दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

नागपंचमीच्या निमित्ताने …..!

समाज माध्यमातून साभार

     सामाजिक विकासक्रमात अनेक घडामोडी घडत असतात. या घडामोडींचा नीट अर्थ- अन्वयार्थ लावणे ही विचारवंतांची जबाबदारी असते. नागपंचमीच्या निमित्ताने यांवर थोडा प्रकाश टाकायला हवा. 

  प्राचीन मानव समाज हा टोळ्यांनी बनलेला असे. प्रत्येक टोळीचे एक “टोळीचिन्ह” असे. या टोळीचिन्हांवरून टोळ्यांची ओळख होई. आज देखील या टोळीचिन्हांचे अवशेष कधी कधी आडनावावरून देखील दिसतात. उदाहरणार्थ मोरे म्हणजे ज्यांचे टोळीचिन्ह मोर होते अशा टोळीचे वंशज होय. जगातील सर्वश्रेष्ठ सम्राट अशोक हा मौर्य टोळीचा वारसदार होता. कोल्हे म्हणजे ज्यांच्या टोळीचे टोळीचिन्ह कोल्हा होता अशा टोळीचे वंशज ! जिज्ञासूंनी ही यादी वाढवत न्यावी. 

   या न्यायाने नाग हे एका मोठ्या व प्रभावी टोळीचे टोळीचिन्ह असावे, असे अनुमान आहे. आपल्या देशात काश्मीरमध्ये अनंतनाग आहे. पूर्वोत्तर दिशेला नागालॅंड आहे तर दक्षिणेला विशाखापट्टणम आहे. विशाखा म्हणजे नाग ! खाली श्रीलंकेत नागमंडल आहे. तक्षक हा देखील नाग असल्याचे उल्लेख आढळतात. या तक्षकाच्या नावावरून प्राचीन भारतातील तक्षशीला विद्यापीठ उभारले गेले असावे , असे अनुमान व्यक्त केले जाते. या विद्यापीठाचे अवशेष आजच्या पाकिस्तानमध्ये आहेत. एवढेच नव्हे तर थेट जपानमध्ये नागासाकी आहे ! यांवरुन नाग टोळीचे प्रभावक्षेत्र किती व्यापक भूप्रदेशावर होते , याचा बोध होतो. 

    भारतीय साहित्यात नागांचा उल्लेख गौरवपूर्वक केला गेला आहे. बौद्ध साहित्यात नाग व हत्ती हे अनेकदा समानार्थी शब्द म्हणून येतात. नाग हे भगवान बुद्धांचे अनुयायी असल्याचा उल्लेख तर खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीच केला आहे. नागांनी भगवान बुद्धांच्या डोक्यावर संरक्षणात्मक फणा धरल्याची अनेक शिल्पे आहेत. महाभारतात देखील नागांशी विवाहसंबंध राजघराण्यांशी जोडल्याच्या कथा आहेत. अशा तऱ्हेने श्रमण व ब्राह्मण अशा दोन्ही साहित्यांत नागमहात्म्य वर्णिले आहे. 

     ज्याप्रमाणे आजच्या काळात विविध राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्यासाठी वाणिज्यिक - सामरिक उपाय अवलंबतात तसे प्राचीन काळी देखील होत होते. विविध टोळ्या आपले प्रभावक्षेत्र वाढवताना आपापसात लढाया करीत, कधी विजयी होत तर कधी पराभूत होत. कृष्ण व पांडवांनी केलेले खांडववन दहन हे अशाच एका लढाईंचे प्रक्षेपण असावे. परंतु या टोळ्या नेहमीच संघर्ष करीत नसत. कधी कधी दोन टोळ्यांचा समझौता देखील होत असे. मग नागपंचमी हे असेच एका समझौत्याचे प्रतीक असेल का ? 

    नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. नाग म्हणजे सर्प हा अर्थ उघड आहे. परंतु निव्वळ सर्पाची पूजा करायला एक विशिष्ट दिवस निवडणे यामागे सर्पपूजेचे कर्मकांड करण्याहून अधिक सखोल अर्थ आहे. आपल्या संस्कृतींत वर्णिलेले नागमहात्म्य विचारात घेतले तर हा सखोल अर्थ समजू शकतो. नाग हे टोळीचिन्ह असलेल्या एखाद्या टोळीशी परकीय आक्रमक आर्यांनी समझौता केल्याचे प्रतीक म्हणून नागपंचमीकडे बघायला हवे. या समझौत्यापोटी नागाला अनेक देवदेवतांच्या समावेत स्थान मिळावे , तसेच विशिष्ट दिवशी नागाची म्हणजे नाग हे टोळीचिन्ह असलेल्या टोळीचा आदरसत्कार करण्याची हमी असावी ; अशा काहीशा या समझौत्याच्या अटी - शर्ती असू शकतात. या बदल्यात नाग हे टोळीचिन्ह असलेल्या टोळीकडून परकीय आक्रमक आर्यांना अभय मिळाले असावे. पुढे काळाच्या ओघात टोळ्या नष्ट झाल्या तरी नागपंचमीच्या स्वरुपात या समझौत्याचे अवशेष टिकून राहिले असण्याची दाट शक्यता आहे. 

     आज नागपंचमीच्या निमित्ताने नागमहात्म्य वर्णिताना नाग टोळ्यांचा पराक्रम सांगितला जातो. आज खरी गरज आहे ती या नाग टोळ्यांबाबत संशोधन करण्याची ! हे संशोधन ऐतिहासिक - भाषिक - सांस्कृतिक अशा विविध आयामांनी समृद्ध झाले तर भारताच्या इतिहासातील अनेक गौरवशाली खाणाखुणा सापडू शकतात. 

  नागपंचमी साजरी करणाऱ्यांनी यांकडे लक्ष दिले तर अधिक उत्तम ! 

मंगल मैत्री ….

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!