देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

शिवकाळाच्या आधी महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती कशी होती ?


बहामनी साम्राज्यात मराठे (त्या वेळी हा शब्द प्रचलित नव्हता) बहामनी साम्राज्यात सरदारकी करत. त्या बदल्यात त्यांना इनामं, वतनं , देशमुखी आणि पाटीलकी मिळायच्या. महार मांग तेव्हांही अस्पृश्यच होते. बाहेरच्या सम्राटांना स्पृश्य अस्पृश्याशी घेणं देणं नसल्याने महारांना सैन्यात काम मिळायचं.

पूर्वीच्या काळी बारा महीने सैन्य पदरी नसायचं. युद्ध काळ नसेल तेव्हां सैन्य आपल्या शेतात राबत असे. बहुतेक सगळे कुणबीच असत. महारांना मात्र जमीन नसल्याने युद्ध काळ नसताना पोटापाण्याची चिंता असे. ज्या वेळी युद्ध नसेल तेव्हां अस्पृश्यतेचं युद्ध लढताना महार मेटाकुटीला येत. महारांनी आपले गार्हाणे बहामनी सुलतानाकडे मांडल्यावर त्याने महारांना सुद्धा वतनं दिलीत. यालाच आपण महार वतन म्हणतो. मात्र महारांना वतनं मिळाल्याने गावकरी नाराज झाले.

एक लक्षात ठेवायला हवं कि बहामनी, आदिलशहा, निजाम, मुघल किंवा ब्रिटीश हे काही समाजसुधारण्यासाठी आलेले नव्हते. ते राज्य करण्यासाठीही आलेले नव्हते तर ते लुटालुटीसाठी आले होते आणि ते करत असताना इथे त्यांना सत्ता ताब्यात हवी होती. पण इथल्या सामाजिक परिस्थितीमुळे आपणच सत्तापूर्वीचाधारी होऊ शकतो हे ध्यानात आल्याने इराणच्या आखातातले, तुर्क देशातले लुटारू इथे येऊन राज्य करू शकले. जोवर सामाजिक परिस्थिती विषमतेची आहे तोवर या सम्राटांना कसलाच धोका नव्हता. त्यामुळे ते समाज सुधारतील ही शक्यता शून्यच. थोडे फार ठिगळं लावण्याचे उद्योग होत. ते ही ब्रिटीश काळात. पण मुलभूत ढांचा बदलावा हे कुणाचंच उद्दीष्ट नव्हतं. झोपलेला समाज असाच राहिला तर फायद्याचेच होते. उगीच त्यांच्या भावना दुखावून आपल्या विरोधात बंडाळीसाठी जागृत करण्याचे धंदे हे कुणी करणे शक्य नव्हते. म्हणून परकीय आक्रमकांनी अस्पृश्यांवर सत्ता गाजवणार्यांना गुलाम बनवले म्हणून महार मांगांनी खूष होण्याचे कारण नाही.

परकीय आक्रमकांमुळे ब्राह्मण सत्तेला हादरे बसून परकीयांकडे सत्ता मिळाल्याने मराठे (कुणबी) आणि अन्य ओबीसी खूष. सैन्याचा पगार अधिक शेतीची कामे आणि ब्राह्मणाच्या सत्तेपासून सुटका हा फायदा. मात्र महार मांगांना मराठ्यांनाही जोहार घालायचा, बामणालाही जोहार घालायचा आणि सुलतानालाही जोहार घालावा लागे. अर्थात सुलतानाशी थेट संपर्क नसे. पण सैन्यातल्या महारांना सुलतानाचा त्रास नव्हता. त्यांना वतन मिळाल्याने आपली बरोबरी होईल यामुळे गावकरी नाराज झाले आणि त्यांनी बहामनी सुलतानाकडे आपली फिर्याद ठोकली. त्यांची बाजू ऐकून घेतल्यावर यांना नाराज करून आपल्या लुटारू सत्तेला सुरूंगा लागायला नको म्हणून सुलतानाने वतनाच्या बदल्यात त्यांचे जुलमी कायदे मान्य केले. तेव्हांपासून महार गांवकामगार झाला. वतनाचा हक्क अबाधित ठेवायचा तर अमानुष असे कायदे पाळत पडेल ती सर्व गावाची कामे त्याला करावी लागत असत.

पुढे आदिलशाहीत जास्त वतनं आणि पगार मिळाल्याने मराठे तिकडे गेले. बहामनी सुलतानाचे साम्राज्य संपले. आदिलशाही पेक्षा जास्त मिळाले म्हणून निजामाकडे गेले. काही विजापूरच्या कुतूबशहाकडे गेले. महाराष्ट्रात मा. प्रकाश आंबेडकर या मराठ्यांना निजामी मराठे म्हणतात. मिळालेली वतनं अबाधित ठेवण्यासाठी जी सत्ता उदयाला येईल तिला साकडे घालणे, म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार करणे हे या मराठ्यांचे वैशिष्ट्य.

शिवाजी महाराज (छत्रपती झालेले नसताना) त्यांच्या विरोधात हेच निजामी मराठे होते. आग्र्याला अटकेत गेल्यावर मराठे सरदार स्वराज्य सोडून गेले. शाहिस्तेखानाला अनेक मराठे सरदार जाऊन मिळाले. ज्यांना वतनं मिळाली नाहीत ते ही जाऊन मिळाले. गद्दारी, फंद फितुरी त्या काळात सुद्धा होती. याच फंदफितुरी मुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले.

ब्राह्मणांनी दगा फटका केला कि स्वकियांनी केला हे इतिहासकार सांगतीलच. अण्णाजी दत्तोच्या पिलावळीने आणि रामदासी संप्रदायाने फितुरी केले असे पुरावे इंद्रजित सावंतांनी दिले आहेत. चिटणीसांच्या बखरीवर संशय घेतला जात आहे. हे सगळं चालूच राहील.

पण औरंगजेब महाराष्ट्रात तळ ठोकून बसला असताना मराठी साम्राज्याचे अनेक शिलेदार त्याला सामील होत होते हे कसे नाकारता येईल ? निव्वळ ब्राह्मणाकडे बोट दाखवले कि यांचा गुन्हा कसा काय पातळ होईल. ब्राह्मणाने शिर्केंकडे बोट दाखवायचे आणि मराठ्यांनी या सर्वांना क्लीनचीट देत फक्त ब्राह्मणाकदे बोट दाखवायचे हा मराठा ब्राह्मणाचा इतिहास सोडून तटस्थ इतिहास कधी समजणार ?

संगमेश्वरात संभाजी महाराजांना अटक झाली. तिथून वढू बुद्रुक इथे मराठी साम्राज्याचा राजाला नेत असताना साडेतीनशे किमीच्या रस्त्यात एकाही मराठी सरदाराने गनिमी काव्याने हल्ला करून राजाला सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा का केला नसेल ? फक्त रायप्पा महार आणि अन्य एक महार सरदार यांनी या मुघल सैन्यावर हल्ले केले. या इतिहासाबद्दल मौन पाळले जात असताना आज अचानक एक रणनीती म्हणून तो समोर आणला जात आहे.

छावा सिनेमा प्रपोगंडा आहे यात शंकाच नाही. या निमित्ताने ब्राह्मणी छावणीने आपले राज्य आल्याचे सूचित केले आहे. ते कधी ?
तर संभाजी ब्रिगेडचा मोठा हिस्सा राष्ट्रवादी आणि भाजपात सामील झाल्यावर. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मराठे सरदार मुघलांकडे गेले. त्यानंतर पेशवाईच्या काळातही मराठे पेशव्यांचे गुलाम झाले. त्यांना फक्त आपले वतन राखण्यात इंटरेस्ट होता.

महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ जोरात असताना ब्राह्मणांना हुसकावून लावण्यासाठी मराठे सत्यशोधक झाले. फुलेंनंतर ही चळवळ ब्राह्मण ब्राह्मणवादाकडे झ्हुकली. मराठ्यांना आता राज्य हवे तर त्यांना इतर जातींना सोबत घ्यावे लागणार होते. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना प्रोत्साहन दिल्याने मराठा + महार हे समीकरण झाले. या समीकरणाने मराठ्यांच्ची शक्ती वाढली. दोन समाज एकत्र आल्याने पुढारीपण मराठ्यांकडे आले. त्यामुळे अन्य समाज सुद्धा जुडत गेला.

पण जेव्हां ब्रिटीश जाऊन केंद्रात ब्राह्मणांचे राज्य येईल हे लक्षात आले तेव्हां ब्राह्मणी कॉंग्रेसच्या विरोधात असलेले मराठे यशवंतराव चव्हांणांच्या कूटनीतीमुळे कॉंग्रेसमधे जाऊन आपल्या सरदरक्या, इनामदार्या, वतनदार्या वाचतील हे बघायला तिथले मांडलिक झाले. त्यांनी लोकशाहीला आपल्या वतनदारी सिस्टीममधे ठाकून ठोकून बसवले आणि वतनदार्यांच्या जागी आमदारक्या, खासदारक्या आणि पाटीलकीच्या जागी सरपंच आले. व्यवस्था तीच राहिली.

जेव्हां ब्राह्मणांची स्वावलंबी टीम भाजपच्या रूपात समोर आली तेव्हां १९९६ ला दुसर्यांदा ( १९७७ ला पहिली खेप) मराठे अपक्ष म्हणून भाजपासोबत गेले. ते पुन्हा २००४ साली कॉंग्रेसमधे परतले. पुन्हा २०१४ ला चाहूल घेऊन मोदींच्या मागे महाराष्ट्रातले मराठे गेले. ते भाजापातून निवडून आले. सातारा आणि कोल्हापूर अश दोन्ही गादींनी नव्या पेशवाईला शरण जाणे पसंत केले.

मग आरोप महारांच्या स्वतंत्र लढण्यावर का ? पूर्वीही महार फक्त छत्रपतींना मानत होते. तेव्हां इमानी महारांनी राजाला सोडवायला प्राण त्यागले. पण त्यांना ना श्रेय ना वतनं, देशमुख्या, देशपांडेपद , पाटीलकी. ज्यांनी गद्दारी केली त्यांनी इतरांना आरोपी ठरवून तसा इतिहास लिहीला.

सांप्रत काळात मराठे बेईमान झाल्याने भाजप सत्तेत आली आणि हे मुसलमान आणि महारांना बी टीम म्हणतात आणि लोक त्यावर विश्वास ठेवत असतील तर इतिहासापासून चालत आलेला गद्दारांचा इतिहास आजही चालूच आहे. हा पुसून टाकण्यासाठी महार, मुसलमान, ओबीसी यांना सत्ता दिली पाहीजे, त्यांना एखादे पद देऊन बटीक बनवायचे आणि आपण अमर्याद सत्ता उपभोगायची हे चालणारे नाही हे मराठ्यांना मान्य नाही.

ते आजही निजामाकडून आदिलशहा, तिथून कुतूबशहा, मुघल अशा उड्या मारून आपले संस्थान जपण्यात धन्यता मानतात. प्रवरानगरचे संस्थान वाचवण्य़ासाठी विखे पाटील २०१४ ते २०१९ या काळात भाजपच्या विरोधात लढलेच नाहीत. उलट आपल्याला कधी सत्तेत घेतात म्हणून पाच वर्षे ते वाट बघत बसले. यांना कधी मराठे गद्दार म्हणत नाहीत. एक एक करून सगळे भाजपात गेले. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही तर २००४ पासून भाजप म्हणेल तसे निर्णय घेत आली आहे. त्यांच्याच काळात दाभोळकरांची हत्या झाली आणि आरोपी पळून जाऊ शकले. करकरे शहीद झाले. भिडेचं प्रस्थ वाढलं. सनातनचं प्रस्थ वाढलं. निरपराध मुस्लीम संघोट्यांनी केलेल्या बॉंबस्फोटासाठी जेल मधे सडले… मोठी यादी आहे.

आता तर राष्ट्रवादीने जनतेला मूर्खात काढत एक मोठा हिस्सा भाजपत दाखल केला आहे.

या परिस्थितीत सामाजिक लढाई लढायची कशी ?
मराठ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवता येईल अशी परिस्थिती नाही. खोटं बोलणे याला डावपेच म्हणत असतील तर बाबांनो ब्राह्मण विरूद्ध मराठा हा वाद तुम्ही खेळा.

आम्ही आमचं बघतो. कॉंग्रेस किंवा भाजप यांना सत्तेत बसवण्यासाठी आमचा जन्म झालेला नाही.
आम्ही आमच्या सत्तेसाठी लढतो. आम्हाला सत्ता हवी ती आमचे स्थान सुधारावे म्हणून. तुम्हाला ती बरोबरी वाटते. म्हणून तुम्ही ओबीसींना धडा शिकवायला आणि आमची स्वतंत्र चळवळ ठेचायला थेट भाजपला निवडून देता….

या परिस्थितीत आम्ही तुमच्या सोबत येऊ शकत नाही. २००४ ला आम्ही सामाजिक परिस्थितीत बदल व्हावा म्हणून तुम्हाला साथ दिली. पंधरा वर्षे तुम्ही सत्ता भोगताना साडेचार हजार दलित अत्याचाराची प्रकरणे तुम्ही सडवली.

मग तुम्ही आली काय आणि ते आले काय , काय फरक पडतो ?

मंदार माने

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!