महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

तुकोबांच्या देहूत प्रतिगाम्यांची सरशी

सुरेंद्र बुराडे


वारकरी संप्रदायातील कळसाचे मानकरी संत तुकाराम बोल्होबा आंबिले उर्फ मोरे यांच्या हत्येला यावर्षी ३७५ वर्षे पूर्ण होणार आहे. या घटनेला संप्रदायाचे महानुभाव आणि शासनकर्ते सदेह वैकुंठ गमनाचा अभूतपूर्व सोहळा प्रदर्शित करू इच्छितात. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या आषाढी वारीचे औचित्य साधून भारतीय डाक विभागातर्फे वैकुंठ गमनावर आधारित विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात करण्यात आले. टपाल विभागाच्या कार्यक्रमाला श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे आणि देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानाचे माजी अध्यक्ष रामदास मोरे उपस्थित होते. यावेळी विशेष टपाल पाकिटाच्या निमित्ताने संत तुकारामांचे विचार जगभर पोहोचतील, असे रामदास महाराज मोरे यांनी मनोगतात सांगितले.
आजवर कोणाचाही बाप-आजा सदेह वैकुंठाला गेला नाही. ज्यांना देवत्व मिळाले ते राम, कृष्णही सदेह परलोकी गेले नाहीत. धर्म संस्थापक बुद्ध, महावीर, ख्रिस्त, पैगंबर हेही सदेह मृत्यूलोकातून गेले नाहीत. कोणत्याही संताला ते जमले नाही. योग्यांच्या जीवनातही तसे घडले नाही. सगळे याच मातीत मिळाले. पंचतत्वात विलीन झाले. असे असताना शूद्र कुणबी जातीतील विद्रोही तुकारामाचा होळीच्या पाडव्याला ब्राह्मणी कावेबाजांनी खून केला. त्यांच्या निष्प्राण देहाचाही थांग लागू दिला नाही. तुकोबा सदेह वैकुंठाला गेला,अशी रामेश्वर भटांनी थाप मारली. यालाच मान्यता देणारा वारकरी संप्रदाय आणि तुकारामाच्या वंशातील आजची पिढी पाहून मन सुन्न होते.
तुकाराम सनातनी वैदिक धर्माचे बळी ठरलेत. या व्यवस्थेला तुकोबांनी आपल्या वाणीने आव्हान दिले होते. त्यांचे अभंग सनातण्यांची पोल खोलत होते.वेद-वेदांत नाकारत होते. तुकाराम शूद्र असल्याने त्यांना वेद पठणाचा अधिकार नव्हता. त्यामुळे मी वेदांचा अंकित नसल्याची घोषणा त्यांना करावी लागली.
‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा ।
येरांनी वाहावा भार माथा ।।’
असे म्हणताच ब्राह्मणी धर्ममार्तंडाची आग-आग होणे स्वाभाविक होते. ब्राह्मणांना त्या काळात भारवाही म्हणणे सोपे नव्हते. ती बहुजनांच्या विचार स्वातंत्र्याची नांदी होती. तमोयुगातून प्रकाशाकडे जाण्याची वाट होती. यामुळे वैदिकांच्या मनात तुकारामाविषयी प्रचंड राग उफाळून आला. त्यांचे तोंड कायमचे बंद करण्यासाठी त्यांच्यावर खटला भरण्यात आला. धर्मशास्त्री रामेश्वर भटाने तुकोबांना कवित्व न करण्याचा आदेश दिला. त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवण्याची शिक्षा दिली. अभंग विरहीत तुकोबा म्हणजे प्राणावीणा देह. आपल्या अभंगाचे विसर्जन करावे लागल्यामुळे जीवनाला काहीच अर्थ उरला नाही, असे त्यांना वाटले. त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले. त्या दिवसांत त्यांच्या कीर्तनातील १४ टाळकऱ्यांपैकी एक संताजी जगनाडे यांनी पंचक्रोशीतील लोकांना मुखोद्गत असलेल्या अभंगाचे संकलन करायला सुरुवात केली. ते स्वतः चांगले लेखनिक असल्याने त्यांच्याकडेही अनेक अभंगाची नोंद होती. तेरा दिवसात एकत्र केलेल्या अभंगांची गाथा संताजी जगनाडे यांनी तुकोबांच्या हाती दिली. तेव्हा त्यांचे उपोषण सुटले. त्यांचा जीव की प्राण अभंग गाथेत होता. ती गाथा पाहताच तुकोबांना जगण्याचा आधार मिळाला,तो संताजी जगनाडे यांच्यामुळे. इंद्रायणीने अभंग गाथा परत केल्याची जी कथा सांगितली जाते ती अत्यंत चुकीची आहे. निसर्ग नियमाला धरून नाही. तिच्यात तिळमात्र सत्यांश नाही. नदीच्या पाण्यात बुडालेला कागद भिजेल ना ! तो कोरडा कसा राहील. त्या काळात शाईत बुडवून बोरुने लिहिण्याची पद्धत होती. म्हणजे कागद पाण्यात पडताच शाई पुसल्या जायची. हे वारकरी संप्रदायातील सर्वांनी समजून घेतले पाहिजे. इंद्रायणी नदीने कोरड्या वह्या तुकोबांना परत दिल्यात ही भंपक कथा ज्यांनी समाज मनात पेरली, ते तुकोबांना दैवी पुरुष करायला निघालेले आहे, हे आपण विसरू नये.
महिपती ताहाराबादकर यांनी अनेक संतांचे चरित्र लिहिले आहे. त्यात निव्वळ चमत्कार सांगितले आहे. तुकारामांच्या बाबतीतही अभंग गाथा तरल्याची जी कंडी पिकवली गेली,ती महिपतींची देण आहे. वास्तविक तुकोबांचे अभंग हे लोकगंगेने तारले.अर्थात समकालीन लोकांनी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले.
तुकारामांनी वैदिक परंपरेशी तर पंगा घेतलाच होता.परंतु समाज सुधारकांची भूमिका देखील पार पाडली होती.त्यामुळे कर्मकांडावर आपली पोटपूजा चालवणाऱ्या मंबाजीसारख्यांचा तिळपापड होऊ लागला.त्यांनी अहर्निश तुकोबांना छळले.तरी माघार न घेता तुकोबांनी आपल्या कीर्तनातून आणि प्रासादिक अभंगातून तत्कालीन व्यवस्थेवर सतत कोरडे ओढले आहे.
‘ नवसे कन्या पुत्र होती, तरी कां करणे लागे पती ‘ हा प्रश्न मुला-मुलींसाठी नवस करणाऱ्यांना त्यांनी विचारला आहे.जर नवसाने मुले-बाळे झाली असती तर नवरा करायची काय गरज होती? असा तार्किक युक्तिवाद त्यांनी केला आहे.एका लोकशिक्षकाची तळमळ तुकारामात दिसून येते.
‘ नाही निर्मळ जीवन,काय करील साबण ‘ हा मार्मिक प्रश्न ते लोकसमूहाला विचारतात.साबणेचा आणि निर्मळतेचा दूरदूर संबंध नसतो, हे तुकोबा ठासून सांगतात.समाज सुधारण्याकरीता सत्यशोधक व्हावे लागते.’ सत्य – असत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता ‘, असे सत्यशोधकाचे जीवन असावे लागते.तुकोबा असेच जगले.’ बोले तैसा चाले ‘, असा हा वारकरी संत होता.समाजातील उणीवा उघड्या डोळ्यांनी पाहत असताना ‘ तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे ‘, या आर्विभावात तुकोबा जगलेत.’ नाही भीड भार । तुका म्हणे साना थोर ‘, समाजात कुणी चुकीचा पायंडा चालवत असेल तर तो लहान असो की मोठा तुकोबांनी कधी कुणाची भीडमूर्वत ठेवली नाही.म्हणून त्यांचा शत्रूंनी काटा काढला.कारण निरंकुश धर्मसत्तेला तुकोबांनी हादरा दिला होता.
अवघ्या बेचाळीस वर्षाच्या आयुष्यातील उत्तरार्धात पराकोटीचे संघर्षमय जीवन त्यांना जगावे लागले.त्यातून तावूनसुलाखून निघालेले तुकोबांचे व्यक्तीत्व होते.यामुळे त्यांच्या शब्दाला अनुभवाची धार होती.’ रात्रंदिवस आम्हा युध्दाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ।।’ म्हणताना त्यांचा स्वत:चा जीवनानुभव पुढे येतो.कधी स्वतःच्या मनाशी तर कधी भोवतालच्या जगाशी युद्ध असते.कल्पना करा की, पावणे चारशे वर्षांपूर्वी समाजाची काय स्थिती असेल ? त्यावेळच्या बहुजन समाजात प्रचंड अज्ञान,दु:ख, दारिद्रयाचा चिखल असताही ब्राह्मणशाहीने गळूप्रमाणे धर्माच्या नावाने शोषण केले.अठरापगड जातींचे जगणे नकोसे झाले.या दमनचक्राला थांबवण्याचे काम तुकोबांनी केले आहे.यासाठी पोटाकरीता रडणारी दैवते त्यांनी नाकारली.’ सेंदरी हे देवी दैवते। कोण ती पुजी भुतेकेते ‘ एवढा कठोर वज्राघात धार्मिक, सामाजिक परंपरांवर करणारे तुकाराम मंबाजीच्या टोळीला जड होणारच ना!
आजच्या देहू नगरीत संत तुकारामाला पारलौकिक श्रेणीत बसवण्याचा प्रकार दिसून येतो. दिवसेंदिवस शीळा मंदिराचे महात्म्य वाढविल्या जात आहे. रामेश्वर भटाच्या आदेशाने तुकोबांनी आपली अभंग गाथा इंद्रायणीत बुडवली व तेरा दिवस ज्या दगडावर ते अन्नपाण्याचा त्याग करून बसले होते त्या दगडाला देवत्व देण्याचा प्रयत्न म्हणजे हे शीळा मंदिर होय. तुकोबांचे अभंग चैतन्याने भरलेले आहे.तिकडे दुर्लक्ष करून पाषाणाचे महात्म्य पटवणे याला काय म्हणावे? दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या स्थळी येऊन गेले. त्यांनीही येथे येऊन आंधळा धर्म सांगितला व तुकोबांच्या प्रासादिक वाणीची पार माती करून टाकली.
देहूत गरुडावर विराजमान असलेली तुकोबांची प्रतिमा भव्य स्वरूपात साकारली आहे. सदेह वैकुंठाला ते अशाच प्रकारे गरुडावर बसून गेलेत, असे वारकरी बोलतात. गरुड हे विष्णूचे वाहन. विठ्ठलाला विष्णूचा अवतार मानला जातो. विष्णूचे वस्तीस्थान वैकुंठ सांगितल्या जाते. तुकाराम सदेह वैकुंठाला ज्या स्थानावरून गेलेत ते इंद्रायणीच्या काठावरचे वैकुंठ गमन स्थळ देहूत येणाऱ्या जाणाऱ्यांचे आकर्षणाचे ठिकाण ठरले आहे. मात्र आमच्या चिकित्सक व डोळस बुद्धीला तो इंद्रायणीचा काळा डोह दिसत नाही. जिथे तुकोबांचा खून झाला. भाबडेपणाचा हा कळसच मानावा? फाल्गुन वद्य द्वितीया आली की अनेकांना तुकाराम बीज आठवते. तुकोबांची पुण्यतिथी होत नाही. इतर संतांची होत असते. ज्या तुकारामाने प्रगल्भ विचारांचे बीज या मराठी भूमीत रोवले त्या तुकारामाला सदैव वैकुंठात नेण्यासाठी विष्णूचे विमान आले कसे? तुकोबांना वैकुंठाला जाताना कुणी बघितले नाही. ते देहू गावातून दिसेनासे झाले. त्यानंतर पाच दिवसांनी रामेश्वर भटाने जाहीर केले की, तुकाराम सदेह वैकुंठाला गेले आहे. त्यामुळे त्यांच्या मागे मृत्यूनंतरचा कोणताही विधी पार पडला नाही.
तुकारामाची जन्मभूमी व कर्मभूमी देहू गाव आहे. या गावात अलीकडे एक गाथा मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात संगमरवरी दगडावर तुकोबांचे सुमारे चार हजार अभंग कोरलेले आहेत. हे मंदिर निव्वळ भिरभिर फिरण्यात समाधान देत नाही. भिंतीवरचे अभंग वाचायला कोणाजवळ तेवढा वेळही नाही. परंतु या मंदिरातील गाभाऱ्यातून घुमटाकडे आपले लक्ष गेले की एक अफलातून दृश्य समोर दिसते. ते म्हणजे तुकोबांना कृतयुगात प्रल्हाद, द्वापार युगात उद्धव, त्रेतायुगात अंगद आणि कलियुगात तुकाराम दाखविण्याचा वेडेपणा मंदिर निर्मात्यांनी केलेला आहे. हे पाहून गाथा मंदिरातील त्याच भिंतीवर डोके फोडून घेण्याची आपल्यावर वेळ येते.
तुकोबांची भक्ती डोळस होती. आपण का म्हणून आंधळे व्हावे. रामेश्वर भट्ट आणि मंबाजींच्या टोळीने तुकारामाची एकदाच हत्या केली. परंतु त्यांच्या जन्म गावी देहूतच दर दिवशी तुकारामाच्या विचारांची हत्या होते, त्याचे काय?
‘नांदूरकीच्या वृक्षाखाली।
गुप्त झाला तुका।।
मन नाही मानत माझे।
गेला कसा वैकुंठा? ।।
इंद्रायणीचे काळे पाणी ।
डोह सांगे कावा ।
तीन शतके निघून गेली।

कुणा सांगू दावा।।

सुरेंद्र बुराडे
९८६०२६२१२२

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!