आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ; आंबेडकरी कुटुंबाबाबतचा दडपलेला इतिहास – आयु. राजेंद्र पातोडे

आज डॉ. बाबासाहेबांच्या सुनबाई व तमाम भारतीयांच्या आधारस्तंभ, सम्पूर्ण आयुष्य भारतीय बौद्ध महासभा आणि धम्म कार्यासाठी वेचणा-या महाउपासिका मिराताई यशवंतराव आंबेडकर ह्यांचा आज ५ मे २०२४ रोजी जन्मदिवस आहे.मीराताईना वाढदिवसाच्या मंगल कामना.
खरे तर बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे कमविले त्या वर समाजाचा पहिला अधिकार ठेवला होता.हे खरे असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या वाटयावर आलेला संघर्ष आपल्या समाजच्या दृष्टीने प्रचंड वेदनादायी आहे.प्रखर विरोध करण्यात सर्वात पुढे कुणी असतील तर ते स्वकीय अधिक होते.मिराताईच्या शब्दात सांगायचे झाले तर ..
“भैय्यासाहेबांचे निधन १७ सप्टेंबर,१९७७ ला झाले. त्यानंतर अनेकांनी मला त्रास द्यायला सुरवात केली. दादरच्या बुध्दभूषण प्रिटींग प्रेस मधे भारतीय बौध्द महासभेचे दप्तर कार्यालयातून पळवले. एक कागदाचा तुकडा शिल्लक ठेवला नव्हता. प्रिटींग प्रेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालले होते. वास्तविक पहाता बाबासाहेबांनी आपल्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी प्रेस त्यांच्या मुलाच्या नावे केली होती. त्याची कागदपत्रेही आहेत. इलेक्ट्रींसिटी बिल,म्युनिसिपल बिल, प्रॉपर्टी टॅक्स सर्टीफिकेट भैय्यसाहेबांच्या नावे होते. तरीही लोकांनी गुंड प्रवृत्तीचे दर्शन घडवले. रात्री अपरात्री टेलीफोन वरून निनावी धमक्या देणे, घराच्या दारावर थापा मारणे इत्यादी प्रकार चालवले. हे लोक इतक्या निच थराला गेले की त्यांनी माझ्या मुलांच्या जिवीताला धक्का लावायची,ईजा करायची भाषा सुरू केली. त्यांची ही कारस्थाने सच्च्या आंबेडकरी अनुयायांकडून मला कळत होती.त्या अनुयायाने मला त्याचे नाव कधीच सांगितले नाही, पण त्याने मला जी मदत केली, वेळोवेळी सावध केले, म्हणून मी माझ्या मुलांचे रक्षण करू शकले या व्यक्तिबद्दल आजही माझ्या मनात आदराची भावना आहे.
हे लोक इतक्या खालच्या थराला गेले की, त्यांनी माझा पाठलाग घरापर्यत सुरू ठेवला, धमक्या तर सतत चालू होत्या, २ जानेवारी १९७८ हा दिवस मी कधीही विसरू शकत नाही. कारण या दिवशी भारतीय बौध्द महासभेच्या ऑफिसचा ताबा घेण्यासाठी ही मंडळी ऑफिसवर चाल करून आली. त्यांना मी माझ्या आधिकारात सुनावलच, शिवाय माझ्या तिन मुलांना समोर उभं करून, “हात लावूनच दाखवा” असे आव्हान केले या प्रसंगाने भेदरून एकेकाने पळ काढला.”
(मुळ मुलाखत: मिराताई आंबेडकर
शब्दांकन:महेश भारतीय
सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर
संपादक: ज वि पवार
प्रकाशक: दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडीया)
मिराताईंनी नावे सांगितली नसली तरी आंबेडकरी जनतेला ती समजावी म्हणून आज ती सर्व नावे जनते समोर जाहिर करीत आहे.
मिराताईंना त्रास देणारे महाभाग आहेत..घनश्याम तळवटकर,आर.जी.रुके, दाभोळकर, नायगांवचे घनश्याम कदम यांनी त्रास दिला….या सर्वांचे नेत्रुत्व सुमंतराव गायकवाड आर.जी.रुके करीत होते….त्यांनी दादरच्या बुद्ध भुषण प्रिंटीग प्रेस मधील बौद्ध महासभेचे दफ़्तर कार्यालयातुन पळविले होते……त्यांनी मिराताईंचा पाठलाग केला…२ जानेवारी १९७८ ला बौद्ध महासभेच्या कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी घनश्याम तळवटकर,आर.जी.रुके, सुमंतराव गायकवाड .सावंत, मुंबरीसकर, दाभोळकर यांनी अॉफ़ीसवर चाल केली होती…तेंव्हा मिराताईंनी तिन्ही मुलांना समोर उभं करुन त्यांचा प्रतिकार केला होता. याच लोकांनी भारतीय बौद्धमहासभेच्या अध्यक्ष पदासाठी ’भैय्यासाहेबां नंतर कोण ?’ ” हा वाद उपस्थित केला होता…या लोकांचे उमेदवार घनश्याम तळवटकर, माईसाहेब आंबेडकर आणि शंकरानंद शास्त्री हे होते…मिराताईंच्या नावाला ज.वि.पवार, गंगाधर तांबुसकर, के.टी. अहीरे, एन. जी. मेश्राम यांनी पाठींबा दिला होता म्हणुन त्या भारतीय बौद्धमहासभेच्या अध्यक्ष म्हणुन ताई निवडुन आल्या… डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वाणा नंतर पिपल्स एज्युकेशन सोसायटीवर त्यांचे पुत्र म्हणुन भैय्यासाहेब आंबेडकरांना घेण्यात यावे अशी आंबेडकरी जनतेची इच्छा होती…त्या इच्छेचा अनादर डी.जी.जाधव, आर.आर.भोळे,शा.स.रेगे, मोहीते गुरुजी व परमार यांनी केला होता.भैय्यासाहेब सोसायटी वर आले की त्यांच्या भानगडी बाहेर येतील अशी त्यांना भीती वाटत होती .
माईसाहेब आंबेडकरांना राजगृहामध्ये ताबा देण्या साठी १.८० लाख मध्ये ३० हजार कमी पडले होते .त्या साठी भैय्यासाहेबांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीला तीस हजार कर्ज मिळावेत ते व्याजासह परत करेन असे लेखी अर्ज दिला होता..परंतु त्यांना कर्ज नाकारण्यात आले होते…मात्र त्याच वेळी संस्थेने अनेक बड्या मंडळींना कर्ज दिले होते….
राजगृहा मध्ये तिस-या माळ्यावर भैय्यासाहेब राहत होते . लहानपणा पासुन पायाचा आजार असल्याने चढण्या उतरण्याचा त्रास होतो म्हणुन भैय्यासाहेबांनी दुसरा माळा मिळावा म्हणुन पिपल्स सोसायटीला अर्ज केला होता..परंतु त्या अर्जा वर निर्णय घ्यायला सोसायटीला ५- ६ वर्षे लागली !…भैय्यासाहेबांच्या आजाराची कल्पना असताना आणि त्या जागे साठी रितसर पैसे भरुन देखील त्यांचा छळ करण्यात आला होता…
कारण आंबेडकर कुटुंबाने जे काही मिळविले आहे, ते संघर्ष करून. मग ते भैय्यासाहेब असो की बाळासाहेब सर्व आंबेडकर कुटुंबाने स्व:बळावर मिळविले आहे.तरीही मनात कटुता ठेवली नाही.उलट भैय्यासाहेब आंबेडकर ह्यांनी पक्ष आणि समाज एकत्र असावा ह्या साठी स्वत: पुढाकार घेवून ‘ऐक्य’ घडवून आणले होते.नागपुर च्या दीक्षाभूमिची १२ एकर जागा भैय्यासाहेब आंबेडकर ह्यांना दिली होती.ती जागा तत्कालीन जिल्हाधिकारी डांगे ह्यांनी परस्पर रा.सु. गवई ह्यांचे स्मारक समितीला दिली गेली. तरी भैय्यासाहेबानी दावा केला नाही.उलट बाबासाहेबांचे चैत्यभूमि येथील स्मारक जनतेच्या पैश्यातून तयार करून घेतले.बाळासाहेबांनी देखींल वारसा म्हणून पक्ष, संस्था इतर काही मिळविले नाही.तर ३५ वर्ष परिश्रम घेऊन आज “वंचित ” ची ताकद उभी करून महाराष्ट्राला नवा राजकीय पर्याय आणि फुले शाहु आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या समुहाला स्वतःच्या हक्काचा पक्ष दिला आहे.ह्या सर्वा पाठीमागे ‘मिराताई ‘ आहेत, त्यांची शिकवण आहे.जे काही भोगले त्याचे भांडवल न करता अथक परिश्रम घेऊन त्यानी बाबासाहेबांना अपेक्षित मातृसंस्था समर्थपने चालविली. आपल्या कुटुंबाला देखींल बाबासाहेबांच्या वैचारिक वारसा प्रमाणे घडविले.
अश्या ह्या संघर्षमूर्तीस पुन्हा एकदा मंगल कामना.
@ राजेन्द्र पातोडे
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत