
————————–विशाल हिवाळे
विश्वाला मानवतेची शिकवण देणारे, बोधिसत्व, डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती जगभर साजरी होतेय.प्रत्येक पिडीत, वंचित, समतावादी आणि मानवतावादी नागरिक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा भाग होताना व जयंतीत सहभागी होताना आपण पाहतोय,अगदी राष्ट् प्रमुखांपासून ते शेवटच्या रेषेवर असणारा सामान्य, गरीब नागरीक महामानवाची जयंती उत्साहाने साजरी करतानाचं वास्तव आपण अनुभवतोय.खरं तर जयंती साजरी करण्याचे निरनिराळे प्रयोग अलिकडे होत आहेत.सुरूवाती पासुन जयंती सोहळ्याचे फॉर्म बदलल्याचे आपल्या निदर्शनास येतंय..जयंती सोहळ्यातील हा बदल, बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनी नाकारावेत हे अपेक्षित नाही. आपण जर हे बदल स्विकारणार नसू तर आपल्यात आणि कर्मठ, परंपरावादी लोकात परिवर्तनाची सीमारेषा राहणार नाही.
पूर्वीच्या काळातला बदल व आजचा बदल नेमका आहे तरी काय.70 च्य दशकां मध्ये किंबहुना त्याही पूर्वी जयंतीचे फॉर्म हे भजनी मंडळी असत अथवा कव्वालींचे जंगी सामने असत.आता आॕर्केस्ट्रांनी हि जागा घेतलीय.पूर्वी बसून गायलं जायचं, दोन कव्वाल असायचे, सवाल-जबाब व्हायचे.आता उभ्याने गाण्यावर भर दिला जातो.त्यातही सिंगल गायक असतो नाहीतर चार-पाच जणांचा चमू असतो.पूर्वी पहाट व्हायची आता कायद्याने 10 वाजता बंद करावं लागतं. मात्र जयंती मंडळं 12 ते 1 पर्यंत खेचतात.पूर्वीच्या सारखे जयंतीचे आकर्षक पोस्टर, बॅनर हल्ली दिसत नाहीत तर आता मोठमोठे होर्डींग दिसतात. भिंतींवरची जाहिरातबाजी बंद होऊन, कटाउटची रेलचेल दिसते.त्यावेळी शेजारच्या भागातील जयंती मंडळांना भेटून निमंत्रण दिलं जायचं, वाॅटस्पच्या काळात यात बदल झालाय.एकाच वेळी व प्रत्यक्ष भेटण्याची तसदी न घेता अनेकांना वाॅटस्पवरून निमंत्रण पाठवण्याची सोय झालीय.नव्वद्दीच्या दशका अखेर पर्यंत निळ्या पताक्यांनी आकाशही निळं,निळं झाल्यासारखं भासायचं आता निरनिराळ्या लायटींगच्या रोषणाईने चमकदारपणा आणला जातो.तेंव्हा जयंती उत्सवात मैदानात मोठ्या पडद्यावर चित्रपट दाखविले जायचे हल्ली मोठमोठ्या स्क्रीन लावून लाईव कार्यक्रम सुरू असतात.मासिकं आणि साप्ताहिकांचे जयंती विशेषांक काढण्याची परंपरा आता बंद झालीय. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन, त्यांचे महान विचार, त्यांचं कार्य, चळवळीचं विश्लेषण, प्रचलित सामाजिक प्रश्न आदी विषयांवर या जयंती विशेष अंकातून वैचारीक घूसळण व्हायची आता छोट्या, छोट्या लेखवजा पोस्ट लिहून, समाज माध्यमात प्रसारीत (व्हायरल) केल्या जातात.दूधाची तहान ताकावर भागविण्याचा हा प्रकार.पूर्वी जयंती म्हणजे प्रबोधनाची मांदियाळी असायची.निरनिराळ्या विषयांवर चार-पाच वक्ते निमंत्रित करुन व्याख्यानं, परिसंवाद व्हायचे.वैचारीक मेजवानीचा तो काळ,नाहीसा होताना दिसतोय.मात्र आता मोठमोठ्या बिदाग्या देऊन, चळवळीत सहभाग न घेणारे वक्ते बोलावले जातात.चळवळीतले वक्ते कार्यकर्त्यांच्या घरी केलेलं जेवण आवडीने खायचे.हल्ली भरमसाठ बिदागी घेणारे वक्ते जेवणाचा चाॅईस सांगतात.नामांकीत हाॅटेलमधलं जेवण मागवलं जातं.पूर्वीचे वक्ते ज्या भागात व्याख्यान वा परिसंवादाला जातील तिथल्या कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून राहायचे आताचे २५’०००ते ३०,००० हजार रक्कम घेणारे वक्ते व्याख्यान दिलेल्या भागाला व्यवहार वादामुळे ढुंकूनही बघत नाहीत.आता बिसलेरीच्या बॉटल रिचवल्या जातात पूर्वी मोठं मोठे पाण्याचे ड्रम भरून पाण्याचा पिण्यासाठी वापर व्हायचा. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सोहळ्यातील हे बदल आणि यांसारखे असंख्य बदल आपण वास्तवात झालेले अनुभवत आहोत.
आता मुद्द्यावर येतो, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीतील DJचा मुद्दा.पूर्वी जयंतीच्या भव्य मिरवणूकीत बॅंजोचा अथवा नासिक ढोलचा वापर व्हायचा कारण त्याकाळी DJचा जन्म आपल्याकडे झाला नव्हता.त्यामुळे बॅंजो किंवा नासिक ढोलवरच बेभान जल्लोष व्हायचा.मानवी जगण्याच्या ईतर क्षेत्रात जशी स्पर्धा आहे तशीच स्पर्धा निरनिराळ्या सण/उत्सवात झालेली दिसतेय.जून्या वादयांवर जल्लोष करण्यापेक्षा,नवीन वाद्यांवर डॉ आंबेडकर जयंतीच्या जल्लोष का होऊ नये?असं आंबेडकरवादयांना वाटणं नैसर्गिक आहे.इतर क्षेत्रातील बदल आणि प्रगतीची गती आपण स्विकारत असू तर सर्व समूहांचं आणि आवडतं व प्रमुख वाद्य झालेल्या DJ ला आपण विरोध करणं हा कपाळ करंटेपणा म्हणावा लागेल.प्रत्येक पिढी हे नवं राष्ट्र असतं,असं महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्या नवीन राष्ट्राचे जगण्याचे, आनंद घेण्याचे फॉर्म वेगळे असू शकतात.विचारांचा अवकाश वेगळा असू शकतो.नवीन पिढीची साद आपण ऐकणार की नाही?की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या दिशादर्शक विचारांची या निमित्ताने प्रतारणा करणार.*
DJबाबत होणारं अरण्य रूदन आपण थांबवलं पाहिजे. खरंच आपल्या समाजातील लोकांचा DJ ला विरोध आहे की पडद्या आडून, मनूवादी विचार चोख भूमिका पार पाडतोय.हे तपासावे लागेल.पूर्वी साजऱ्या होणाऱ्या जयंतीचे फॉर्म व आताच्या जयंती फॉर्म मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर जगातल्या कोटयावधीं पर्यंत पोहचले आहेत, पोहचत आहेत.पूर्वी पेक्षा आताचा DJ आणि त्यानुसार होणारा लाईटींगचा झगमगाट, अफाट गर्दी आणि गर्दितील बेभान होऊन हातात निळे व पंचरंगी झेंडे डौलवत, आपल्या मुक्ती दात्याच्या जयंतीला नाचणारी तरुणाई यांचे विडीओ, रिल्स समाज माध्यमातून वेगाने देशो-देशांच्या सीमा रेषा भेदत पोहचताहेत.बरं जयंतीच्या मिरवणूकीत DJ वर थिरकणारे फक्त बौद्ध नसतात तर ज्यांना, ज्यांना आंबेडकरवाद समजतोय,ज्यांच्या सामाजिक जीवनात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने, कार्याने आमूलाग्र बदल झालाय असे वेगवेगळ्या समाज घटकातील तरूण/तरूणी, बांधव/भगिनी असतात. DJवर ताल धरणाऱ्या या सर्व घटकांच्या डोक्यात भविष्यात आंबेडकरवाद जाणार याची निश्चित शाश्वती आहे.जयंतीमुळे सर्वदूर व सर्व स्तरात पोहोचणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या मनूवादयांना त्रासदायक होत असावेत.त्यामुळे जयंतीत वाजणाऱ्या DJ बाबत पडद्या आडून मनूवादयांनी त्रागा सुरू केला असण्याची दाट शंका आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला, आंबेडकरवादी तरूणांच्या प्रतिभेला वाव देणं हि समाजातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.नाही तर याच तरूणाईने ईतर उत्सवां मध्ये भाग घेतला तर तो त्यांचा नव्हे समाजाचा दोष असेल.म्हणूनच DJ या विषयावरची अर्थहिन चर्चा थांबवून मुख्य सामाजिक उत्थान व सामाजिक प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी.येऊ घातलेल्या संकटांवर मात करण्यावर चर्चा व्हावी हेच कला आणि संगीताची आवड असणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन असेल
–विशाल हिवाळे
(संविधान अभ्यासक आणि प्रचारक)
9022488113
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत