच्या कडून शिकले पाहिजे… बाबासाहेबांनी जे सांगितले त्याप्रमाणे त्यांनी इतिहासाची बंधने, धर्माची जोखडं फेकून देवून ते सतत फुलत राहिले… म्हणून बौद्धांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची वेळ आली आहे… ते बाबासाहेबांनी विजन केलेल्या एका स्वप्नाची ते पहाट आहेत… अशी पहाट सगळ्या दबलेल्या व पिचलेल्या समाजासाठी येवो…
लोकांना प्रेरणा देणारा हा समाज… हल्ला करून नष्ट करता येत नाही… येणार नाही… तो नेहमीच लढत राहील… आणि आम्ही त्यांच्या बरोबर लढत राहू…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत