पाली भाषेत भगवा शब्द हे बुद्धाला संबोधन आहे
मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यावेळी लिपीचा शोध लागला नव्हता त्यामुळे त्रिपिटक बुद्धाने स्वतः लिहिलेले नाही. त्रिपिटक बुद्धाच्या मृत्यू ४०० वर्षांनंतर ब्राम्हण बौद्ध भिक्षूने लिहिलेले आहे. त्यात मुळ त्रिपिटकात भगवा हा शब्द 8758 वेळा निश्चितच आला असेल. कारण पाली भाषेत भगवा शब्द हे बुद्धाला संबोधन आहे. पाली भाषेत भगवा म्हणजे भगवान. म्हणून मराठी किंवा हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेत त्यांना भगवान ह्या शब्दाने संबोधन केल्या जाते. परंतु त्यांच्या सोबत चर्चा करताना त्यांना बुद्धा ह्या संबोधनाने संबोधन केले नाही. गौतम बुद्धाचे मुळ नामकरण सिद्धार्थ आहे. त्यांना ज्ञानप्राप्ती नंतर तथागत, सम्यक संबुद्ध, सुगत, अर्हत, अर्हत असे अनेक नावांनी त्यांना संबोधन केल्या गेले. परंतु सिद्धार्थाला जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तेंव्हा त्यांनी द्रोण ब्राम्हणाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना त्या द्रोण ब्राम्हणाला म्हटले, त्यांना ज्ञानी पुरुष असे समज. तो संवाद असा आहे –
ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही. त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो,जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे.
म्हणून हे ब्राह्मणा तू मला एक ज्ञानी पुरुष असे समज संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र,२९२ अनु क्र ६ आणि ७.
तेव्हा त्यांनी स्वतःला बुद्ध म्हटले नाही.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अभिधम्मपिटक हे तर निव्वळ कपोलकल्पित कथावर रचलेले आहे. तरीही आपण अभिधम्मपिटकाला का मान्यता देतो ? हे आश्चर्यजनक आहे. कारण समजून घ्या —
तथागतांनी हा उपदेश देवलोकात दिला असे वर्तविल्या जाते. संबोधीप्राप्तीनंतर सातव्या वर्षाच्या आषाढ पौर्णिमेला बारयोजन विशाल सभेत अनन्यमताचे मतावलंबी त्या सभेत बसले होते. त्यांच्या गर्वहरणासाठी अतिर्शणीय ‘यमक प्रतिहार्य ‘दाखविण्यासाठी श्रावस्तीच्या राजोद्यानात गण्डम्ब वृक्षाखाली तथागतांनी दोनच डगीत तावतिंस देवलोकात जाऊन परिच्छत्तक वृक्षाखाली पाण्डकुंबल शिलासनावर वर्षावासाचे अधिष्ठान घेतले आणि तेथेच विहार करून दहा हजार चक्रवाला (ब्रह्मांडातून) आलेल्या देवांच्या समोर आपल्या आईला ( महामायाला) सतत तीन महिने ह्या अभिधम्माचा उपदेश दिला. संदर्भ – अभिधम्मपिटक पृष्ठ क्र,१४ पैरा १
इतके चमत्कारिक अभिधम्म पिटक रचल्या गेले आहे तरीही आपण त्यावर विश्वास का ठेवतो ? ह्यावर सर्व थेरो, महाथेरो, बौद्धाचार्य, धम्माचार्य आणि धम्म अभ्यासकांनी विचार केला पाहिजे.
सुत्तपिटकाबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते पाहा –
खोट्या गोष्टीचे आवरण चढवून त्यात मूळ बुद्ध विचारांशी अगदीच परकीय असलेल्या ब्राम्हणी विचारांची भर घालून तसेच मठशाही विचारांना प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सूत्तपिटकाला संपूर्णपणे विद्रुप करण्यात आलेले आहे. ज्याला बुद्धाची मुळ शिकवण माहित आहे तो असे सुत्तपिटक वाचून वेडा झाल्याशिवाय राहणार नाही. संदर्भ – खंड २० पृष्ठ क्र ३९० पैरा २
त्यांनी निश्चितच सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हा ग्रंथ लिहिला आहे. मग त्यांनी गौतम बुद्धाचा सर्वोत्तम धम्म का स्विकार केला नाही ? हा प्रश्न स्वाभाविकच निर्माण होतो. अमोल मिटकरी साहेब बुद्धांच्या धम्मावर खूप चांगले भाषण देतात, पण त्यांनी तरी बुद्धांचा धम्म स्विकार केला काय ? पुस्तक लिहीने आणि भाषण देणे कितीही चांगले असले तरीही जोपर्यंत त्या धम्माचा स्वीकार करीत नाही ते व्यर्थच म्हणावे लागेल. धम्म स्वीकारणे हे वैयक्तिक जरी असले तरी स्विकारण्याला फारच महत्त्व असते. भाषण देण्यासाठी त्यांना २५ ते ३० हजार रुपये मिळतात आणि पुस्तक लिहिल्याने सुद्धा पैशाची मिळकत होते.
मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत