२५ डिसेंबर हा साऱ्या बहुजनांसाठी ठरलेला ऐतिहासिक दिवस…

२५ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील ऐतिहासिक ठरलेला दिवस या दिवसी डॉ. बाबासाहेबांनी दोन ऐतिहासिक घटना घडवून आणल्या. तसं बघितलं तर बाबासाहेबांच्या जिवनातील प्रत्येक दिवस त्यांनी ऐतिहासिक दिवस करून ठेवला आहे. त्यापैकी २५ डिसेंबरच्या दोन घटना इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व ठेवून आहेत. त्यापैकी पहिली घटना २५ डिसेंबर १९२७ ची व दुसरी २५ डिसेंबर १९५४ ची पहिल्या घटनेत रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करून स्त्री वर्ग, शुद्र व अस्पृश्यांच्या गळ्याचा फास मोकळा केला. हे पहिले महत्त्वाचे कार्य बाबासाहेबांनी केले. त्यातून दुसरे महत्त्वाचे कार्य घडवून आणले ते म्हणजे ज्या मनुस्मृतीने छ. शिवरायांना शुद्र ठरवून त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता. त्याच मनुस्मृतीला जाळून आपले आवडते राजे छ. शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला. तिसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे ज्या महात्मा जोतिबा फुलेंनी ही मनुस्मृती कोणीतरी जाळली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती ती आपल्या गुरूची इच्छा देखील बाबासाहेबांनी पूर्ण केली होती. म्हणजे मनुस्मृती जाळून एकाच वेळी त्यांनी हे तीनही महान कार्ये घडवून आणले. धन्य ते बाबासाहेब, धन्य त्यांचे गुरू आणि धन्य त्यांचे आवडते राजे. थोर संत, जगदगुरु व छ. शिवाजी राजेंचे गुरू असणारे संत तुकाराम महाराज यांचे गाव. याच गावातून त्यांनी आपल्या अभंगातून आपल्या अमृतवाणीने कर्मकांडातून बाहेर पडण्यासाठी जनसमुदायांचे केलेल्या प्रबोधनाचे गाव म्हणजे देहू. याच देहू गावातील पंचक्रोशीत असलेले देहूरोड या ठीकाणी दि. २५ डिसेंबर १९५४ रोजी बाबासाहेबांनी थायलंड वरून आणलेल्या शुभ्र तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तेव्हा तेथे जमलेल्या लोकांना बुद्धां विषयी थोडक्यात माहिती देवून त्रिशरण, पंचशील घेऊन नंतर त्यावर त्यांनी भाषण दिले. ह्या दिवसापर्यंत बौद्ध दीक्षा घेण्याची त्यांची तयारी जवळ जवळ पूर्ण झाली होती. बाबासाहेबांच्या या कार्यामुळे हा दिवस ऐतिहासिक ठरला. तेव्हापासून देहूरोडची भूमी ही धम्मभूमी म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे. आज या दिवशी महाराष्ट्रातून असंख्य आबालवृद्ध, माता भगिनी, तरूण, तरूणी, या धम्मभूमीला येवून बाबासाहेबांनी प्रतिष्ठापना केलेल्या भगवान बुद्धांच्या मुर्तीला नमन करतात. या दिवशी देहूरोड धम्मभूमीला मोठ्या उत्सवाचे स्वरूप येते. संत तुकोबा रायांच्या देहूच्या पंचक्रोशीतील असलेले देहूरोड बाबांच्या पदस्पर्शाने पावन होवून ती भूमी धम्मभूमी म्हणून देशाच्या नकाशात लौकिक पावली आहे. याच पवित्र ऐतिहासिक धम्मभूमीत आम्ही वास्तव्यास आहोत. हे आमचं मोठं भाग्य आहे. तर अशाप्रकारे २५ डिसेंबर या दिवसाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेले आहे. संत तुकोबा राय हे बाबासाहेबांचे आवडते संत होत. म्हणूनच त्यांनी आपल्या वर्तमान पत्रात शीर्षस्थानी तुकाराम महाराजांचे वचने घेतली आहेत. धन्य ते तुकोबा राय अन् धन्य ते बाबासाहेब.
अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत