रगेल बहूजनांच्या खांद्यावर, रंगेल ब्राह्मण्याचे ओझे…

काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या मांडवात संघाचे प्रातःस्मरणीय मार्गदर्शक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक, संघाला दहा ईश्वरी आज्ञा आणि विचारधनाचे हिट*लरी बौद्धिक देणारे गोळवलकर गुरूजींचीही जयंती साजरी व्हायला लागली तर आश्चर्य वाटायला नको. तर ते होईलच याची मला खात्रीच वाटते.
ब्राह्मण्यवाद बहुजनांच्या गळ्याभोवती कशा पद्धतीने फास आवळतो आहे त्याचे ताजे उदाहरण म्हणजे आज शिवजयंतीच्या दिवशी शिवद्रोही विचारांच्या गोळवलकर गुरुजींना बहुजन नेत्यांनी व महिलांनी दिलेल्या मानवंदना. यामध्ये लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणजे गुरुजींना अभिवादन करण्यासाठी बॅनरवर आपले नाव टाकण्याची स्पर्धा फक्त लाळचाट्या बहुजन नेत्यांचीच आहे. यात काहिजणांची गोची अशी झाली आहे की आज गोळवलकरांची जयंती आहे की पुण्यतिथी यात त्यांचा गोंधळ उडाला आहे. काही जणांनी अभिवादन केलंय तर काही जणांनी श्रद्धांजली अर्पण केलीये. वरुन आलेल्या हुकमाचा अंमल करण्याशिवाय हे हुकमाचे आणखी करणार तरी काय? देवेंद्र फडणवीस यांनी गुरुजींना अभिवादन करताना आपले नाव कटाक्षाने टाळले आहे कारण तेवढे नैतिक धारिष्ट्य त्यांच्यात नाही.
यावर्षी फक्त खडा टाकून चाचपणी करुन घेत आहेत की पाण्यामध्ये किती तरंग उठतात की सगळं शांत आहे. आज सगळं शांत राहिलं तर पुढच्या वर्षी विधानसभेत प्रस्ताव मांडून राज्यपातळीवर गोळवलकर गुरुजींचा जयंती महोत्सव साजरा करण्याचा अध्यादेश निघू शकतो. ताटाखालची मांजरं हुं की चुं करणार नाहीत याची त्यांना पक्की खात्री आहे. यापुढील काळात नेत्यांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे धर्मांध हिंदुत्वीकरण म्हणजेच संघीकरण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे खुजेकरण करुन प्रातःस्मरणीय गोळवलकर गुरुजी यांचे उदात्तीकरण करुन गोळवलकर जयंती धुमधडाक्यात साजरी केली गेली तर आश्चर्य वाटायला नको. सध्याची परिस्थिती पाहता गोळवलकर गूरुजींना पुढे आणून छत्रपती शिवाजी महाराजांना अडगळीत टाकले जाईल की काय अशी शंका घेण्याजोगी एकंदर परिस्थिती आहे.
कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना असो वा संघी राज्यपालांनी किंवा त्यांच्या धर्मांध हिंदुत्ववादी नेत्यांनी शिवाजी महाराजांची आक्षेपार्ह बदनामी केल्यावरही शेपुट घालुन बसणाऱ्या, मेंदुत किडे पडलेल्या भिडेच्या आंबापुत्र भक्तांना जराशीही लाज वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा धर्मनिरपेक्ष स्वराज्याचा विचार डोक्यात घेण्याऐवजी नासलेल्या मेंदुच्या भिडे नावाच्या तद्दन धर्मांध, मुस्लिमद्वेषी विकृतीचा संघी विचार डोक्यात घेणाऱ्या या तरुण पिढीला बौद्धिकदृष्ट्या षंढ करुन टाकले गेले आहे. उद्या यांनाच गुरु गोळवलकरांच्या अपकिर्तिचे महिमामंडण गायला गाऊन गोळवलकरी पालख्या यांच्या बोकांडी ठेऊन पुजल्या जातील तो दिवस दूर नाही.
तमाम मराठी जनतेला मुर्ख बनवून, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही अरबी समुद्रात उभारणार हे आश्वासन देऊन महाराष्ट्राच्या सत्तेवर ज्यांनी ताबा मिळवला ते आज दहाबारा वर्षे झाली तरी अद्याप त्या स्मारकाची सुरुवातही करु शकलेले नाहीत. उद्याच्या उज्वल भविष्याचं सोनेरी स्वप्न बघणाऱ्या तरुण युवकांना, विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गोंधळात टाकणारी मांडणी करुन पदयात्रा, गडकोट मोहिमेचे गाजर दाखवून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचे महापाप या कारस्थानी शिपुरड्याने वर्षानुवर्षे चालवले आहे तरी तथाकथित बुद्धीबधीर शिवभक्तांच्या ते लक्षात येत नाही.
गावखेड्यातील भोळ्याभाबड्या, गरीब तसेच महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्तांना रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे बत्तीस मण वजनाचे सोन्याचे सिंहासन स्थापन करायचे आहे असे भावनिक आवाहन करुन अनेक वर्षे जमा केलेला निधी, सोन्याचे दागिने तसेच त्या निमित्ताने जमा झालेला सर्व पैसा या धूर्त म्हाताऱ्याने हडप केलेला आहे. त्या सर्व निधीचा विनियोग याने आतापर्यंत कसा, कुठे, किती, कधी केलाय हे अद्याप याने जाहिर केलेले नाही. महाराजांना राज्याभिषेकाचा अधिकार नाकारणाऱ्या या मनुवादी औलादींकडुन छत्रपतींचा यथोचित सन्मान होईल याची आम्हाला अपेक्षाही नाही. ब्राह्मणेतर बहुजनांच्या पोरांना शिवाजी महाराजांच्या नावाने मुस्लिम द्वेष पेरुन दंगली घडवायला यांना फक्त महाराज लागतात परंतू या मनुवादी भटपुरोहितांच्या मनात रयतेच्या हक्काचं ‘स्वराज्य’ स्थापन करणाऱ्या महाराजांबद्दल तिळमात्र अभिमान वा आपुलकी नाही हे वारंवार सिद्ध झालंय.
यांच्या स्वराज्याची संकल्पना भटमान्य टिळकांनी कांगावा केल्याप्रमाणे जन्माधिष्ठीत आणि ब्राह्मण्यवादी वर्णाधिष्ठीत समाजसंस्कृतीचा पुरस्कार करणारी आहे. यांना लोकशाहीवादी रयतेच्या राज्याची संकल्पना कदापी अपेक्षित वा मान्य नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजच काय तर छत्रपती प्रतापसिंह महाराज तसेच राजर्षी शाहु महाराजांनाही शुद्र ठरवण्यापर्यंत या शेंडीजानवं बहाद्दरांची मजल गेली होती. ‘मनुवादी ब्राह्मण्यवाद’ हा या देशाला पोखरणारी अत्यंत घातक अशी वाळवी आहे. या देशावर धर्मांध तसेच वर्णवर्चस्ववादी समाजव्यवस्थेच्या आग्रह धरणारी विषमतावादी कपटी, कारस्थानी प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला ब्राह्मणेतर, बहुजनांतील आदर्श नायक वा महापुरूषांनी गाजवलेल्या कर्तृत्वाबद्दल तसुभर कौतुक नाही. त्यामुळे वारंवार महापुरुषांची अस्सल विचार गिळंकृत करुन त्यांच्याकडून आपल्या पडेल नायकांची टिमकी वाजवणे हा यांचा पिढीजात धंदा आहे. यांचे आदर्श स्वतःच्या बळावर व उजळ चेहऱ्याने समोर आणणे यांना कदापी शक्य नाही. त्यामुळे आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आणि आपल्याच बाजारबुणग्यांना पुढे करुन त्यांच्या आडून हे आपला मनुवादी तिर मारत असतात.
यांनीच शिवाजी महाराजांना तत्कालीन परिस्थितीत तिव्र विरोध केलेला आहे कारण शिवाजी महाराजांना संपूर्ण अलुतेदार, बलुतेदार, अठरापगड जातींचे व सर्वांना समान न्याय देणाऱ्या ‘रयतेचे राज्य’ अपेक्षित होते. म्हणून त्याकाळी मनुस्मृती या धर्मग्रंथाच्या आधारे शिवाजी महाराज हे शूद्र असुन त्यांना ते क्षत्रिय नसल्याने त्यांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही असे सांगून त्यांची हेटाळणी करण्यात आली. येथील ब्राह्मणांनी मराठा शिवाजी शूद्र तर राजपूत शिवाजी क्षत्रिय ठरवले. राजस्थानमधील शिसोदिया घराण्याच्या वंशावळीनुसार राजपूत शिवाजीमहाराजांना क्षत्रिय ठरवून, मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ उपटून गागाभट्टाने महाराजांना राज्याभिषेक केला. या राज्याभिषेकावेळी स्वराज्याचा खजिना अक्षरशः मोठ्या प्रमाणावर रिता करण्यात आला. तो कसा केला गेला हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तुर्त येथे एवढेच लक्षात घेणे गरजेचे आहे की, समानतेच्या, बंधुतेच्या, न्यायाच्या, स्वातंत्र्याच्या पायावर उभे राहिलेले हे स्वराज्य इथल्या मनुस्मृतीसमर्थक धर्ममार्तंडांना कधीच मान्य नव्हते. त्यामुळे या सर्वसमावेशक स्वराज्याचा सतत विरोध करणे हा इथल्या सर्वोच्च वर्णीयांचा एककलमी कार्यक्रम होऊन राहिला होता. त्याचीच परिणती शेवटी पेशवाईत झाली. नंतरच्या काळात ब्रिटीशांचे राज्य आल्यानंतर शिक्षणाच्या जोरावर प्रशासकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वरच्या हुद्द्यावर नेमणुका झाल्याने हा उच्चवर्णीय समाज सुखावला. परंतू ब्रिटीशांनी धर्मात लक्ष घालून इथल्या अनिष्ट चालीरीती, अमानवी रुढीपरंपरा आणि जाचक अंधश्रद्धा यावर निर्बंध घालून समाजसुधारणा करायला सुरुवात आणि सर्वांसाठी शिक्षण, नोकऱ्या, न्यायालये उपलब्ध केल्यानंतर हा वर्ग पुन्हा दुखावला.
पुढील काळात स्वातंत्र्य चळवळीने जोर पकडल्यावर हे ब्रिटीश जाऊन सत्ता पुन्हा आपल्या हातात येणार या कल्पनेने हा वर्णवर्चस्ववादी वर्ग पुन्हा चेकाळला. परंतू यांचं दुर्दैव असं की स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व टिळकांच्या हातात असेपर्यंत पेशवाईच्या स्वप्नानंदात असणारा हा वर्ग गांधीजींच्या स्वराज्याच्या संकल्पनेने पुन्हा दुखावला. कारण टिळकांचे स्वराज्य म्हणजे त्यांच्यासाठी जन्मसिद्ध अधिकार होता तर गांधीजींचे स्वराज्य म्हणजे शुद्रातिशुद्र समजल्या गेलेल्या सगळ्यात खालच्या स्तरावरील स्त्रीला सर्वोच्च पदावर बसण्याचा अधिकार होता. यामुळे अशा प्रकारचे स्वराज्य आपल्या काय कामाचे म्हणून स्वातंत्र्य आंदोलनातून काढता पाय घेवून स्वातंत्र्य चळवळीत भाग न घेणाऱ्या पळपुट्यांचे नेते होते हे गोळवलकर गुरुजी. एवढेच काय तर आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरदेखील यांना पोटशूळ उठला होता. दिल्लीत स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याची तयारी सुरू होती. त्यावेळी ‘ऑर्गनायझर’ या आरएसएसच्या इंग्लिश मुखपत्राने आपल्या १४ ऑगस्ट १९४७ च्या अंकात या आपल्या तिरंगा ध्वजाच्या निवडीवर तुच्छतादर्शक शब्दांत टीका केली होती. त्यांनी म्हटले होते,
“ज्यांना केवळ चुकून नशीबाचा हात मिळाल्यामुळे सत्ता मिळाली आहे ते आमच्या हातात कदाचित तिरंगा देतीलही; परंतु त्याला हिंदूंकडून कधीच आदर आणि मान्यता मिळणार नाही. मुळात तिरंगा हा शब्दच दुष्ट आहे, तीन हा आकडा अशुभ आहे आणि तीन रंग असलेल्या ध्वजामुळे मानसिकदृष्ट्या अत्यंत अनिष्ट परिणाम होतील. हा ध्वज देशासाठी घातक आहे.”
म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे लोकशाही प्रस्थापित झाली हे या गोळवलकरांना आणि त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पिलावळीला कदापी मान्य नाही. त्यांना येथे उच्चवर्णिय ब्राह्मण भटपुरोहितांच्या तालावर नाचणारे आणि राजाला आपल्या मुठीत ठेवणारी राज्यव्यवस्था अपेक्षित आहे. त्यासाठीच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अखंडपणे त्यांचा जळफळाट सतत सुरू आहे.
अशा प्रकारे आरएसएसने देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला या ध्वजाला अशुभ आणि अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले होते. त्याआधी गोळवलकरांनी १४ जुलै १९४६ रोजी गुरुपौर्णिमेच्या संमेलनात नागपुरात भाषण करताना असे म्हटले होते की,
“भगवा ध्वजच भारतीय संस्कृतीचे, आपल्या महान हिंदू संस्कृतीचे परिपूर्ण प्रतिनिधित्व करतो. तो परमेश्वराचे मूर्तिमंत प्रतीक आहे. अखेरीस संपूर्ण राष्ट्र या भगव्या ध्वजासमोर नतमस्तक होईल, असे आम्हाला ठामपणे वाटते.”
अगदी स्वातंत्र्यानंतरही आरएसएसने तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ पन्नास वर्षे संघाने आपल्या मुख्यालयावर आपल्या देशाचा राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकावला नव्हता. ‘ड्रिफ्टिंग अँड ड्रिफ्टिंग’ या लेखात राष्ट्रध्वज म्हणून तिरंग्याच्या निवडीचा उघड धिक्कार करताना गोळवलकरांनी म्हटले होते की,
” आपल्या नेत्यांनी आपल्या देशासाठी एक नवीनच राष्ट्रध्वज तयार केला आहे. त्यांनी असे का केले? हा फक्त एक भरकटण्याचा आणि परकीयांची भ्रष्ट नक्कल करण्याचा स्पष्ट पुरावा आहे. हा काय शुद्ध आणि निरोगी राष्ट्रीय दृष्टिकोन आहे का? ही तर केवळ एका राजकीय नेत्याची तडजोड होती. ती केवळ एक राजनैतिक कामचलाऊ तात्पुरती मलमपट्टी होती. कोणताही राष्ट्रीय दृष्टिकोन, राष्ट्रीय इतिहास अगर परंपरा यांवर आधारित कोणत्याही सत्यातून प्रेरणा घेऊन तो तयार करण्यात आला नव्हता. आपला देश हा प्राचीन आणि महान आहे आणि त्याला उज्ज्वल भूतकाळ लाभलेला आहे. मग आपल्याकडे आपला स्वतःचा ध्वज नव्हता का? एवढ्या हजारो वर्षांत आपल्याकडे राष्ट्रीय प्रतीक नव्हते का? निःसंशयपणे आपल्याकडे ते होते. मग तरीही आपल्या मनात त्याविषयी एवढी निखालस पोकळी का आहे?”
गोळवलकरांना आपल्या देशाची लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, राज्यघटनाही अमान्य होती.
भारतीय राज्यघटनेविषयी ते नेतृत्व करत असलेली आरएसएस किती निष्ठा बाळगते हे गोळवलकरांच्या खालील विधानावरून समजून येते. गोळवलकर म्हणतात,
” आपली राज्यघटना हा विविध पाश्चात्य देशांच्या वेगवेगळ्या राज्यघटनांमधील वेगवेगळ्या विषम, बहुजिनसी कलमांचे तुकडे एकत्र करून तयार करण्यात आलेला बोजड संग्रह आहे. ‘आपले’ म्हणावे असे यात काहीही नाही. आपला राष्ट्रीय जीवनोद्देश आणि आपल्या जीवनाचा प्रमुख उद्देश काय आहे याविषयी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एका शब्दाने तरी उल्लेख करण्यात आला आहे का?”
आरएसएसच्या तत्त्वज्ञांचे विचार नेहमीच भारतीय संघराज्याच्या स्पष्टपणे विरोधात राहिले आहेत. आरएसएसच्या कार्यकर्त्यांसाठी ‘विचार नवनीत’ हे गोळवलकरांचे पुस्तक म्हणजे गीता आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचे शीर्षक आहे, ‘एकात्मिक शासनाची अनिवार्यता.’ या प्रकरणात गोळवलकरांनी भारतातील संघराज्य पद्धती नष्ट करण्याचे उपाय सुचवले आहेत. ते लिहितात, “आपल्या देशाच्या घटनेतून संघराज्याची संपूर्ण चर्चा कायमचीच समाप्त करून टाकावी. एका राज्याच्या म्हणजेच भारताच्या अंतर्गत अनेक स्वायत्त किंवा अर्धस्वायत्त राज्यांचे अस्तित्व संपवून टाकणे आणि एक देश, एक राज्य, एक विधानमंडळ, एक कार्यपालिका जाहीर करणे हे या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने टाकलेले सर्वात महत्त्वाचे आणि प्रभावी पाऊल असेल. अशा देशात खंडात्मक, क्षेत्रीय, धार्मिक, भाषिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या अभिमानाचा लवलेशही असता कामा नये. “
तसेच या माधव सदाशिव गोळवलकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी ज्या दहा मार्गदर्शक ईश्वरी आज्ञा दिल्या आहेत त्यापैकी काही आज्ञा पाहिल्या तर या गुरुजींची मनोभूमिका लक्षात येईल. तथाकथित गुरुजी सांगतात ते पुढीलप्रमाणे :
- वंश शुद्ध ठेवण्यासाठी हिटलरचा धडा गिरवा !
- ईश्वरनिर्मित श्रुती व स्मृती यांचा भाग असलेली वर्णव्यवस्था हा आपल्या धर्माचा पाया आहे. त्याचे रक्षण झाले पाहिजे,
- ‘समता’ नव्हे ‘सहकार’ आपल्या हिंदू व्यवस्थेचा पाया आहे. जगात समता कोठेही नाही. येऊ शकत नाही. आणण्याचा प्रश्न निष्फळ ठरेल.
- वर्ण हे कर्माप्रमाणेच ठरतात; पण कोणते कर्म? पूर्वजन्माचे कर्म !
5.समाजाची शक्ती खच्ची व्हायची नसेल तर एकच नेता असावा व त्याच्या आज्ञा पाळाव्या.
6.खासगी संपत्ती हा पवित्र अधिकार आहे. त्याचे रक्षण करा !
7.ज्यांना संपत्ती मिळवता येत नाही ते दरिद्री राहतात आणि लोभाने, स्वार्थाने व असूयेने संपत्तीधारकांविरुद्ध झगडतात !
8.समाजसत्तावादाचा झगडा स्वार्थावर आधारलेला असतो.
9.स्त्री-पुरुष समानतेच्या बडबडीला हिंदू धर्मात स्थान नाही.
10.कष्टकऱ्यांनी (दलितांनी) ‘हे देवाचे काम आहे’ असे मानून आपले काम करावे. फळाची अपेक्षा करू नये.
या गोळवलकर गुरुजींना समता मान्य नाही. लोकशाहीबद्दल यांना तिटकारा आहे. यांना ब्राह्मणेतरांचे श्रेष्ठत्व मान्य नाही. यांना भारताची राज्यघटना मान्य नाही. तर मग हे ब्राह्मणेतर ब्राह्मण्याच्या पालख्या वाहणारे, हे “कुर्हाडीचा दांडा गोतास काळ” असणारे ब्राह्मणेतर लोकप्रतिनिधी कसे मान्य असतील? परंतू आज भारतीय संविधानाच्या कृपेने भारताच्या विधीमंडळात, कायदेमंडळात, कार्यकारी मंडळात मतदानाद्वारे जाऊन बसलेले हे अतृप्त आत्मे गुरु गोळवलकरी हिंदुराष्ट्रात कुठे असतील याचा विचार तरी यांच्या रिकाम्या डोक्यात येत असेल का? खाटकांच्या संगतीने वाजतगाजत यज्ञवेदीकडे निघालेल्या बळीच्या बकऱ्यांसारखी अवस्था या मेंदू गहाण ठेवलेल्या राजकारण्यांची झालेली आहे. याबद्दल त्यांची खुप दया येते, त्यांच्याबद्दल अत्यंत करुणा दाटून येते. परंतु त्यांच्या मुर्खपणासमोर करणार काय अशी परिस्थिती आहे. एकवेळ झोपलेल्याला जागे करता येईल परंतू झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे सोपे नाही.
या संघाच्या गुरु गोळवलकरांना आपल्या देशाचा ध्वज मान्य नाही, आपल्या देशाचे संपूर्ण जगाने कौतुक केलेले ‘भारताचे संविधान’ मान्य नाही, इथली लोकशाहीवादी समानतेवर आधारित समाजव्यवस्था मान्य नाही. तर त्यांना जर्मनीचा क्रुर हुकुमशहा हिटलरच्या हुकुमशाही तत्त्वांवर आधारित उच्च वर्णियांची एकाधिकारशाही अपेक्षित आहे. ते बेधडकपणे हिट*लरच्या हुकूमशाही आणि फॅसिस्ट रचनेवर आधारित हिंदू राष्ट्राची निर्मिती करण्याचे सुतोवाच करतात. हे त्यांच्या पुढील शब्दांवरून ते स्पष्ट होते. “प्राचीन राष्ट्रांनी आपल्या देशातील अल्पसंख्यांकांची समस्या कशी सोडवली ही बाब आपण डोक्यात ठेवली पाहिजे. आपल्या राजनैतिक यंत्रणेत कोणत्याही भित्र तत्त्वाचा स्वीकार करण्याची तयारी त्यांनी ठेवली नाही. परदेशी लोकांना नैसर्गिकपणेच लोकसंख्येच्या प्रमुख प्रवाहाशी स्वतःला जुळवून घ्यावेच लागते. त्यांची संस्कृती, भाषा आणि महत्त्वाकांक्षा यांचा स्वीकार करून आपल्या स्वतंत्र अस्तित्वाच्या भावनेचा त्याग करून आणि आपले परदेशी मूळ विसरून त्यांना त्यांच्याशी एकरूप व्हावे लागते. जर त्यांनी तसे केले नाही, तर केवळ परदेशी लोकांप्रमाणेच ते राहू शकतात. राष्ट्राचे सर्व निर्बंध आणि नियम पाळून, केवळ कोणत्याही विशेष संरक्षणाचीच अपेक्षा न बाळगता नव्हे; तर कोणत्याही सुविधा न मागता त्यांना राहावे लागते. अशा परदेशी लोकांसमोर केवळ दोनच मार्ग असतात. एक तर राष्ट्रीय वंशात त्यांनी पूर्णपणे मिसळून जावे, या वंशाच्या संस्कृतीचा स्वीकार करावा किंवा राष्ट्रीय वंशाचे लोक जोपर्यंत आपल्या देशात राहाण्यास परवानगी देतील, तोपर्यंतच त्यांच्या दयेवर देशात राहावे. राष्ट्रीय वंशाच्या लोकांना त्यांनी देश सोडून निघून जावे असे वाटले, तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी देश सोडून निघून गेले पाहिजे. हाच एकमेव तर्कसंगत आणि उचित उपाय आहे. फक्त याच प्रकारे राष्ट्रीय जीवन शांततेने आणि त्रस्तताविरहित राहू शकते. फक्त असे करूनच एका राष्ट्रांतर्गत कर्करोगासारख्या उपजणाऱ्या आणि पसरणाऱ्या दुसऱ्या राष्ट्राची निर्मिती होण्याच्या धोक्यापासून आपण आपला बचाव करू शकतो. प्राचीन समजूतदार देशांच्या अनुभवांवरून असे सांगता येते की हिंदुस्थानात बिगर हिंदू जनतेने एक तर हिंदू जातीचे आणि संस्कृतीचे म्हणजेच हिंदू राष्ट्राचे गुणगान करण्याखेरीज इतर काहीही करता कामा नये. त्यांनी हिंदू वंशात मिसळून जाण्यासाठी आपले स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणले पाहिजे; अन्यथा, हिंदू राष्ट्राच्या पूर्ण अधीन राहून ते इथे राहू शकतात. त्यांनी कोणत्याही गोष्टीवर हक्क सांगता कामा नये. कोणताही विशेषाधिकार, प्राधान्य देणारे व्यवहार, वर्तन आणि अगदी नागरी अधिकारांपासूनही वंचित राहून त्यांना या देशात राहावे लागेल. याखेरीज त्यांच्याकडे अन्य कोणताही मार्ग नाही. आपला देश एक प्राचीन देश आहे. आपल्या देशात राहाणे पसंत केलेल्या परदेशी जातीच्या लोकांशी इतर प्राचीन राष्ट्रांनी ज्याप्रमाणे वर्तन केले आहे, तसेच वर्तन आपल्यालाही या परदेशी लोकांशी करावे लागेल.”
त्यांच्या या वक्तव्यावरून असे दिसुन येते की या भारतात ज्यांना रहायचे असेल त्यांनी या गोळवलकरांना अपेक्षित असलेल्या नियमांनुसार राहिले पाहिजे. इथल्या दुय्यम नागरिकांना म्हणजेच चातुर्वर्ण्याधारीत हिंदूंखेरीज सर्व अतिशूद्र, परधर्मीय वा ज्यांना हिंदु धर्मातील जातिव्यवस्था, जातउतरंड, अनिष्ट प्रथा परंपरा आणि उच्चवर्णियांचे मनुवादी नेतृत्व मान्य नसेल वा त्यांच्या अधिपत्याखाली रहायचे नसेल त्यांनी एकतर कोणत्याही संरक्षण, सुविधांची मागणी करता इथले निर्बंध पाळावेत, इथल्या लोकांमध्ये मिसळून आपले स्वतंत्र अस्तित्व विसरून इथल्या लोकांच्या दयेवर जगावे, इथल्या असमान संस्कृतीचे गुणगान गावे, इथल्या कोणत्याही गोष्टीवर अधिकार सांगू नये, कोणताही विशेषाधिकार, मागू नये, नागरी अधिकारांपासून वंचित राहुन येथे रहावे अन्यथा या देशातून निघुन जावे. म्हणजेच आपल्या देशाच्या राज्यघटनेने दिलेले सर्वाधिकार काढून घेऊन; मनुस्मृतीवर आधारित कायदे पाळून सर्वांनी येथील मनुवादी वैदिक ब्राह्मणांचे गुलाम व्हावे.
अशा घातक विचारसरणीच्या पायावर हिंदूराष्ट्राची उभारणी करण्याचा संकल्प केलेल्या गोळवलकरांची विषारी महत्वाकांक्षा प्रत्यक्षात आणायला झटणाऱ्या आपल्या मेंदूमंद, बुद्धीबधीर, अक्कलशून्य राजकारण्यांची अक्षरशः किव वाटते. असो.
आपल्याला फक्त हा निर्णय घ्यायचाय की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य या मुलभूत हक्काधिकारांवर आधारीत विज्ञानवादी, लोकशाहीवादी माणसांना मानसन्मान, प्रतिष्ठा देणारे “रयतेचे राज्य” राखायचे की मनुस्मृतीवर आधारित ब्राह्मण्यवादी, वर्णवर्चस्ववादी, चातुर्वर्ण्याधारीत, विषमतावादी, अंधश्रद्धावादी माणसांना गुलाम करणारे आणि महिलांना दासी बनवणारे अमानवी “हिंदुराष्ट्र” आणायचे..?
- बाळासाहेब कदम
🌹🌹🌹
शिवजयंती #शिवछत्रपती #गोळवलकरी_आज्ञा
छत्रपतीशिवाजीमहाराज #राजेशिवाजी #रयतेचाराजा #जाणताराजा #संघम्हणजेअसंगाशीसंग #विकृतांचासुकाळ #सुमारांचीसद्दी #धंदाधर्माचा #हेचतेहिंदूराष्ट्र
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत