महाप्रजापती गौतमी बुद्ध विहारात हरदास एल. एन. यांच्या जयंती निमित्त वैचारीक प्रबोधनात्मक कार्यशाळा संपन्न.

आपले सहकारी : बी. बी. मेश्राम, संचालक फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल, 4, साकेत नगर, (पेठे नगर), छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), महाराष्ट्र. 431002
संपर्क : 9421678628
stdbbm@gmail.com
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : समाज जीवनात कार्यरत बुद्ध, फुले, शाहू, पेरियार, आंबेडकराईट विचारधारेच्या हितचिंतकांना जागृत करून वैचारिक आंदोलनाचा कारवाँ पुढे घेऊन जाण्यासाठी चळवळीतील “जय भीम” चे महत्व समजून घेताना जय भीम ची सुरूवात कधी झाली? कुणी केली? का केली? कशी केली? इत्यादी मुद्यावर विचारमंथन व्हावे जेणेकरून सामान्य जणांचे प्रबोधन करण्यासाठी महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार समिती आणि फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलच्या संयुक्त विद्यमाने “जय भीम” चे जनक हरदास एल. एन. यांच्या जयंती निमित्त अविष्कार कालनी, एन- 6, सिडको, छत्रपती संभाजी नगर, (औरंगाबाद), महाराष्ट्र येथे 7 जानेवारी 2024 ला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते धनराज गोंडाणे यांनी केले. ते म्हणाले की, हरदास लक्ष्मणराव नगराळे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील शिंगोरी बोरी येथे झाला आहे. त्यांनी स्वामी ब्रम्हानंद यांचेकडून संस्कृत शिकून प्राविण्य मिळविले होते. 1927 ला कामठी येथे रात्रशाळा चालविली होती. त्यांचेवर संत चोखामेळा यांच्या विचारांचा पगडा होता. 1920 साली साहूबाई शी त्यांचा विवाह झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच अस्पृश्यांचे नेते आहेत. हे स्पष्ट करण्यासाठी इंग्लंड चे प्रधानमंत्री रॅम्सेमॅक्डोनाल्ड यांना 32 तारा पाठविल्या ज्यामुळे बाबासाहेब अस्पृश्यांचे नेते सिद्ध होऊ शकले. ते आल इंडिया डिप्रेस्ड असोसिएशनचे सचिव आणि अध्यक्ष होते. 1937 ला ते विधानसभेवर निवडून आले होते. या प्रसंगी सुधाकर मेश्राम असे म्हणाले की, हरदास एल. एन. यांना अस्पृश्यतेच्या कारणास्तव गिरणी चालकाने दळण दळून दिले नाही. परिणामी वसाहतीतील विविध महिलांनी महत्प्रयासाने दळण दळून दिले याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी 6 जानेवारी 1935 ला जय भीम चा नारा दिला आहे. आशाताई आंभोरे म्हणाल्या की, तथागत बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग बलिदानामुळे आपण येथे एकत्रित येऊन चर्चा करीत आहोत. सुधीर प्रभाकर खोब्रागडे म्हणाले की, पूर्वी वडील विहारात यायचे आता त्यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवायचा ठरविले आहे. बी. टी. बागूल म्हणाले की, चळवळीसाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. त्यांचा हातभार लागणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असलो तरी चळवळीत सक्रिय राहिलेच पाहिजे. आपण बुद्धिष्ट असल्याने समाजात आपण आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीं गेलेच नाहीत मात्र दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेल्यावर अस्पृश्यांचे खरे नेते असल्याचा दावा केला परिणामी हरदास एल. एन. यांनी रॅम्से मॅकडोनाल्ड यांना 32 तारा पाठवाव्या लागल्या म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे नेते सिद्ध झाले. प्रमुख वक्ते डॉ. रमेशचंद्र धनेगांवकर म्हणाले की, हरदास एल. एन. हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील उजवा हात होता. त्यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी आंतरजातीय सहभोजनाचे आयोजन केले होते. सायमन कमिशनच्या वेळेस त्यांनी आपली साक्ष दिली. सी पी बेरार प्रांतातून ते निवडून आले होते. नागपूर परिषदेचे ते स्वागताध्यक्ष होते. पुणे करारांवर सही करणारी ही एक महत्त्वाची व्यक्ती होती. त्यांच्या अंत्यसंस्काराला अलोट गर्दी होती. त्यांच्या स्वाभिमानी विचारांना आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना जय भीम चे जनक असे मानले जाते कारण त्यांनी या अभिवादनाचा सर्व प्रथम प्रयोग केला आहे. बाबू हरदास कार्यकर्त्यासोबत समाज जीवनात चळवळीच्या कार्या निमित्ताने भटकंती करीत असताना त्यांना वाटेत एका मुस्लिम व्यक्तींने त्यांच्या मित्राला सलाम वालेकुम तर समोरील व्यक्तींने वालेकुम सलाम असे म्हणताना ऐकले तेव्हा त्यांनी त्या दोन्ही व्यक्ती कडून त्याचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की, अल्लाह आपको सलामत रखे। असे कळले त्यामुळे त्यांना असे वाटले की, आपलीही अशी स्वतंत्र ओळख असावी ज्यातून त्यांना जय भीम हे अभिवादन 6 जानेवारी 1935 ला सुचले तेव्हा त्यांनी ही बाब सर्व प्रथम सोबत असणारे गौरीशंकर गजबे यांना सांगितली व यांचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी गौरीशंकर गजबे आणि हरी चांदोरकर यांचेवर सोपविली. याची नोंद रामचंद्र क्षीरसागर लिखित ‘दलित मुव्हमेंट इन इंडिया अँड इटस लीडर्स : (1857 ते 1956)’ पुस्तकात आहे. तेव्हा प्रथमत: उच्चारण करणा-यांनी “जय भीम” म्हणायचे तर ऐकणा-यांनी प्रत्युत्तरादाखल “बल भीम” म्हणायचे ठरले होते. तसे बरेच काळ चालले सुद्धा मात्र कालांतराने ऐकणा-या व ऐकविणा-या व्यक्तींने जय भीम म्हणण्याची प्रथा रूढ झाली. ती आजतागायत सुरू आहे. पुढे 30 डिसेंबर 1938 ला मक्रणपूर येथे संपन्न झालेल्या दलित परिषदेत भाऊसाहेब मोरे यांनी सुद्धा हा नारा पुढे चालविण्याचा संदेश दिला. जय भीम चा अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा होतो. हरदास एल. एन. यांनी वयाच्या 17 व्या वर्षी ‘महारठ्ठा’ नावाने चळवळीचे साप्ताहिक सुरू केले होते. याची नोंद वसंत मून लिखित ‘वस्ती’ या पुस्तकात असून या पुस्तकाचे गेल आमवेट यांनी ‘ग्रोईंग अप अनटचेबल्स’ असे इंग्रजीत भाषांतर केले आहे. “एखादा धुमकेतू आकाशात तळपावा अन् त्याच्या लख्ख प्रकाशाने डोळे दिपून जावे पण क्षणार्धातच तो नाहिसा व्हावा अस हरदास च्या बाबतीत आम्हाला झाल.” अशी भावना वसंत मून यांनी व्यक्त केली आहे. द्वितीय गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे नेते कोण? अशी समस्या निर्माण झाली तेव्हा बाबू हरदास यांनी ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांना 32 तारा पाठवून 32 वेळा पञ व्यवहार केला. ज्यामुळे बाबासाहेब अस्पृश्यांचे नेते सिद्ध झाले. त्यांनी 1924 ला ‘मंडल महात्मे’ हा ग्रंथ लिहिला तर ‘वीर बालक’ नावांचे नाटक ही लिहिले. 1925 ला त्यांनी बीडी कामगारांची संघटना स्थापन केली. 1927 मध्ये त्यांनी अस्पृश्य समाजातील मुलामुलींसाठी चालविलेल्या रात्रपाळिच्या शाळेतून 86 मुले तर 22 मुली शिकून बाहेर पडल्या. 1930 ला बीडी मजूर संघ स्थापन केला. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. बाबू हरदास यांच्या जीवनावर “बोले इंडिया जय भीम ” असा चित्रपट आलेला आहे ते आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळेच सूर्याला जयभीम चित्रपट काढता आला तर ख्यातनाम गायिका गिन्नी माही यांना ‘जय भीम-जय भीम, बोलो जय भीम’ हे गीत गाता आले. अशा प्रकारे जय भीम ही आपल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्रांतीच्या संघर्षाची ओळख ठरली असून कोट्यवधी जनतेच्या मुखातून दररोजच्या जीवनात “जय भीम” चा उद्घोष होत आहे. म्हणून आपल्या साठी जय भीम, जय भीम आणि जय भीमच अंतिम सत्य आहे. याचा प्रचार प्रसार करणे हीच हरदास एल. एन. यांना खरी आदरांजली ठरेल. कार्यशाळेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन विठ्ठल पवार तर एम. जी. गाढे यांनी आभार व्यक्त केले. व्ही. आर. पवार, धनराज गोंडाने, डॉ. रमेशचंद्र धनेगांवकर, सुधाकर मेश्राम, सुधीर प्रभाकर खोब्रागडे, एम. जी. गाढे, आशा अंभोरे, निर्मला देविदास मगरे, रंजना गायकवाड, सुमन गाढे, सरस्वती धाबर्डे, बी. बी. मेश्राम इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. अशाप्रकारे आभार प्रदर्शनाने हर्षोल्हासात कार्यशाळेची सांगता झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत