महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ५७


बौद्ध जीवनमार्ग

मागील भागात ‘सत्, असत् आणि पाप,
लोभ व तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर आणि मनुष्याचे मन आणि मनोविकार, आपण(स्वत्व) आत्मविजय आणि प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती,
विवेकशीलता, एकाग्रता आणि जागरूकता,
दुःख आणि सुख, दान आणि दयाळूपणा, ढोंग (खोटे बोलणे), खऱ्या धम्माची खोट्या धम्मासोबत सरमिसळ न करणे’ याबाबतीत माहिती घेतली. या भागात ‘सम्यक मार्गाचे अनुसरण’ याबाबतीत माहिती घेणार आहोत.

सम्यक मार्गाचे अनुसरण

सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहेत; परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही, तो बहुजनांच्या सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणपद आहे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवनमार्गाचे अनुसरण होय.

अष्टांगमार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे, सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये चार सत्य आहेत, वैषयिक अनासक्ती (passionlessness) हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे; दुसरा नाही. याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निरास होईल. दुःखाचे काटे कसे काढून टाकता येतील.

तथागत हे केवळ पथदर्शक आहेत. स्व-उन्नतीचा प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो.

सर्व पदार्थ हे विनाशाधीन आहेत, हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करु शकत नाही. सर्व रुपे अनित्य आहेत, जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करत नाही.

जेव्हा जागे व्हायला पाहिजे; तेव्हा जो होत नाही, जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही.

भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायेने कोणतेही पाप न करणे, हे काया-वाचा- मनसा आचरण्याचे तीन मार्ग अवलंबिल्यामुळे प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाने माणसाला जाता येते.

वास्तव ज्ञानाने लाभ होतो, आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा.

शरदऋतुतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी. शांततेचा मार्ग जवळ करावा.

अधर्माने वागू नका, अविचाराने जगू नका. खोट्या सिद्धांताचे अनुकरण करु नका.

जागे व्हा. सुस्त पडू नका. सदगुणाची कास धरा. सदगुणी या जगात सुखी असतात.

जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्ये सोडून सत्कृत्ये करु लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो.

एका धर्मनियमाचे उल्लंघन करुन जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्ये करणार नाही, हे सांगवत नाही.

जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात, जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात, त्यांचे दुर्विकार (आसव) शेवटी लोप पावतात.

अशी एक जुनी म्हण आहे की, जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात, जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात, जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही.

वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिभेचा संयम करा, मानसिक पापांचा त्याग करा आणि मनानेही सदगुणाचा आचार करा.

अप्रमाद (निर्दोषीपणा) हा निर्वाणाचा मार्ग आहे, प्रमाद (मोठा दोष) मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत् आहेत.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड चवथा भाग तिसरा
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.८.२.२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!