मुख्यपान

जागृत भारत विशेष.

बधिर मेंदूच्या लोकांसाठी

✒️✒️✒️✒️✒️✒️
बाबा बंड आणि भक्त अंध !

“दो करोड नोकरीया लाऊंगा,” असे म्हणणाऱ्या मोदींनी आठ चित्ते आणले. ठाकरेंनी आठ पेंग्विन आणले. दुसरीकडे राहूल गांधी विचारतात, नोकरी कुठे आहे? हा प्रश्न राहूल गांधींनी नव्हे तरूणांनी विचारला पाहिजे.
पण तरुण वेगळ्याच नादात आहेत. वेगळ्याच नशेत आहेत. नशा तिच. धर्म नावाची अफूची गोळी. ही अफुची गोळी देऊन तरूणांना नशेत ठेवलेले आहे. तरूणांना कधीच प्रश्न पडत नाही. प्रश्न राहूल गांधींना पडतो. आणि तरीही पप्पू म्हणतात. खरे पप्पू तर तरूण बनलेत.

या तरूण पप्पूंना कदाचित नोकरी, कामधंद्याची गरज नाही. त्यांना राममंदिर मिळाले. आता काशीमंदिर मिळेल. सरदार पटेल यांचा भव्य पुतळा मिळाला. आता समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मिळणार आहे. बुलेट ट्रेन मिळाली. नवीन लोकसभा इमारत मिळणार आहे. तर मग, कशाला हवी नोकरी ? कशाला हवा कामधंदा ? नोकरी हवी, कामधंदा हवा, याचे भान तरूणांना उरलेच नाही. ते धर्माच्या नशेत चूर आहेत. धर्म ही अफूची गोळी आहे, असे कार्ल मार्क्स भारतीय तरूणांचा अभ्यास करून म्हणाले असतील, कदाचित.

महाराष्ट्र काही प्रमाणात पुरोगामी होता. आता तर भाजप, शिवसेना, मनसे यांनी हिंदुत्वाची दुकाने थाटली आहेत. सामान्य माणूस त्याला राजकारण समजतो. हे राजकारण नाहीच.
हिंदुत्वाचे पेटंट कोणाकडे, हा वाद चालू आहे.
एकनाथ शिंदे आणि कलापथकाने तर हिंदुत्वासाठीच शिवसेना सोडली म्हणे. ????

ठाकरेंचे हिंदुत्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सहवासाने धुसर झाले होते. अस्पष्ट झाले होते. बाटले होते. फडणवीस आणि कलापथकाने तर हिंदुत्वाचा ठेका घेतलेला आहे. भाजपने हिंदू धर्माचे पेटंट आधीच घेतलेले आहे. जर तुम्हाला हिंदू म्हणवून घ्यायचे असेल, मिरवायचे असेल, कोणाला सांगायचे असेल तर यांच्या दुकानातून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. जरी आपले आईबाप हिंदू असले तरीसुद्धा.
जसे जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, जातीचा दाखला घेतला जातो. तसा हिंदुत्वाचा दाखला. बाप आपल्यासमोर मेला. आपणच जाळला. आपणच पुरला. पण ते खरे कि खोटे याचे प्रमाणपत्र सरकारी दुकानातून घ्यावे लागते.

मनोहर जोशींचा दगडाचा गणपती दूध पीत होता. नरेंद्र मोदींचा कोरोना थाळी वाजवली कि पळ काढत होता. एकनाथ शिंदेंचा कारभार दहीहंडी फोडणारा गोविंदा करीत होता. सेमीकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्र सोडून गुजरात ला नेला. आणि शिंदे फक्त गणपतीची आरती करण्यात व्यस्त होते. कॅमेराची फौज घेऊन. तरूणांनी नोकरी मागण्याऐवजी दहीहंडीचा गोविंदा आणि गणपतीचा पुजारी बनले पाहिजे. तेथेही बिनकामाचा, बिन नोकरीचा बक्कळ पैसा मिळतो. वर्गणी जमा करता करता तो दाऊद, गवळी, राजन केंव्हा बनतो हे, त्याला काय, त्याच्या बापालाही कळत नाही.
गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याचे आश्वासन शिंदेंनी देऊन त्यावर कडी केली.
गणपतीची आरास, स्थापना, आरती, विसर्जन करणाऱ्यांना सुद्धा नोकरीत आरक्षण का देऊ नये ? याच हिंदुत्वासाठी शिंदेंनी ठाकरेंना सोडले.

महाराष्ट्र पुरोगामी म्हणवून मिरवत होता. आता महाराष्ट्राने यु टर्न घेतला आहे. महाराष्ट्र प्रतिगामी होत आहे. फुले, शाहु, आंबेडकर यांचे पुतळे हटवून साधू, बाबा, मां चे पुतळे उभारले जातील.

असाच फॉसीझम इटलीत आला होता.
असाच नाझीझम जर्मनीत आला होता.
दोन्ही देशांचा पन्नास वर्षे सत्यानाश करून गेला.
असाच इझम इराणमधे आला होता.
असाच इसीस इझम लेबनॉनमधे आला होता.
असाच तालीबान इझम अफगाणिस्तानमध्ये आला होता.
*असाच पाक इझम *पाकिस्तानमध्ये उफाळून येतो. त्यातून फक्त अतिरेक्यांचे उत्पादन होते.*
भारतसुद्धा त्याच दिशेने जात आहे. येथे हिंदु इझम धुमाकूळ घालत आहे. हा इझम फक्त परधर्मियांचे शिरकाण करीत नाही, पुढे जाऊन स्वधर्मियांचेही भरीत करतो. कोणताही धर्म पहिल्या पायरीवर असला तर समाज धारण करतो.
धर्मो धारयते प्रजा.

धर्म दुसऱ्या तिसऱ्या पायरीवर पोहचला कि, तो अधर्म बनून समाजकंटक बनतो.
धर्मो हंतयते प्रजा.

आमदार, खासदार, मंत्रींच्या कपाळावरचा लांबलचक, गोलमटोल टिळा पाहून मुर्खांना वाटते, हा पवित्र आहे. याला चारित्र्य आहे. पण नाही. हाच चोर आहे. हाच बलात्कारी आहे. याची संपत्ती मोजा तेंव्हा कळेल.
पण आज हे कळण्याच्या मनस्थितीत तरूण नाहीत.

इझम म्हणजे शब्दश: अर्थ वाद म्हणतो. वाद म्हणजे संवाद नव्हे, वितंड. श्रेष्ठत्वाचा वाद. वंशाचा वाद. वाद म्हणजे नशा. ज्यामुळे माथा फिरतो. कोणीतरी एक माथेफिरू पुढे पळतो. त्याच्यामागे दुसरा पळतो. दुसऱ्याची पळण्याची गती आणि स्वत:भोवती फिरण्याची गती एकाच वेळी असली कि, या भुमितीतून स्वत:चा अक्ष कलतो. तिरकस होतो. सुर्याच्या भोवताली पृथ्वी फिरते. एका परिभ्रमणाला ३६५ दिवस. तशीच स्वत:भोवती फिरते. परिवलनाला २४तास. या प्रक्रियेतून पृथ्वीचा आस २३|| अंशाने कलला आहे. हे पृथ्वीला कळत नाही. ते खगोल शास्रज्ञाला कळते. आस कलल्यानेच पृथ्वीवर ऋतू होतात. वारा वादळ पाऊस, भुकंप होतो, असे शास्त्रज्ञ सांगतात.
तरूणांचा मेंदूही असाच कलतो. त्यातूनच दंगा फसाद होतात.
कोणी ईश्वराचा संदेश म्हणतो. कोणी अल्लाचा आदेश म्हणतो. कोणी आकाचा फर्मान म्हणतो. कोणी बाबाचा उपदेश म्हणतो. हे तरूणाला कळत नाही. मानसशास्रज्ञाला कळते. समाजशास्रज्ञाला कळते. तटस्थ असलेल्या त्रयस्थाला कळते. ऑब्जेक्टला कळत नाही. ऑब्झरव्हरला कळते.

भारतात मुसलमान हिच समस्या सांगून तरूणांचे मेंदू ट्वीस्ट करीत आहेत. भीतीचे जहरी इंजेक्शन देऊन मेंदू निकामी करीत आहेत. धर्माची गोळी देऊन बुद्धी भ्रमिष्ट करीत आहेत. हे काम काही तथाकथित धार्मिक संस्थांनी केले असते तर क्षम्य होते. पण सरकार नावाची राजकीय संस्था हे काम करीत असेल तर त्यांचा उद्देश तरुणांनी समजून घेणे आवश्यक आहे. कारण संपत्ती व तिजोरी राजकीय संस्थांच्या हातात असते.
तरूणांना धर्माची, अफूची, गुंगीची गोळी देऊन बधीर केले जाते. संपत्ती, तिजोरीच नव्हे देश विकायला काढला तरी लक्षात येत नाही. भक्तांना कळतही नाही कि साधूबाबाने किती संपत्ती विकली, पसार केली .साधूबाबा खरा विरक्त, वैरागी असता तर ही संपत्तीची हेराफेरी, मालगुजारी केलीच नसती. हे भक्तांना कळतच नाही.
बाबा बंड आहे आणि भक्त अंध आहेत. *भारत आता या स्थितीतून जात आहे. *सरकारी संस्थाने विकून वैयक्तिक लाभ घेत आहेत. चित्ता आणला, नोकरी कुठे आहे ? पेंग्विन आणला, नोकरी कुठे आहे ?तरुणांनो सांगा “पप्पू कोण” ?*

शहरांची नांवे, किल्ल्यांची नावे, विद्यापिठांची नावे बदलण्याचा उपक्रम चालू आहे. नवीन निर्मीती करण्याऐवजी जुन्यावर नवा शिक्का मारत आहेत.
क्रियटीव्हिटी संपली. इडीटींग करीत आहेत. रियालिटी नाही. तोतयागिरी चालू आहे. यातून तेढ निर्माण करणे, माथी भडकावणे, दंगा फसाद करणे, मताचे धृवीकरण करणे हाच हेतू आहे. हे तरूणांना कळत नाही. कळले पाहिजे. राजकिय पक्षांची क्रियटीव्हिटी संपली किंवा नसली तर धर्माची गोळी दिली जाते.

राजकारणात, शासनात, प्रशासनात धर्म घुसडला कि, येथून परतीचा मार्ग सुरू होतो.
प्रगतीचा मार्ग थांबतो.

– शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!