८० कुटुंबानी सुरतमध्ये बुद्धिझम स्वीकारला

80 Families in Gujarat Embrace Buddhism
गुजरात राज्यात गेली दोन वर्ष सुरतच्या शासकीय कार्यालयाने धर्मांतराचे अर्ज रोखून धरल्याने ८० कुटुंबाचे धर्मांतर होत नव्हते. परंतु अखेर स्वयं सैनिक दल या संघटनेने प्रशासनाची नाडी आवळल्याने ८० कुटुंबांना धर्मांतराची परवानगी देण्यात आली. त्यानुसार लगेच सुरत येथे १४ मे २०२५ रोजी आनंद बुद्ध विहार, बॉम्बे कॉलनी, अमरोली येथे मोठ्या जाहीर कार्यक्रमात ८० कुटुंबांनी बुद्धिझमचा स्वीकार केला. समानतेची दृष्टी देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शांततेची शिकवणूक देणारे भगवान बुद्ध यांच्यामुळेच आम्ही हा प्रशासकीय लढा जिंकू शकलो अशी या कुटुंबाची आज भावना आहे.
गुजरातमध्ये धर्मांतर करण्यास अलीकडे सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार २०२३ मध्ये ८० कुटुंबानी हिंदू धर्मातील जातीभेदाला कंटाळून बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याबाबतचे पत्र प्रशासनास दिले. त्यावर तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिन्यात निर्णय घ्यावयाचा होता. परंतु गेली दोन वर्षे जाणून बुजून अपुरे पेपर असल्याचे कारण दाखवून अनेकांना हेलपाटे घालायला लावले. बुद्धिझमचा स्वीकार लोकांनी करू नये यासाठी ही सर्व खेळी होती. परंतु सर्व ८० कुटुंबे आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्याचवेळी गुजरातच्या स्वयं सैनिक दल ( SSD ) यांनी या लढ्यास पाठिंबा दिला. फोन करून, कार्यालयास भेट देऊन त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. परंतु प्रशासन ढिम्म होते. शेवटी त्यांनी प्रशासनास बजावले की धर्मांतराचे अर्ज मंजूर करा अन्यथा रस्त्यावरील आंदोलनास तयार व्हा. ही मात्रा लागू पडली आणि त्यांनी ८० कुटुंबाचे बौद्ध धर्म स्वीकारण्याबाबतचे अर्ज मंजूर केले. त्यानुसार लगेचच १४ मे रोजी धर्मांतराबाबतचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याची शपथ घेण्यात आली. अशा तऱ्हेने बौद्ध धर्माचा स्वीकार अनेक कुटुंबानी केला. परंतु याची बातमी कुठल्याच वृत्तपत्रांनी दिली नाही.
बुद्धीझममुळे आयुष्य कसे सुखपूर्वक बदलले,असे पूर्वी झालेल्या धर्मांतर कार्यक्रमातील काहीजणांनी आपले अनुभव कथन केले. मयूरराज नाग हा सुरत येथील डायमंड फॅक्टरी मध्ये मशीन ऑपरेटर आहे. त्याने २०१९ मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. तो म्हणतो बौद्ध धर्म हा उर्जेकडे नेणारा मार्ग आहे. शील पालन केल्याने वाईट व्यसने पळून गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचल्याने जीवनाचा नवीन अर्थ कळला. कुटुंबाकडे लक्ष देऊ लागलो. त्याची पत्नी अस्मिता म्हणते बुद्ध स्वीकारल्याने आम्ही साधे पण आनंदी आयुष्य जगत आहोत. चंद्रिका शाक्य ही ३० वर्षाची शिक्षिका म्हणते वीस वर्षांपूर्वी बुद्ध स्वीकारल्याने आयुष्याचे सोने झाले. आजही अनेक वस्त्यांमध्ये जाऊन महिलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगते. त्यांचे अफाट कार्य आणि समानतेसाठी त्यांनी दिलेला लढा सांगते. आणि नंतर मग बुद्धतत्त्वज्ञान जीवनात कशी ऊर्जा देते हे सांगते. ती पुढे म्हणाली “आता आम्ही दिवाळी आणि होळी खेळण्यापेक्षा तेच पैसे कुटुंबासाठी राखून ठेवतो”.
जात व्यवस्था आणि अंधश्रद्धेमुळे हिंदू धर्माचा तिटकारा आल्याने अनेक कुटुंबे बुद्धिझम स्वीकारण्याच्या परवानगीची वाट पहात आहेत. गुजरातच्या सरकारी कार्यालयात यासाठीचे २००० पेक्षा जास्त अर्ज पडून आहेत. सरकार जाणून-बुजून परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहे. सन २००६ मध्ये राजकोट येथे SSD संघटना स्थापन झाली. ग्रामीण भागात जाऊन लोकांना त्यांचे हक्क सांगणे, विषमता दूर करणे, आणि समानतेचा मार्ग कोणता याबाबत मार्गदर्शन करणे हे तीचे मुख्य कार्य आहे. सन २०२८ पर्यंत २० मिलियन उपेक्षित लोकांना बौद्ध धर्माचा राजमार्ग दाखविण्याचा तिचा निर्धार आहे. तसेच संविधानाबाबत लोकांमध्ये जागृती करणे आणि आपले भविष्य घडविण्याची ताकद आपल्याच हातात आहे हे जनमानसात बिंबवणे हे उद्दिष्ट असल्याचे SSD चे एक प्रवक्ते म्हणाले. आपल्या महाराष्ट्रात सत्यशोधक ओबीसी परिषदेचे हनुमंत उपरे बौद्ध धर्म प्रवेशाबाबतचे कार्य करीत होते. परंतु त्यांच्या निधनामुळे कार्य अपुरे राहिले असून त्यांच्या पाठीमागे अजून नवीन योद्धा तयार झालेला नाही. तरी गुजरातमधील स्वयंम सैनिक दलास ( SSD ) खूपखूप शुभेच्छा..!
~~~ संजय सावंत ( नवी मुंबई)
सविस्तर माहितीसाठी खाली लिंकवर जावे.
https://en.themooknayak.com/dalit-news/two-years-of-wait-80-dalit-families-in-gujarats-surat-finally-embrace-buddhism
🏮🏮🏮🏮🏮
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत