देशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आद्य शिक्षक : संत गाडगे बाबा

प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे

महाराष्ट्राच्या संत परंपरेत अनेक संत होऊन गेले.महाराष्ट्र ही संताची पंढरी होय .या संतांनी लोकांना अंध : कारातून, जुन्या डोळेझाक पणे करत असलेल्या, मोडकळीस आलेल्या जुनाट चालीरीती,परंपरा यामधून वैज्ञानिक दृष्टी देऊन लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने संतांनी केलेला आहे.या साठी संतानी कीर्तनाचे प्रयोग केले. संत गाडगे बाबा कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान देणारे एक ज्ञानपीठ च होते. अंध : कारात गुरफटलेल्या मानवी समाजाचे खरे शिक्षक म्हणून संत गाडगे बाबांचे नाव घ्यावे लागते.लोकांना खरे शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून आयुष्यभर धडपडत,फिरत राहिले .लोकांच्या वरती कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार करत राहिले.खरे समाजसुधारक ते होते. लोकांच्या मनकोशात स्वच्छ विचारांचे निर्झर कसे निर्माण करता येतील हे बाबांनी पाहिले.वऱ्हाडात अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव हे बाबांचे मूळ गाव होय.पुढे बाबा अखंड महाराष्ट्रभर फिरत राहिले. परीट समाजातील बाबांचे मूळ नाव डेबू होय. २३ फेब्रुवारी १८७६ साली बाबांचा जन्म झालेला होता. बाबांचे वडील झिंगराजीची घरची गरीबी होती. दारूचे व्यसन जडलेले.रोज दारू पिणे.पाहुणचार, नवस करावयाचे ते फिटण्यासाठी कोंबडं,बकरं कापायचे अशाच दिनचर्येत लोक अडकलेले असायचे तत्कालीन समाज अशा अंधश्रद्धेच्या जोकडात अडकलेला होता.बाबांच्या घरची अवस्था ही हीच होती.काही वेगळी नव्हती.त्यांच्या समाजातील लोक चालीरीतीच्या श्रंखलांनी घट्ट करकचून आवळलेले होते.त्यांची बुद्धी जुन्या चालीरीतीतून बाहेर पडण्यास,विचार करण्यास तयार नव्हती.खंडोबा,म्हसोबा,मरीआई यांचे ते उपासक. कोंबडे,बकरे बळी देणे,दारू,मास या आवश्यक वस्तु कोणत्याही कार्यक्रमात असायच्याच.डेबू हा बालपणापासून हे सर्व पहात होता.

जेव्हा झिंगराजी जाणोरकर आजारी पडले तेव्हा ते अंतर्मुख झाले.त्यांना वाटू लागले आपण आयुष्यभर चालीरीतींच्या बंधनात गुरफटलो. व्यसनात अडकलो त्यामुळेच मला लवकरच जगाचा निरोप घ्यावा लागत आहे.त्यानी डेबू ची आई सखुबाई ला जवळ बोलवून सांगीतले.”सखु,आयुष्यभर मी ज्या मोठेपणा पायी जुन्या चालीरीतीत अडकलो .आता जवळ पैसा नाही.माझा डेबू नास्तिक झाला तरी बेस.पण त्येला ह्या म्हसोबा ,मरीआईची भक्ती नको करू देऊ,याला दगडाजवळ डोकं नको ठेवू देऊ.दारूपासून दूर ठेव.आपली काय स्थिती झाली.हे तू पाहिलेस.” आणि त्यांची मान खाली पडली. त्यांनी अखेरचा श्वास घेतला.शेवटी या डेबूला घेऊन सखुबाई आपल्या माहेरी दापोरीला वडील हंबीरराव यांच्याकडे आल्या.डेबू आनंदात जगू लागला गायी म्हैसी चारायला घेऊन जाऊ लागला खूप काम करावे लागायचे.रानात गेल्यानंतर काम करत भजन गुणगुणत रहायचा. शाळा त्याच्या वाटेवर आलीच नाही तो अशिक्षित राहिला अक्षरांची ओळख त्याला झालीच नाही.पण सकाळी मामींच्या सकाळी दळणाच्या वेळच्या ओव्या,पदे ऐकायचा व त्या पाठ करायचा.पुढे त्या त्याच्या पाठ च झालेल्या होत्या.ओवीतील प्रत्येक शब्दाचा ,ओवीचा डेबू अर्थ शोधायचा याच्यातूनच त्यांचे विचारचक्र वाढू लागलेले होते.गावातील प्रत्येक कार्यक्रमात, भजनात तो पुढे असायचा. अस्पृश्य समाजावर होणारे अन्याय, अत्याचार ही त्याने जवळून पाहिले होते.यातूनच अन्यायाच्या विचारावर त्यांना चीड यायची.उत्सवात पंगती बसायच्या यातूनच त्यानी गरीबांना जवळून पाहिले.तीही माणसेच आहेत.त्यांच्या शेजारी बसून आपण भोजनाचा,जेवनाचा आस्वाद घेतला पाहिजे असे त्यांना वाटायचे.आणि एक दिवस त्यांनी आपल्या संवगड्यांच्या समोर गरीबांना जेवन घालण्याची योजना मांडली .काहीनी होकार दिले काहीनी नकार दिले पण डेबू ने ती योजना यशस्वीपणे पूर्ण केली. यातून काही जुन्या मंडळीना डेबूचे हे वागणे आवडले नाही.पण ते खरे निश्चयी होते त्यामुळे अशा विचारापासून ते मागे सरकले नाहीत.ते त्या मंडळींना म्हणाले आपण चंगळ करतो.नवीन कपडे,घेतो,जेवणे घालतो.पण या गरीबांचा कधी विचार केला आहे का ?जरा बाहेर पहा. लोक अन्नावाचून तडफडत असतात. डेबू मोठा झाला होता.मामांच्या कारभारात लक्ष्य घालत होता. आता त्याचे लग्नाचे वय झालेले होते.तो वयात आलेला होता.पुढे लग्नाबाबत विचार झाले व कमलापूरच्या धनाजी वठ्ठ्याशी सोयरीक पक्की होऊन कुंता शी त्यांचे लग्न झाले.संसारात रमले ही.पणत्यांची नजर चौफेर होती.तो सामान्य मुलगा नव्हता.एकदा सावकाराच्या घरी जाण्याचा प्रसंग त्याना आला.तेथे गेल्यावर त्यांनी पाहिले सावकार आपल्या मुलांना टरबूजा च्या फोडी करून खायला देत होते.पण एक फोड खाली पडली.पडलेली फोड त्यांनी मुलाला उचलू दिली नाही.त्याला दूसरी फोड आणून दिली.सावकारांने ती फोड डेबू स उचलावयास सांगीतले.याचा त्यांना खूप राग आला.जी पडलेली फोड सावकार आपल्या मुलाला उचलून खाऊ देत नाही.ती फोड मला उचलायला सांगतात.ते विषण्ण झाले.त्यांना हा भेदभाव बरा नाही वाटला.पुढे याच गोष्टीचा प्रचार त्यांनी केला.लोकांना सांगीतले.उष्ट खाऊ नका,श्रम करा.काम करा.शिक्षण मिळवा.मागून उष्ट खाऊ नका.असा ते बोध देत असत.मामाच्या घरची जुनाट पंरपरा त्यांना पचनी पडत नव्हती.सावकाराकडून मामा कर्ज घेत.सावकार न शिकलेल्या लोकांचे कर्जाच्या व्याजाचे आकडे वाढवून सांगायचे.ही गोष्ट डेबूच्या ध्यानात येऊ लागलेली होती.यातूनच मामाचे शेत सावकाराच्या ताब्यात गेले हे मात्र डेबूला खटकले.एकदा एक साधू आले ते डेबू स डेबीदास मटले.पण लोकांना हे न आवडल्याने त्यांनी साधूस हाकलले. यामुळे डेबू चे मन उद्विग्न झाले.यातूनच एकदा त्यांनी हातात एक काठी आणि गाडगे घेऊन रात्री सर्व झोपी गेल्यानंतर आई सखुबाई च्या चरणी माथा टेकून घराचा उंबरठा ओलांडला.घराचा मोह सोडून लोकोद्धार, आत्मोद्धारासाठी ते अंगावरील कपड्यानिशी घराबाहेर पडले.सर्व माणसे सारखीच असतांना हे भेद का हे प्रश्न त्यांना भेडसावत होते.

आपल्या कीर्तनात ते म्हणायचे.”आपल्या हिंदुस्थानले मोठा एक डाग आहे डाग.धुऊन काढायचा. प्रयत्न करा तो डाग कोणता ?शिवशीSल .काय करशील? -शिवशीSल. तू कोन ?जो जात पुसते त्याचा सारखाच तो आहे की नाही? -होय ! याले चार हात अन् त्याले दीड हात आहे का .ना Sही. याले चार डोळे अन् त्याले दोन च आहेत का? नाSही.मंग तू कोन का पुसता? कोनी तुम्हाले जात विचारील. तू कोन ? तर म्हणाव मी मी माणूस. कोन आहात तुम्ही ? मानसंS !! ” असे ते जाती प्रथेबाबत प्रबोधन करायचे. म्हणजे सगळी माणसे माणसेच आहेत.

ते आपल्या कीर्तनात म्हणायचे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला I हो SSS I विद्या शिका.अन गरीबाले विद्यासाठी मदत करा.गरीबाचे मुलाला चड्डी द्या.खादी टोपी द्या.शिस्पेन पाटी द्या.कोरी वही. द्या.आपल्या पोराले विलायतला पाठवायची इच्छा करता अन् साले एक दोन आण्याची वही देण्याची गरीबाचे मुलाले आपल्या पोटात बुद्धी नाही.आपण माणसं नाही.

गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला I

हो ss सरकारने दारुबद्दल उपदेश करायला नको.पण मुलं पोलीस झाले पाहिजेत मुलं.कोन झाले पाहिजेत मुssलं. बाप दारू पिऊन सापडला. असा बडवा की त्याच्या बापाच्या बापानं पाहिलं नसशील असा थंड करा.अन् पुसा त्याले म्हणावं दारु सोड-सुटली दारूका पेशील. ” म्हणजे आपल्या कीर्तनातून ते लोकांना बोलतं करायचे .बुरसटलेल्या चाली रीतीवर सडकून टीका करायचे. दारू पिईल तो बाप नाही लख्खो धन्यानं आपल्या आजाच्या बापाच्या हातच्या जमीनी पार गमावल्या आणि हमाली करून राहिले हमाली. दीडशे दे ना धर्माSSSला Il अन् रुपया मोडून दारू प्याला Il हो SSS I हे दारू पिणारे मुर्दाड पहिलवान, मराठे,माळी, तेली,न्हावी,धोबी,चांभार, कोष्टी,कुंभार, लोहार, बलदार,कैकाडी,गोंड,गवारी इणकर, धनगर, मांग आणि महार-
मारवाडी दारू पिऊन बंबईत पडला पाहिला का ?नाSS ही. गुजराती दारू पिऊन बंबईत पडला. पाहिला का ? नाSSही ! जे जे दारू पितील त्यांचा खाना खराब झाल्याविने कधी राहणार नाही. अशा पद्धतीने कीर्तने करून खेडोपाड्यातील असंख्य कुटूंबांना सावरले .सावकरकीच्या विळख्यातून बाहेर काढून अन्नाला लावले.हातात गाडगे होते म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणत होते.
बाबा म्हणायचे “खर्चु नका देवासाठी पैसा. शिक्षणाला पैसा तोच द्या हो.,शाळेहून नाहीं ते थोर मंदिर. देणगी उदार शाळेला द्या. ते कधी हिंदी भाषेतून सुद्धा बोध करत. ते म्हणतात ” पत्थर का शेर हमें,खा नहीं सकता ,पत्थर की गाय हमें दूध नहीं दे सकती फिर पत्थर का भगवान हमें क्या दे सकता है I ” अशा पद्धतीने बाबांच्या कडून समाज परिवर्तनशील कोणता विषय सुटला असावा असे म्हणता येणार नाही.बाबा कुठे ही गेले की झाडू,खराटा त्यांच्या कडे असायचा पंढरपूर ला गेले के ते विठ्ठलाच्या दर्शनाला नाही तर खास करून कीर्तना साठी जायचे. पहिल्यांदा स्वच्छता करायचे आणि मगच त्यांचे कीर्तन सुरू करायचे.बाबा जी तत्वे मांडायचे ती खोडण्याची शक्ती कोणातच नसायची. म्हणजे गाडगे बाबा हे संताचे संत होते.समाजाचे व्यासपीठ होते.त्यांचा देव देवळात नव्हता तो माणसातच होता. आहे असे ते सांगायचे.ते गरीबांचे वाली होते .ते म्हणायचे गरीबांच्या मुला मुलींची लग्ने झाली पाहिजेत.

आपले संत गोरोबा, संत चोखोबा,संत ज्ञानेश्वर संत नामदेव,संत जनाबाई, संत कबीर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम या सर्वांनी समाज एकतेने कसा नांदेल हे पाहिले त्यांनी जोडण्याची भाषा वापरली.पण अनेक संत महात्म्यांना लोक ओळखू ही शकले नाहीत.छत्रपती शिवाजी महाराज हे जानते राजे होते.सर्व जाती धर्मांचा आदर करून त्यांनी राज्य केले म्हणूनच सामान्य जनांच्या तनामनावर आजही ते राज्य करत आहेत.बुद्ध,कबीर महात्मा फुले,सावित्रीबाई फुले .राजर्षी शाहू महाराज,,कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. संताच्या पुढच्या पिढीतील या महापुरुषांनी शिक्षण, समाज प्रबोधन करत एक वैज्ञानिक दृष्टी लोकांच्यात निर्माण करण्याचे महान कार्य या सर्वानी केलेले आहे. हे आपण विसरून चालणार नाही . समाज सुधारणेचे काम या आद्य शिक्षक, समाज सुधारक संत गाडगे बाबांच्या कार्यावर,जगण्यावर विचारावर आपण नक्कीच विचार कराल आणि आचरणात आणाल अशी आशा बाळगतो.🙏🙏🙏🙏

संदर्भ ग्रंथ :
१) श्री संत गाडगे बाबा -ले.लक्ष्मण पुंडलिक पापळकर संस्क. १९७६
२) श्री गाडगे बाबांचे शेवटचे कीर्तन- संपादक-प्राचार्य रा.तु.भगत संस्क.१९९१
३)लोकसंत गाडगे महाराज-संपादक रा.तु.भगत संस्क. १९९८
४)श्री गाडगे महाराज गौरव ग्रंथ -संपादक-प्राचार्य रा.तु.भगत.संस्क.१९९२

              प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे 

स.गा.म.काॅलेज, कराड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!