संघ असं का बोलला?

माधव पठारे
२०१४ पासून भाजप सत्तेवर आल्यानंतर विरोधीपक्ष आणि विरोधी विचार संपवण्यासाठी मोदींनी जे काम केलं त्या बद्दल संघाने कायम मोदींचं समर्थनच केलं आहे.संघाने कधीही याबाबत मोदींना खडे बोल सुनावलेले नाहीत.पुरोगामी संघटना असो,किंवा पक्ष असो त्यांना देशातुन आणि राजकारणातुन हद्दपार करायची खुलेआम भाषा मोदींनी कित्येकदा बोलुन दाखवली होती परंतु संघाने या विरोधात कधीही ब्र शब्द काढलेला नाही.काॅंग्रेसमुक्त भारत ही मोदींची वल्गना शब्दाशब्दात आणि भाषणागणीक येत होती.तेंव्हाही या विषयावर संघ कधी बोलला नाही.मग आज असं काय घडलं की संघाला,मोदींना राजधर्माची आठवण करून द्यावी वाटली.
संघ प्रणित भाजप सत्तेवर आला हे संघाचं स्वप्न पूर्ण झालं,संघाला अपेक्षित असणारं पंतप्रधान पद नेहमी पंतांकडं असलं पाहिजे हे अधोरेखित असताना सुद्धा अगोदरच दोन तीन वर्षे मोदींना प्रोजेक्ट करायची रननीती संघ-भाजपने आखलेली होती.याचं कारणही तसंच आहे ते म्हणजे मोदी हे लहानपणापासून संघाच्या मुशीत घडलेले हार्ड कोअर हिंदूत्ववादी नेते आहेत.त्यांची जात २००० मध्येच ओपन मधुन ओबीसी मध्ये घेतली होती.भाजप हा ओबीसींच्या मतांवर निवडून येणारा पक्ष आहे.(ओबीसींसाठी काही करत नसला तरी व त्यांच्यात लीडरशीप तयार होऊ देत नसला तरी) मोदींना ओबीसी लीडर म्हणून प्रेझेंट करून त्या मतांवर सत्ता मिळवण्यासाठी ही रणनीती भाजपने आखली होती.पंतप्रधान शब्दातच अधोरेखित केले आहे की प्रधानमंत्री हा शक्यतो पंत असला पाहिजे.परंतु असं असताना देखील मोदींना या पदासाठी नियुक्त केलं गेलं कारण ते प्रखर हिंदुत्ववादी आहेत व एखाद्या पंतांना,संघांसाठी, भाजपसाठी, किंवा हिंदुत्ववादी भुमिकेसाठी ज्या मर्यादा येतील त्या मर्यादा ओळखून मोदींची निवड झाली होती.आणी यासाठी मोदी खरोखरच संघाला भरूनही पावलेले आहेत.संघ आणि भाजप कधी नाही एवढा भरभक्कम स्थीतीत उभं राहिलेला आहे.पैसा आडका,सत्ता हिंदुत्ववादी राष्ट्र बनविण्याची जी संकल्पना संघ आणि भाजपची आहे त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ असेल सत्तेचं बळ पाहिजे ते पण तयार झालेलं आहे.आणी हे सगळं मोदींना त्या पदावर नियुक्त केल्यामुळेच घडुन आलं आहे याची जाणीव संघाला आहे. हे सगळं एखादा पंत त्या पदावर बसुन करु शकला नसता याची जाणीव व कल्पना संघाला जरुर होती व आहे आणि म्हणूनच मोदींची निवड झाली होती.यासाठी संघ मोदींना खूप धन्यवाद देत असणार यामध्ये दुमत नाही.पण हे सगळं खरं असलं तरी आता जे उदिष्ट ठरवलेलं होतं ते बरचसं साध्य झाले आहे. मोदींनी दमनकारी नीती अवलंबुन विरोधकांना तक्रार करण्याच्या लायकीचे सुद्धा ठेवले नव्हते यावरुन हे कळते.मोदींच्या या दमनकारी नीतीचा वास मधल्या काळात सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेल्या भाषणाचा अभ्यास केला की या दमनकारी नीतीचा वास तीथुन आल्याचे ध्यानात येते.भागवत म्हणाले होते की पाकिस्तान अफगाणिस्तान वगैरेंसहीत हे हिंदू राष्ट्र बनवायचं आहे सगळ्यांना सोबत घेऊन किंवा जे येणार नाहीत त्यांना बदलवुन हे करायचे आहे.आणी मोदी नेमकं तेच करत चालले होते संघाने जो रोड मॅप ठरवुन दिला आहे त्या मार्गाने.परंतु दहा वर्षातील या दमनकारी नीतीने देशात मोठा असंतोष घडुन आला आठ नऊ राज्यांमध्ये सत्ताबदल घडवून आणला गेला,इडी सीबीआय वगैरेंनी कित्येक नेते पक्ष जेरबंद केले गेले बेरोजगारी महागाई तयार केली गेलेली धार्मिक तेढ यामुळे वातावरण विरोधात गेले व यासाठी राहुल गांधी यांनी जीवाची बाजी लावून काढलेल्या पदयात्रा खूप कामी आल्या.या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे मोदींना देशाने पुर्ण बहुमताला नाकारलं.निवडणुक आयोगाने पहिल्या पाच टप्प्यात सव्वा कोटी मतं वाढवले नसते तर भाजप दिडशेच्या आत असता.अशी सगळी परिस्थिती आहे.आणी अशातच परिस्थिती राहुल गांधी यांची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढली आहे.मोदिंकडुन जे हवं होतं ते सगळं मीळाल आहे.आता भाजपला अपयश आले आहे,व भविष्यातही भाजप सत्तेवर येण्याची शक्यता नसेल तर भाजप ऐवजी मोदी शहा यांच्याच माथ्यावर खापर फोडुन परत भाजपला सत्तेत आणण्यासाठी काम करणारी मातृसंस्था म्हणून संघ तीची स्वतःची तरी प्रतीमा स्वच्छ ठेवा असा विचार करत आहे आणि यासाठीच डॉ मोहन भागवत यांनी मोदींना राजधर्म सांगण्याचा शहाजोग पणा केला आहे यापेक्षा वेगळं काही नाही…
संघटनेला मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी वेगवेगळी माणसं वापरायची असतात मोदींचा जेवढा पाहिजे तेवढा वापर झालेला आहे आता परत वापर होण्याची सुतराम शक्यता नसेल तर आपली तरी प्रतीमा जपा म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे.मोदिंनी राज्यघटनेच्या चौकटीत काम केलेलं नाही व दहा वर्षांत नाही म्हणून संघाने कधी सल्ला दिला नाही.मनिपुर घटना घडुन कित्येक दिवस झाले संघाने मोदींना जाब विचारला नाही जे पी नड्डांनी संघाशिवाय भाजप भक्कम आहे म्हणून बरेच दिवस झाले तरी संघाने तक्रार केली नाही मग अचानक निकाल जाहीर झाल्यानंतर संघाने हे का बोलावं तर जनमानसात संघाची विचारसरणी चांगली आहे हे रुजावं म्हणून संघ बोलला, संघावरील ढासळलेला विश्वास लोकांचा बसावा म्हणून संघ बोलला, आपलं उद्दिष्ट बाकी आहे आणि ते साध्य करण्यासाठी लोकांमध्ये जावं लागेल,तीथं आपल्याला ऊजळ माथ्याने जाता यावं म्हणून संघ बोलला आहे यापेक्षा वेगळं काही नाही….
माधव पठारे अहमदनगर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत