प्राचीन भारत असेल तर मग आता हिंदुस्तान कसा ?


प्रा. डॉ. आर.जे. इंगोले
भारताच्या राजकीय जीवनाचा आपण विचार केला तर आपल्या राजकीय नेतृत्वामध्ये दोन दोष प्रथम दर्शनी दिसतात यातील एक म्हणजे भारतीय संस्कृती आणि इतिहास यांचे प्रचंड अज्ञान आणि दुसरे याला अनुसरून मग लोकांना भावनिक मुद्यावर एकत्र करून मते मिळवणे याला कमी जास्त प्रमाणात सर्व पक्ष जबाबदार आहेत. भारताचे संविधान जरी आपणास धर्मनिरपेक्ष तत्व सांगत असले तरी प्रत्यक्ष आपले नेते मात्र आपणास आपला धर्म आणि आपली जात पुन्हा पुन्हा आठवण करून देतात यात आपला फायदा काहीच नाही सर्व फायदा हा राजकीय लोकांचा आहे. हे सर्व आठवण्याचे कारण आपल्या देशात हिंदू –मुस्लिम ,हिंदू बौद्ध अशा प्रकारे वाद निर्माण केले जातात याला आपली जनता फसते आणि पुन्हा असेच लोक सत्तेवर येतात ज्याला आपल्या समाजात जातीय तेढ निर्माण करण्याची आणि त्याचा फायदा घेऊन कायम सत्तेत राहण्याची इच्छा असते. आपला इतिहासच मुळात वैदिक विरुद्ध अवैदिक असा आहे. वैदिक म्हणजे वेद माणनारे अर्थात ब्राम्हण आणि अवैदिक म्हणजे यांना सोडून इतर सर्व बहुजन पण आपल्या लोकांना हे कधीच समजले नाही. आणि आपल्या नेत्यांनी यांना कधी समजू नये अशी व्यवस्था तयार केली आहे. आपल्या देशात अनेक जाती आणि धर्माचे लोक राहतात आणि तसे त्यांना संविधानाने अधिकार दिलेले आहेत. आपल्या देशातील कोणत्याही जाती आणि धर्माचा अनुयायी हा त्याच्या घरात कोणताही धर्म पालन करू शकतो आणि बाहेर आल्यावर मात्र त्याने भारतीय म्हणून राहिले पाहिजे. पण असे झाले तर मग आपल्या राजकीय लोकांची पोळी भाजली जात नाही. आणि त्यामुळे आपल्या देशात मुले लहान असतानाच त्याला तू कोणत्या जाती आणि धर्माचा आहेस हे सांगितले जाते. इथे जास्त दोष आपल्या आई-वडिलांचा आहे. पण त्यांचीही वाढ तशीच झालेली असते आणि त्यामुळे पुढे ते असेच करणार यात शंका नाही. आज उत्तरप्रदेश मध्ये अगदी शाळेत असणारी 8-10 वर्षाची मुले खांद्यावर कावड घेऊन अनेक किलोमीटर पायी चालत आहेत आणि एक तर व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता की, या वयातील मुले सिगारेट आणि गांजा ओढत आहेत. आता हे जर सत्य असेल तर मग कुठे चाललो आहोत आपण याचा विचार केला पाहिजे. याच संदर्भात एका व्हिडिओमध्ये भारत आणि चीन या दोन देशाची तुलना केली होती की, चीन मधील या वयाची मुले शिक्षण घेऊन देशाला पुढे नेत आहेत आणि आपली मुले शिक्षण सोडून अशा नशाच्या आहारी जात आहेत तर आपला देश महसता कसा होणार ? आणि विश्वगुरु कसा होणार आहे ? हा प्रश्न आहे.
याचा जर आपण थोडा गांभिर्याने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, आपल्या देशातील राजकीय नेतृत्वाला कोणत्याच क्षेत्राचा अभ्यास नाही. आणि त्यामुळे एखाद्या ठिकाणी समूहाला संबोधीत करतांना अनेक राजकीय नेते भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा करतात आता तसे पाहिले तर हे फार गंभीर आहे. म्हणजे याची सुरुवात जाणीवपूर्वक आर.एस.एस. सारख्या प्रतिगामी संस्थेने केली आहे आणि त्यांचा हा एक डाव आहे हे आपल्या कांही विद्वान लोकांच्या लक्षात आले आहे. पण आपण राजकीय नेतृत्वाचा विचार करतो तेंव्हा यांना ना देशाची काळजी ना समाजाची मग ते नेते कोणत्याही पक्षाचे असतील तरी साधारण सारखीच स्थिती आहे. यांना फक्त सत्ता पाहिजे. आणि त्यासाठी ते कोणत्याही विचाराच्या पक्षाशी युती करतात आपण 2024 ला महाराष्ट्रात जे राजकीय नाटय घडले ते आपण सर्वांनी पाहिलेच आहे. आणि यात आर.एस.एस. चा हिंदू राष्ट्राचा अजेंडा आहे की, यांना अखंड भारत तयार करायचा आहे पण आता यांना हे माहीत असायला पाहिजे की, जर तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता तर मग भारताला अखंड भारत का म्हणता ? पण आपल्याकडे चिकित्सा करायची नाही अशी एक गुलाम मानसिकता आहे. आणि त्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र म्हणायचे आणि त्याचा पुढे मात्र आखंड भारत करायचा आहे. यावर कट्टर हिंदुत्ववादी कधी विचार करणार आहेत का ? आपण ज्याला प्राचीन भारत असे म्हणतो त्याला जंबुद्वीप असे सुद्धा नांव बुद्धकाळात होते. पण तेंव्हा सुद्धा हिंदुस्तान असा शब्द वापरात नव्हता आणि यापेक्षा महत्वाचे म्हणजे हे हिंदुत्ववादी ज्याला फार पवित्र ग्रंथ म्हणतात त्यात सुद्धा कुठे हिंदू असा शब्द अस्तीत्वात नाही. आणि अखंड भारत जे यांचे स्वप्न आहे यात भारत ,पाकिस्तान , बांग्लादेश , नेपाळ , भुतान आणि श्रीलंका असा व्यपाक प्रदेश होता पण आज आणि यापुढे सुद्धा याचा एक देश तयार करणे कसे शक्य आहे ? पण ज्या गोष्टी अशक्य असतात त्याच हे आर.एस.एस. वाले लोकांना सांगतात आणि लोक सुद्धा ऐकतात हे विशेष आहे. पण आता सोशल मीडियामुळे लोकांमध्ये थोडी जागृती येत आहे. आपण 2024 च्या संसदेमध्ये अनेक खासदार यांनी शपथ घेतांना भारताचे संविधान हातात घेऊन किंवा त्याचा उल्लेख करून शपथ घेतली हे भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठे परिवर्तन आहे.
आपल्या देशाच्या संविधानाची प्रस्तावना We the People of India अशी आहे.आणि आपल्या घटनेत सुद्धा भारताचा उल्लेख India that is Bharat असा आहे तर मग बरेच उच्च शिक्षित लोक याला हिंदुस्तान असे का म्हणतात हे एक अज्ञान आहे.आणि ही चूक विद्वान लोक करतात म्हणजे ते आर.आर.एस.एस. च्या अजेंडयाला बळी पडत आहेत असे मला वाटते. यात कांही तर कायद्याचे पदवीधर आहेत जर उदाहरणच द्यायचे असेल तर MIM चे खासदार ओवेसी हे अनेक वेळा भाषणात हिंदुस्तान असा भारत देशाचा उल्लेख करतात आणि ते एक चांगले संसद सदस्य आहेत असे मला तरी वाटते. तर असा उल्लेख करू नये कारण तो उल्लेख करणे एक षडयंत्र आहे आणि त्यामुळे आपण आज बरीच वर्ष मागे आहोत. आपण जर आपल्या इतिहास विषयाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, काळानुसार भारताच्या इतिहासाचे भाग आहेत त्याला सुद्धा प्राचीन भारताचा इतिहास , मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास असे म्हणतात. हिंदुस्तान म्हणत नाहीत आणि त्यामुळे या भारत शब्दाचा प्रचार खरे तर अधिकार असणार्या इतिहास विषयाचा प्राध्यापकांनी केला पाहिजे. पण मी बरेच प्राध्यापक बोलतांना हिंदू शब्द वापरतात मला वाटते ही आपल्या विषयाशी आणि समाजाशी केलेली बेईमानी आहे. कारण जे हिंदू आहेत ते आपल्या घरात हिंदू आहेत पण बाहेर आणि विशेषकरून वर्गात शिक्षक म्हणून मात्र सच्चे भारतीय असले पाहिजे. भारतीय असणे ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. आपल्याला प्रबोधनकार ठाकरे यांची एक मोठी पुरोगामी विचार परंपरा आहे. प्रबोधनकरांनी हिंदू आणि हिंदूधर्म याचा अर्थ काय सांगितला आहे हे जरा या राजकीय नेत्यांनी वाचले पाहिजे कारण प्रबोधनकार सुद्धा हिंदुच होते. पण त्यांनी हे वैदिक धर्माचे गौडबंगाल उघडे पाडले पण आपण हे वाचत नाहीत. त्यांचे फक्त “ धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म ” ही पुस्तक जरी मन लावून वाचले तर आपल्या हा सर्व फार्स लक्षात येईल.
आज आपल्या देशातील लोकांना हिंदू म्हटले की, अंगात काहीतरी संचारले आहे असे वाटते आणि मग ते निघतात आंदोलने आणि मोर्चे घेऊन त्यांना एखादा हिंदू नेता सांगतो आणि हे निघतात लगेच मुस्लिम वस्तीवर हल्ला करायला पण हे आपल्या भारतीय संविधानात येत नाही. कारण आपण लहान असतांना शाळेत प्रार्थना म्हणतो की, “ भारत माझा देश आहे ,सारे भारतीय माझे बांधव आहेत.” मग आज याच बांधवावर आपण हल्ला करतो आणि त्यांना आपल्याच देशात परकीय असल्यासारखे वागवतो याला काय म्हणावे ? मला वाटते आपण मा. आ.ह. साळुंके सर जे म्हणतात ते विसरलो आहोत की, “ आपल्या धडावर आपलेच डोके आहे.” आणि त्या डोक्यात एक मेंदू नांवाचा अवयव असतो आणि त्याचा वापर सुद्धा करायचा असतो हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे. आपण जर आपल्या मेंदूचा वापर केला तर असे अनर्थ घडणार नाहीत. आणि आपण आपल्या देशात बंधुभावाने राहू शकतो. आपण आपले फक्त शरीर वापरतो पण आपल्याला कोणीतरी कंट्रोल करीत आहे असे दिसत आहे. साधा विचार करा गांधी हत्येनंतर आर.एस.एस. वर बंदी का आणली होती सरदार वल्लभभाई पटेल यांनी ? कारण त्यांना माहीत होते की, ही संघटना आपल्या देशाची एकता आणि अखंडता याला धोकादायक आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष जर कोंग्रेसने राज्य केले आहे तर मग यांनी का नाही बंदी आणली आर.एस.एस. वर ? हा सुद्धा प्रश्न आहे. माणसाला एखादा आजार झाल्यावर लगेच त्यावर उपाय करायचा असतो आणि जर जास्त काळ झाला तर मग तो आजार वाढतो आणि त्यात माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.संघी हिंदुत्व हे सामाजिक आजार आहेत यांना वेळीच पायबंद सरकारने केला नाही तर मग पुढे हा सामाजिक आजार जास्त मोठा होऊन समाजाचे जास्त नुकसान करतो. आता हे कोंग्रेसवाले आता सांगतात की, “ ये भाजपा देश मे जातिवाद पैदा करती है इसने हमारे देश को बहोत साल पिछे ढकेल दिया.” मग जर तुम्हीच सत्तेत होते तर तेंव्हाच बंदी घातली असती तर आज ही वेळ नसती आली आपल्यावर हा विचार केला पाहिजे. भाजपावाले आता 2024 ला म्हणतात की, अबकी बार 400 पार आणि त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले कारण उद्देश चांगला नव्हता पण या कोंग्रेसने तर हा आकडा 1984 लाच श्रीमती इंदिरा गांधीच्या हत्येनंतर 412 खासदार आले होते आणि राजीव गांधी प्रधानमंत्री झाले होते. त्यावेळीच बंदी आणली असती तर आज कोंग्रेसवर ही वेळ आली नसती. आणि समाजात शुद्ध राजकारण करायचे असेल तर कोणताही पक्ष सहज पुढे आला पाहिजे आणि त्यामुळे आज अनेक प्रादेशिक पक्ष आहेत पण त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना कोंग्रेसने पुढे येऊ दिले नाही. उलट त्यांचे खच्चीकरण केले, खच्चीकरण झाले नसते तर इंडिया आघाडी केंव्हाच सत्तेवर आली असती आणि भाजपा देशाच्या कोणत्या एखाद्या कोपर्यात असता. पण आता उलट स्थिती आहे की, कोंग्रेस आज अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. याला कारण भूतकाळात यांनी केलेल्या चुकांचा हा परिणाम आहे. आणि कधी कधी मा. कांशीराम साहेब म्हणत होते ते सुद्धा सत्य वाटते की, “ एक नागनाथ तो दूसरा सापनाथ है |” आणि या अशा वातावरणामुळे सर्वात जास्त नुकसान आपल्या भारतीय समाजाचे होते. त्यामुळे आज आपल्याला हिंदू नाही तर भारतीय असण्याचा गर्व असला पाहिजे. जगात आपण हिंदू नाही तर भारतीय आहोत ,जगात आपल्या देशाला भारत किंवा India अशी ओळख आहे हे आपण विसरलो आहोत. हेच आपल्याला हिंदू हिंदू करणारे जेंव्हा विदेशात जातात तेंव्हा, “ मै बुद्ध की धरती से आया हू |” असे लोकांना सांगतात याला म्हणतात खोटारडेपणा आणि लोकांना मूर्ख बनविणे पण लोक आता सोशल मीडियामुळे जागृत होत आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जर असे म्हटले की, आमचा देश हिंदुस्तान आहे तर मग जे भारतीय संविधान आहे त्याचे काय ? तो एक आपला सर्वात पवित्र ग्रंथ असला पाहिजे. आपले संविधान आपणास “ आम्ही भारताचे लोक.” असे संबोधन करते याचा अर्थ काय होतो तर आम्ही भारताचे लोक आहोत म्हणजे सर्व भारतीय आहोत आणि आम्ही सर्व समान आहोत. मग कोणी हिंदू असेल ,शीख असेल ,जैन असेल ,बौद्ध असेल , मुस्लिम असेल ,इसाई असेल पण सर्व भारतीय आहोत असा स्पष्ट अर्थ आहे. आणि जर आपण सर्वांना हिंदू म्हटले तर मग वरील सर्व धर्म हे हिंदू नाहीत तर मग त्यांचे काय होईल ? आणि पुन्हा एक महत्वाचा मुद्दा आहे की, हे फक्त यांच्या स्वार्थासाठी हिंदू म्हणतात पण यांना हिंदू सुद्धा समान असावे असे कधीच वाटत नाही. कारण जेंव्हा मंडल कमिशन आले त्यावेळी आपलेच हिंदू बांधव ओबीसी आहेत त्यांना याच हिंदूंनी विरोध केला होता. आणि “ तूम मंडल लाते हो तो हम कमंडल लाएंगे|” अशा घोषणा करून राम मंदिर साठीचा लढा सुरू केला आणि मंडल कमिशन बाजूला पडले. देशातील 52% असणारा ओबीसी बाजूला पडला. हे षडयंत्र आपण समजून घेतले पाहिजे. ओबीसीला आरक्षण द्यायचे तर यांना गुणवत्ता कमी होईल असे वाटते पण जेंव्हा कारसेवक आणि रथयात्रा काढली तेंव्हा सर्व ओबीसी वापरले गेले. आणि यांची गुणवत्ता पहा राम मंदिर पाहिल्याच वर्षी लिक झाले आणि समृद्धी महामार्ग पूर्ण झाला नाही तर त्याला तडे जात आहेत. आज देशात सामाजिक वातावरण फार कलुषित झाले आहे. याला आपल्याला बदलायचे असेल तर आपणास भारतीय संविधान आपला सर्वात महान ग्रंथ आणि भारतीय आपला धर्म आहे असे वर्तन करावे लागेल आपल्याला भारतीय असण्याचा गर्व असला पाहिजे. आपण आपल्या घराबाहेर पडतांना कधीही हिंदू ,मुस्लिम किंवा इतर धर्माचे आहोत हे दिसले नाही पाहिजे. हे आज होत नाही आणि त्यामुळे आपल्या समाजात एक विभागणी झाली आहे याला बर्याच अंशी आपण सुद्धा जबाबदार आहोत. म्हणजे सुरुवात या आर.एस.एस. वाल्यांनी केली पण आपला सर्व समाज याला बळी पडला आहे. यांनी हिंदुना सांगितले की, मांदिरे बांधा की, झाली सुरुवात आणि मग मस्जित ,चर्च ,गुरुद्वारा ,विहारे आणि स्थानके वाढली आणि अनेक झेंडे वाढले, गळ्यात वेगवेगळ्या रंगाचे रुमाल घातले ,कोणी कपाळावर टिळा लावतो तर कोणी डोक्यावर टोपी घालतो आणि अशा स्पर्धेत आपला धर्म कधी रस्त्यावर आला हेच आपल्याला समजलेच नाही. आणि आपले शाळा ,महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू करण्याचे राहूनच गेले आणि जग आज कुठे जात आहे , विज्ञान कुठे आज आहे ? विदेशातील लहान मुले शिक्षण घेऊन देशाला पुढे नेत आहेत आणि आमची लहान मुले मात्र कावड यात्रा ,पदयात्रा आणि धार्मिक उत्सवात मग्न आहेत. मग आपण अशाने विश्वगुरू कसे होणार आहोत. पण हा गंभीर धोका आहे आपल्या मानवी अस्तिवाला हे मात्र ध्यानात घ्यावे लागेल. जगाचा इतिहास आहे धर्मावर आधारित राष्ट्र कधीच पुढे जात नाही. कारण यामुळे इतर धर्मीय लोक यांना महत्व राहत नाही. आणि असे राष्ट्र जर निर्माण करायचे असेल तर मग अशा कोणत्याही राष्ट्रात इतर धर्म किंवा पंथ माणणारा एक सुद्धा नागरिक राहत नसावा असे असेल तर मग हिंदू किंवा इतर कोणत्याही धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करता येईल पण आजच्या ग्लोबल जगात असे शक्य वाटत नाही. कारण आपली अर्थव्यवस्थाच अशी असते की, आपल्याला भारतात अनेक वस्तु आणि सेवा लगतात. आणि भारतात असा कोणताच धर्म नाही की, ज्यात सर्व प्रकारच्या वस्तु आणि सेवा उत्पादन होतात. मग आपण आपल्या गरजा कशा भागवणार आहोत ? आपल्या देशात समाजाची विभागणीच मुळात व्यवसायावर आधारित आहे. फक्त त्यांना इतर व्यवसाय करायचे असतील तर भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिले आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतो की, कोणताही व्यवसाय कोणीही करीत आहे ही चांगली बाब आहे कारण त्यामुळे जात हा एक बंद वर्ग होता तो संविधानाने खुला झाला आहे. आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीने आज समजा एक खाद्य तेल तयार करण्याची मशीन आणली आणि तो तेल विकण्याचा व्यवसाय केला तर तो तेलीच असेल हे आज सांगता येत नाही. कोणीही तो व्यवसाय करू शकतो आणि करीत आहेत. पण तरी सुद्धा हा बदल 100 टक्के झाला नाही म्हणजे 50 टक्के लोक आहेत की, ते त्यांचा मूळ व्यवसाय करीत आहेत. आज बूट ,चप्पल विकणारे सर्वच चांभार किंवा मोची नाहीत तर इतर लोक सुद्धा हा व्यवसाय करीत आहेत. यामुळे सर्वच धर्म आणि जातींना आपल्याला एका संविधानाच्या बंधनात बांधून सर्वांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करावी लागेल आणि आम्ही सर्व भारतीय आहोत या भावनेने जीवन जगावे लागेल यातच आपल्या समाजाचे भले आहे. एक गीतकार म्हणतो ,
तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा , इंसान की औलाद है इंसान बनेगा |
प्रा. डॉ. आर.जे. इंगोले
नाशिक (9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत