मोहनजी मग स्वातंत्र्य इंग्रजांची चाकरी करुन मिळाले काय?

-चंद्रकांत झटाले, अकोला
१३ जानेवारी २०२५ रोजी इंदूर येथे बोलताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी “राममंदिर अभिषेक दिन हा भारताचा खरा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जावा, अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाची तारीख “प्रतिष्ठा द्वादशी” म्हणून साजरी करावी, असे वक्तव्य केले आहे. भागवतांच्या अगोदर कंगना राणावत हिनेसुद्धा पद्मश्री पुरस्काराच्या मोबदल्यात अशाचप्रकारचे वक्तव्य केले होते. कंगनाच्या म्हणण्यानुसार देशाला २०१४ साली खरे स्वातंत्र्य मिळाले, आणि भागवतांच्या मतानुसार २०२४ ला. हे लोक कितीवेळा हा देश स्वतंत्र करणारं आहेत कळायला मार्ग नाही. या वक्तव्यांमागील राजकारण आणि सत्य दोन्ही आपण समजून घेऊ.
या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी स्वातंत्र्यसेनानी क्रांतिकारक इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढत होते. फासावर जात होते. गांधी, नेहरू, पटेल, आझाद, सुभाषचंद्र बोस हे देश स्वतंत्र होण्यासाठी जीव तोडून लढत होते. आयुष्याची 10-10 वर्षे यांनी तुरुंगात काढली. याच काळात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अश्फाकउल्ला खान सारखे क्रांतिकारक देशासाठी फासावर जात होते आणि नेमके याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा या संघटना ब्रिटिशांना मदत करत स्वातंत्र्यलढ्याला विरोध करत होत्या. जे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी देशासाठी लढत होते, त्यांच्याविरोधात आरएसएस आणि हिंदू महासभेचे लोक इंग्रजांच्या बाजूने लढत होते. सावरकरांसारखे लोक माफी मागून स्वतःची सुटका करून घेऊन इंग्रजांकडून महिना ६० रुपये पेन्शन घेत होते. अनेक दशके असंख्य क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेक महापुरुषांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्याला वाहून टाकलं तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालं आहे. हिंदू महासभा, आरएसएस, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्याप्रमाणे इंग्रजांची चाकरी करून हे स्वातंत्र्य मिळालेले नाही. हे भागवतांना चांगले माहित आहे पण स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान शून्य आहे ही सल डॉ. हेडगेवार व गोळवलकरांच्या अनुयायांना सतत बोचत राहते. आपण त्या लढ्यात नव्हतो म्हणून संपूर्ण स्वातंत्र्यलढाच बदनाम करायचा, स्वातंत्र्यलढ्याचे, राष्ट्रध्वजाचे, संविधानाचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करायचा हे यांची जुनी नीती आहे.
भागवतांच्या संघटनेच्या बौद्धिक प्रशिक्षकांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट त्यांनी वाचली. पण हे बोलताना आपलेच भाजप सरकार 1947 मध्येच मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत हे मात्र ते विसरतात. १९४७ मध्ये जे मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर मग २०१४ पासून अवघ्या १० वर्षात असं काय घडलं की त्याला स्वातंत्र्य म्हणावं? कारण 2014 सालापासून स्वातंत्र्य मिळणे तर दूरच, जे स्वातंत्र्य-हक्क-अधिकार या देशातील नागरिकांना होते तेसुद्धा कमी झाले आहेत. देशातील महागाई-बेरोजगारीने उच्चांक गाठलाय, अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, परराष्ट्र धोरण सपशेल फेल झालंय. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड गैरवापर होतोय. देशावरील कर्ज फक्त गेल्या १० वर्षात २०५ लाख कोटींच्या वर म्हणजे चौपटीच्या वर गेलंय. वरून जीएसटी-टोल टॅक्सचा मारा प्रचंड वाढवून ठेवलाय. देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य वाटावं लागतेय. माध्यमे तर सरकारपुरस्कृतच झालेली आहेत. मोठे नेते, मंत्री, पोलीस अधिकारी, न्यायाधीश जिथे सरकारच्या विरोधात बोलायला घाबरतात तिथे सामान्य माणसाची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. शेतकरी-मजुर, नोकरदार, व्यावसायिक सर्वांची परिस्थिती वाईट आहे. यात भागवतांना कोणतं खरं स्वातंत्र्य दिसलं हे कळायला मार्ग नाही. पण जिथे स्वतःचं काहीच कर्तृत्व नसलं की ज्यांनी कर्तृत्व गाजवलं त्यांना बदनाम करायचं हेच संघाने आजपर्यंत केलेलं आहे.
वरून भागवत म्हणतात "प्रतिष्ठा द्वादशी" साजरी करा. इकडे देशाची प्रतिमा-प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर मातीत जाते आहे. शेजारचे चिमुरडे भूतान आणि बांग्लादेश सारखे देशही आता भारताला डोळे दाखवतोय. चीन ने या १० वर्षात भारताची किती जमीन हडप केली हेसुद्धा कधीतरी बाहेर येईलच. पण तरी चिनी कंपन्यांना ठेके दिले जातात. बँक ऑफ चायना ला भारतात परवानगी दिली जाते. हंगर इंडेक्स मध्ये भारत पाकिस्तान-बांग्लादेशाच्याही मागे गेलाय. अमेरिका त्यांच्या देशात राहण्याचे नियम कडक करतेय आणि आपल्या देशाचे चलन म्हणजेच रुपयाचा भाव इतिहासात इतका कधीच पडला नव्हता इतका पडला आहे, पण या देशातील नेत्यांइतका तो पडला नाही हे नशीबच.
या स्वयंघोषित देशभक्तांचे नेते, त्यांचे आदर्श, आरएसएस आणि हिंदू महासभेने असहकार आंदोलन असो, भारत छोडो आंदोलन असो की सुभाषबाबूंची आझाद हिंद फौज असो कशातच सहभाग घेतला नाही. त्यांनी 1946 मध्ये झालेल्या मुंबईच्या रॉयल नेव्हीच्या विद्रोहातसुद्धा सहभाग घेतला नाही. भारतातील बहुतांश हिंदू स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होते परंतु हिंदू महासभा आणि आरएसएस स्वातंत्र्यलढ्यापासून कायम दूर होते. त्याचप्रमाणे बहुतांश मुस्लिम स्वातंत्र्यसंग्रामात होते, इतकेच काय तर बरेलवी आणि देवबंदी मौलाना पण स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते पण मुस्लिम लीगने या लढ्यात अजिबात भाग घेतला नाही. हिंदू महासभा, आरएसएस आणि मुस्लिम लीग ह्या तिन्ही संघटना कायम ब्रिटिशधार्जिण्या होत्या. यांच्यासारखीच ब्रिटिशांची चाकरी जर स्वातंत्र्यसैनिकांनीसुद्धा केली असती तर हा देश कधीच स्वतंत्र होऊ शकला नसता. आरएसएस, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या तिन्ही संघटना ब्रिटिशांना उघड मदत करतात म्हणून 1934 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीने काँग्रेसच्या सदस्यांना आरएसएस, हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग या संघटनांचे सदस्यत्व पत्करण्यास बंदी घालणारा प्रस्ताव संमत केला होता.
आरएसएसच्या एकाही कार्यकर्त्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी कधीच तुरुंगवास भोगला नाही. इतकेच नव्हे तर ब्रिटिश राजवटीत जे अनेक अत्याचार जनतेवर झाले, लाठीमार, अश्रुधूर, गोळीबार इतकेच काय अगदी जालियनवाला बागमधील अत्यंत क्रूर असे हत्याकांड सुद्धा झाले. परंतु या प्रकारांविरोधी एका शब्दानेही हिंदू महासभेने कधीच निषेध व्यक्त केला नाही. शहीदे आझम भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ह्या तिन्ही देशभक्तांना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा जाहीर केल्यापासून तर प्रत्यक्ष फाशी दिल्यानंतर सुद्धा आरएसएसने एका शब्दाने निषेध नोंदवला नाही की भगतसिंगची फाशी थांबविण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीला डॉ. हेडगेवार आणि आरएसएसची मूकसंमती होती. त्यामुळेच त्यांनी ब्रिटिशांच्या धाकाने कधीच भगतसिगांना वाचविण्याचा प्रयत्न केला नाही, कधीच त्यांना भेटायला तुरुंगात गेले नाहीत की, फाशी दिल्यानंतर हे वाईट झालं असे बोलण्याचीसुद्धा हिंमत दाखविली नाही.
के.एल. टुतेजा यांनी ’दी पंजाब हिंदू महासभा अॅन्ड कम्युनल पॉलिटिक्स 1906-1923’ या पुस्तकात हिंदू महासभेने केलेल्या एका ठरावाचा उल्लेख केला आहे. तो ठराव असा – ’आमचा असा दृढ विश्वास आहे की, भूतकाळातील एका ऐतिहासिक कालखंडात दुर्दैवाने ताटातूट झालेल्या दोन आर्य शाखांचे आता दयाघन परमेश्वराच्या कृपेने हिंदुस्थानात पुनर्मिलन झाले आहे. ही परमेश्वराची योजनाच आहे. ज्यावर सूर्य कधीच मावळत नाही अशा साम्राज्याचे आम्ही एकनिष्ठ नागरिक आहोत, हे आम्ही आधीच सिद्ध केले असून आम्हाला त्याचा अभिमानही वाटतो. ब्रिटनच्या सम्राटाकडेच हा विशेषाधिकार असाच कायम राहावा अशीच आमची आंतरिक तीव्र इच्छा आहे.’ या ठरावावरून काय लक्षात येते?
8 जून 1942 च्या भाषणात गोळवलकर म्हणतात ’देशाच्या आजच्या अवनत अवस्थेला ब्रिटिशांना दोष देणे योग्य नाही. मोठा मासा लहान माशाला खाणारच हा निसर्गनियम आहे. यात मोठ्या माशाचा काय दोष? त्याचप्रमाणे दांडगेश्वर दुबळ्यांना पायाखाली तुडविणारच, हाही निसर्गनियमच आहे. त्यामुळे ब्रिटिश आपल्यावर अन्याय करतात असे म्हणणे निरर्थक आहे.(श्री.गुरुजी समग्र दर्शन, खंड 4) म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला जे गुलामीत ठेवले होते ते निसर्ग नियमानुसारच असे संघ मानत असल्याने त्यांना विरोध करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जर असाच विचार करून आणि मुघलांना मोठा मासा समजून गुपचूप त्यांचा अन्याय सहन केला असता तर? स्वराज्य निर्माण झालं असतं ? याचं उत्तर कोणताच संघ स्वयंसेवक देऊ शकत नाही.
स्वातंत्र्यलढ्यात देशाचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा विश्वासघात करणारी संघटना म्हणून आरएसएस या संघटनेकडे पाहता येईल. स्वातंत्र्यलढ्यात सहभाग किंवा मदत तर दूरच राहिली परंतु स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि क्रांतिकारकांच्या मार्गात अनंत अडचणी आणण्याचे काम आरएसएस व हिंदू महासभेने केले. ह्या संघटनांमुळे स्वातंत्र्य मिळायला उशीर झाला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
स्वातंत्र्य मिळणे तर दूरच पण १९४७ मिळालेले स्वातंत्र्य पुन्हा हिरावून घेण्याची प्रक्रियाच २०१४ पासून सुरु झाली आहे. मोहन भागवतांना एक प्रश्न आहे की जर १९४७ साली देश स्वतंत्र होऊन संविधान अंमलात आलं नसतं तर काय ओबीसी समाजातून आलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकले असते? मोहन भागवतांसारखं हेच वक्तव्य जर कुण्या मुस्लिमाने केले असते तर? आरएसएस वाल्यांनी संपूर्ण देश भडकवून टाकला असता. मग श्रीमान भागवत आता सांगा की स्वातंत्र्य इंग्रजांची कायम चाकरी करणार्या डॉ.हेडगेवार-गोळवलकरांमुळे मिळालं की इंग्रजांविरोधात लढणार्या गांधी, सुभाषबाबू, पटेल-नेहरू आणि भगतसिंगांसारख्या क्रांतीकारकांमुळे?
- चंद्रकांत झटाले, अकोला
7769886666
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत