महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

विज्ञानवादी होण्यासाठी कुतूहल आवश्यक – डॉ. विजय रणदिवे.

अगदी उत्क्रांतीच्या सुरवातीच्या काळापासूनच कुतूहल (curiosity ) हा मानवी मेंदूचा आवडता विषय राहिला आहे. “हे काय आहे? हे असं का बरं आहे? हे असंच का बरं आहे?” असे प्रश्न मानवाला पडत आलेले आहेत.
कुतूहल शमवणे आणि नव्या गोष्टींचा शोध घेणे ह्यात त्याला रोमांच मिळतो.

पाऊस पडतो, विजा कडाडतात, भूकंप येतो, पूर येतो, चक्रीवादळ, ज्वालामुखी, गारपीट हा काय प्रकार आहे? हे प्रश्न त्याकाळी मानवी मेंदूला हैराण करुन सोडायचे. तर्क, विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्याकाळी आपल्या प्राथमिक आणि कच्च्या अवस्थेत असल्यामुळे त्याच्या त्या अपरिपक्व बुद्धीला जे पटेल ते अनुमान लावून त्यालाच सत्य मानणे अशी त्याची संशोधक वृत्ती होती.

साथीचे आजार पसरायचे, माणसं पटापट मरायची, हे सगळं होण्यामागे कसलातरी व्हायरस असावा हे त्याच्या अविकसित मेंदूच्या आकलना बाहेरची गोष्ट होती. जे डोळ्यांनी दिसत नाही, ते बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकयंत्र उपलब्ध नव्हते. मग हे सगळं घडून येण्यामागे कसलीतरी अदृश्य शक्ती कार्यरत असावी असा कयास त्याच्या मेंदूनी बांधला. काळेकुट्ट ढग, त्याआडून लखलखणाऱ्या वीजा, मुसळधार कोसळणारा पाऊस, सुसाट सुटलेला वारा आणि तुडुंब भरून वाहणाऱ्या रुद्ररूपी नद्या बघून तो घाबरला. निसर्ग जितका लोभस आहे तितकाच रौद्र आहे हे त्याला कळायला लागलं परंतु निसर्ग असा अनियमित अनिश्चित का बरं आहे ह्याचं कारण त्याला कळायला मार्ग नव्हता.

कुतूहल शमवण्यासाठी मग त्यानं अदृश्य दैवी शक्तीची कल्पना केली. माणूस जसा प्रशंसेनं प्रसन्न होतो आणि निंदेनं नाराज होतो तसाच तो अदृश्य देव असावा असं त्याला वाटलं. त्या अनिश्चित अनियमित लहरी अदृश्य देवाला प्रसन्न करुन त्याची कृपादृष्टी प्राप्त करण्याच्या हेतूने सुरु झाली मग आराधना, उपासना, पुजा अर्चना. व्रत वैकल्ये , नवस उपवास हीच देवाणघेवाण आहे जी केल्याने ती अदृश्य सत्ता प्रसन्न होईल असं त्या अर्धविकसित मेंदूला वाटायला लागलं.

पुढं मानवी मेंदू जसजसा विकसित होऊ लागला तश्या ह्या अश्मयुगीन ( प्राचीन युगी) कल्पना मावळायला लागल्या. पाऊस पडणे ,वीज कडाडणे किंवा भूकंप होणे ह्या पर्यावरणीय घटना असून ह्यामागे कोणी देव नाही हे विज्ञानाने सिद्ध करुन दाखवलं. जे मेंदू वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत गेलेत ते अश्मयुगीन दैवी कल्पनेतून बाहेर पडत गेलेत. पण ज्यांनी विज्ञान स्विकारलं नाही किंवा ज्यांच्या मेंदूला विज्ञान झेपलंच नाही ते आजही त्याच अश्मयुगीन (प्राचीन युगी) कल्पनांमध्ये रमून त्या अस्तित्वातच नसलेल्या दैवी शक्तीला शरण जाऊन पूजा अर्चा करीत आहेत.

अशी अश्मयुगीन अविकसित मेंदू असलेली मंडळी चमत्कारी बुवा बाबांच्या दर्शन रांगेत रेटारेटी करत उभी असलेली आढळून येतात. अशक्य ही शक्य कसे करतील स्वामी? किंवा महाराजांच्या थुंकीने कुष्ठरोग (Leprosy ) कसा बरं बरा होईल हा प्रश्न त्यांच्या मेंदूला कधीच पडत नाही.

डॉ. विजय रणदिवे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!