निवडणूक रोख्यांविरोधात अंतिम सुनावणी ३१ ऑक्टोबरला; योजनेला आव्हान

राजकीय पक्षांना निवडणूक निधी उपलब्ध करून देणाऱ्या निवडणूक रोखे योजनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. या योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिकांवर ३१ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेची बाजू मांडणारे वकील प्रशांत भूषण यांनी सादर केलेल्या निवेदनाची सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दखल घेतली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक रोखे खुले होण्यापूर्वी या प्रकरणावर अधिकृत निर्णय होणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद भूषण यांनी केला. तो खंडपीठाने मान्य केला.
निवडणूक रोख्यांद्वारे उभारण्यात येणाऱ्या निनावी निधीमुळे भ्रष्टाचार वाढतो आणि एक भ्रष्टाचार-मुक्त देश मिळण्याच्या नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होते असा दावा भूषण यांनी केला. त्यावर आम्ही या याचिकांवर सुनावणी घेत आहोत असे न्यायालयाने त्यांना सांगितले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात चार याचिका दाखल असून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. जर एका दिवसात सुनावणी पूर्ण झाली नाही तर १ नोव्हेंबरलाही सुनावणी पुढे सुरू राहील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत