देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

‘अप्लाईड आंबेडकर !’

र!ण!जि!त! मे!श्रा!म (लेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक तसेच विचार संशोधक शोध साहित्यिक आहेत



हा घोष होऊ शकेल. भाष्यविधाता सुध्दा ! हे गोळीबंद सांगणे होय. यात आज आहे. आजची गरज आहे. कालची साद आहे. उद्याचे पडसाद आहेत. निदानाचे दार म्हणता येईल !

‘रेसीपी’ कितीही चांगली असली तरी साक्षात स्वयंपाकाचे वेगळे महत्त्व असते. याच आशयाने .. अप्लाइड आंबेडकर .. विचाराचे आचारात आगमन !

     अप्लाइड (applied) म्हणजे उपयोजन. सांगणे करणे ची युती. यात बाबासाहेब रमायचे. शिका , संघर्ष करा , संघटित रहा .. ही तिन्ही उपयोजने. पहिल्याला लोकांनी मनावर घेतले. एका 'स्ट्रोक'मध्ये .. उध्दरली कुळे ! दुसरे असायचे. तिसऱ्याची घसरवाट झाली. मूल्यमापनात निराशा हाती येते. ते नको. उपचार सांगता येतील. इतिहास वाहता ठेवावा. बाबासाहेब स्वतः परिणामावर जोर द्यायचे. त्यांचे सारे सांगणे निकालदेई (result oriented) असे. त्याला ते प्राथम्य (priority) देत. सामाजिक आर्थिक विषमता कशी कमी करता येईल हा त्यांच्या कृतीचिंतनाचा गाभा होता. स्वातंत्र्य कशासाठी हे त्यांच्या उत्तराचे सार होते. बिनचूक .. अंतिम .. असे नसतेच. हे त्यांना पटायचे.

     बाबासाहेबांनी जे घोषवाक्यात सांगितले नाही ते त्यांनी दिशा (way) या रुपात सांगितले. त्यांनी स्वतः सरकार आणि लोकशाही यांची व्याख्या केली होती. अब्राहम लिंकन च्या व्याख्येची ते समीक्षा करीत.‌ बाबासाहेब म्हणत , लिंकन .. लोकशाही 'कशी' असावी हे सांगतात. मला लोकशाही 'कशासाठी'  हवी .. हे हवंय. म्हणून बाबासाहेबांनी लोकशाहीची स्वतः व्याख्या केली. त्यात ते म्हणतात , 'रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी शासनपध्दती म्हणजे लोकशाही' होय. असेच आर्थिक व सामाजिक समताप्रेम बाबासाहेबांनी संविधान देतांनाही व्यक्त केले. त्यात त्यांनी संविधान कशासाठी व अंमलबजावणी यावर अधिक भर दिला.

     वेगवेगळ्या प्रसंगातून ही स्पष्टता त्यांनी अधिक स्पष्ट केली. त्यांना देशापेक्षा व्यक्ती वा विचारसरणी मोठी वाटत नव्हती. त्यांना निखळ व्यवहारवाद नको होता. अंमलबजावणीच्या स्वच्छंद सैलतेवर वा अप्रामाणिकतेवर बाबासाहेबांचा कटाक्ष होता. त्यांना स्वीकारीत लोकशाहीला पूरक आर्थिक व सामाजिक रचना हवी होती. देश स्वतंत्र झाल्याबरोबर लोक स्वतंत्र होत नसतात. त्यांना विधीमंडळाच्या इच्छेवर देश सोडायचा नव्हता. घटनात्मक विधीनियमांनी रचित देश हवा होता. आर्थिक रचनेचे स्पष्ट निर्देश संविधानात नसले तरी भांडवलशाही व खाजगीकरणाला पूरक अशा कोणत्याच बाबी संविधानात नाहीत. धन , साधन , संसाधन यावर मुठभर लोकांची मालकी होणार नाही याची काळजी घेतली गेली. जे संहितेत द्यायला अडचण आली त्या तरतूदी त्यांनी मार्गदर्शक तत्वात दिल्या. तसे स्पष्ट निर्देश दिले.

बाबासाहेबांच्या विचारसुत्राला विषमताअंत आणि जातीअंत या दोन्हींचा मेळ आहे. कारणांचा शोध व त्याचे निर्दालन याची भक्कम घट्टता आहे. अदृश्यशक्ती व पापपुण्य यातून सुटकेचा श्वास आहे. प्रसंगोत्पात दिलेले इशारे यात सावधानतेचा ध्वनी आहे. आपण आपल्या भवितव्याविषयी जागरुक असावे असे ते नित्य सांगत. भारतीय माणसा .. तुझ्या दुर्दशेला राजकीय व्युहरचना कारणीक आहे. तुझे भले तुलाच करावे लागेल. हे सांगणे पटले तेव्हाच मनाने संपलेले , मुक्तीला सज्ज झाले. तशीच दु:स्धिती नव्याने (आणली जाते) येते की काय ? त्यासाठी सर्वोत्तम प्रतिबंधक उपाय एकच ! अप्लाइड आंबेडकर ! ओन्ली आंबेडकर ! कारणांचा शोध .. कारणांचे निर्दालन !

     विज्ञानाने हे अधिक स्पष्ट केलंय. विज्ञानाला सैद्धांतिक विज्ञान (Basic science) व उपयोजित विज्ञान (Applied science) असे परिभाषित केले जाते. केमेस्ट्री , फिजिक्स , बाॅयोलाॅजी , झुलाॅजी , मॅथ्स हे बेसिक सायन्स. तर , काम्प्युटर , मेडिकल , इंजिनिअरिंग हे अप्लाइड सायन्स. एकीकडे शोध व सिध्दान्त तर दुसरीकडे उपयोजन व निदान ! 

     लिहित्या विषयाची विज्ञानासारखी टोकाची मांडणी करता येत नाही. पण दृष्टी घेता येईल. आयुष्यभर शिकणेच असते. शास्वत मुक्तीसूत्र नसतेच ! परिस्थितीजन्य ते बदलते. परिस्थितीजन्य गरज उभी ठाकत जाते. तेव्हा पुन्हा आंबेडकर. आंबेडकर स्वीकारताना भावनिकता सहज येऊन जाते. तिचे सोबत लाडकौतुक येणारच ! चालत्या प्रवासात असे थांबे येतीलच ! मात्र , आजची ती गरज कोणती ? हा धांडोळा महत्वाचा. ते अधिक महत्त्वाचे. आंबेडकरांच्या उपकारात की आंबेडकरांच्या शब्दात ? आंबेडकर कसे की आंबेडकर कशासाठी ? आधी , कसे महत्त्वाचे होते.‌ते कळले. अनेक अंगांनी कळले. रोज कळतेच आहे. चरित्रवाहकता , अक्षरप्रधान , प्रसंगप्रधान , शब्दप्रधान .. किती अंगे ? पण आता प्रश्न बदलले. पोत बदलला. पिढी बदलली. फास बदलले .. उत्तरही बदलेल. बदलवावे लागेल ! 

     हे नवे उत्तर .. नवे वाचन .. नवे निरीक्षण .. नवे चिंतन .. नवे आंदोलन यात आहे. आधार .. उपाय एकच. ओन्ली आंबेडकर. अप्लाइड आंबेडकर. 

     आता यापुढे आंबेडकर कां , कशासाठी ? काय सांगितले ? हे महत्त्वाचे ! जयंती .. जप .. दिन .. दिवस .. थांबे झालेत. तिथेच थांबू नये. फार गुंतू नये. बदलती व्युहरचना कशी ? तिचे डावपेच कसे ? सारीपाटाचा डाव कुठाय ? चाली कोणत्या ? हे कळीचे झालेय. हे कळणे हा प्रवासच. हाच आंबेडकरवाद. तिकडे निघावे. तो खूप लांबचा नाही. पण एकट्याने नको. आडवळणाचा जरुर आहे. अंमल .. आचरणाचा आहे. कळला की सोपा जाईल. आंबेडकर सोबत आहेतच. निघावे. तेव्हाच फासे कळतील. सातबारा कळेल. गारदी कळतील. मालकीही कळेल. 

बाबासाहेबांना चालता बुद्ध कां आवडायचा , हेही कळेल !

० र!ण!जि!त! मे!श्रा!म

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!