
लेखन :- अशोक नागकीर्ति
दिनांक :- १७/८/२०२५
मोबाईल :- 7039120462
भाग — २७
समता ; स्वातंत्र्य ; बंधुत्व व न्याय
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ ऑक्टोबर १९५४ रोजी दिल्ली येथे दिलेल्या भाषणात आपणास सांगतात की; माझ्या जीवनाचे अधिष्ठान काय असेल तर समता; स्वातंत्र्य;बंधुत्व ही तत्वे माझे गुरू तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून हे तत्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे.
त्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की; माझ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावयाचे आहे.पण त्याच बरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक ठरते.माझ्या तत्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे.तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेला मात्र मुळीच थारा नाही.कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तीत्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे.
माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतीक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणूनच फक्त कायदेकानुणांचे स्थान गृहित धरलेले आहे.पण कायद्याचे स्थान मी फारच गौन मानतो.कारण स्वातंत्र्य व समतेच्या भंगाबाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही.मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो.कारण स्वातंत्र्य व समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो.सहभाव हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव अथवा मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे.कायदा किंवा स्वभावाचे मुल्यमापन करताना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो.या उलट सहभाव अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते.
माझे तत्वज्ञान हे कोणा सुखवस्तू माणसाचा ध्येयवाद आहे असे मानू नये.सामाजिक जीवनात त्रिगुण तत्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असेच माझे क्रांतीकारक तत्वज्ञान आहे.म्हणून मी इतका चढावखोर आहे.आणि मला पुष्कळ शत्रू आहेत.पण मला हे शत्रू आवडतात.कारण मला माहित आहे की; माझे बोलणे ते कान देऊन ऐकत असतात.
माझे तत्वज्ञान हे माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठीही आहे.निराळया शब्दात सांगायचे म्हणजे माझ्या तत्वज्ञानाच्या मागे विशिष्ट उद्दीष्ट आहे.मला मतपरिवर्तन करावयाचे आहे.त्रिगुण तत्वाच्या अनुचरांना त्याचा त्याग करावयास लावून माझ्या तत्वज्ञानाचा स्वीकार करावयास लावायचा आहे.हे एक भव्य कार्य आहे आणि त्याला पुष्कळ अवधी लागण्याचा संभव आहे.
आज भारतीय व्यक्ती दोन निरनिराळ्या ध्येयवादांनी नियंत्रित आहेत.राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत सूचित केलेल्या ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद.ज्याला समज आहे त्याला कळू शकेल की; हे दोन परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत.राजकीय ध्येयवादामूळे स्वातंत्र्य; समता व बंधुभाव या जीवनमूल्यांना मान्यता मिळाली आहे.तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत.असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही.माझ्या जीवन तत्वज्ञानावर माझा पुरेपूर विश्वास आहे आणि म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल अशी मला उमेद आहे.
हिच तत्वे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा पाया म्हणून स्वीकारली आहेत.या तत्वांना संविधानात समाविष्ट करून डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतात आदर्श समाज निर्माण होईल अशी अपेक्षा ठेवतात.या तत्वांमध्ये न्याय हे तत्व समाविष्ट करण्यात आले आहे.संविधानाच्या उद्देशिकेत पुढील गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
आम्ही भारताचे लोक; भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक; आर्थिक व राजनैतिक न्याय
विचार; अभिव्यक्ती; विश्वास; श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता
निश्चितचपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्वक निर्धार करून हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.
उर्वरित भाग पुढे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



