
२२ एप्रिल २०२५ मंगळवार रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसर भागात निष्पाप पर्यटकांवर हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. हा हल्ला कसा झाला, हल्ल्याच्या वेळी सुरक्षा दल का तैनात नव्हते, पाकिस्तानला कसा धडा शिकवला पाहिजे अशा विविध प्रकारच्या चर्चा देशभर सुरू झाल्या आहेत. साहजिकच आहे, देशात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया उमटणारच…
सप्टेंबर २०१६ मध्ये उरी येथे व फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे.
त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तीनही सैन्यदलांचे प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना मोकळे हात देण्यात आले आहे. दुसरीकडे पाकिस्तान पण पूर्णपणे हाय अलर्टवर असल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. आमच्या अस्तित्वाला थेट धोका असेल, तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू अशी धमकी त्यांनी दिली आहे.
पाकिस्तानवर आक्रमण करून पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घ्यायला पाहिजे, असेही वक्तव्य करण्यात येत आहे. परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल, अशी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानशी युद्ध करणे खरंच यावर कायमस्वरूपी उपाययोजना आहे का? त्यामुळे हा प्रश्न सुटू शकेल काय? यावर विचार होणे अगत्याचे आहे.
भगवान बुद्धांच्या जीवनात असाच युद्धाचा प्रसंग आला होता. शाक्य आणि कोलीय यांच्यात रोहिणी नदिचे पाणी वाटपाच्या संदर्भात शाक्याच्या सेनापतीने कोलियांच्या विरुध्द युध्द पुकारण्याचा ठराव शाक्य संघामध्ये मांडला. सिध्दार्थाने या ठरावाला विरोध केला होता. ते म्हणाले होते,
“युध्दाने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसर्या युध्दाची बिजे रोवली जातील. जो दुसर्याची हत्या करतो, त्याला त्याची हत्या करणारा भेटतो. जो दुसर्याला जिंकतो, त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्याला लुबाडतो, त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. हा प्रश्न दोन्हीही बाजूचे प्रतिनिधी निवडून सामोपचाराने मिटवावे.”
दहशतवादामुळे दोन्हीही देशांचे अतोनात नुकसान होत आहे. ही बाजू दोन्हीही देशांनी समजून घेणे गरजेचे आहे. दोन्हीही देशात शांततामय वातावरण प्रस्थापित करून ज्या कारणांनी ही परिस्थिती निर्माण झाली ती दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे हाच मार्ग त्यावर असायला पाहिजे.
हे जर शक्य नसेल तर भारताने आपल्या सिमा इतक्या मजबूत करायला पाहिजे की अतिरेकीच काय एखादा चिटपाखरूही सुद्धा भारताच्या हद्दीत घुसता कामा नये.
खरं म्हणजे युद्धात ज्याचं जळतं त्यालाच युद्धाची खरी किंमत कळते. इतरजणांना
युद्धावर गप्पा मारणे रोमांचकारी वाटत असेल पण जी कुटुंबं या युद्धात त्यांचे नातलग गमावून बसतात, त्यांच्यासाठी युद्ध ही कधीही न भरून निघणारी जखम असते. युद्धामुळे आपण जे सोसत आहोत ते इतरांच्या वाट्याला येऊ नये असे त्यांना वाटत असल्यानेच ते युद्धविरोधी भूमिका घेतात. ज्या लाखो घरातील सैनिक आज सीमेवर तैनात आहेत, त्या घरातील लोक किती तणावात आणि दुःखात बुडालेले आहेत, हे त्यांना जावून विचारा… सिमेवर राहणारे लोक किती तणावाखाली जगत आहेत, हे त्यांना जावून विचारा…
झालाच तर युद्धाचा फायदा कुणाला होतो? युद्धाचा फायदा मुख्यतः शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या देशाला होतो. कारण त्यामुळे त्यांच्या शस्त्रास्त्राची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून ते युद्ध करण्यासाठी चिथावणी देत असतात.
सम्राट अशोकांनी कलिंग देशाशी युद्ध केल्यानंतर युद्धभुमि पाहायला गेले होते. तेथे इतस्ततः मेलेल्या सैनिकांची प्रेते, जखमी झालेल्या सैनिकांचे विव्हळणे, त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून त्यांचं मन द्रवले. त्यांनी भगवान बुद्धांचा धम्म स्वीकारला.
भारत ही भगवान बुद्धाची भुमी आहे. या भुमीत द्वेश, हिंसा व अशांततेला थारा द्यायला नको. आंतराष्ट्रीय मंचावर भारताचा गौरव सांगताना शांतताप्रिय बुद्ध सांगण्याशिवाय पर्याय नसतो. सभ्य देश म्हणून आजपर्यंत जी भारताची प्रतिमा तयार झाली आहे, ती मिटवण्याचा प्रयत्न होऊ नये. जपानवर पडलेल्या अणुबॉम्बचे दुष्परिणाम लोकांना ज्ञात असताना, कोणत्याही देशातील जनता युद्धाला समर्थन देईल असे वाटत नाही. याची जाणीव युद्धाची भाषा करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
प्रत्येक देश हा अण्वस्त्रसज्ज झालेला आहे. त्यामुळे त्याची धग आपल्या देशालाही निश्चितपणे लागणार आहे. त्याचे दुष्परीणाम कित्येक वर्षे भारतीयांना भोगावे लागतील. भारताच्या लष्करी क्षमतेवर सर्वांचाच पूर्ण विश्वास आहे. ते एका दिवसांतही पाकिस्तानला धूळ चारतील. पण त्यापुढे काय? काय त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेला रुपया वधारणार आहे? डिझेल-पेट्रोलच्या किंमती कमी होणार आहेत? परदेशी गुंतवणूक, नवे उद्योग वाढणार आहेत ? गरीबी, बेरोजगारी, महागाई, रोगराई कमी होईल? शिक्षणाचे प्रश्न मिटतील? शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बालमृत्यू, कुपोषण थांबतील? कोणता फायदा होणार हे एकदाचे देशवासीयांना या लोकांनी समजावून तरी सांगावे…
आर.के.जुमळे
अकोला
दि. ३०.४.२०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत