महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

राजकीय पक्षांशी युती-आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन

अनिल वैद्य 
माजी न्यायाधीश
९६५७७५८५५५

देशात लोकसभेची निवडणूक होतआहे .युती व आघाड्यांवर  सर्वत्र चर्चा सुरू आहे .डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली
समता ,स्वातंत्र्य, बंधुत्व ही त्रिसूत्री स्वीकारणारा आंबेडकरवादी समाज भारतात मोठ्या प्रमाणात आहे.त्यांची संविधानावर श्रद्धा आहे.घरा घरात संविधान अभ्यासल्या जात आहे.संविधानाने दिलेल्या मानवी हक्कांच्या आश्वासनामुळे हा समूह कुणाचीही संविधान विरोधी भूमिका सहन करीत नाही.
आपल्या हक्काची त्याला जाणीव आहे.
संविधानाने आरक्षण दिले परंतु सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण केल्याने आरक्षण नष्ट होत आहे.धर्मांधता पसरविणाऱ्याना आंबेडकरी समाज चांगलाच ओळखून आहे.ध्रुवीकरण व्हायला नको म्हणून जाहीर बोलत नाही एव्हढेच आहे!
आंबेडकरी विचारांच्या पक्षांनी युती करायची की,नाही व केली तर कुणा सोबत करायची या बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काय मत व्यक्त केले ?या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही बाबतचे मत व त्यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे धेय्य व उद्दिष्ठ आधी लक्षात घेणे गरजचे आहे.
अब्राहम लिंकन यांनी
गॅटिसबर्ग येथे सुप्रसिद्ध भाषण केले, त्यांत लोकशाहीची व्याख्या त्यानें” लोकांचे सरकार, लोकांनी नियुक्त केलेलें सरकार, आणि लोकांकरितां राबणारें सरकार ” अशी केली. अशा आणखी कितीतरी व्याख्यांचा नामनिर्देशन करतां येईल. परंतु डॉ बाबासाहेब आंबेकरांनी व्याख्या केली ती अशी. ” लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनांत क्रांतिकारक बदल रक्ताविरहीत मार्गानी घडवून आणणारी शासनपद्धति म्हणजे लोकशाही होय.” ज्या शासनपद्धतिमुळे सत्तारुढ मंडळीला सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत मूलभूत बदल करतां येतात आणि असें बदल ग्रहण करतांना जनता रक्तलांच्छित (हिंसात्मक) मार्गाचा अवलंब करीत नाही तेथे लोकशाही नांदते आहे. असें मी म्हणेल की, हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे. तीच उच्चतम कसोटी आहे. ज्यावेळी तुम्ही एकाद्या पदार्थांचे गुणग्रहण करतां त्यावेळी सगळ्यांत कडक कसोटी त्याला लावणें जरूर आहे. तेव्हांच त्याची खरी परीक्षा होते. लोकशाहीची ही व्याख्याच मी निकष म्हणून वापरणार आहे.”
(संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड २०पृष्ठ७५८)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे धेय्य धोरण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले ते म्हणतात
भारतीय घटनेच्या ह्या उपोद् घा तांमधील ध्येय व उद्दिष्टें न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व साध्य करणें हेंच रिपब्लिकन पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट राहील.
हीं उद्दिष्टें साध्य करण्यासाठीं रिपब्लिकन पक्ष सार्वजनिक व्यवहारांत खालील तत्वांना बांधलेला राहील,
(१) सर्व भारतीयांना समान न्याय मिळेल; एवढेच नव्हे तर समान न्याय हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे असें मानण्यांत येईल. आणि यानुसार जेथें समता नाहीं तेथें ती आणण्यासाठीं पक्ष झटेल व जेथें ती नाकारण्यांत येते, तेथे, ती राबविण्यासाठी लढा देईल.
(२) प्रत्येक व्यक्तीचें सुख हा केंद्रबिंदु समजण्यांत येईल आणि आपल्या उद्धारास्तव प्रयत्न करण्याची प्रत्येक व्यक्तीस समानसंधी मिळेल. शासनसंस्था ही, हें साध्य मिळविण्यासाठी वापरावयाचें साधन होय.
(३) इतर देशबांधवांच्या हक्कांचें व शासनसंस्थेच्या आवश्यक तेवढ्या
अधिकारांचे संरक्षण करून प्रत्येक नागरीकांस धार्मिक, आर्थिक, राजकीय
स्वातंत्र्य असलें पाहिजे असें हा पक्ष मानील.
(४) प्रत्येक भारतीय नागरिकांस समान संधीचा अधिकार असल्याचें हा पक्ष मान्य करील. अर्थात, ज्यांना आत्मोन्नतीसाठी कधींच संधी मिळाली नसेल त्यांना संधी मिळालेल्या लोकांपेक्षां अग्रक्रम देण्याचें तत्व पक्ष अंगिकारील.
(५) प्रत्येक व्यक्तीस जीवनांतील गरजा व भीति यापासून मुक्ति मिळवून देण्याच्या शासन संस्थेच्या कर्तव्याची जाणीव सरकारला हा पक्ष सातत्यानें देईल.
(६) हा पक्ष स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या प्रस्थापनेसाठीं आग्रह धरील आणि एका माणसाकडून दुसऱ्या माणसाची, एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाची, किंवा एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून होणारी पिळवणूक व दडपशाही यांना पायबंद घालील.
(७) व्यक्ति व समाज या दोहोंच्या भल्याच्या दृष्टीनें संसदिय राज्यपद्धति ही सर्वोत्तम राज्यपद्धति आहे अशी या पक्षाची श्रद्धा राहील.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जरी हे रिपब्लिकन पक्षाच्या उद्दिष्टासाठी हे नमूद केले होते तरी
आज उदयास आलेल्या सर्वच आंबेडकरी चळवळीच्या राजकीय पक्षांनी हे धेय्य धोरण मान्य केले आहे.मग पक्षाचे नाव वेगळे जरी असले तरी ते
या आंबेडकरी विचारांचे पाईक आहेत असे मी मानतो.
या विचारांच्या रक्षणा साठी इतर राजकीय पक्षांशी युती करण्याची आवश्यकता असते तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते लक्षांत घेने जरुरीचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काय मत होते ? ते बघू या .
22 नोव्हेबेर1951 ला मुंबईत परळ ,सेंट झेविअर मैदानावर निवडणूक सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,”आजच्या राजकारणात कोणत्यातरी एका पक्षा सोबत संधी केली पाहिजे.शंभरात अस्पृश्य नऊ किंवा दहा आहेत .असे असता तह करणे भाग आहे.खेळीमेळीचे राजकारण यशस्वी होऊ शकते.एकांगी राजकारण यशस्वी होऊ शकत नाही”
(संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 18 भाग 3 पान 287)
26व 27 ऑक्टोबर1954 रोजी शेंडूल्ड कास्ट फेडरेशन च्या मुंबई येथिल  सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ,”जे लोक आपले बरे करतील तो पक्ष आमच्या मित्र राहील .राजकारणात भांडणे होतात ती विसरून जाण्याची सवय ठेवली पाहिजे.”
(संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 18 भाग 3 पान 397 )
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वरील भाषणाचा विचार केला तर समविचारी पक्षा सोबत युती करणे व विरोधी शक्ती कमकुवत करणे असे आंबेडकरी विचारांचे धोरण आहे हे स्पस्ट होते.

काँग्रेस हे जळते घर आहे असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते परंतु .30 मे 1937 ला स्वतंत्र मजूर पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सभेत बोलतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,’सार्वजनिक राष्ट्रीय हिताच्या प्रश्ना संबंधी एकमत होईल त्यावेळी तात्पुरते भेदभाव विसरून आम्ही काँग्रेस बरोबर सहकार्य करू”(डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 18 भाग 2 पान 28 )
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत संविधान सुपूर्त करतांना २५ नोव्हेंबर १९४९ ला धोक्याचा इशारा दिला होता की,
“एखादा पक्ष
सविधांना पेक्षा स्वतःच्या पक्षाची विचारसरणी मोठी समजत असाल तर  तो देश गुलामीत जाईल व पुन्हा कधी स्वतंत्र होणार नाही ‘”
आज च्या राजकीय परिस्थितीत या इशाऱ्याचा गंभीरपणे विचार करणे अत्यन्त गरजेचे आहे .
राजकीय पक्षांनी संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही देशाची प्रतिमा एका धर्माचा देश म्हणून निर्माण केली तर ही कृती संविधान विरोधी ठरेल.त्यामुळे जागतिक पातळीवर देशाला धर्मांध देश म्हणून ओळखला जाईल ही बाब देशाच्या प्रतिष्ठेला मलिन करणारी ठरेल.
हा विचार समविचारी पक्षांनी केला पाहिजे.
राजकारणात होणारे भांडणे विसरून गेले पाहिजे असेही बाबासाहेब म्हणतात.याचा अर्थ जुना वाद उकरुन काढत बसू नका असा होतो .आपण लोकसंख्येने कमी आहोत याची जाणीव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना होती हे सुध्दा वरील भाषणावरून स्पस्ट होते .
राजकीय भूमिका घेतांना अत्यंत डोळसपणे निर्णय घ्यावा लागतो.भारतीय मतदाराच्या जातीय भावनांचे वास्तव लक्षात आले पाहिजे. केवळ आपल्या पक्षाची मत संख्या अजमावणे असा हेतू किंवा आम्ही कुणाला पाठिंबा देणार नाही व घेणारही नाही असे आडमुठे धोरण कोणती सत्ता मिळवून देईल ?याचाही विचार  नेत्यांनी करावा. पक्षाकडे चांगली  मतदान संख्या आहे केवळ  आपली मतं घ्यायची एव्हढीच मानसिकता न ठेवता सत्तेवर अंकुश कसा ठेवता येईल , यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आजची परिस्थिती अशी आहे की ,देशात संविधानिक मूल्य जोपासणे हीच गरज होऊन बसली आहे . आता तर निर्भिडपणे
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करतांना सुध्दा भीती वाटते .या वातावरणात सुरक्षित कसे राहता येईल याचा विचार नेत्यांनी केला पाहिजे . आंबेडकरी पक्षाची युती कुणाशीही होवो.
सुजाण आंबेडकरी मतदार संतप्त झाले आहेत. ते मात्र संविधानीक हक्काचे संरक्षण करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धोरणाने मतदान करतील हे निश्चित आहे.

अनिल वैद्य
माजी न्यायाधीश
५ मार्च २०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!