आम्ही पारधी हाव म्हणून आमच्या बाईची इज्जत स्वस्त आहे का ? पारधी समाजाच्या विजय भोसलेंचे प्रशासनाला गंभीर प्रश्न !

धाराशिव ता. १७ मार्च : * रविवार दिनांक 03/03/2024 रोजी दुपारच्या वेळी मौजे कानेगाव तालुका लोहारा शिवारातील तात्या कदम यांच्या शेतामध्ये लक्ष्मण कदम, विलास कदम व इतर व्यक्तींनी संगनमत करून मला माझ्या जातीवर शिवीगाळ करून माझे कपडे फाडून माझ्या अवघड जागेला हात लावून मला लज्जा वाटेल असे अपमानजनक वर्तन करत माझ्या वरती जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. विरोध करत असताना, “तुमचे तुकडे तुकडे करून बोरवेल मध्ये टाकून देईन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. अशी जीवघेणी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना स्वतः सांगून सुद्धा लोहारा पोलीस स्टेशन कायदेशीर गुन्हा नोंद करून घेत नसल्यामुळे आम्ही आमच्या सहा महिन्याच्या बाळासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहोत.” असे पिडीत पल्लवी भोसले व विजय भोसले यांनी स्वतः सांगितले.
आम्ही भोसले कुटुंब रा. पाटोदा ता.जि. धाराशिव येथील रहिवासी असून आमच्या कुटुंबामध्ये सासू दैवशाला पती विजय व आमची सहा महिन्याची मुलगी महादेवी असे ४ सदस्य राहतो.
पारधी जातीचा हा परिवार पण वास्तविक पाहता चोऱ्या-माऱ्या न करता कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी लोकांनी दिलेले अन्नधान्याचे खळे मागून पोटाची खळगी भारतात. घटनेच्या दिवशी हा परिवार कानेगाव मध्ये सध्या चालू असलेल्या ज्वारी पिकाचे खळे शेतकऱ्याकडून मागण्या करिता गेले होते. त्यावेळी तिच्यासोबत तिचे पती विजय भोसले व सहा महिन्याची मुलगी महादेवी देखील होती. तेथे तात्या कदम यांची भेट झाली.
तात्या कदम यांनी त्यांना वीस किलो ज्वारी देवून तिला म्हणाले की, आमच्या गाईचे लहान पाडसं असून ते दान म्हणून तुम्हाला सांभाळण्याकरिता देणार आहे असे सांगितले. त्यासाठी त्यांनी शेतामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. पुढे कदमने सांगितल्यामुळे पल्लवी आणि विजय शेतामध्ये गेले असता, त्याठिकाणी तात्या कदम शेतात दिसले नाहीत.
पीडित महिलेने सांगितलेली पुढील हकीगत अशी की, त्यावेळी तात्या कदम यांचा भाऊ लक्ष्मण कदम हे दिसले. यांच्याकडे तात्या कदम कोठे आहेत अशी विचारणा केली असता, त्या ठिकाणी अचानक कांहीं समजायच्या आत लक्ष्मण कदम व विलास कदम हे दोघे मिळून माझ्या पतीच्या अंगावरती फास आणि वेळूची काठी घेऊन धावून आले आणि मला व माझ्या पतीला म्हणाले की, मला काय तुमच्या आईकडे झ* घेऊन जाता का ? असे म्हणतं मला माझ्या जातीवर शिवीगाळ करू लागले. त्यावेळी लक्ष्मण कदम हा माझ्या पतीला रागारागात म्हणाला की,” तुला कापून तुझे तुकडे तुकडे करून बोरवेलमध्ये टाकतो.” तसेच विलास कदम माझ्या पतीच्या अंगावरती वेळुची काठी घेऊन मारण्याकरता धावून गेला. त्यावेळी मी माझ्या पतीला मारू नका असे म्हणत माझ्या पती जवळ गेले असता विलास कदम याने माझ्या डावा हात धरला व लक्ष्मण कदम याने माझे कपडे फाडले, उजव्या छातीला हात लावून आवळला आणि उजव्या खांद्या जवळून माझा ब्लाऊज फाडला. त्या दोघांनी मिळून मलाही अश्लील शिवीगाळ करत अवघड जागेवरती ( गुप्तांगावर) हात लावला. आणि माझ्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या सर्व सुरू असलेल्या झटापटीमध्ये माझ्या पतीने घटनास्थळावरुनच १०० नंबर वर फोन करून पोलिसांना घडत असलेली घटना कळविली. पण लोहारा पोलिसांनी घटना स्थळी येण्याऐवजी उलट आम्हालाच “लोहारा पोलीस स्टेशन येथे या” असे सांगितले.
पोलीस स्टेशनला फोन केला असल्यामुळे या लोकांनी आम्हाला सोडले व आम्ही दोघेजण पोलीस स्टेशन लोहारा येथे आलो. तर तेवढ्या वेळात पोलिसांनी लक्ष्मण कदम व विलास कदम यांनासुद्धा बोलावून घेतले होते. त्याच बरोबर सतीश कदम गावातील वीस पंचवीस लोकांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये लोहारा येथे आला. पोलिसांनी गावातील सरपंच नितीन पाटील यांना ही बोलाविले होते. या सर्व सवर्ण मंडळींनी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यावरती दबाव टाकला. तर सतीश कदम हा पोलीस स्टेशन मध्येच सतत जिवे मारण्याची धमकी देत होता. ” तू केस केली तर पोलीस स्टेशन बाहेर तुला व तुझ्या घरचांना जिवंत जाळून टाकीन” अशी धमकी देत वारंवार अश्लील शिवीगाळ करत होता.
तरीही भीतीपोटी व न्याय मागण्यासाठी मी व माझे पती रात्रीचे दीड वाजेपर्यंत पोलीस स्टेशन लोहारा येथे आमची तक्रार घ्यावी म्हणून विनवणी करत थांबलो असताना देखील पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही.
त्यामुळे दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक 04/03/2024 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव व पोलीस अधीक्षक साहेब धाराशिव यांना तक्रार दिली व त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी सांगितल्याप्रमाणे मी पोलीस स्टेशन लोहारा येथे जाऊन माझी तक्रार दाखल करून घ्या अशी विनंती केली असताना देखील लोहारा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. पोलिस प्रशासन हे सवर्ण गावगुंडांच्या दबावाला बळी पडून तक्रार नोंदवून घेणारच नाहीत ही गोष्ट लक्षात आल्यामुळे आम्ही 13 मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो आहोत. माझ्या पतीला मारहाण करणाऱ्या आणि माझ्या इज्जतीवर हात घालणाऱ्या सतीश कदम, लक्ष्मण कदम, विलास कदम व इतर लोकांवर (सर्व आरोपी रा. कानेगाव तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद) जो पर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्ट व विनयभंगाचा गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत. अशी भूमिका घेतली असल्यामुळे माझ्या परिवाराला आणि अपंग असलेल्या वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. माझ्या परिवाराचे काही बरे वाईट झाल्यास लोहारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार असतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच आमरण उपोषणाला बसल्यामुळे आता लोहारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपोषण सोडण्यासाठी मला दबाव आणत आहेत.
वरील कथन आज गुरुवार दिनांक 14/3/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या पल्लवी विजय भोसले व विजय भोसले या पीडित दांपत्याने मुलाखती दरम्यान पब्लिक न्यूजला सांगितले.
वास्तविक पाहता लोहारा तालुक्यामध्ये लॉ अँड ऑर्डर अतिशय कमकुवत झाल्याचे चित्र वारंवार दिसून येत असते. तसेच लोहारा तालुक्यामध्ये मागासवर्गीय भटक्या विमुक्त जातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार घडण्याचे प्रमाण हे जास्त असल्याचे विविध घटनांवरून स्पष्ट दिसून येते. त्यामुळे धाराशिव जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी लोहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आज सुद्धा एखाद्याला जातीच्या नावावरून शिवीगाळ करण्यात येते त्यांच्या पत्नीच्या महिलांच्या इज्जतीवर हात घालण्यात येतो ही बाब मानवतेला काळीमा फासणारीच आहे आणि या गंभीर घटनेतील पीडित कुटुंबाला लोकाभिमुख असणाऱ्या पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून कसलेच सहकार्य मिळत नाही आणि उलटपक्षी न्याय मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसावे लागते व त्याची सुध्दा १०-१० दिवस कोणी दखल घेत नाही ही बाब संविधान उद्देशिका मधील सामाजिक न्याय आणि इतर मूलभूत तत्वांची किती क्रूर थट्टा आहे. . !
विजय अशोक बनसोडे
लेखक/संपादक 8600210090
जि.संघटक भारतीय बौद्ध महासभा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत