बौध्द तत्वज्ञान

1)सज्जन मनुष्य कुणाला म्हणावे?
भ.बुध्दाच्या मते जो मनुष्य स्वतःमधील विषयवासना,क्रोध आणि अविद्या(अंधश्रध्दां) यापासून दूर राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो व इतरांनाही या अवगुणापासून दूर राहण्याचा सतत प्रयत्न करतो तो सज्जन मनुष्य होय.
सज्जन माणसाला मानसिक शांतता लाभलेली असते.मरते समयी तो शांत चित्ताने देहत्याग करतो.त्याची सर्वत्र सत्कीर्ती पोहचते.
याउलट जो मनुष्य निरुपद्रवी, निष्पाप अशा प्राण्यांना दुःख देतो,त्यांना छळतो,त्याच्या वाटेला महान संकटे आणि मानसिक अशांती येत असते.
2)सर्वोत्तम पुरुष कुणाला म्हणावे?
जो मनुष्य स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी सतत झटत असतो तो सर्वोत्तम पुरुष होय.
3)पवित्र जीवन जगणे म्हणजे काय?
शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता,आसक्ती आणि तृष्णा यापासून अलिप्त राहणे म्हणजेच पवित्र जीवन जगणे होय.
4)ज्या बौद्ध धम्मात सर्व वस्तू अनित्य मानल्या जातात त्यात वस्तूची,प्रतिमांची,प्रतीकांची पूजा का केली जाते?
बौद्धधम्मामध्ये जगातील सर्व वस्तू अनित्य मानल्या गेल्या आहेत.हे तत्वज्ञान ज्ञानी लोकांना ताबडतोब समजले जाते परंतु सर्वसामान्य लोकांना समजणे कठीण जाते.म्हणून त्यांच्या समोर धम्माचरण करण्यासाठी प्रज्ञा,शांती व एकाग्रता येण्यासाठी कोणीना कोणी महानमानव,त्याची प्रतिमा, प्रतीकं,किंवा विशिष्ट धातू ठेऊन त्या महा मानवाबद्दल श्रद्धा निर्माण करणे आवश्यक असते. श्रद्धा निर्माण झाल्यानंतर त्या महामानवाचा आदर्श घेऊन त्याच्या उपदेशाप्रमाणे ते श्रद्धेने वागण्याचा प्रयत्न करतात.म्हणून अनित्य मानल्या जाणाऱ्या वस्तूंची,प्रतिकांची पूजा श्रद्धेच्या दृष्टीने महत्वाची आहे.
5)भ.बुद्धाची पूजा करणे जरुरी आहे का?
होय.कारण आमच्यापुढे बुद्ध, धम्म व संघ यांचा आदर्श असतो. त्यातून श्रद्धा निर्माण होते.श्रद्धा निर्मितीतून मनुष्य कुशल कर्म कार्यरत होतो.मात्र इथे अंधश्रद्धेला बिलकुल स्थान नाही.
6) शाश्वतवादी पुरुष कोणते?
जी माणसे चुकीचा समज करून घेऊन मनुष्यामध्ये एक आत्मा आहे,आणि तो अमर आहे.त्याचे परिवर्तन होत नाही असे जे समजतात ते शाश्वतवादी पुरुष होत.
7) उच्छेदवादी पुरुष कोणते?
ज्यांचा असा समाज असतो कि मृत्यूनंतर सर्वनाश होऊन पुनर्जन्म होत नाही असे मानणारे ते उच्छेदवादी पुरुष होत.
भ.बुद्धाचा धम्म शाश्वतवादीही नाही आणि उच्छेदवादीही नाही. तो मध्यममार्ग आहे.यालाच आर्यअष्टांगिक मार्ग म्हणतात.
8)भ.बुद्ध पुनर्जन्म मानत होते का?
भ.बुद्धाच्या मते मनुष्य वा कोणताही प्राणी चार मूळ घटकांपासून बनलेला आहे. माती,हवा,पाणी आणि ऊर्जा (उष्णता).मृत्यूनंतर मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही तर हे चार घटक सदैव जिवंत राहून निसर्गातील त्या त्या घटक समूहाला मिळतात नंतर प्रत्येक घटक वेगवेगळ्या शरीरातून आलेल्या उर्वरीत तीन घटकांना एकत्रित करून वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्जन्म घेत असतात.
9)तथागत म्हणजे कोण?
तथागत म्हणजे ज्याने संपूर्ण तथ्य ( सत्य) जाणले आहे असे एकमेव भ.बुद्ध.किंवा तथागत म्हणजे यथावादी तथाकारी आणि यथाकारी तथावादी.याचा अर्थ तथागत जसे बोलतात तसे करतात आणि जसे करतात तसेच बोलतात.
10)निर्वाण व परिनिर्वाण म्हणजे काय?
आर्य अष्टांगिक मार्गाचे परिपूर्ण पालन करुन दोषरहित जीवन जगणे म्हणजे निर्वाण होय. अर्थात निर्वाण म्हणजे सर्व विकारांपासून मुक्ति मिळविणे.
निर्वाण प्राप्त महापुरुषाचा मृत्यू होणे म्हणजेच महापरीनिर्वाण. निर्वाण मिळऊन पूर्णपणे मालविणे,नाहीसे होणे म्हणजेच परीनिर्वाण होय.
11)धर्म आणि धम्मातील फरक काय आहे?
धर्म:देवांवर श्रद्धा,आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वरपूजा,प्रार्थनाविधी,यज्ञयाग इ मार्गांनी देवाला प्रसन्न करणे म्हणजेच धर्म होय.
धम्म:धम्म म्हणजे सदाचरण, जीवनाच्या सर्वच क्षेत्रात माणसामाणसामधील उचीत व्यवहार म्हणजेच धम्म होय. किंवा प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजेच भ.बुद्धाचा धम्म होय.निती हे धम्माचे सार आहे. धम्मात सदाचरण,रागद्वेषlपासून मुक्ती,शांती,शमन आणि सत्यज्ञान शिकवले जाते.
12)दैवी चमत्काराचे खंडन करण्याचे भ बुद्धाचे कोणकोणते हेतू होते?
a)माणसाला बुद्धीवादी बनविणे म्हणजेच सत्यज्ञानी बनविणे.
b)माणसाला स्वतंत्रlपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी प्रवृत्त करणे.
c)ज्या भ्रामक समजूतीने माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारली जाते त्याचे उगमस्थानच नष्ट करणे.त्याचे उगमस्थान असते मनात,अर्थात मेंदूत.
विश्वातील सर्व माणवांना सर्व कालीन उपयुक्त असे भ.बुद्धाचे धम्म तत्वज्ञान
🙏जयभीम जयबुद्ध🙏
एस बी सिंगारे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत