भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी एकीची गरज !

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही राज्यातील भटक्या-विमुक्त घटकातील लाखो कुटुंबांना अद्याप जगण्याचा अधिकार मिळू शकला नाही. असंख्य कुटुंबांची आजही रस्त्यावर, गाव-शहरांच्या बाहेर पालावर भिक्षा मागून जगावे लागत आहे. शहरांमध्येही त्यांना सुखाने जगू दिले जात नाही. त्यांच्यासाठी शिक्षण, आर्थिक विकासाचे कार्यक्रम हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत,’ असे सांगत त्यांच्या या प्रश्नांसाठी राज्यात भटक्या-विमुक्त समाजातील संस्था, संघटनांसोबत कार्यकत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी मुंबईतील परिषदेत व्यक्त केले.
भटक्या व विमुक्त जाती संघाच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात भटक्या-विमुक्त जाती- जमातीची संयुक्त परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भटक्या व विमुक्त जाती संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र भोसले होते. तसेच ज्येष्ठ विचारवंत अंबरसिंह चव्हाण, अरुण जाधव, कैलाश भांडवलकर, डॉ. डी. टी. पवार, डॉ. कैलास गौड, प्रकाश राठोड, मोहन शिंदे, कमला पटणी, कल्पना चव्हाण आदी नेते या परिषदेला उपस्थित होते. या वेळी भोसले यांनी ‘भटक्या विमुक्तांच्या विकासासंदर्भात आजपर्यंची सर्व सरकारे अपयशी ठरली आहेत. त्यामुळेच आमचे जगणे मुश्कील झाले आहे,’ असे सांगितले. मोहन शिंदे यांनी मुंबईत डवरी गोसावी समाजाच्या महिलांवर कसा अन्याय केला जातो, याची माहिती दिली. कल्पना चव्हाण, देविदास शिंदे, कमला पटणी यांनीही आपले विचार मांडले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत