‘सकल’ शब्दाचे वेड !

🌻रणजीत मेश्राम लेखक विचारवंत अभ्यासक साहित्यिक समीक्षक आहेत
संघ चतुर आहे. चतुरस्त्र आहे. वेळेवर शब्द देतो. ती गरज असते. किंवा निर्माण केली जाते. तत्क्षणी संघ ती पूर्ती करतो.
विभेदिता ठेवायची. विभक्तता सोसायची. परत ती सांभाळायची. हे सारे ‘सकल’ने सांभाळून घेतले. किमया अशी असते.
देताना तत्वही देतात. पाचही बोटे सारखी नसतात. पंजा आहेच की ! ती मूठ होते. तेच सकल ! विभिन्नतेत एकता. निसर्गाकडे पहावे. आधार देऊन टाकतात.
आपण वेगळे का आहोत ? मूळ कशात ? प्रश्न पडूच देत नाहीत. अमुक तेली. तमुक तो तेली. हा कुणबी. तो तो कुणबी. असा मातंग. तसा मातंग. सर्व शाखीय माळी. सर्व भाषीय ब्राह्मण. म्हणजे काय ? म्हणजे एकच. आपले वेगळेपण जप. अधिक कठोर कर. तेच सत्व. तसे जग. एकीसाठी उपाय आहे ना ! सकल ! सकल म्हणजे एकत्व ! सारे खुष !
सारी डोक्याची कमाल आहे.
अधिक खोलात जाऊ देत नाहीत. आधार धोक्यात यायचा. यापरी जाऊच देऊ नये. सकलने ते थांबवले. मजबुतीचे बंदद्वार !
शब्दाचे असे सामर्थ्य असते. ते चळवळीतून यावे. चळवळपूरक असावे. संघीकरणाला सकलची जोड आहे. तिही त्यांची चळवळच. संघाला सकल हवा. तो दिला. आता विराजमान आहे. सकल पांघरुणात घेते. वेगळेपण जपू देते. भेदाभेद पाळून एकीची भलावण देते. ती जिंकत असते. ती गरज होत जाते. हेच सफल सकल. हेच पूढे हिंदुत्व असते !
वेगळालीला असे जपले जाते.वाहते ठेवले जाते. परंपरेने ते चालत आले. म्हणून आम्ही जपतो. विषय असा संपवला जातो. त्यावर चर्चा नको असते.
बौध्दांचे उदाहरण दिले की उसळी येते. पण ते खरंय. बौध्दातही हे बावणे ते बारके असे होते. कडवट भिंती होत्या. पार ते विस्मरणात गेले. आठवण्याचाही संकोच असतो. धम्माने सारे पुसले. सारा मानसिकतेचा खेळ असतो. समजले की संपते.
साधे उदाहरण देता येईल. वहिवाटीत अपंग शब्द होता. सरकार दरबारीही होता. तसा कुणाचा विरोधही नव्हता. पण संघाला त्याऐवजी दिव्यांग हवे होते. दिव्यांग आले. रुढ झाले. अपंग अज्ञातवासात ढकलले गेले. राज्य असे मानसिकही असते !
संघ असे मानसिक राज्य करीत असतो. मानसिकता आली की पुढचे आणणे सोपे जाते. संघविरोधकांना हे कोडे सुटले नाही. हिंदुत्व आले की संघही येतो. संघविरोधकांची अशी पंचाईत असते. धरले तर चावते , सोडले तर पळते. कोडे तसेच आहे. हे दुर्लक्ष की अज्ञान की दौर्बल्य ?
असे बरेच सांगता येईल.अलीकडे गाईचा कळप म्हणत नाहीत. गोवंश म्हणतात. गोरा , सांड कधी वाचनात येत नाहीत. आदर जपायची अशी अदृश्य बाध्यता असते. आता हिंदू धर्मही म्हणत नाहीत. सनातन धर्म म्हणतात. कधीही नष्ट न होणारा. असे हे योजन प्रयोजन असते. हेतू सहेतूपूर्वक.
चळवळीला अशी अनेक अंगे असतात. ती काटेकोर वा कोपराधारी नसतात. ती एकल , एकाकी नसतात. समग्र असतात. चळवळीला धारण करणारे ते जोखतात.तसे जोखावे. तेव्हाच चळवळ समग्रतांची होते. नेतृत्वाला हे खुणावत असते.
रिपब्लिकन चळवळीचे नेतृत्व करु इच्छिणारे तसेच सहभागी होणारे अशा अंगाने विचार करतांना दिसतात. याचा आनंद असतो.
० रणजीत मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत