मुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुध्दांच्या शिकवणीचे लक्षणे भाग ८

भगवद्‍गीतेतील विचारसरणीप्रमाणे आत्मा जीर्ण वस्त्र बदलवतो तसे तो शरीर बदलवत असतो. असे जर असते तर जन्म न घेतलेल्या किंवा जन्माला आलेल्या मुलींना मारले जातात तेव्हा त्यांच्यातील आत्म्यांना अजून ते शरीर जुने झाले नसताना सुध्दा त्यांचे शरीर कसे जिर्ण होते? जर आत्मा जुने शरीर टाकून नविन शरीर धारण करतो, तर दरवर्षी वाढणार्‍या लोकसंख्येत हे नवीन आत्मे येतात कोठून? कोणी आत्मवादी माणसाच्या मनाला आत्मा म्हणतात. माणसाचे मन तर सतत बदलत असते. ते अत्यंत चंचल व अस्थिर असते. म्हणून मन हे न बदलणारा आत्मा असू शकत नाही.
यावरुन असे दिसून येईल की, आत्मवाद्यांचे एकही म्हणणे कसोटीला उतरत नाही. म्हणून बौध्द विचारप्रणाली आत्म्याच्या अस्तित्वाला मानत नाही. बौध्द अनात्मवादी आहेत. बौध्द मताप्रमाणे ज्याला आपण सजीव प्राणी असे म्हणतो, तो खरोखरच चेतनामय शक्ती आणि शारीरीक अविष्कार असतो. त्या शक्ती म्हणजे पंचस्कंध होय. हे पंचस्कंध म्हणजे रुपस्कंध, वेदनास्कंध, विज्ञानस्कंध, संज्ञास्कंध व संस्कारस्कंध होय.
मनुष्यप्राण्याचे सर्व घटक म्हणजे नामरुप, विज्ञान, संज्ञा, वेदना, व संस्कार तसेच पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू हे पंचस्कंधात सामावलेले आहेत. पंचस्कंधाशिवाय मनुष्यप्राण्यात दुसरा कोणताच घटक अस्तित्वात नाही. असा कोणताच घटक नाही की जो पंचस्कंधात सामावलेला नाही. सर्व पंचस्कंध सतत बदलणारे आहेत. परिवर्तनशील आहेत.
रूपस्कंध
भौतिक अथवा स्थूल शरीराला रूप म्हणतात. म्हणजेच इंद्रिय आणि इंद्रियांच्या विषयांना रूप म्हटले जाते. ज्या इंद्रियाद्वारे विषयांचे प्रतिनिधित्व केले जाते, त्या इंद्रियांना रुपाच्या नावाने संबोधले जाते. चार महाभूते, जसे की पृथ्वी, पाणी, उष्णता आणि वायु आणि त्यांच्यापासून निर्माण झालेल्या भौतिक स्वरूपांना रुप म्हणतात.
तसेच रुप (शरीर) हे १) पृथ्वी, २) पाणी, ३) अग्नी आणि ४) वायू या चार घटकांचे बनलेले आहेत तसेच प्रत्येक वस्तू हे चार घटकांचे बनलेले असते. हे चार घटक सृष्टीमध्ये निसर्गत:च विद्यमान असतात.
चेतनामय शक्ती ही वेदना, संज्ञा, संस्कार, व विज्ञान यांनी मिळून बनलेली असते.
वेदनास्कंध
एखाद्या बाह्यस्थितीचा आपल्या ज्ञानेंद्रियाला स्पर्श होताच जे तरंग शरीरात निर्माण होतात ते म्हणजेच वेदना. वेदना कशी निर्माण होते ते मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे.
आपल्या सर्व प्रकारच्या संवेदना वेदनास्कंधात मोडतात. वेदना म्हणजे इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी संपर्क झाला असतांना जाणवणारी अनुभूती होय. ह्या अनुभूती तीन प्रकारच्या असतात-
सुखमय अनुभूती
दु:खमय अनुभूती
अदु:खमय व असुखमय अनुभूती
एखादे रुप पाहिल्याने, आवाज ऎकल्याने, वास घेतल्याने, चव घेतल्याने, स्पर्श केल्याने व मनात कल्पना किंवा विचार आल्याने संवेदना निर्माण होत असतात. त्या सहा प्रकारच्या संवेदना डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन अनुभवत असतो. जेव्हा ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय विषय आणि ज्ञानेंद्रिय विज्ञान यांचा समन्वय झाल्याने स्पर्श होतो, तेव्हाच संवेदना निर्माण होत असतात. म्हणून स्पर्शामुळे वेदना निर्माण होत असतात. जसे एखादे सुंदर फुल, पाहणार्‍यांचा डोळा आणि त्याचे विज्ञान यांचा समन्वय झाला म्हणजे सुखमय अनुभूती होते.
विज्ञानस्कंध
सर्व स्कंधात विज्ञानस्कंध अत्यंत महत्त्वाचे आहे. विज्ञानाने जाणण्याची व निरनिराळ्या प्रकारे अनुभूती घेण्याची क्रिया करता येते. आपण आपल्या पाच इंद्रियाद्वारे आणि मनाद्वारे निरनिराळ्या प्रकारची अनुभूती घेत असतो. जसे आपण आपल्या डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणत असतो. कानाद्वारे आवाज जाणत असतो. नाकाद्वारे वास जाणत असतो. जिभेद्वारे चव जाणत असतो. त्वचेद्वारे स्पर्श जाणत असतो. आणि मनाद्वारे कल्पना आणि विचार जाणत असतो. अशा तर्‍हेने विज्ञान सहा प्रकारचे आहेत. चक्षू विज्ञान, कर्ण विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, स्पर्श विज्ञान आणि मनो विज्ञान. दृश्य आकृती आणि रंग, आवाज, वास, चव, स्पर्श, कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय असले आणि त्याचा संबंध अनुक्रमे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा व मन या इंद्रियांशी आला तरच विज्ञान जागृत होते, इतर वेळी नाही. अशा वेळेस सुख-दु:खाच्या भावना निर्माण होतात.
त्याचप्रमाणे कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय मनात आले तरच मनिंद्रिय विज्ञान जागृत होते आणि सुख-दु:खाच्या भावना निर्माण होतात. ह्यावरुन असे स्पष्ट होते की, इंद्रिय आणि विषयाचा एकमेकांशी संबंध आलाच तर विज्ञान जागृत होते. कारण त्यावेळी आपले चक्षुंद्रियविषय विज्ञान जागृत नसते. म्हणून इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियाच्या विषयाचा एकमेकांशी संबंध असतो. ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणूनच विज्ञान सुध्दा शाश्वत नाही तर ते क्षणाक्षणाला बदलत असतात.
संज्ञास्कंध
संज्ञास्कंधाचे कार्य म्हणजे इंद्रियविषयांना ओळखणे, त्याची जाण करणे होय. संवेदना प्रमाणे संज्ञा सहा प्रकारच्या आहेत. जसे रुपाला ओळखणे, आवाजाला ओळखणे, वासाला ओळखणे, चवीला ओळखणे, स्पर्श केल्याने व मनात कल्पना किंवा विचार आल्याचे ओळखणे असे ते सहा प्रकारच्या संज्ञा आहेत.
विज्ञान आणि संज्ञा यांच्यात एक प्रकारचे सारखेपणा आहे. पण विज्ञानामुळे इंद्रियविषयांच्या अस्तित्वाची जाण होते, तर संज्ञा त्याच्या विशिष्ट खुणांमुळे त्या वस्तूला इतर वस्तुतून ओळखते. संज्ञामुळे वस्तूचे स्मरण होते.
संस्कारस्कंध
संस्कारस्कंधात संवेदना आणि जाणण्याची किंवा ओळखण्याची क्षमता सोडून मनाच्या इतर सर्व भागांचा समावेश होतो. म्हणून याला संस्कार चेतना असे सुध्दा म्हणतात. मनाच्या व्यवहारात चेतना किंवा इच्छा फार महत्त्वाचे कार्य करते. कार्य करण्याच्या इच्छेने एखादे कार्य केले तरच बुध्दधम्माप्रमाणे ते ‘कर्म’ होते. इच्छा नसताना जर एखादे कार्य केले तर ते ‘कर्म’ होऊ शकत नाही.
संवेदना आणि संज्ञा याच्याप्रंमाणे चेतना सुध्दा सहा प्रकारच्या आहेत. जसे रुपाचे कार्य, आवाजाचे कार्य, वासाचे कार्य, चवीचे कार्य, स्पर्शाचे कार्य, स्पर्श केल्याने व मनात कल्पना किंवा विचार आल्याने होणारे कार्य असे ते सहा प्रकारच्या संस्कार आहेत.
अशा तर्‍हेने जिवंत प्राण्याच्या जिवंतपणाचे सर्व व्यवहार चेतनामय शक्ती आणि शारीरिक शक्ती रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या पंचस्कंधामुळे होत असतो.
म्हणजेच सक्षम इंद्रिय, इंद्रिय विषय आणि इंद्रिय विज्ञान यांचा समन्वय झाला की, स्पर्श निर्माण होते. स्पर्श निर्माण झाला की, सुखमय, दु:खमय, व अदु:खमय व असुखमय वेदना उत्पन्न होतात. अशा तर्‍हेने सुख-दु:ख निर्माण होते व त्याची अनुभूती जाणवते. त्यामुळे सुख-दु:ख भोगणारा कोण? हा प्रश्‍न निर्माण होत नाही. कारण सुख-दु:ख भोगणारा कोणी आत्मा नावाचा पदार्थ शरीरात किंवा शरीराबाहेर राहत नाही.
आर.के.जुमळे
दि.२१.१२.२०२३
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!