दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

जेष्ठ साहित्यिक आदरणीय डॉ.यशवंत मनोहर यांना वाढदिवसाच्या मंगल कामना – टीम दैनिक जागृत भारत

मराठी साहित्यात सातत्यपूर्ण रीतीने मूल्य गर्भ अशी साहित्य निर्मिती करणारे जेष्ठ साहित्यिक आदरणीय डॉ.यशवंत मनोहर यांचा आज वाढदिवस. त्यांना प्रदीर्घ, आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो ही मंगल कामना. त्यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका कवितासंग्रहाचे संविधानवादी मूल्यमापन…

तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता :
संविधानवादी मूल्यमापन

डॉ. अनंत राऊत
प्रमुख, मराठी विभाग
पीपल्स कॉलेज, नांदेड.
भ्र.ध्व.९८६०५२५५८८

ई मेल पत्ता -anantraut65@gmail.com

‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ हा डॉ. यशवंत मनोहर यांचा कविता संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. तुरुंग या प्रतीकातून बंदिस्तता, कोंडी, पारतंत्र्य, अंधारमयता, पीडितता, घुसमट इत्यादी अर्थ सूचित होतात. ज्या व्यक्तीने अथवा समूहाने कठोर असा गुन्हा केल्याचे न्यायालयीन प्रक्रियेद्वारे सिद्ध होते, अशी व्यक्ती अथवा समूहाला तुरुंगामध्ये बंदिस्त केले जात असते. विशिष्ट गुन्हा केल्यामुळे त्यांना दिली गेलेली ती शिक्षा असते. त्यांना अशा प्रकारच्या बंदिस्ततेची शिक्षा देऊन कठोर गुन्ह्याच्याद्वारे त्या व्यक्तीने अथवा समूहाने ज्यांच्यावर अन्याय केला, त्यांना न्याय दिला जातो, असे मानले जाते. खरोखरच तो न्याय असतो का हा प्रश्नच आहे. कारण गुन्हेगाराला दिलेल्या शिक्षेतून अन्यायग्रस्त व्यक्ती वा समूहाचे झालेले नुकसान भरून निघतेच असे म्हणता येत नाही.

डॉ. यशवंत मनोहर यांनी लिहिलेली ‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ तुरुंगात बंदिस्त केलेल्या गुन्हेगारांच्या उठावाची कविता नाही. या कवितासंग्रहाच्या शीर्षकस्थानी असलेले तुरुंग हे प्रतीक प्रचलित अर्थापेक्षा निराळ्या अर्थाचे सूचन करणारे आहे. भारतामधील वर्णजातीय विषमतेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेने कोणताही गुन्हा केलेला नसताना जाणीवपूर्वक तळस्तरात ठेवलेल्या भारतीय नागरिकांना शतकानुशतके दृश्य स्वरूपातील भिंती नसलेल्या उघड्या तुरुंगात बंदिस्त केले होते. ही वर्णजातिव्यवस्थेने लादलेली बंदिस्तता भारतीय संविधानाने अधिकृतरीत्या १९५० सालीच उठवलेली असली तरी, जुन्या विषमतावादी व्यवस्थेचे अमानुष अवशेष वरस्तरातील भारतीय नागरिकांच्या मनामध्ये अजूनही वास करत असतात. हेच अमानुष अवशेष आजदेखील असंख्यजणांच्या जीवनाचे तुरुंगात रूपांतर करतात. तळस्तरातील माणसांची ही तुरूंगमयता नष्ट झाली पाहिजे. त्यांना मुक्ततेचा श्वास घेता आला पाहिजे. त्यांना माणूस म्हणून स्वतःचा विकास घडवून आणता आला पाहिजे.या संग्रहातील कविता संविधानवादी साहित्य मूल्यमापनाच्या निकषावर बहुतांशाने टिकणाऱ्या आहेत. या कवितासंग्रहातील विषय आशियाचे स्वरूप बहुतांशी संविधानकेंद्री आहे. कवितांमधील आशयाचा आवाकाही बर्‍यापैकी मोठा आहे. स्फूट कवितेमध्ये व्यामिश्र समाजवास्तवाचा समग्र वेध घेण्याची क्षमता तशी कमीच असते, सदरील कविता संग्रहामधील कविताही त्याला अपवाद नाही. वर्तमान संविधानयुगातील जीवनानुभवांचा आविष्कार करण्याची क्षमता मात्र या संग्रहातील कवितांमध्ये लक्षणीयरीत्या आढळून येते. त्यामुळे संविधानयुगातील मूल्यव्यवस्थेचे काहीसे ज्ञानदेखील यातील कवितांमधून प्राप्त होऊ शकते. या संग्रहातील कवितांना मूल्यमय भावनांतरक्षमता मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे.संविधानध्येयी परिणामकारकता, संवैधानिक नैतिकता, भविष्यवेधी कल्पकतेचे नावीन्य या निकषांवरदेखील यातील कविता टिकते. यातील कवितांमध्ये प्रतिमा रूपकांचे नाविन्य थोड्या प्रमाणात आढळून येते. नाविन्यपूर्ण मिथकांची निर्मितीही यामध्ये कमीच दिसते. या संग्रहातील कवितांमध्ये संविधानयुगातील वाचकांच्या मनाला विधायक असे आवाहन करण्याची एक क्षमता नक्कीच आहे.

‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ या कवितासंग्रहामध्ये संविधानवादी जीवन जाणिवेचा प्रभाव मनोहरांच्या इतर सर्व कवितासंग्रहांच्या तुलनेत अधिक प्रमाणात पडलेला दिसतो. यातील जवळजवळ सर्वच कवितांमध्ये संविधानमूल्यांचे संदर्भ उत्कटपणे आलेले दिसतात. या संग्रहामधून यशवंत मनोहर संविधानवादी भावचिंतन मांडतात असे दिसून येते. प्रथम या संग्रहामध्ये संविधान हा मूल्यसंकल्पनामय शब्द कशा पद्धतीने येतो ते लक्षात घेऊ. सौंदर्यविधान… या कवितेमध्ये यशवंत मनोहर त्यांच्या पद्धतीने संविधानाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करतात. ‘संविधान रचना म्हणजे भारताच्या सेक्युलर डीएनएची रचना. आधुनिक भारताच्या महाकथनाची रचना. संविधान म्हणजे परिपूर्ण भारतीय माणसाचे रचनाविधान. संविधान म्हणजे निरंतर चिकित्साविधानाची निर्मिती. संविधान म्हणजे भारतनिष्ठेचे नीतिशास्त्र.(१८). यामध्ये मनोहरांनी भारताच्या एक राष्ट्र म्हणून असलेल्या अस्तित्वामध्ये सेक्युलारिझम या मूल्याला सर्वाधिक महत्त्व दिलेले दिसते. मनामनात संविधानमूल्ये रुजली तरच परिपूर्ण भारतीय नागरिक बनू शकतो. संविधानातील बुद्धिवाद हाही त्यांनी या कवितेत अधोरेखित केलेला आहे. भारतनिष्ठेचे नीतिशास्त्र इतरत्र कुठेही नसून ते संविधानातच असू शकते,याचीही स्पष्ट जाणीव यामध्ये त्यांनी दिलेली आहे. या कवितेने संविधानाची परिपूर्ण व्याख्या केली असे मात्र म्हणता येणार नाही. भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य,समता, न्याय, बंधुता इत्यादी प्राणभूत जीवनमूल्यांना काव्यमय पद्धतीने यात गुंफले असते तर ही कविता परिपूर्ण संविधान काव्याच्या अधिक जवळ जाऊ शकली असती. भारतात संविधानविरोधी शक्ती मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. वर्तमान कालखंडात तर त्या अधिक प्रबळ होताना दिसतात. संविधान विरोधी शक्ती संकुचित आणि धर्मांध आहेत. त्यांचे डोळे भूतकाळावर खिळलेले आहेत. सेक्युलॅरिझम हे संविधानाचे मूलभूत तत्त्व त्यांना मान्य नाही. ते विशिष्ट धर्माच्या पायावर राष्ट्रउभारणी करू पाहतात. जो पायाच अत्यंत ठिसूळ स्वरूपाचा आहे. स्वातंत्र्य आंदोलनातून तयार झालेल्या प्रगल्भ आणि जाणत्या राष्ट्र पुरुषांनी खूप मोठा त्याग करून आणि प्रचंड मोठे कष्ट करून उभे केलेले हे राष्ट्र धर्मांध शक्ती विस्कटून टाकू शकतात हा फार मोठा धोका वर्तमान कालखंडामध्ये निर्माण झालेला आहे. या धोक्याचा इशारा कवी आपल्या कवितेतून देतात आणि यापुढील लढाई धर्मांध शक्ती विरुद्ध असणार आहे याची स्पष्ट जाणीव देतात. ते लिहितात ‘यापुढील लढाई पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान अशी असणार नाही, हिंदुस्थान विरुद्ध भारत, हिंदूराष्ट्र विरुद्ध संविधानराष्ट्र, फॅसिझम विरुद्ध लोकशाही, समरसता विरुद्ध समता, धर्म विरुद्ध सेक्युलारिझम आणि जय मनू विरुद्ध जय भीम अशी असेल; आणि या लढाईत संविधानास्त्र हेच आमचे एकमेव अस्त्र असेल.'(१३) मोगल राज्यकर्त्यांनी ज्यांचे नामकरण हिंदू असे केले, ते हिंदू लोक संविधान स्वीकारापूर्वीदेखील भारतात होते. परंतु आजच्या अर्थाने ते लोक ‘एकराष्ट्र’ मुळीच नव्हते. आजचे भारत हे राष्ट्र हिंदूराष्ट्र नसून संविधानराष्ट्र आहे. खूप मोठ्या कष्टातून उभ्या राहिलेल्या आताच्या या संविधानराष्ट्राला विस्कटून टाकण्याचे राष्ट्रद्रोही कृत्य हिंदू राष्ट्राची संकुचित भूमिका घेणारे लोक करत आहेत. म्हणून त्यांच्याविरुद्ध संविधानराष्ट्राच्या रक्षणासाठी संविधानास्त्राच्या सहाय्याने लढा देणे अपरिहार्य असल्याची प्रगल्भ अशी जाणीव यशवंत मनोहरांनी या कवितेतून व्यक्त केली आहे. ‘आम्ही हिंदू अथवा हिंदुस्थानीही नाही. आदी आणि अंतीही आम्ही नितळ भारतीय आहोत. संविधानातील उजेडाच्या महोत्सवाचे आम्ही काव्यमय आविष्कार आहोत. आमचे मानवाधिकार जाळणारी मनुस्मृती आम्ही जाहीरपणे जाळलेली आहे. वन मॅन वन व्हॅल्यूला आम्ही भारत म्हणतो. सेक्युल्यारिझमला आम्ही भारत राष्ट्र म्हणतो. आणि संविधानाला आम्ही भारताचे लोक निर्मिणारा राष्ट्रग्रंथ मानतो.’ (१३,१४) कवीची ही जाणीव देखील प्रगल्भ अशी संविधानवादी जाणीवच आहे. ‘एका हातात मनुस्मृती आणि दुसऱ्या हातात भारताचे संविधान हा दुटप्पीपणा आम्हाला मान्य नाही. आम्ही असत्याला असत्य आणि सत्याला सत्य मानतो. जे संविधानाला आपल्या जगण्याचे प्रमाणशास्त्र मानतात त्यांना आम्ही भारताचे नागरिक मानतो. ज्यांना संविधान आपले वाटत नाही, त्यांना आम्ही अभारतीय मानतो. संविधानाला आम्ही भारताचा संस्कृतीकोश मानतो. आम्ही उजेडाची पुस्तके आहोत. आम्ही संविधानजादे आहोत.'(१५) कवीने प्रकट केलेली ही संविधाननिष्ठा मनामनात रुजली की भारत हे राष्ट्र आपोआप एकजीव होऊ शकते, आणि अनेक अंगांनी प्रचंड मोठी प्रगती करू शकते. ‘आमचा भारत तुमचा हिंदुस्तान, तुमचे इरादे संविधानद्रोही, आमचा भारत सेक्युलरशाही.'(१७) इथे मनोहरांनी अत्यंत नेमकेपणाने संविधानवादी जीवनजाणीव मांडलेली दिसते. इतर पाचसहा ठिकाणी संविधान या शब्दाचा थेटपणे वापर करत कवीने संविधान विरोधी शक्तींशी असलेला आपला संघर्ष प्रकट केलेला आहे. आणि मनामनात संविधानातील मूल्यमय उजेड पेरण्याची भूमिका घेतलेली आहे.

या कवितासंग्रहातील अनेक कवितांमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सेक्युलॅरिझम, स्वाभिमान, सत्य, सभ्यता व सौहार्द या मूल्यांवरील निष्ठा प्रकट केलेली दिसते. पाखरांच्या गळ्याभोवती आवळलेले तुरुंग कवीला यातही वाटतात. रोहित माणसाभोवतीच्या कुविचारांचे तुरुंग तोडायला निघाला होता. तुरुंगाच्या प्रतिमेतून व्यक्त केलेली ही स्वातंत्र्यनिष्ठाच आहे. ‘स्वातंत्र्याला तडीपार करणारे, पर्यायांना तुरुंगात सडवणारे हे पारतंत्र्याचे रखवालदार,स्वतंत्र देशात कुठे ठेवायचे?(९,१०), ‘रोहित,तू स्वतंत्र माणसासारखं जगणं निर्माण करण्यासाठी विजांच्या पंखांनी झेप घेतलीस.'(३३), ‘तुझं मुक्तीविधान निळा पक्षी होऊन उडत होतं.'(३६), ‘सत्तेच्या डोळ्याला डोळा भिडवताना लटपटतात, ते पाय स्वातंत्र्याचे नसतात, सत्तेपुढे घोळतात गोंडा ती अस्तित्वे जिवंत माणसांची नसतात.'(६६), स्वातंत्र्य या संविधान मूल्याचा कवीने केलेला हा पुरस्कार महत्त्वपूर्ण आहे.

समता आणि बंधुता हे आमच्या राष्ट्रवादाचे दोन पंख आहेत.(१६) अशी सुंदर मांडणी करून मनोहर पुढे विषमतावादी शक्तींच्या संदर्भात समता या मूल्यांचे मोल मांडतात. ‘चातुर्वर्ण्याच्या गिधाडांनो तुमचा इतिहास म्हणजे तुम्ही समतेच्या खांडोळ्या केल्याचा इतिहास'(२७) आहे. ‘समतेला तुम्ही कर्दनकाळ वाटता, तर सज्जनांना हिटलर.'(३०), ‘विषमतेचा ईश्वरी न्याय टिकविण्यासाठी धर्मांध लोक हे अभियान चालवतात.'(४३). विषमतावाद्यांच्या संदर्भातच भगिनीबंधुता हे मूल्यही मनोहर मांडतात. ‘भगिनीत्वाने आणि बंधुत्वाने तुमचे पित्त खवळते, लोकांना झुंजवण्याची अमानुष सवय जडलेल्या तुम्हा वरिष्ठांना लोकांचे सज्जन संबंध त्रासदायक वाटतात.'(८८). या संग्रहातील कवितांमध्ये न्याय हे मूल्य अन्यायाच्या पार्श्वभूमीवर मांडलेले दिसते. ‘सत्तेने आपणा सर्वांनाच दुःखाच्या कढईत तळले आहे, अन्यायाच्या वणव्यात जाळले आहे.'(६७) अशी मांडणी करत वर्तमान कालखंडातील अनेकविध अन्यायकारी घटनांच्या नोंदी मनोहरांनी यातील कवितांमध्ये केलेल्या दिसतात. ‘मी सेक्युलर आहे बुद्ध, मी भीम सेक्युलर आहे,अंधार पेटवीत गातो, मी माझे सेक्युलर दोहे.'(२१), ‘पर्यायाला धर्मद्रोह ठरवणाऱ्या काळोखवेळी पर्यायाचे सेक्युलर बॅनर होण्याचा धोका, कवितेने पत्करला पाहिजे.'(२३), ‘कविताच कोरील आता, दुनियेच्या काळजावर, प्रेमाची सेक्युलर व्याख्या.'(५०), अशा पद्धतीने सेक्युल्यारिझम या मूल्याचा मनोहरांनी पुरस्कार केला आहे. ‘सत्य भेटावे सत्याला, उजेड भेटावा उजेडाला.'(६८), ‘तुम्ही सांगितले असत्य, तरी लोकांना वाटते सत्य, आणि लोकांना वाटले असत्य तरी मी सांगतच राहील सत्य.'(११०). असा हा सत्याचा पुरस्कार. आपल्या स्वाभिमानाचे अपहरण होणार नाही.(६३) ‘आपल्याच स्वाभिमानाचे प्रेत भक्तिभावाने खांद्यावर वागवतात त्यांना गुलाम म्हणतात.'(६६). असा हा स्वाभीमानाचा पुरस्कार. ‘सौहार्दाला आजारी तोडांचा संसर्ग होत आहे.'(५९), ‘हे फक्तच अर्थमृत आवाज नसतात, तर ते सभ्यतेच्या प्रेतावर नाचणारे बेबंद नर्तक असतात.'(१०५). सौहार्द व सभ्यतेचा पुरस्कार मनोहर अशा भाषेत करतात. संविधानाने पुरस्कारिलेल्या मूल्यांची मांडणी सदरील कवितासंग्रहमध्ये धर्मांध अशा परंपरावादी व स्ववर्चस्ववादी शक्तींकडून संविधानमूल्ये पायदळी तुडवली जात असल्याबद्दलची चिंता प्रकट करत करत केलेली आहे.

देश आणि भारतीयत्व या गोष्टींना संविधानवादी जीवनजाणिवेमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. या संग्रहातून प्रकट झालेले मनोहरांचे कविमन देश व भारतीयत्वासंदर्भातील आपली मूल्यमय भूमिका मांडते. ‘उन्मादांची शस्त्रसामग्री’ या कवितेमध्ये उन्मादी, अतिरेकी, जातीयवादी, देवदैववादी, अंधश्रद्धावादी, दुतोंडे, नंगे साधू, गुंड,डाकू, चोर, बदफैली अशा प्रवृत्तीच्या लोकांचा उल्लेख करून हे लोक म्हणजे माझा प्रिय देश असे मी म्हणणार नाही. अशी भूमिका मनोहर माडतात आणि शेवटी म्हणतात – ‘ एक व्यक्ती, एक मूल्याला प्राण मानणारे, देशाला सतत देत राहणारे, त्या बदल्यात काहीही न मागणारे सरळ मार्गी लोक म्हणजे देश. संविधानाच्या रस्त्याने निघालेली ही स्वच्छ माणसे म्हणजे माझा देश. बुद्ध, फुले, आंबेडकर आणि त्यांच्या नजरेतला भारत म्हणजे माझा देश. माझा प्रिय भारत देश!'(४९).
या संग्रहातील मनोहरांची कविता चिंतनगर्भ स्वरूपाची आहे. मानव्यनिष्ठ भारतीयत्व घडवणारे संविधानमयी नवराष्ट्रचिंतनच ते आपल्या कवितेतून मांडतात. मनोहरांचे हे भावचिंतन भारतीयत्वाची सुंदर अशी व्याख्या करते. ‘भारतीयत्व म्हणजे मानवी सत्त्वाचे असीम सौंदर्य, मानवी स्वातंत्र्याची अंतहीन असीम भरती, कोणालाही विचारता येईल अशी जात मुलखात ठेवू नका, कोणालाही सांगता येईल अशी जात मनात ठेवू नका, कारण जात तुम्हाला माणूस होऊ देत नाही, जात तुम्हाला राष्ट्र होऊ देत नाही.’ (८०) मानवी सत्त्वाच्या सौंदर्याने युक्त स्वातंत्र्याचा आग्रहाने पुरस्कार करणारे जातविरहित लोक म्हणजे भारतीयत्व असेच इथे मनोहरांना म्हणावयाचे आहे. मानव्यनिष्ठ राष्ट्रवादाची ही भूमिका विशाल स्वरूपाची आहे. ती वैश्विकतेच्या पातळीवर जाणारी आहे. ‘वैश्विकतेची तहान लागलेला असीम भारतीयत्वाचा पासपोर्ट तुमच्या डोक्यात पिसारू द्या.'(३१) ही मांडणीही भारतीयत्वाला वैश्विक पातळीवर नेऊ पाहणारीच आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार भारतात आणि जगामध्ये मानवतेची प्रस्थापना करू पाहतो. याच विचाराचा भारतीय संविधानात देखील पुरस्कार केलेला आहे. हा

मानवतेची प्रस्थापना करू पाहणारा विचार भारतीयांच्या मनामनात रुजावा. समग्र भारतीयांनी या विचारांना अनुसरूनच वागावे, अशा प्रकारची कायदेशीर यंत्रणा भारतीय संविधानाने निर्माण केली आहे. या संग्रहातील मनोहरांच्या कवितेलादेखील मानवतेच्या प्रस्थापनेची फार मोठी ओढ लागलेली दिसते.
‘ कविता निर्मिती म्हणजे निखळ माणूसनिर्मिती, आणि माणूसनिर्मिती म्हणजे निखळ कविता निर्मिती, या निष्ठेचा सुंदर धोका कवीने पत्करला पाहिजे.'(२३), ‘व्यापाऱ्यांना आणि नफे खोरांनाना नव्हे, माणसांना जवळ आणणारे लोहचुंबक व्हावे कवितेने आता.'(५१), ‘माणूस निर्मिण्याची, त्याच्या परिपूर्णतेच्या निर्मितीची, तहान नष्ट नाही करता आली माणसाची कोणालाही, माणूस होऊ इच्छिणारी माणसे संपली नाहीत कधीही.'(६४), ‘प्रत्येकच माणसात गदगदून येईल अंतरिक्ष, आणि त्याच्या ओठांवर, हीच कविता असेल साकल्याची! धुरे आणि कुंपणे नसलेल्या माणुसकीची.’६८), ‘एकविसाव्या शतकालाही तुम्ही माणुसकीच्या कंगालीकरणाचे शतक केले आहे, खरेच तुम्ही कोण आहात?'(८४), ‘मला भेटलेल्या पंखांच्या झाडाला जात नाही. नाही धर्म, ते मानीत नाही उपरे, जगातल्या कोणत्याही झाडाला, हे माणुसकीचे झाड बोलत राहते माणसांपुढील संकटानबद्दल.'(९३), ‘दिवस उगवला नाहीतर, त्यांच्या बदली, माणसांनीच उगवण्याची, तयारी करायला हवी, नाहीतर पुढच्या पिढ्यांना, दिवस म्हणजे काय, तेही कळणार नाही, आणि दिवसाचे झाडही, कळणार नाही.'(९६) मनोहरांच्या कवितेमधून आविष्कृत झालेली ही माणूस व माणुसकीवरील निष्ठा अत्यंत मोलाची आहे. कारण ही निष्ठा जितकी वाढत जाईल तितका जगातील माणूस सुखीसंपन्न बनत जाईल. जेव्हा जेव्हा माणसाची माणुसकीवरील निष्ठा ढळते, तेव्हा तेव्हा माणूस विनाश व दुःखाच्या गर्तेतच लोटला जात असतो.

या संविधानवादी मूल्यमय आशियाशिवाय 'तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता' या संग्रहातील मनोहर यांची कविता वर्तमानकालीन फॅसिस्ट प्रवृत्तीची क्रूरता मांडून या प्रवृत्तींना स्पष्टपणे नकार देते. जातीयता व धर्मांधतेची अनेक रूपे मांडून या दुष्प्रप्रवृत्तींनाही नाकारते. आणि मानवतावादी व्यवस्था व संस्कृतीचे नवे पर्याय रुजवू पाहते. मूलतत्त्ववादास, दैववाद व नियतीवाद, पुराणगुंगेपण, भ्रष्ट प्रवृत्ती इत्यादी उपद्रवकारी घटकांना नकार, व्यापकता, सर्वसमावेशकता, बुद्धिवाद, विज्ञानवाद व विवेकवाद यांचा पुरस्कार हीदेखील या कवितेतील आशयाला लाभलेली महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. वर्तमानकालीन सत्ताधीश मंडळी कशी मूल्यभ्रष्ट झाली आहे, आणि ती संविधानाचे आदेश झुगारून किती क्रूर पद्धतीने वागते आहे याचेही संदर्भ या संग्रहातील अनेक कवितांमध्ये आलेले आढळतात. संविधानवादी जीवनदृष्टी या संग्रहातील बहुतांश कवितांमध्ये  ओतप्रोत भरलेली दिसते.

             तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता
             पृष्ठसंख्या-११८
             मौज प्रकाशन गृह मुंबई.४०००५६
             किंमत :२०० रुपये

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!