स्वार्थ सिद्ध झाल्यास पालकमंत्रिपदाचा राजीनामा देईन; केसरकरांच्या वक्तव्य.

दि.28.‘शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यांची गैरसोय होऊ नये. त्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी दर्शन मंडपासाठी इमारत उपलब्ध करून देण्याबाबत शेतकरी संघाला फेब्रुवारीमध्ये प्रस्ताव दिला. त्याकडे संघाने दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारत ताब्यात घेण्याची वेळ आली, असे स्पष्ट मत मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
ही इमारत ताब्यात घेण्यामागे माझा वैयक्तिक स्वार्थ नाही. तसे सिद्ध झाल्यास पालकमंत्रिपदाचा राजीनामा देईन,’ असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, शेतकरी संघाने दिलेल्या संयुक्त सुविधा निर्माण करण्याच्या प्रस्तावावर आता जिल्हाधिकारी निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, ‘कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासह पर्यटनदृष्ट्या कोल्हापूरचा विकास करण्याचा सरकारच्या माध्यमातून मी प्रयत्न करत आहे. शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेण्यावरून माझ्यावर होणारे सर्व आरोप खोटे आणि राजकीय हेतूने होत आहेत. संघाची जागा हडप करण्याचा आरोप सिद्ध झाला तर पालकमंत्रिपदाचा राजीनामा देईन. खोटे आरोप मी सहन करणार नाही.
श्री. अंबाबाईची आणि छत्रपतींच्या गादीची सेवा करण्यात मला रस आहे. त्यामुळे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देण्यामध्ये कोणी राजकारण आणू नये. नवरात्रोत्सव थाटामाटात साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत