कुंभमेळ्यात 1500 लोक बेपत्ता

कुंभमेळ्यात 1500 लोक बेपत्ता असल्याची अधिकृत नोंदणी झाली. बेपत्ता असलेल्या ज्या लोकांचे आधार कार्ड, वोटिंग कार्ड किंवा इतर सरकारी ओळख पत्र, त्यांचे नातेवाईक देऊ शकले फक्त त्यांचीच नोंद, बेपत्ता म्हणुन करण्यात आली. बाकी जे इतर बेपत्ता झालेले लोक आहेत ज्यांचे कुठलेच ओळख पत्र त्यांच्या नातेवाईकांकडे नाही आहेत, अशा लोकांची नोंद स्वीकारण्यात आली नाही आणि त्यांची संख्या सुद्धा हजाराच्या घरात असल्याचे समजते. ह्यावरून अंदाज केला जाऊ शकतो की ज्या 6 ठिकाणी एकाच रात्री भगदड आणि चेंगराचेंगरी झाली, त्यामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला असावा.
कुंभमेळ्यात हा जो मृत्यूचा तांडव घडला ह्याच्याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. पहिला म्हणजे सरकारी, आरएसएस/ बीजेपी वाल्यांचा आणि त्यांचे गुलाम असलेल्या मनुवादी मीडिया चा दृष्टिकोन. ह्या दृष्टिकोनातून पाहिले तर कुंभमेळ्यात कोणतीच सरकारने दखल घ्यावी अशी मृत्यूहानी झाली नाही. जे काही सरकार आणि त्यांच्या गुलाम मीडियाने अधिकृत जाहीर केल्याप्रमाणे 30-40 लोक मृत्यू झाले, ती त्यांच्यासाठी चिंता करण्यासारखी गोष्ट नाही. अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. त्याही पुढे जाऊन तो धिरेंद्र शास्त्री नावाचा बदमाश म्हणतो की, गंगेच्या तीरावर मृत्यु होणे म्हणजे मोक्ष मिळणे आहे. त्यामुळे ते मृत्यू झालेले लोक भाग्यवान आहेत.
दुसरा दृष्टिकोन असलेले लोक कुंभमेळ्यात असलेल्या अव्यवस्थेवर टीका करणार्यांचा आहे. ते तिथे झालेल्या चेंगराचेंगरी साठी सरकारला जबाबदार धरून त्यावर टीका करत आहे. हेच मीडिया चे खरे काम आहे. ह्यामध्ये मुख्यतः यु ट्यूबर्स आहेत – अशोक वानखेडे, रवीश पांडे, चीत्रांशी, अजित अंजुम, अभिसार शर्मा, साक्षी जोशी, प्रज्ञा मिश्रा, वैगरे. हे सगळे आणि आणखी काही पत्रकार हे आधीचे गोदी मीडियात काम केलेले, पण आता तेथून बाहेर केलेले पत्रकार आहेत. हे सध्याच्या गोदी मीडियातील भ्रष्ट पत्रकारांपेक्षा खूप प्रामाणिक reporting करत आहेत. ते सरकारला कठघऱ्यात उभे करून, सरकारी यंत्रणेला कुंभमेळ्यातील मृत्यू साठी दोषी धरत आहेत.
परंतु ह्या दोन्ही दृष्टिकोनाच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे, ह्याबाबतीत कोणीच बोलत नाही, दुसऱ्या दृष्टिकोनातील यूट्यूबर पत्रकार पण नाही. तो दृष्टिकोन म्हणजे –
- सर्वप्रथम कुंभमेळा भरवणे हे सरकारचे काम आहे काय ? आतापर्यंत कुंभमेळ्याचे आयोजन वेगवेगळ्या संतांच्या आखाड्या द्वारे केले जात होते. ते आता उत्तर प्रदेश सरकार का करत आहे ?
- भारतीय राज्य घटने नुसार, सरकारचा धर्म नसतो. सरकार हे धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे. मग इथे खुल्लम खुल्ला सरकार धार्मिक मेळ्याचे आयोजन कसे करत आहे, ते ही सरकारी तिजोरीतून 10 हजार रुपये खर्चून ?
- तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सरकार जाहीरपणे लोकांना कुंभात येऊन स्नान करण्याचे आव्हान करत आहे. त्यासाठी करोडो रुपयांची जाहिरात केली जात आहे. खरंच नदीत स्नान करून लोकांचे पाप धुतले जाऊ शकतात काय ? मग कर्मसिद्धांताचे काय ? तुम्ही पाप केले तर तुम्हाला शिक्षा मिळणारच हे कर्मसिद्धांत सांगतो. तेव्हा हा गंगेत स्नान करून पापक्षालन होते ही धारणा च मुळात धर्म विरोधी आहे. ह्याच चुकीच्या धारनेमुळे, लाखो गरीब, कष्टकरी, वंचित, अशिक्षित, अज्ञानी, अंधश्रद्धाळू, भोळे भाबडे लोक कुंभमेळ्यात येतात आणि आपल्या अमूल्य प्राणाची किंमत मोजून देतात. ह्या धर्माच्या बाजारावर, हे ब्राम्हण यूट्यूब पत्रकार पण प्रश्न उचलत नाहीत.
- काँग्रेस, समाजवादी पार्टी सारखे विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते सुद्धा ह्या धर्माच्या नावावर चाललेल्या बाजारावर प्रश्न विचारत नाही. त्याउलट तो अखिलेश यादव स्वतःच तिथे डुबकी मारायला गेला होता. त्यामुळे मरणाऱ्या लोकात सर्वाधिक यादव आणि तत्सम ओबीसी लोकांची संख्या सर्वाधिक असेल ह्याची खात्री आहे. हे विरोधी पक्ष सुद्धा उत्तर प्रदेश सरकार कुंभमेल्याचे आयोजन कसे करू शकतो ह्यावर प्रश्न उठवत नाही.
त्यामुळे आज देशात जो धर्माचा बाजार चालला आहे त्यासाठी केवळ बीजेपी/आरएसएस आणि त्यांच्या सरकारांना जबाबदार धरने पुरेसे नाही. ह्यामध्ये विरोधी पक्ष, सामाजिक संघटना, बुद्धिजीवी वर्गातील लोक आणि हे स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणारे ब्राम्हण यूट्यूबर सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. ह्या यूट्यूबर मध्ये अपवाद आहेत ते ओबीसी समाजाचे काही जागृत युट्यूब संपादक आणि पत्रकार जसे नवीन कुमार आणि शंभु कुमार जे प्रश्न उपस्थित करायला पाहिजेत ते करत आहेत.
जयंत रुमी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत