कर्तबगार महिला ! शांताबाई धनाजी दाणी

संकलन
मिरा वासनिक, कल्याण
शांताबाई दाणी हे नाव आंबेडकरी…
चळवळीच्या इतिहासात आज अनेकांच्या विस्मरणातुन गेलेलं आहे…
शांताबाई धनाजी दाणी यांचा जन्म १जानेवारी १९१९ नाशिक येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला. आई फुंदाबाई दाणी ह्या अशिक्षित होत्या परंतु त्यांना शिक्षणाची खुप आवड होती…आपली मुलगी खुप शिकावी हे त्यांचे स्वप्न होते . वडील धनाजी दाणी हे इंग्रजी ४ थी शिकलेले होते त्यामुळे त्यांच्या शिक्षणात कोणताही अडसर नव्हता.
नाशिक मध्ये चौक मंडईच्या ख्रिश्चन शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. नगरपालिकेच्या व्हर्नाक्युलर फायनल परिक्षा उतिर्ण झाल्या. गुणवत्तेच्या जोरावर पुण्यातील स्रियांच्या प्रशिक्षण महाविद्यालयातुन त्यांनी शिक्षण घेतले. नाशिकला आल्यानंतर निफाड तालुक्यातील विंचुर गावच्या प्राथमिक शाळेत शांताबाईंनी शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर नांदगावच्या शाळेतही त्या होत्या. त्यांचे हितचिंतक डॉ लोंढे यांच्या प्रेरणेने सौराष्ट्रात गेल्या . तेथे त्यांनी मेट्रिकची परिक्षा दिली…मॅट्रिक झाल्यावर त्या नाशिकाला परतल्या आणि एच.पी.टी. महाविद्यालयामध्ये कला विभागात प्रवेश घेतला. महाविद्यालयात प्रवेश घेणा-या शांताबाई या नाशिकमधील पहिल्या दलित विद्यार्थीनी होत्या.
शिक्षणामुळेच मुलींचा व्यक्तीगत विकास होतोच पण त्याचबरोबर कौटुंबिक , सामाजिक व राष्ट्रीय विकास देखील होतो…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना व दादासाहेब गायकवाड यांच्या विचारांचा आचाराचा व कृतीचा ठसा त्यांच्या जीवनशैलीतुन दिसुन येतो. गाव खेड्यातुन गावंढळ शाळेतुन आलेल्यांना प्रवेश देण्यास प्रस्थापित मंडळी टालमटोल करीत असत…माध्यमिक शिक्षणासाठी आलेल्या मुलींना ऍडमिशन मिळणे कठीण होते. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्ञानविकास केंद्र , नाशिक या संस्थेची स्थापना या संस्थे अंतर्गत रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय , कुणाल प्राथमिक शाळा व तक्षशिला विद्यालय हे त्यांनी स्थापन केले…या शाळा सुरु केल्या त्यासाठी त्यांनी आपले दागिने विकले. या विद्यालयात आजही ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. गौतम छात्रालय व रमाबाई वसतिगृह येथे आजही मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षण घेत आहे…त्यांनी केलेल्या कार्याची ही पोचपावती आहे..
जातीभेदाच्या क्रुर वागणीतून शांता बाईही सुटल्या नाही . त्यांनाही जातीयतेचे चटके भोगावे लागले. याचे उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील विंचुर या गावी त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली परंतु अस्पृश्य असल्या कारणाने त्यांना तेथील नोकरी सोडावी लागली. अस्पृश्य मुलींनी शिक्षण घेणे , त्यांच्या बरोबरीने नोकरी करणे हे सनातनी विचारसरणीला मानवणारे नव्हते. शांताबाई तर अस्पृश्य! त्यांनी सवर्णांना शिकवावे हे धर्मांधांना कसे रूचणार? त्यांच्यावर सवर्णाचा रोष होता हे नोकरी सोडण्याचे मुळ कारण होते. विंचुर गावातील एका देवीच्या मंदिरात शाळेतील इतर शिक्षकांसह गेल्या होत्या. ही बातमी अवघ्या विंचुर संस्थानात वा-यासारखी पसरली होती. महारांना मंदिर प्रवेश निषिध्द असल्याने शांताबाईंना संस्थानिक असलेल्या विंचुरकरांच्या दरबारात हजर रहावे लागले. कोणतीच गोष्ट मी जाणुनबुजुन केली नाही…जे घडलं ते अजाणतेने घडले असा खुलासा त्यांना द्यावा लागला. हे मुख्य कारण त्यांनी तेथील नोकरी सोडण्याचे होते.
“करण्यासारखे बरेच काही असते , पण ते करण्याची जिद्द हवी असते.” हा कानमंत्र त्यांनी उभारलेल्या शिक्षणसंस्थेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिला. त्या नेहमी म्हणत , ‘शाळा म्हणजे ज्ञान देण्याचे समाजक्रांतीचे , स्वातंत्र्य ,समता ,बंधुता या क्रांतितत्वाचे तसेच स्री शक्तीच्या विकासाचे गीत आहे. मुळातच त्या खुप बुद्धीवान होत्या. त्यांचा जीवन प्रवास खुप संघर्षमय होता. पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांना इंग्रजी , हिन्दी व गुजराती भाषा अवगत होत्या..
सर्व देश गांधींचा फॅन होता तेव्हा दलित समाजामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावाची जोरदार चर्चा होती. त्यावेळी शांताबाईंनी कॉलेजमध्ये बाबासाहेबांचे भाषण ऐकले. आंबेडकरी विचारांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला…हे भाषण म्हणजे त्याच्या आयुष्यात ज्योत पेटवणारी मशाल ठरले…आंबेडकरी चळवळीत त्या सक्रीय झाल्या त्या संदर्भात त्या म्हणतात , *”डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोंडून बाहेर पडणारा शब्द न् शब्द माझ्या मनात कोरला जात होता. माझं मन त्या शब्दात पुर्णपणे एकरूप होऊन गेले आणि मी मनोमन ठरवून टाकले. आता क्षण न् क्षण व्यतीत करायचा तो पिडीत , शोषित , अत्याचारित अशा आपल्या भावंडांसाठीच!” तेव्हापासून त्यांनी तन-मन-धनाने चळवळीला वाहुन घेतले…आता माघार नाही… दलितांच्या राजकीय हक्कासाठी लढायचे. हा द्दढ निश्चय केला….
आपले स्वतंत्र राजकारण सुरु करावे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९४६ मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. शांताबाईंनी या पक्षाची संपूर्ण धुरा सांभाळली. त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली. काँग्रेस गट मुठभर लोकांसाठी काम करतो असा दलितांचा सर्वसामान्य समज होता. मुस्लिम हा इस्लामी राष्ट्राकडे वळलेला पक्ष बनला. अशावेळी दलितांना कोणतेही स्वतंत्र विचारपीठ नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी शेड्युल कास्ट फेडरेशन स्थापना केली. पक्षाच्या कानपूरमध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. या परिषदेत शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या धोरणावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती. खुप जोखमीचे काम होते. या प्रेसचे अध्यक्ष पद स्व:ताकडे घेऊन देशभरातील पत्रकारांना पक्षाचे नेमके धोरण समजावून सांगितले. महिलेने देशव्यापी प्रेस कॉन्फरन्स समोर पक्षाची खंभीरपणे बाजु मांडली. ही भारतातील पहिलीच घटना होय!
शांताबाई दाणी हे नाव राजकीय वर्तुळात चांगलेच गाजले. त्याकाळी १९३२ साली झालेला ‘पुणे करार’ गावोगावी त्याचे पडसाद उमटले होते. १९४६साली स्वतंत्र मतदार संघ असावा या मागणीसाठी शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्षाने सत्याग्रह पुकारला होता. पुणे येथील कॉन्सिल हॉलमध्ये विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना शांताबाईंनी गनिमी काव्याने सभागृहात प्रवेश करून सत्याग्रह केला. त्यामुळे त्यांच्यावर पोलिस कारवाई झाली. आणि त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. १९४७ साली मध्यप्रदेशातील रायपूर येथे सभा घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथील चर्मकार समाजामध्ये पारंपारिक अंधश्रद्धा विषयी त्यांना जनजागृती करायची होती. सोबत आंबेडकरी चळवळीतील पा.न.राजबोध होते त्यांना पोलिसांनी अटक करून जबलपुरच्या तुरूंगात एक महिना डांबून ठेवले. व दोघांवर आरोप होता की , ‘निजामाचे हेर’ आहेत. १९६४ मध्ये भूमीहीन शेतक-यांच्या सत्याग्रहात शांताबाई अग्रभागी असल्याने पोलीस यंत्रणेने अटक करून इतर महिलांसह भुसावळ तुरुंगात सात दिवस ठेवले. या सर्व घटना रात्रंदिन आम्हा या शांताबाईंच्या चरित्र्यग्रंथात तपशीलवार दिल्या आहेत.
आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आंबेडकरी राजकारणाचा कित्ता गिरवला…शेड्युल कास्ट फेडरेशन ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व प्रवासात त्या ठाम राहिल्या. १९५६ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. १९५७ ते १९७८ या बारा वर्षाच्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा म्हणून काम पहात होत्या…१९६८ साली त्यांची नियुक्ती विधान परिषदेवर करण्यात आली. राजपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी दलित कष्टकरी जनतेचे प्रश्न विधान परिषदेत मांडले. कामाला अधिक महत्त्व देऊन शांताबाई आयुष्यभर अविवाहितच राहिल्या…आपले समग्र जीवन दलितमुक्ती आंदोलनासाठी वेचले… . शांताबाईंनी दलित ऐक्य व्हावे म्हणून राजकारण बाजुला सारून वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी मासमुव्हमेंट , दलित पँँथर , दलित मुक्ती सेना आणि रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते सहभागी केले. सर्वांना एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला परंतु बेकीची कीड लागलेल्या समाजाला व नेत्याला त्याचा काही उपयोग झाला नाही… शांताबाईंनी राजकीय , सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला. या पुरस्कारात मुंबई महिला गौरव पुरस्कार , महाराष्ट्र राज्य सावित्रीबाई फुले पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार यांचा समावेश आहे…१९६८मध्ये मलेशियातील ‘धम्म परिषदेत’ विशेष अतिथी म्हणून त्यांना निमंत्रण होते. १९७०मध्ये जपानला संपन्न झालेल्या ‘शांती परिषदेत’ त्या ‘शांती सैनिक’ म्हणून उपस्थित होत्या. १९७२ मध्ये श्रीलंकेच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी त्यांना बोलविले होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र , मुक्त उंचविद्यापीठाने शांताबाईंना सन्मान पुर्वक ‘डी.लिट’ ही पदवी प्रदान केली… अशा या शांताबाई दाणी यांची इ.स.२००१ मध्ये प्राणज्योत मालवली..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत