मानवप्राणी, ब्राह्मण्य व ब्राह्मण

“शिव छत्रपतीला ब्राम्हण्य नष्ट करता आले नाही. आपल्या राज्यभिषेकासाठी सोने देऊन काशीहून गागाभट्टाला आणावे लागले. ब्राम्हणांची नांगी शिवाजीला तोडता आली नाही. त्यामुळे ब्राम्हण्य नष्ट केल्याशिवाय समाजाची उन्नती नाही.” (संदर्भ- DBAWS खंड 18-भाग 2 पान न.307)
वरील बाबासाहेबांच्या विधानातून बरेच काही लक्षात घेण्याजोगे आहे. पहिली गोष्ट ही की, बाबासाहेबांनी ‘ब्राह्मण’ (व्यक्ती) नष्ट करण्याबाबत भूमिका मांडलेली नसून ‘ब्राह्मण्य’ (प्रवृत्ती)(Brahmanism/ब्राह्मणवाद) नष्ट करण्याबाबतची भूमिका मांडली आहे. प्रथमतः कोणतीही व्यक्ती मानवप्राणी म्हणून जन्मास येते. त्या मानवप्राण्याची स्वतःस जन्मानेच श्रेष्ठ समजून इतरांवर राज्य करण्याची स्वार्थी प्रवृत्ती त्यास तथाकथित ब्राह्मण बनवते. ही त्याची स्वार्थी प्रवृत्ती नष्ट झाली की तो तथाकथित ब्राह्मणातून परत मनुष्यमात्रात पदार्पण करतो. या श्रेष्ठत्वाच्या प्रवृत्तीस ब्राह्मण्य (रोग) म्हणतात तर या प्रवृत्तीने पछाडलेला स्वतःस ब्राह्मण (रोगी) समजतो. सोप्या शब्दात सांगावयाचे झाल्यास निसर्गतः मनुष्यप्राणी म्हणून जन्म झालेल्या एका माणसात जन्माधारित श्रेष्ठत्वाची भावना वाढीस लागते व तो स्वतःस ब्राह्मण म्हणविण्यात धन्यता मानतो. इतरांना तो नीच-कमी लेखण्यास सुरुवात करतो. यात केवळ तथाकथित ब्राह्मणातच जात-जन्माधारित श्रेष्ठत्वाचा अहंकार शिरलेला दिसतो असे नाही तर जात-जन्माधारित श्रेष्ठत्वाची क्रमवारी असल्याने ही प्रवृत्ती ज्यांच्या-ज्यांच्यात शिरलेली दिसते ते सर्वच स्वतःला तथाकथित ब्राह्मणांपेक्षा कदापिही कमी समजत नाहीत असा आजवरचा वास्तववादी अनुभव आहे. मात्र हे ब्राह्मणेतरच म्हणूनच गणले गेले आहेत. कारण त्यांच्या मनावर हे बिंबविल्या गेले आहे की, तथाकथित ब्राह्मण हाच सर्वश्रेष्ठ आहे आणि ब्राह्मणेतरांसाठी तो अत्यंत पूजनीय राहिलेला आहे. तथाकथित ब्राह्मणांसहित ब्राह्मणेतरांना या जात-जन्माधारित श्रेष्ठत्वाच्या भावनेतून कायमची मुक्ती हवी असेल तर बौद्ध धर्म स्वीकारल्याशिवाय त्यांना दुसरा कोणताच मुक्तीचा मार्ग नाही. तेव्हा ज्यांना कोणास माणसात यावेसे वाटते किंवा कोणास आणावेसे वाटते त्या सर्वांना बौद्ध धर्म स्वीकारणे हा एकच पर्याय आहे. ज्यामुळे श्रेष्ठत्वाने ग्रसीत व्यक्ती केवळ माणसात येत नाही तर तो मानवतावादानेही ओतप्रोत होतो हे विशेष !
टीप : ‘ब’ हा मनुष्यप्राणी म्हणून जन्मास आला. त्याला जन्माधारित ‘श्रेष्ठत्वाच्या भावनेने’ ग्रसित केले त्यामुळे तो स्वतःस ‘क’ मध्ये रूपांतरित झाल्याचे मानू लागला. त्याला ‘क’ मधून परत ‘ब’ मध्ये आणण्यासाठी ‘अ’ नावाच्या औषधीची गरज पडते. त्या औषधीचे नाव ‘बौद्ध धर्म’ होय. येथे एखाद्याने ‘क’ ला संपविले म्हणजे ‘श्रेष्ठत्वाच्या भावनेचा’ उदयही आपोआप संपून जाईल असे मानणे वा तसा सिद्धांत मांडणे म्हणजे आपल्या निर्बुद्धतेचे दर्शन देण्यासारखेच होईल. कारण मनुष्यप्राणी जन्मास येण्याची प्रक्रिया ही जशी नैसर्गिक आहे तशीच इतर मनुष्यमात्रांवर राज्य (हुकूमत गाजविण्यासाठी) करण्यासाठी ‘श्रेष्ठत्वाची स्वार्थी भावनाही’ वाढीव लागणे नैसर्गिक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. बुद्धाने मनुष्यमात्राच्या उपजत स्वभावावर भाष्यही केले आहे. तेव्हा ही रोगट भावना नष्ट करायची असेल तर प्रत्येकाने ‘बौद्ध धर्माच्या औषधीत’ ही रोगट भावना नष्ट करण्याची प्रचंड ताकद आहे हे जाणून घेतले पाहिजे. याखेरीज इतर कोणताही औषधोपचार करणे अगदीच व्यर्थ आहे !
~ प्रशिक आनंद, नागपूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत