बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथाचे का दहन केले होते


बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले होते ते केवळ त्यात मागासांना हक्क आणि अधिकार नाकारले तसेच महिलांना जनावरांच्या पेक्षाही हीन वागणूक दिली होती ही महत्त्वाची कारणे आहेत.
नांगर धरती। शेती जे करती।
मठ्ठ ते असती। मनु म्हणे।।1।।
करु नका शेती। सांगे मनुस्मृती।
धर्माज्ञा करती। ब्राम्हणास।। 2।।
शूद्र जन्म घेती। पूर्वीची पापे ती।
जन्मी या फेडती। शूद्र सारे।। 3।।
विषम रचती। समाजाची रीती।
धूर्तांची ही निती। अमानव।। 4।।
(संदर्भ :- सावित्रीबाई फुले समग्र वाङ् मय)
मनू म्हणे या ओवीत सावित्रीमाई फुले यांनी मनुला आणि मनुस्मृतीला शाब्दिक चाबकाने अक्षरशः फोडून काढले आहे. नांगर धरतात, शेती करतात ते मठ्ठ आहेत, शूद्रांचा जन्म हे पुर्वजन्माचे पाप आहे, ब्राम्हणांनी शेती करु नये अशी धर्माची आज्ञा आहे, मनुने या सर्व गोष्टी मनुस्मृतीत लिहून ब्रामणांना ऐदी, ऐतखाऊ बनवले. विषमता ही समाजाची रीत आहे आणि ही रीत बनवणारे धूर्त आणि अमानवी आहेत असे सांगणारी आमची सावित्रीमाई खरोखरच खूप महान आहे.
सहजसोप्या भाषेत समाजातील लोकांच्या वेदना मांडण्याचे कसब सावित्रीमाई फुले यांच्या लेखणीतून दिसून येते. मनुची धूर्त निती किती अमानवी होती हे या ओवीमधून दाखवण्याचे धाडस त्याकाळी करणे हे काळाच्या पुढचा विचार होता. क्रांतीबाची सावली माय सावित्री खुपच महान होत्या हे निर्विवाद सत्य आहे. क्रांतिबा फुले आणि सावित्रीमाई या दाम्पत्याने जे समाजकारण केले ते अवर्णनीय आहे. यातुनच पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळत गेली आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे यूगसुर्य जन्माला आले.
शूद्राणां मासिकं कार्यं वमनं न्यायवर्तिनाम् |
वैश्यवच्छौचकल्पश्च द्विजोच्छिष्टं च भोजनम् | (५:१४०)
ब्राम्हण सेवा करणाऱ्या शूद्राने प्रतिमासी मुंडण करावे.वैश्यासारखे जन्म-मरण शौचकार्य करावे आणि ब्राम्हणांचे उष्टे खावे.
मनुस्मृती किती निचप्रवृत्तीच्या व्यक्तीने लिहीली होती हे सांगण्यासाठी हा श्लोक पुरेसा आहे.
मनुने मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना किती खालच्या दर्जाची हिन वागणुक दिली आहे ते दर्शवणारे श्लोक व त्याचे अर्थ देत आहे. सर्वच श्लोक व. त्याचे अर्थ लिहीणे शक्य नसल्याने महत्वाचे तेवढे लिहीत आहे. मनु एका श्लोकात म्हणतो की “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| ” म्हणजे जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देवता प्रसन्न होतात. पण प्रा. नरहर कुरुंदकरांच्या मते नारी पूजनिय केव्हा होते तर खालील श्लोकात नमुद केलेल्या सर्व अटी व नियम पुर्ण केल्यानंतर. स्त्रीने स्वच्छेने व सर्वस्वाने पुरुषाची गुलामगीरी स्विकारली तरच ती पूजनीय होवु शकते. मनुचे स्त्रिविषयीचे काही श्लोक खालीलप्रमाणे….
मनुस्मृतीमध्ये स्त्रीचे स्थान काय?
“अस्वतन्त्रा: स्त्रिय: कार्या: पुरुषै: स्वैदिंवानिशम् |
विषयेषु च सज्जन्त्य: संस्थाप्या आत्मनो वशे ” (९.२)
” पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने|
रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातंन्त्रमर्हति” (९.३)
वरील दोन श्लोकांचा अर्थ पुढीलप्रमाणे ” जवळच्या आप्त पुरुषाने स्त्रियांना आपल्या ताब्यातच ठेवावे. त्यांना ईतर विषयांची चटक लागू देवु नये. त्यांच्यावर रात्रंदिवस नजर ठेवावी. स्त्रिच्या लहानपणी वडिलांनी सांभाळावे. तरुणपणी तिच्या पतीने संरक्षण द्यावे. म्हातारपणी मुलांनी सांभाळावे.
स्त्री अशी सतत पराधीन आहे. ती स्वातंत्र्यास पात्र नाही या आशयाचा श्लोक
” बालया वा युवत्या वा वृघ्दया वापि योषिता |
न स्वातंत्रेण कर्तव्यं किंचित्कार्य गृहेष्वपि” (५.१४७)
अर्थात लहान मुलीने, तरुण बाईने, वृध्द स्त्रिनेही स्वताच्या अधिकारात छोटेसे सुध्दा काम करु नये.
” बाल्ये पितृर्वशे निष्ठेत्पाणिग्राहस्य यौवने |
पुत्राणां भर्तरि प्रेते न भजेत्स्त्री स्वतंन्त्रताम् |” (५.१४८)
अर्थात स्त्री लहानपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या व म्हातारपणी मुलाच्या छत्राखाली रहावे. स्वतंत्रपणे व स्वतंत्रवृत्तीने कधीही राहू नये.
“पौश्चल्याश्च लचित्ताच्च नैस्नेह्याच्च स्वभावत: |
रक्षिता यत्नतोSपीही भर्तृष्वेता विकुर्वते “(९:१५)
याचा अर्थ नट्टापट्टा करुन पुरुषांना बिघडवणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे,म्हणुन ज्ञानी माणसे स्त्रियांच्या वाटेला जात नाहित. काम,क्रोध अशा विकारांमुळे स्त्री ज्ञानी-अज्ञानी पुरुषांना कुमार्गास लावू शकते.
‘ शय्यासनमलंकारं कामं क्रोधमनार्जवं |
द्रोहभावं कुचर्या च स्त्रीभ्यो मनुरकल्पयत् ‘(९.१७)
अर्थात विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासुनच काम ,क्रोध,दागिण्यांचा मोह,बसुन राहणे,द्वेष निंदा झोपा काढणे, हिंसा या गोष्टी मनुने स्त्रियांना दिलेल्या आहेत.
नवऱ्याने आपली बायको विकली वा टाकली तरी नवऱ्याचा तिच्यावरचा अधिकार नष्ट होत नाही, ती त्या नवऱ्याचीच पत्नी राहते हे सांगणारा पुढील श्लोक
” न निष्क्रविसर्गाभ्यां भतृभार्या विमुच्यते |
एवं धर्म विजानीम: प्राक्प्रजापतिनिर्मीतम् “(९.४६)
नवरा दुराचारी असो,स्वैराचारी असो किंवा त्याच्यात कोणताही गुण नसो तरीही त्याला पती परमेश्वर मानावे. त्याची पुजा करावी,सेवा करावी. पती दारुडा,जुगारी,रोगी किंवा षंढ असला तरी स्त्रिने त्याची सेवा करावी या आशयाचा पुढचा श्लोक
” विशील: कामवृत्तो वा गुणैर्वापरिवर्जित: |
उपचर्य: स्त्रिया साध्व्या सततं देववत्पत्ति:” (५.१५४)
एवढे वाचूनही जर मनु आणि मनुस्मृती आवडणार असेल आणि मनुचे आणि मनुस्मृतीचे समर्थन करणार असाल तर बायांनो तुमच्यावर जे अन्याय, अत्याचार, बलात्कार होतात त्याला तुम्ही स्वतः जबाबदार आहात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनुस्मृतीचे समर्थन अडाणी आणि मुर्ख करु शकतात.
Bharatwasi Satish
कोल्हापुर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत