निवडणूक रणसंग्राम 2024भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघात ही आहे. __ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघात ही आहे. या विषयावर वैचारीक प्रबोधनात्मक 39 वी कार्यशाळा संपन्न.

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : समाज जीवनात कार्यरत फुले शाहू आंबेडकराईट विचारधारेच्या हितचिंतकांना जागृत करून वैचारिक आंदोलनाचा कारवाँ पुढे घेऊन जाण्यासाठी समग्र आंदोलन समजून घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका आणि त्यावेळी व्यक्त केलेले विचार समजून घेणे आवश्यक आहे. आपण सर्वांना ज्ञात आहेच की, 29 मार्च 1936 ला ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे.” याची जाणीव ठेवून त्या संदेशाच्या 88 व्या वर्धापनदिनानिमित्त वर्तमान काळात आपण कुठे आहोत? समग्र चळवळीचे नेतृत्व, कार्यकर्ते, संस्था, संघटना, अनुयायी, हितचिंतक नेमके काय करीत आहेत? आपली त्यात भागीदारी किती? यावर विचारमंथन व्हावे म्हणून फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलच्या विद्यमाने 39 व्या वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळेचे 29 मार्च 2024 ला आयोजन करण्यात आले होते.

    *या कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अनामी मोरे यांनी केले. ते याप्रसंगी म्हणाले की, 14 एप्रिल जयंती निमित्त, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाला व 1 जानेवारी भीमा कोरेगाव प्रसंगी आपणास बाबासाहेबांची आठवण होते. आंबेडकराईट विचारधारा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य आहे. ते आपणांस दररोज स्मरण करायला हवे. मताच्या माध्यमातून विधान मंडळात आपण आपले प्रतिनिधी पाठवू शकतो. आई बहिणीच्या इज्जतीपेक्षा मताची किंमत निश्चितच जास्त आहे. मताचा अधिकार मिळवून आणल्यावर आचार्य कृपलानी यांनी या समाजाला विकत घेऊ असे म्हटले होते. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ज्या दिवशी या समाजाला आपल्या मताची किंमत कळेल, त्या दिवशी विकत घेणारा भिकारी तुमच्या शिवाय दुसरा कुणीही नसेल. आता आपण साडी, माडी, गाडी याच्या मोहपाशातून बाहेर पडले पाहिजे. कार्ल मार्क्स यांच्या मृत्यू समयी केवळ 7 अनुयायी होते ज्यांनी मार्क्सची विचारधारा जगभर पोहचवली पण आपण लाखो असुनही आंबेडकरवाद जगभर पोहोचवू शकलो नाही.* 
        *या प्रसंगी रूपचंद पवार म्हणाले की, भारताच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव कोरलेले आहे. भाषेचे व्याकरण खुजे ठरणार असे व्यक्तीमत्व असणारे बाबासाहेब डॉ. आंबेडकर होते. सध्या आंबेडकरांच्या नावाचा बहुतांश केवळ स्वार्थासाठी वापर होतो आहे. म्हणून तथाकथित नेत्यांच्या जोखडातून बाबासाहेब आंबेडकरांना मुक्त करने आवश्यक आहे. मते विकल्याने नालायक प्रतिनिधींची खोगीर भरती होईल. ज्यामुळे खाटकाच्या हातात बक-यांनी सुरी दिल्यासारखे होईल. ही धोक्याची सुचना आपण विचारात घेतली पाहिजे. सुधाकर दांडगे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 88 वर्षापूर्वीचे भाकीत आज सत्यात उतरत आहेत. समाजाला नेतृत्व उपलब्ध नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यात सुद्धा कोणी वारसदार निर्माण होऊ शकले नाही. ज्यामुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. परिणामी भारताचे संविधान धोक्यात आले आहे. ज्याचे कुणाला काही घेणे देणे नाही. भारताचे संविधान संपुष्टात आले तर अराजकता माजेल व आपले अस्तित्व धोक्यात येईल. करिता योग्य उमेदवारांना मतदान करावे. समता सैनिक दलाचे के. जे. त्रिभूवन म्हणाले की, आपणास अजूनही मताची किंमत कळाली नाही. मतदानाचा हक्क प्राप्त करून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार संघर्ष केला आहे. 2024 ला मतदानासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. सर्व गट तट आप आपल्या स्वार्थासाठी कार्यरत आहेत. नेते स्वतःसह समाजाला विक्रीस तयार आहेत. विरोधी गटातील लोक नेत्यांना विकत घ्यायला शोधत आहेत. करिता बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीला आपण समजून घेतले पाहिजे. गोविंद कांबळे म्हणाले की, शत्रू पक्षापेक्षा आपल्याकडे गट जास्त का आहेत? एक समस्या नीट करायला गेला की नवीन चार समस्या उभ्या राहतात. आपल्या अर्धवट धार्मिक लोकांनी कट्टरतावाद सोडून चांगल्या कामासाठी राजकारण केले पाहिजे. तसेच 'निबीड जंगले तुडवीत आलो, रथ समतेचा असा आणिला' हे गीत त्यांनी सादर केले. महादेव डांबरे म्हणाले की, तत्कालीन विचार आजही जसेच्या तसे लागू पडतात यावरून बाबासाहेबांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येते. आपण सर्वाना जे काही प्राप्त झाले, ते बाबासाहेबांचे योगदान आहे. आपल्या मताची ताकत, किंमत वाया जाता कामा नये, ज्यामुळे राष्ट्र अधोगतीस जाईल असे कृत्ये करू नये. संसदीय लोकशाही समजून घेतांना मतांचे मूल्य आपण तपासले पाहिजे. लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात रक्तपाताशिवाय आमुलाग्र बदल घडवून आणणा-या लोकशाहीची अंमलबजावणी करण्यासाठी मताची किंमत मीठ, मिर्ची एवढी कमी समजू नये. अजय रमेश बनसोडे म्हणाले की, राजकारणात नव्याने प्रवेश करणा-यांसाठी पॉलिटिकल स्कूल चालविले पाहिजे ज्यातून प्रशिक्षित कैडर बाहेर पडतील. मताचा अधिकार सुशिक्षितांनी अशिक्षितांना समजावून सांगितला पाहिजे. एड. राजू बागूल म्हणाले की, एक मत, एक मूल्य हा मताचा कायदेशीर अधिकार सहज मिळाला नाही. हक्क अधिकार हवे असतील तर कर्तव्याचे पण पालन केले पाहिजे. सर्व राजकीय पक्षाचे जाहिरनामे समजून घेऊन योग्य प्रतिनिधी सभागृहात पाठविले पाहिजेत. प्रज्वलित बनसोडे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे, त्याचे फलित म्हणून आपण आज टाय कोटात उभे आहोत. स्वतंत्र मतदार संघाचे ऐवजी राखीव मतदारसंघ देऊ केल्याने बाबासाहेबांचे स्वप्न धुळीस मिळाले. नेते मोठे होऊन सुद्धा लाचारी पत्करतात म्हणून समाज लाचारी स्विकारतो. एड. विलास रामटेके म्हणाले की, निवडणूका जवळ आल्या की एक व्यक्ती अनेक पक्षात पहायला मिळतो. जे मत विकत घेण्यासाठी दलाली करीत असतात. समाजात घडणाऱ्या सर्व घटनांत संधी असल्यास आपण आपले मत व्यक्त केले पाहिजे. मानवी शरिरातील पांढ-या पेशीत रोगप्रतिकारक शक्ती असते, अशा व्यक्ती समाजातही असतात. त्यांच्या बाजूने आपले मत ठेवले पाहिजे. जेणेकरून समाजातील वाईट चालीरीतींना पायबंद घातला जाईल. राष्ट्रपाल सोनकांबळे म्हणाले की, विकासाला प्राधान्य देऊन नेतृत्वाची निवड केली पाहिजे. निवडणूकपूर्व जागृती मोहीम राबविली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे विद्यार्थ्यांनी जागृती केली पाहिजे.*
      *प्रमुख वक्ते डॉ. आर. डी. बडगे म्हणाले की, एखादी व्यक्ती मरण पावल्यावर सुद्धा त्यांचे विचार जीवंत राहतात, असे मॅझिनी म्हणायचे मात्र बाबासाहेब म्हणतात की जर त्या विचारांचे प्रचारक, वाहक नसतील तर ते विचार सुद्धा त्या व्यक्तीबरोबर नष्ट होतात. भाकरी पेक्षा स्वाभिमानाला बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्व दिल्यांने आपणास स्वाभिमान प्राप्त झाला. 1911 च्या जनगणनेनुसार अस्पृश्य हे स्वतंत्र उपेक्षित जाती आणि वर्ग असल्याची जाणीव ब्रिटिश सरकारला करून दिली होती. आपण तेव्हाच इतरांना सांगू शकतो जेव्हा आपण स्वतः त्याचे अनुपालन करूया. करिता राजकारणात प्रशिक्षित प्रतिनिधी पाठविले पाहिजेत.*
     *कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, 29 मार्च 1936 ला मु. वेढी, ता. पालघर, जिल्हा ठाणे येथे संपन्न झालेल्या ठाणे जिल्हा अस्पृश्य परिषदेच्या पहिल्या अधिवेशनात बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने धर्मांतर व राजकारण या दोन मुद्यावर मार्गदर्शन केले आहे. आपणास आपली उन्नती व प्रगती करून घ्यायची असेल तर सहृदय, सामर्थ्यवान, शील संपन्न, निस्वार्थी अशा समाजाशी संबंध स्थापित करावे लागतील ज्यासाठी धर्मांतर करणे आवश्यक आहे. हिंदू समाज स्वराज्यासाठी व अस्पृश्योधारासाठी किती स्वार्थ त्याग करायला तयार आहे? याची तपासणी करून समतेने मदत करतील अशा मुसलमान व शीख समुदायाशी आपण सहकार्य केले पाहिजे. चातुर्वर्ण्य व वर्णाश्रमधर्माने ज्ञान, सत्ता, शस्त्र व संपत्तीचा उपभोग न घेऊ दिल्याने आपले अतोनात नुकसान झाले आहे. करिता आपण ज्ञान संपादन करून जुन्या खोट्या रुढी परंपरांचे बंधने तोडून स्वोन्नतीचा मार्ग चोखाळला पाहिजे. त्या काळात नौकरशाहीत कलेक्टर एका प्रदेशाचा राजा समजला जात असे. हे प्रस्थ संपुष्टात येऊन अधिकार कायदेमंडळाकडे जाणार आहेत याची जाणीव करून देताना कायदेमंडळात चांगली माणसे गेली पाहिजेत. शेठ सावकार व श्रीमंत लोकांकडून गरीब जनतेचे कल्याण होणार नाही. म्हणून आपण योग्य प्रतिनिधी निवडून पाठविले पाहिजेत. मते विकून नालायकांची खोगीर भरती कायदेमंडळात केल्याने देशाचे अपरिमित नुकसान होऊन राष्ट्र अधोगतीस जाते असा निर्वाणीचा इशारा तेव्हाच बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता, ते आजही खरे ठरत आहे. नेतृत्वहीन समाजाला नेतृत्व प्रदान करण्याची भाषा बोलणारे मात्र आता नेतृत्वहीन होत चालले आहेत. ज्यामुळे बामसेफ सारख्या संघटनेचे 45 वर्षात आठ पेक्षा जास्त वेळा विभाजन झाले आणि होत आहेत. अशाप्रकारे नेतृत्वहीन समाजात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. करिता आपण कार्यरत असलेल्या पक्ष, संघटन, संस्थातील योग्य फोरम मध्ये काम करताना "योग्य मत" व्यक्त केले पाहिजे. अन्यथा तथाकथित नेतृत्व त्यांच्या योजना आपल्यावर लादतील ज्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतील. ज्यामुळे मत विकणे हा गुन्हा तर आहेच पण मत प्रदर्शित न करता आंधळे, बहिरे व मुक्याची भूमिका पार पाडणे हा त्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे. परिणामी ते आत्मघातही असल्याचे सिद्ध होत आहे.*
     *या कार्यशाळेला रूपचंद पवार, कारभारी त्रिभुवन, संतोष गडकर, सुधाकर दांडगे, महादेव डांबरे, अजय रमेश बनसोडे, गोविंद कांबळे, डॉ. संघरत्न गवई, दीक्षा कांबळे, साधू आनंद, अनामी मोरे, एड. विलास रामटेके, डॉ. आर. डी. बडगे, प्रज्वलित बनसोडे, राष्ट्रपाल सोनकांबळे, विराज गोविंद कांबळे, बी. बी. मेश्राम इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. अशाप्रकारे आभार प्रदर्शनाने हर्षोल्हासात कार्यशाळेची सांगता झाली.*

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!