
नवी राजकीय सोय !
🌻रणजित मेश्राम लेखक जेष्ठ साहित्यिक विचारवंत अभ्यासक आणि समीक्षक आहेत
मतभेद असूदे. मनभेद असू नये. मतभेद असू शकतात.मनभेद असता कामा नये. या एका वाक्याने अनेकांची आरामात सोय झालीय.
इतके गुणकारी वाक्य अलीकडच्या काळात दुसरे शोधून मिळणार नाही. फारच मात्राकारी आहे कोणतेही चक्रव्यूह असूदे. बालंट येऊदे. हे ‘मतभेद-मनभेद’ सोबत असावे. हमखास सुटका असते. सुरक्षा कवच आहे. अंगावर शिंतोडा येऊ देत नाही. उलट वाहवा होते.
हं, सांगण्याचे कौशल्य तेव्हढे असावे !या वाक्याने अनेकांचा सर्वत्र वावर सोपा केला.कृती संशयरहित केल्या. राजकारणाच्या वर संबंध असणे महत्त्वाचे, सांगणे सोपे केले. यशस्वी जीवनाचे हे वाक्य ‘सूत्र’ झालेय.
या एका वाक्याने , मतलबी .. बेभरवशाचा .. स्वार्थी .. चोपडा .. कुंपणावरील हे शब्द बाजूला पडले. ‘सर्व रोगावर एकच उपाय’ असे महत्व या वाक्याला आलेले दिसते.
राज्यशास्त्रात ‘मतभेद-मनभेद’ नवीन अध्याय अभ्यासात जोडण्याचे घाटत आहे. कारण ते आता राजकीय तत्त्वज्ञान झाले आहे. राजकारणात महत्त्वाचे अंग झालेय. ती आता वैयक्तिक बाब उरलेली नाही. मोठाली मंडळी अलीकडे सार्वत्रिकरित्या हेच सांगतांना दिसतात.
विचार .. विचारसरणी .. भूमिका .. आचारसंहिता यांचेही दिवस होते. तोच आधार असायचा. तेच राजकीय तत्त्वज्ञान होते. जाहीरनामा .. ध्येयधोरणे .. कार्यक्रम .. असायचे. निवडणुकीत हारजित .. सत्तेची उलथापालथ .. यांचा आधार विचार असायचा. तोच पुसला जातो की काय ?
तेव्हाही विरोधकांशी संबंध पाळले जात. पण त्याला औचित्य .. प्रासंगिकता .. Etiquette .. Manners .. यांचा आधार असे. ते प्रसंगोत्पात घडे. शिवाय वैयक्तिक श्रेणीत येई. सार्वजनिक केले जात नसे.
सर्वजनांचे राजकीय तत्त्वज्ञान .. नवी आचारसंहिता असे स्वरूप नव्हत बऱ्याच गोष्टी नव्याने रुढ होतांना दिसतात. ‘सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता’ ही त्यापैकी एक. तसेच ‘आचरणानुसार राजकीय तत्त्वज्ञान ..’ असे नवे झाले आहे.
काहींच्या सोयीतून जग अशी नवी व्युहनिती सध्या वावरात आहे. हे काही म्हणजे ‘सर्व’ कसे ? बहुसंख्यांकता कष्टीजनांची की धर्मजनांची? विचार .. भूमिका .. यांचा आधार कष्टीजन राहीलेले आहेत. सांधा बदलू देऊ नये. सारीपाट बदलू देऊ नये.
नागपुरने बऱ्याच बाबी देशाला दिल्या. ‘मतभेद-मनभेद’ याचा उदगम नागपुरातीलच आहे. आता ते सवंग झाले. खाजगी राहीलेले नाही. राजकीयकरण न झालेला मोठा समाज असतो. त्यांना हे अडचणीचे आहे.
नवी राजकीय सोय आता अनेकांची गरज झालेली दिसतेय.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत