मुख्य पान

डॉ.माईसाहेब आंबेडकर–खोट्या आरोपांची शिकार


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या सर्वांगीण विकासासाठी, न्याय हक्कासाठी हिंदु धर्मीय सनातनी, महात्मा गांधी, काँग्रेस पक्ष, ब्रिटीश सरकार यांचे बरोबर राजकीय व सामाजिक लढे देत होते. अशात २७ मे १९३५ ला धर्मपत्नी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे निधन झाले. बाबासाहेब आंबेडकर कमालीचे दु:खी झाले. वैफल्यग्रस्त वाटू लागले, कितीतरी दिवस त्यांनी एकांत वासात कंठले. १५ एप्रिल १९४८ पर्यंत म्हणजे १३ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधूर अवस्थेत जीवन कंठीत होते. या कालावधीत रक्तदाब, मधुमेह, संधीवात, न्युराईट्स सारख्या आजार डॉ.बाबासाहेबांना जर्जर करुन त्यांचे शरीर पोखरुन काढीत होते. सामाजिक, राजकीय लढे मोर्चे, सत्याग्रह, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन परिषदा, सभा, सतत मुंबई – दिल्ली – लंडन सारखा प्रवास ग्रंथवाचन, ग्रंथलेखन, ब्रिटीश शासनाशी, काँग्रेस पक्षाशी समझोते करार, वाटाघाटी या संदर्भाने त्यांची चिंतनशील मानसिकता असे विविध आजार, शारिरीक स्वास्थ्य, बिघडवून टाकत, मुंबईचे उपनगर विलेपार्ले येथे डॉ. एस. रॉय. यांचेकडे अर्थशास्त्र संदर्भाने चर्चा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर येत असत. डॉ. राव यांचे व कृष्णराव कबीर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यांचे एकमेकांकडे जाणे – येणे असे. डॉ. राव यांच्या उच्चशिक्षीत मुलींकडे व डॉ. शारदा कबीर यांचे मैत्रीणींच्या संबंधाने नेहमीच जाणे – येणे असे. डॉ. रावांनी एकदा सहजतेने डॉ. बाबासाहेबांशी ओळख करुन दिली.
” ही शारदा कबीर माझ्या मुलीची मैत्रीण मोठी हुशार आहे. डॉ. मालवणकरांकडे ज्युनिअर म्हणून काम करते. ” डॉ. रावांचे घरी (डॉ.शारदा कबीर) यांच्या तीन – चार वेळा भेटी झाल्या होत्या. डॉ. शारदा कबीर सारस्वत ब्राम्हण कुटुंबात जन्माला आल्या, त्यांचे मूळ घराणे डोरले ता.राजापूर जि. रत्नागिरी पण वडील कृष्णाराव कबीर पुण्यात नौकरीस असल्यामुळे डॉ. कबीर यांचे हायस्कूल पर्यंतचे शिक्षण (एस.एस.सी. (इंटर), एच.एस.सी. ) पर्यंतचे शिक्षण पुण्यातच एस.पी. कॉलेज व फर्ग्युसन कॉलेज येथे झाले. कृष्णाराव कबीर यांना पाच मुली व तीन मुले होती. या आठ भावंडांपैकी सहा भावंडांचा त्या काळी आंतरजातीय विवाह झाला होता. डॉ.शारदा कबीर मुंबईला ग्रँट मेडीकल कॉलेजमधून वस्तीगृहात राहून एम.बी.बी.एस. शिक्षण पुर्ण केले. पण एम.डी. च्या प्रॅक्टीकलच्या वेळेला आजारी असल्याने एम.डी. उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. पण त्या आजारपणात अनेक पुस्तकांबरोबर भगवान बुध्दाचे पुस्तक त्यांच्या वाचनात आले व त्या बुध्दविचारांनी प्रभावित झाल्या. वडील कृष्णराव कबीर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांचे बिऱ्हाड मुंबईला हलविले. डॉ. शारदा कबीर या डॉ. मालवणकरांच्या क्लिनीकमध्ये ज्युनिअर म्हणून नौकरीस राहिल्या. एकेदिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.मालवणकरांच्या क्लिनीकमध्ये आले व म्हणाले “डॉ. रावांनी मला तुमच्याकडे औषधोपचार घेण्याचा सल्ला दिला म्हणून आलो आहे. डॉ.मालवणकरांनी डॉ.रावांना जुनाट फिट्स आजारातून वाचविले होते. “डॉ. शारदा कबीर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची डॉ.मालवणकरासह सर्वांना ओळख करुन दिली. डॉ. आंबेडकरांसारखी महान व्यक्ती आपल्या क्लिनीकमध्ये आली याबद्दल सर्वांनाच आनंद झाला. पुढे काही दिवसांनंतर एकेदिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.मालवणकरांकडे तपासणीसाठी आले असता डॉ. मालवणकरांनी तपासणी करुन एका कागदावर सुचना दिल्या ‘ रोज इन्शुलिन घेणे, नियमीत व्यायाम करणे , जेवणाचे हे हे पथ्य पाळणे हा कागद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देत डॉ शारदा कबीर म्हणाल्या ” डॉक्टर साहेब यात लिहिल्या प्रमाणे आहार घ्या नि पथ्य पाळा. “
डॉ.बाबासाहेब म्हणाले ” पण मला हे सर्व कसे जमणार ?
डॉ. कबीर म्हणाल्या ” तुमच्या घरच्यांना हे जमत नसेल, एखादी नर्स ठेवा ” डॉ. बाबासाहेबांशी चांगला परिचय झाल्यामुळे पुढे त्या म्हणाल्या ” हवं तर मी तुमच्याकडे येऊन राहीन आणि बाईंना सगळं शिकवीन. ” (बाबासाहेबांना पत्नी त्यांचे घरी आहेत अशी डॉ कबीरांची धारणा होती.)
डॉ. बाबासाहेबांनी सांगून टाकलं ” अहो डॉक्टर हे सर्व ठीक आहे पण माझ्या घरात कुणीही बाईमाणूस नाही मी अगदी एकटा आहे तेव्हा हे पथ्यपाणी कोणाला सांगू ?
तेव्हा माईसाहेबांच्या डोक्यात प्रकाश पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय कार्य प्रसिध्दीसह महाराष्ट्रात, भारतात नव्हे जगात विस्तारले होते. त्यांचे अनुयायी जयभिमचे नारे लावताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लाऊन आनंद व्यक्त करताना, मोर्चे मिरवणुका काढताना माईसाहेबांना प्रवासात व इतरत्र वावरताना दिसून येत होतेच. हे पाहुन, ऐकून डॉ.बाबासाहेबांचे प्रकांड पांडित्य, अफाट लोकप्रियता यांचा इतरांप्रमाणे डॉ. शारदा कबीर यांच्यावर प्रभाव पडणे स्वाभाविक होते पण त्यांचे विविध आजार मनामध्ये आठवताच त्यांना खेद वाटायचा. एक डॉक्टरनि एक पेशंट यांच्यातली भावना होती. डॉ.बाबासाहेबांना व्याधीमुक्त करण्यासाठी वैद्यकीय गरज होती. डॉ. मालवणकर, डॉ. शारदा कबीर, डॉ. बाबासाहेबांचे सहकारी,अनुयायी, कार्यकर्ते भाऊराव गायकवाड, दौलतराव जाधव, कमलाकांत चित्रे, यांच्या विचार विनिमयातून व प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांनी एकमेकांचे जीवनसाथी व्हावे असे मनोमन वाटले व त्या दृष्टीने प्रयत्न झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक दिवस त्यांचे मज्जातंतुचे दु:खणे रात्रीचे सुरु होई त्यांना कण्हत, कुथत सर्व रात्र काढावी लागली. त्यांना कुठलेच औषध लागू होईना त्या दिवसात ते इन्शुलीन घेत असत. फेब्रुवारी १९४८ ला कमलाकांत चित्रे यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. बाबासाहेब म्हणतात ” माझी प्रकृती एकाएकी ढासळली आहे,आणि दु:खण्याने फिरुन उचल खाल्ली आहे. चार दिवस डोळ्याला डोळा नाही, पायातील वेदना तर असह्य झाल्या आहेत. दिल्लीतील दोन नामांकीत वैद्यांनी मला तपासले त्यांचे मत असे पडले की, जर पायातील वेदना त्वरीत थांबल्या नाहीत तर त्या नेहमीच राहतील आणि कधीच बऱ्या होणार नाहीत. माझ्या प्रकृत्तीची काळजी घ्यायला कोणीतरी माणूस पाहिजे या तुमच्या सुचनेचा मी पुर्वीपेक्षा आत्ता अधिक विचार करीत आहे.
तर सहकारी भाऊराव गायकवाडांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात ” पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पुन्हा लग्न न करण्याचा मी निर्धार केला होता. परंतु आत्ता दुसरा विवाह करण्याचा मी निर्धार ठरविला आहे. अशा पत्नीची मला आवश्यकता आहे की, उच्चशिक्षीत तसेच वैद्यकीय औषधोपचाराचे ज्ञान असलेली दलित समाजात अशी स्त्री सापडणे अशक्य असल्याने मी एका सारस्वत बाईची निवड केली आहे जी डॉक्टर आहे. “आपला एक सहकारी माझा मुलगा यशवंत आणि माझी नियोजित पत्नी डॉ. शारदा कबीर यांची मने एकमेकांविषयी कलुषित करीत आहे.”
डॉ.मालवणकर,कमलाकांत चित्रे,भाऊराव गायकवाड, दौलतराव जाधव यांच्या विचार विनीमयातून १५ एप्रिल १९४८ रोजी गुरुवारी रजिस्टर नोंदणी पध्दतीने विवाह विधी पार पाडण्याचे ठरले. डॉ.शारदा कबीर विमानाने दिल्लीला गेल्या तेथे कमलाकांत चित्रे, दौलतराव जाधव यांनी डॉ.शारदा कबीर यांना घेतले कमलाकांत चित्रेंच्या सुनबाईंने डॉ.शारदा कबीर यांना ओवाळले. रजिस्टर ऑफ मॅरेजेस आवश्यक त्या कागदपत्रासह जातीने हजर होते. नोंदणी पध्दतीने विवाह संपन्न झाला तेव्हापासून डॉ.शारदा कबीर या डॉ. सविता भिमराव (बाबासाहेब) आंबेडकर या माईसाहेब आंबेडकर झाल्या १५-२० निवडक निमंत्रीत उपस्थित होते. दुपारी जेवणाचा व सायंकाळी स्वागत समारंभ झाला तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटनचे दूत भेट सह उपस्थित होते. समारंभ संपताच डॉ. बाबासाहेब माईसाहेबांना घेवुन उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांकडे भेटीला गेले. त्यांची प्रकृत्ती ठीक नव्हती ते आंबेडकर दाम्पत्यांना पाहताच उठून बसले,त्यांनी हसून स्वागत केले. माईसाहेबांना आपल्या शेजारी बसवुन पाठीवरुन हात फिरवून म्हणाले ” बेटी तुमने डॉ. साहब से विवाह करके बड़ा धैर्य दिखाया हैं, यह शुभ घटना अगर बापूजी के सामने होती तो और भी खुशी की बात होती. वे तो फुल न समाते. ” सरदार पटेलांनी या लग्नाप्रित्यर्थ छोटासा समारंभ आयोजित केला होता. देश – विदेशातुन अभिनंदनाचा वर्षाव झाला. ‘ कारवाँ ‘ या वृत्तपत्राने तर सारस्वतांचा जावई असे संबोधीले. न्यूयॉर्क टाईम्स सुध्दा मोठी प्रसिध्दी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रक्तदाब,मधुमेह,संधीवात,न्युराईट्स सारख्या जीवघेण्या आजारासह जीवन कसे कंठले असतील ? याची कल्पनाच केलेली बरी अनेक तज्ञ डॉक्टरांनी सल्ले दिल्यामुळे सहकारी मित्रांच्या विचार विनीमयातून पुन:र्विवाह केला. माईसाहेबांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मपत्नी सहचारिणी म्हणुन ५ डिसेंबर १९५६ पर्यंत सहवास लाभला या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनमोल कार्यात माईसाहेब आंबेडकरांचाही बहुमोल वाटा आहे हे नाकारुन चालणार नाही. माईसाहेब स्वातंत्रपुर्व काळातल्या एम.बी.बी.एस व निष्णात डॉक्टर होत्या. त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना व्याधीमुक्त करण्यासाठी व आयुष्य,आरोग्य वृध्दीसाठी झाला म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन २ वर्षे, ११ महिने, १७ दिवस इतक्या प्रदीर्घ कालावधीत जगातील मोठे स्वतंत्र भारताचे संविधान लिहू शकले. १९३५ साली केलेली “मी हिंदु धर्मात जन्मलो असलो तरी हिंदु धर्मात मरणार नाही ही केलेली भीम प्रतिज्ञा पूर्ण करु शकले.” यापुर्वी बुध्द ॲण्ड हिज धम्म या ग्रंथाचे लेखन केले. बाबासाहेबांच्या तीव्र इच्छेचे हिंदु कोडबील तयार करणे यासाठीही माईसाहेबांची शक्यती मदत झाली आहे. तर १४ ऑक्टोंबर १९५६ ला नागपूरला दिक्षा भुमीवर डॉ. बाबासाहेबांच्या समवेत बौध्द धर्मांतर केली. त्या डॉक्टर बाबासाहेबांशी एकरुप होत्या म्हणुनच डॉ. बाबासाहेबांचे १५ एप्रिल १९४८ ते ५ डिसेंबर १९५६ या कालावधीत जी कार्ये झाली त्यात माईसाहेबांचा सहभाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्दधम्म स्विकारल्यानंतर ५० – ५१ दिवसांनी त्यांचे स्वाभाविक दुर्दैवी महापरीनिर्वाण झाले. भारत देश हादरुन गेला. दलित समाज दु:खाने सैरभैर झाला होता. या भावनिक वातावरणात काही समाज कंटकांनी ” हिंदुत्ववाद्यांनी माईच्या सहाय्याने बाबासाहेबांचा घात केला ” ही अफवा वायुवेगाने पसरवली व बौध्द समाजाने आंबेडकर अनुयायांनी माईसाहेबांच्या परिनिर्वाणानंतर ही अफवा खोटी ठरवली नाही. ही कृतघ्नताच होय, केवळ बाबासाहेबांचा सहवास एवढ्या भांडवलावर स्वत:चे महत्त्व वाढवुन घेण्यासाठी राजकीय व आर्थिक लाभापोटी माईसाहेबांकडून जाणते – अजाणतेपणाने दुखावले गेलेले चांगदेव भवानराव खैरमोडे, नानकचंद रत्तु, सोहनलाल शास्त्री, शंकर शास्त्री यांनी तेव्हा जे खोट्या लेखनाव्दारे जे विष समाज मनामध्ये पेरले भिनवले ते अद्याप उतरलेले नाही.याचाच परिणाम बौध्द समाजाकडुन,आंबेडकर अनुयायांकडुन डॉ.माईसाहेब आंबेडकर यांची जयंती,पुण्यतिथी हे कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. त्यांच्या प्रतिमा घरात लावल्या जात नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी व महापरिनिर्वाण दिनी माईसाहेबांचा उल्लेख सुध्दा टाळण्यात येतो. या समाजाने माईसाहेबांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घात केल्याचा आरोप करुन त्यांना अग्नीदिव्य करण्यास भाग पाडणे, चौकशी अहवालात सुईच्या टोकाइतकाही दोष सिध्द झाला नाही.
डॉ.बाबासाहेबांच्या नंतर समाजाचे राजकीय नेतृत्व वारसदार म्हणून माईसाहेब आंबेडकरांकडे, भैय्यासाहेब आंबेडकरांकडे,मुकुंदराव आंबेडकरांकडे गेले तर आपले राजकीय भवितव्य धोक्यात येईल म्हणून तत्कालीन असूरी भावनेच्या रिपब्लिकन बौध्द समाजाच्या नेत्यांनी भैय्यासाहेब व माईसाहेब यांच्यात खोटेनाटे गैरसमज पसरवुन दरी वाढवली. त्यांना इस्टेटीच्या नावाखाली न्यायालयात, कोर्टात झुंजवले व त्यांना कायमचे एकमेकांपासून दूर ठेवले गेले. अशा बौध्द नेत्यांच्या रिपब्लिकन नेत्यांच्या इच्छापुर्ती झाल्या माईसाहेबांना घरी बसवले व भैय्यासाहेब आंबेडकरांना बौध्दधम्म कार्याकडे वळविले.आज नागपूर दिक्षाभूमी पिपल्स एज्युकेशन सोसायटी व इतर संस्था इतरांनी बळकावल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबीयांना / वारसदारांना विरोध करीत आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदे उपभोगली आहेत.करोडो रुपये विश्वस्त संस्थांमार्फत निधी देणग्या हाडप करताना दिसत आहेत, किती हा दैव दुर्विलास.ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला स्वातंत्र,समता,बंधुता आणि न्याय यांची शिकवण दिली त्या थोर न्यायाधीशाच्या धर्मपत्नीला त्यांच्याच अनुयायाकडुन खोट्या नाट्या आरोपा आधारे घनघोर अन्याय केला व करीत आहेत. केवढी ही कृतघ्नता आईसाहेबांप्रमाणेच माईसाहेबांचेही योगदान आंबेडकर अनुयायांनी लक्षात घ्यावे. व माईसाहेबांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घात केल्याचा जो काळा डाग लावण्यात आला आहे तो डाग माईसाहेबांची त्यांच्या महापरीनिर्वाणानंतर तरी क्षमा मागून धुऊन काढला जावा अन्यथा आपण आंबेडकर द्रोही अशीच इतिहासात नोंद होईल. माईसाहेबांना त्याच्या पुण्यतिथीनिमीत्त (दि.२९/०५/२०२५) दोन्ही कर जोडून श्रध्दांजली.
संदर्भ :- १) बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर – पृष्ठ क्रमांक ४४७, ४४८
२) माईसाहेबांचे अग्नीदिव्य – लेखक प्रा.पी.व्ही. सुखदेवे –पृष्ठ क्रमांक २०,२४,
३२,३३,६०,६२,६३,६६,९७,९९,१०२
३) आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ-लेखक ज.वि.पवार-पृष्ठ क्रमांक १७,१८

४) माईसाहेब आंबेडकर काय खरं काय खोटं – राजेश कोळंबकर पृष्ठ क्रमांक
४,५,६,१०,११,१३

हरीभाऊ साधुराव बनसोडे,
(बी.ए. (ऑनर्स), बी.एड.
सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी,
मो.नं.८९९९५८६३२२

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!