भगवान बुद्धांच्या आयुष्यातील अंतिम काळातील उपदेश.

महपरिनिब्बानसुत्त
नालंदामधील प्रावारिक, आम्रवनात विहार करीत असताना,भगवान धम्म उपदेश भिक्षूंना देत असत, “हे शील आहे,ही समाधी आहे, ही प्रज्ञा आहे.शीलामधून समाधी (ध्यान करण्याची इच्छा) प्रकटते ती महाफलदायी असते. समाधीमधून निर्माण होते चित्त (मन) आणि ते चित्त , मन विकारापासून माणसाला मुक्त करते. जसे की, कामास्त्रव (कामवासनेचे वाईट विचार), भवास्त्रव (मानवी जीवन जगण्याची ओढ), दृष्टिस्त्रव (जे पाहिले त्याबद्दल वाईट विचार) आणि अविद्यास्तव (अज्ञानाने आलेले वाईट विचार).
शील न पाळण्याचे दुष्परिणाम नालंदा इच्छेनुसार वास्तव्य केल्यानंतर भगवान आयुष्यमान आनंदा म्हणाले-
“चल, आनंद! जेथे पाटलिग्राम आहे, तेथे जाऊ! “होय भंते, ” असे आयुष्यमान आनंदने भगवंतांस उत्तर दिले. पाटलिग्रामच्या उपासकांना समजले की, भगवान पाटलिग्राममध्ये आले आहेत तेव्हा ते उपासक जेथे भगवान होते तेथे गेले. भगवंतांना अभिवादन करून ते एका बाजूस बसले. एका बाजूस बसलेले उपासक भगवंतांस म्हणाले,- “भंते! भगवान, आमच्या अतिथीगृहात येण्याचे आमंत्रण स्वीकारावे. “
या आमंत्रणाचा भगवंतांनी मौनपणे स्वीकार केला. पाटलिग्रामच्या उपासकाचे अतिथीगृहात येण्याचे आमंत्रण भगवंतांनी स्वीकारले आहे हे ओळखून तेथून ते उठले, भगवंतांना अभिवादन करून त्यांना प्रदक्षिणा घालून अतिथीगृहाला गेले. तेथे जाऊन त्यांनी अतिथीगृहाच्या आत चारी बाजूंना बिछाना अंथरला. भगवंतांकरिता आसन तयार केले. पिण्याच्या पाण्याची सोय केली. तेलांचे दीप लावून भगवंतांना वंदन करून एका बाजूला उभे राहिले.
एका बाजूला उभे असलेले पाटलिग्रामचे उपासक भगवंतांस म्हणाले, “ते अतिथीगृहाच्या चारी बाजूंना बिछाना अंथरला आहे, आपणाकरिता आसन
लावले आहे. भंते! भगवान जे योग्य ते करा!”
भगवान सायंकाळी भिक्षापात्र हातात घेऊन, भिक्षुसंघासह आवसथागार (अतिथीगृह) गेले. ते तिथे गेल्यानंतर त्यांनी पाय धुतले. त्यानंतर आवसथागारात (अतिथीगृहात) प्रवेश केला. भगवान मध्यभागी असलेल्या खांबाला पाठ टेकून पूर्व दिशेला तोंड करून बसले. पाटलिग्रामचे उपासकदेखील पाय धुवून पूर्व दिशेला पाठ करून, पश्चिमेकडे तोंड करून भगवंतांसमोर बसले.
तेव्हा भगवान पाटलिग्रामच्या उपासकांस म्हणाले, “हे गृहपतीनो! शीलवान मनुष्य दुःशील झाला तर त्याला पाच परिणामांना सामोरे जावे लागते. ते पाच परिणाम कोणते ? तर गृहपतींनो,
1)पहिला परिणाम शीलापासून दुरावलेला मनुष्य आपली संपत्ती हरवून बसतो.
2)दुसरा परिणाम वाईट शीलाचे अपयश सर्वत्र फैलावते.
3)तिसरे, वाईट शीलाचा मनुष्य कोणत्याही सभेत जावो, मग ती ब्राह्मणांची असो, ती क्षत्रियांची असो, ती गृहपतींची अथवा श्रमणांची असो, तो तेथे भयभयभीतपणे घाबरून चुपचाप बसतो.
4)चवथा परिणाम बहुशीलांचा माणूस बेहोशीत मरण पावतो.
5)तद्नंतर तो मनुष्य मेल्यानंतर त्याला सुगती प्राप्त होत नाही हा आहे पाचवा परिणाम. अशा तऱ्हेने है। गृहपतींनो, केवळ शील नसेल तर, चांगले शील नसेल तर, माणसाला ह्या पाच परिणामांना भोगावे लागते. “
शील पालनाचे गुणधर्म
“तसेच, हे गृहपतींनो, शीलानेयुक्त अशा शीलवंत माणसात पाच चांगले गुण आढळतात. ते पाच चांगले गुण कोणते ?’
१. “गृहपतींनो, शीलवान मनुष्य कोणतीही चूक न करता मोठी धन-संपत्ती प्राप्त करतो. हा शीलवंत असल्याचा पहिला फायदा आहे.”
२. “आणि गृहपतींनो, शीलामुळे शीलवंताचे मंगल यश चोहीकडे पसरते, हा दुसरा फायदा आहे. “
३. “आणि गृहपतींनो, असा शीलवान मनुष्य कोणत्याही सभेत जाऊ द्या,मग ती सभा ब्राह्मणांची असो किंवा क्षत्रियांची असो, ती सभा गृहपतींची असो, अथवा श्रमणांची, तो आपल्या ज्ञानाने ती सभा (परिषद) जिंकतो. “
४. “शीलसंपन्न मनुष्य संपूर्ण जागृतावस्थेत निधन पावेल हा उत्तम शीलाचा फायदा आहे.”
५. ” आणि पाचवा फायदा शीलवान मृत्यू पावल्यानंतर त्याला सुगती प्राप्त होते. हा शीलसंपदेचा पाचवा व अंतिम फायदा आहे.”. तेव्हा भगवंतांनी पाटलिग्रामच्या धम्म उपासकांना अनेक कथा कथन केल्या. त्यांचा अंगिकार करा, असे ते म्हणाले. तद्नंतर खूप वेळ झाला आहे, असे समजून भगवान म्हणाले, “हे गृहपतींनो रात्र झाली आहे. आता योग्य ते तुम्ही करा. ‘
“ठिक आहे भंते,” असे त्यांनी उत्तर दिले. ते सर्व उपासक आपापल्या आसनांवरून उठले. भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांना वंदन करून निघून गेले. पाटलिग्राचे उपासक गेल्यानंतर भगवान ‘शून्य आगारात प्रविष्ट झाले.
प्रा.नरेंद्र गव्हाणे.धुळे (मो.9168999169)
चक्रवर्ती सम्राट अशोक सेवासंघ.महाराष्ट्र राज्य
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत