छुपा शत्रू अधिक घातकं असतो.

भाजप आणि कॉंग्रेस हे दोन्ही राजकीय पक्ष सवर्णाचे पक्ष आहेत. भांडवली विचारांचे पक्ष आहेत. दोघांचीही ध्येय धोरणं सारखीच आहेत हा त्यांच्या सत्ताधारी कार्यकाळातील अनुभव आहे.आणि म्हणून भाजप आणि कॉंग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक नागनाथ तर दुसरा सापनाथ आहे. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉंग्रेस पक्षाला जळतं घरं म्हणतं होते. आंबेडकरी राजकीय पक्षाचा भाजप हा ऊघडं तर कॉंग्रेस हा छूपा शत्रू आहे. दिलदार शत्रु पेक्षा दगलबाज मित्र जास्त घातक असतो तसाच हा प्रकार आहे. कॉंग्रेस पक्ष आंबेडकरी समूहाचा मित्र असल्याचे नेहमीच भासवितो मात्र आंबेडकरी राजकारण ऊभेचं राहू नये म्हणून आकाश पाताळ एक करतो आणि आंबेडकरी राजकारण संपवितो. स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने पराभूत केले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जाहीर रित्या म्हटले होते की, डॉ आंबेडकर यांच्या संविधान सभेतील प्रवेशासाठी आम्ही दारेच नाही तर खिडक्यांची तावदाने सुद्धा बंद केली आहेत. १९५२ मध्ये भंडारा लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षानेच संविधानाचे शिल्पकार प्रकांड पंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत केले होते. खरं म्हणजे नवख्या भारत सरकारने संविधानाच्या शिल्पकाराला अविरोध निवडून देऊन त्यांच्या ज्ञानाचा देशासाठी उपयोग करुन घ्यायला पाहिजे होता परंतु तसे झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत ऊत्तर प्रदेश मध्ये आंबेडकरी राजकीय चळवळ प्रभावशाली होती.ऊत्तर प्रदेश मध्ये संघप्रिय गौतम आणि बी. पी. मौर्य हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन चे नेतृत्व करीत होते.बी. पी. मौर्य यांना काँग्रेस पक्षाने फुस लावून फोडले आणि ऊत्तर प्रदेश मध्ये आंबेडकरी राजकीय चळवळीला दगाफटका केला.
कॉंग्रेस पक्षानेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब रूपवते यांना बळ देऊन कॉंग्रेस पक्षात सामावून घेतले आणि महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्ष खिळखिळा करण्याचे पाप केले. हा सगळा अभ्यास करून आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी मा. कांशीराम यांनी ऊत्तर प्रदेश मध्ये भाजप सोबतं युती केली आणि मनुवादी कॉंग्रेस पक्षाला कडाडून विरोध केला. कॉंग्रेस पक्षाचा असाच कटू अनुभव घेऊन रामदास आठवले यांनी सत्तेसाठी भाजप ला जवळ केले. कॉंग्रेस पक्षाने आंबेडकरी राजकीय चळवळ देश पातळीवर ऊभी राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी ए. राजा. जगजीवनराम,सिताराम केसरी बाळकृष्ण वासनिक, नाशिकराव तिरपुडे अशी माणसे कॉंग्रेस पक्षात सामावून घेतली परंतु स्वतंत्र आंबेडकरी पक्षाचे अस्तित्व ऊभे राहूच दिले नाही. ज्यांनी स्वतंत्र बाण्याचे आंबेडकरी राजकीय पक्ष ऊभे करण्याचा प्रयत्न केला त्यांना नामोहरम करण्याचं पाप सुद्धा कॉंग्रेस पक्षाकडूनच झाले आहे.
महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे गटतट ही कॉंग्रेस पक्षाची फुस होती हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचे आतापर्यंत दहा आमदार निवडून आणलेले आहेत. ते सर्वच आमदार कॉंग्रेस पक्षाने फुस लावून पळविले आणि आंबेडकरी विचारधारेच्या राजकारणाचा गळा घोटला. २००० साली कॉंग्रेस प्रणित आघाडी सरकार मध्ये भारिप बहुजन महासंघ हा सहयोगी घटक पक्ष होता. भारिप बहुजन महासंघाचे २ कॅबिनेट मंत्री १ राज्यमंत्री आणि १ महामंडळ अध्यक्ष होते. कॉंग्रेस पक्षाने तिन्ही मंत्र्यांना फुस लावून पळवून नेले आणि भारिप बहुजन महासंघाचा विश्वासघात केला, आंबेडकरी राजकीय चळवळीचे खच्चीकरण केले. काही दलितांना आमिषे देऊन आंबेडकरी राजकीय चळवळी पासून तोडले, काही जणांना सत्तेचा लोभ दाखवून स्वतः मध्ये सामावून घेतले आणि आंबेडकरी राजकीय पक्षात सुद्धा एकवाक्यता राहणार नाही याची तजवीज करीत मनुवादी कॉंग्रेस पक्षाने स्वतंत्र बाण्याचे आंबेडकरी राजकारण ऊभे राहणारचं नाही याची काळजी घेतली. हा अनुभव आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एक गोष्ट सिद्ध झाली आहे की भाजप ची बी टीम म्हणून कॉंग्रेस पक्षाने भुमिका निभावली आहे आणि भाजपला तिसऱ्यांदा सरकार बनविण्यासाठी रसद पुरविली आहे.
महाराष्ट्रातील आंबेडकरी समुहात आपसी वाद निर्माण व्हावा म्हणून काही लोकांना कु-हाडीचा दांडा बनविले आणि आंबेडकरी समुहाच्या राजकारणाचे खच्चीकरण करण्याची भुमिका कॉंग्रेस पक्षाने २०२४ च्या निवडणुकीत निभावली आहे. षढयंत्रकारी कॉंग्रेस पक्ष प्रत्येक वेळी नवीन पवित्रा घेऊन आंबेडकरी राजकारण संपवण्याचा प्रयोग करीत असतो. यापुर्वी रिपब्लिकन गटाधिपती हाताशी धरून आंबेडकरी समुहाची मते चोरण्याचा प्रयोग कॉंग्रेस करीत असे.
रिपब्लिकन गटाधिपती निष्प्रभ झाले आहेत त्यांच्या भरवशावर मते चोरता येणार नाहीत असे लक्षात आले म्हणून कॉंग्रेस पक्षाने नवा डाव खेळला, समाजाची मते विकणा-या कु-हाडीच्या दांड्याला “विचारवंत” असं गोंडस नांव दिलं आणि दरोडा टाकला. अशाप्रकारे मित्राचं रुप घेऊन सेक्युलर मुखवटा धारण केलेल्या परंतु अतिशय घातक असलेल्या कॉंग्रेस नावाच्या छुप्या शत्रू पासून आंबेडकरी मतदारांनी दक्ष असलं पाहिजे. उघड शत्रू पासून कुणीही दक्ष असतो, त्याने वार केला तर पलटवार करण्यासाठी आपणं सज्ज असतो. त्याच्या प्रत्येक हालचाली वर लक्ष ठेवता येते आणि जीव वाचविता येतो.परंतु आपणं बेसावध असतांना छूपा शत्रू मित्र बनून गळ्यात हात टाकून पाठित खंजीर खुपसतो आणि म्हणून घात होतो. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका आहेत, छूपा शत्रू षढयंत्र रचून तयार आहे, आंबेडकरी मतांची चोरी करेल किंवा दलाल कामाला लावून आपलं इशिप्त साध्य करेल म्हणून सरंजामी वृत्तीच्या घराणेशाही मजबूत करणा-या कॉंग्रेस पक्षापासुन महाराष्ट्रातील आंबेडकरी मतदारांनी अंतर राखून वागले पाहिजे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत