धर्मांध चष्मे उतरवून इतिहासाकडे विवेकाने बघा–डॉ. अनंत दा. राऊत

इतिहासाकडे पाहण्याच्या वस्तूनिष्ठ, विवेकी दृष्टीचा अभाव. वेगवेगळ्या तथाकथित धर्मनिष्ठ समूहांमध्ये द्वेषाचे विष कालवणारे राजकारण. या राजकारणाने भैकवून टाकलेली तरुणाई हे वर्तमानातील मनोवास्तव आहे. हे वास्तव बदलवून ते विवेकी बनवले की इतिहासकालीन गोष्टींच्या संदर्भात कसा विचार केला पाहिजे हे कळते, हे ज्यांना कळते ते इतिहास उकरून वर्तमान कधीही बिघडवू देत नसतात. विशिष्ट समूहांच्याबद्दल द्वेष पसरवण्यासाठी, धर्माधर्मात भांडणे लावण्यासाठी वर्तमानात सुरू असलेले धर्मांध राजकारण्यांचे षडयंत्र विवेक हरवलेले लोक समजू शकणार नाहीत. पण विवेक किंचित का होईना जागा असलेल्या लोकांनी तरी त्याला किती दिवस बळी पडायचे आणि आपण आपला वर्तमान किती बिघडवून घ्यायचा याला काही मर्यादा असतात.
मुस्लिमांनी मुस्लिम चष्मा काढून औरंगजेबाच्या इतिहासाकडे पाहिले तर त्यांना औरंगजेबाची क्रूरता ही अमानवीय आहे, हे तीव्रतेने लक्षात येईल. कोणत्याही राजाच्या राज्यकारभारात काही वाईट काही चांगल्या गोष्टी असतातच, पण अधिक्य कशाचे आहे यावरून त्याचे मूल्यमापन करायचे असते. औरंगजेबाच्या व्यक्तिगत वर्तनात साधेपणा वगैरेच्या चांगल्या म्हणाव्यात अशा गोष्टी आढळून आल्या म्हणून तो आदर्श राजा होता असे म्हणण्याचे काही कारण नाही हेही त्यांच्या लक्षात येईल.हिंदूंनी हिंदू चष्मा काढून औरंगजेबाकडे पाहिले तर तो केवळ मुस्लिम होता म्हणून त्याचा द्वेष करण्याची भूमिका ते घेणार नाहीत. विरोध हा प्रवृत्तीला करायचा असतो, विशिष्ट ठिकाणच्या जन्माला नाही. इतिहासाचे जशास तसे जतन, पुरातत्त्व विभागाची जबाबदारी हे सारे लक्षात आले तर औरंगजेबाची कबर उखडून काढा अशी भाषा ते करणार नाहीत. क्रूर प्रवृत्तीच्या राजाचे उदत्तीकरण मुसलमानांनी किंवा कुणीही तो आपल्यासमूहातला होता म्हणून करण्याचे कारण नाही.
इतिहास हा वर्तमानातील विविध समूहांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी समोर आणायचा नसतो तर इतिहासामध्ये ज्यांनी कोणी ज्या प्रकारच्या चुका केल्या त्या चुका वर्तमानात आणि भविष्यात कधीही होऊ नयेत याचा बोध घेण्यासाठी व तशी व्यवस्था करण्यासाठी इतिहास अभ्यासायचा असतो. इतिहास काळात ज्या चांगल्या, उत्तमातीउत्तम प्रवृत्ती होत्या त्यांचे जागरण करण्यासाठी आणि त्या लोकमनामध्ये रुजवून मोठ्या प्रमाणात फुलवण्यासाठी इतिहास जागवायचा असतो. द्वेष पसरवणारे घटक अडगळीत टाकायचे असतात याचे सुजाण भान सर्वांना आले तर लोक इतिहास उकरून आपला वर्तमान बिघडवणार नाहीत.
आपणा सर्वांना सारी संकुचित कुंपणे तोडून सच्चे भारतीय बनायचे आहे. सच्चे भारतीय बनवण्यासाठीची प्रबोधन प्रक्रिया संविधान मूल्ये रुजवण्यातून होत असते. ही प्रक्रिया न करता वर्तमानात इतिहास उकरून काढून धर्मद्वेष वाढवण्याचे हे जे भयंकर राजकारण चाललेले आहे ते आपल्या लोकशाही भारतासाठी घातक आहे.
भारतातील लोक धर्म, जात, पंथ, भाषा, प्रांत इत्यादी संकुचिततेतून बाहेर येतील, व्यापक बनतील, अंधश्रद्धांना सोडचिठ्ठी देऊन बुद्धिवादी व विज्ञानवादी बनतील. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, सत्य, शांती, अहिंसा, प्रेम, मैत्री, करुणा या मूल्यांचे पालन करतील अशा आशयाच्या प्रबोधनावर सर्वाधिक भर देणे आवश्यक आहे. हे काम करणे सोडून इतिहासातील काहीतरी वादस्थळे उकरून काढायची आणि परस्परांमध्ये द्वेष पसरवायचा ही वर्तमान राजकारण्यांची प्रवृत्ती घाणेरडी व राष्ट्र घातक आहे. या घाणेरड्या प्रवृत्तीला भारतीयांनी बळी पडणे योग्य नाही.
आपणा हिंदू, बौद्ध, जैन, मुस्लिम, शीख, ईसाई अशा सर्व भारतीयांना खऱ्या अर्थाने भारतीय बनायचे आहे. एकजीव व्हायचे आहे. आपली एकात्मता दृढ करायची आहे. परस्परांच्या हातात हात घालून एकमेकाला मदत करत आपला सर्वांचाच निकोप विकास घडवून आणायचा आहे. त्यासाठी इतिहास काळातील गोष्टी उकरून आपणाला भांडणे करायची नाहीत. आपणा सर्वांना प्रगतीच्या दिशेने जायचे आहे. सारे भारतीय प्रगत झाले तर भारत प्रगत होईल. त्यासाठी सत्तांध राजकारणी इतिहासातल्या नको त्या गोष्टी उकरून काढून आपल्यामध्ये भांडणे लावत असतील तर आपण सर्वांनी शांततेने एकमेकांचा हात हातात घेऊन त्यांना उत्तर दिले पाहिजे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत