देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

विवाह एक संस्कार

    प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे

मानवी समाजात एक संस्कार म्हणून विवाहाकडे पाहिले जाते. इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी यांच्यात फरक आहे. माणसाला बुद्धी आहे तीच्या जोरावरच तो जे करू शकतो ते इतरांना करता येत नाही. तो बोलतो,हसतो आपली कामे करतो. इतरांना मदत ही करतो आणि त्यांचे नुकसान ही करू शकतो.त्याने नाती बनविली आहेत. आई,वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले, काका,मावशी आत्या आजोबा. अशी अनेक नाती आहेत. विवाहामुळे नवीन नाती उदयास येतात म्हणून हा संस्कार झाल्यावर
त्याचे जतन ही योग्य पद्धतीने झाले पाहिजे म्हणून तर लोक म्हणत असतात, आमचा गोतावळा मोठा आहे. आपल्याकडे अनेक जाती धर्म आहेत .ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे लेबल असणारे लोक हिंदू या छताखाली राहतात. पण तरी ही त्यांच्या प्रथा या वेगवेळ्या असतात. भारतामध्ये हिंदू,जैन,ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध,शीख, पारसी अशा धर्मांचे लोक राहतात.आणि ते गुण्यागोविंदाने राहतात. याचे मात्र जगाला आश्चर्य वाटते कि हे लोक कसे एकत्र राहतात कधी कसल्या प्रकारचे टोकाचे वाद नसतात. आणि ही बांधणी संविधानाने केलेली आहे. इथले कायदे हे इथे राहणाऱ्या सर्व जाती धर्मांना समान पद्धतीने लागू होतात. जरी हे पटत नसले तरी याच्यावर शांतपणे विचार केल्यानंतर लक्षात येते की बरोबर आहे.ज्याचा वशिला नाही, उच्चपदस्थांशी नाते नाही जो समाज अल्प आहे शैक्षणिक,धार्मिक सामाजिक, आर्थिक दृष्टिने गरीब आहे त्यांची ,सेवा करण्याचे काम हे भारतीय संविधान करते . जरी त्यांच्या चाली रीती,परंपरा वेगवेगळ्या आपल्या धर्मात, समाजात असल्या तरी देशाच्या शासकीय पातळीवर त्यांचे मोजमाप एकसारखेच केले जाते.अर्थात शासकीय नियम, पोलीस स्टेशन, न्यायलय इथे मात्र सर्वांना सारखेच आहेत

मानव समाजात हा लग्नाचा प्रकार आहे. निसर्गाच्या नियमा प्रमाणे स्त्री चे वय बारा च्या पुढे सरकू लागले की प्रजनन क्षमता सुरू होते म्हणून पूर्वी लहान वयातच मुलांमुलींची लग्ने लावून लोक मोकळे व्हायचे. पण ती मुले कळती होई पर्यंत जबाबदारी त्या त्या कुटुंबांवर असायची. भविष्यात खूप अडचणी जाणवू लागल्या त्या बाल मुलामुंलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागले. हे समाज सुधारकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बालविवाह पद्धतीस विरोध करावयास सुरुवात केली. पुढे ती यशस्वी झाली.इंग्रजाच्या काळात हरबिलास सारडा यांच्या नावाने १ एप्रिल १९३० मध्ये केवळ समाज सुधारकांच्या मुळे हा कायदा लागू झाला. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ असेल तर त्यांचे लग्न लागू शकते जर वय कमी असेल तर तो कायद्याने गुन्हा समजला जातो.हा बदल ही नंतर करण्यात आला होता. २८ सप्टेंबर १९२९ रोजी जेव्हा हा कायदा सम्मत झाला होता तेंव्हा मुलीचे वय १४ व मुलाचे वय १८ ठरले होते.पण नंतर वरील प्रमाणे म्हणजे १९७८मध्ये नवीन कायदा करून बदल करण्यात आले. आज अखेर आपण त्याचे पालन करूनच लग्न कार्य सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करतो.अन्यत: तो गुन्हा ठरतो व संयोजकांना कायद्याने शिक्षा होऊ शकते. राजाराम मोहनराय यांनी सती प्रथा, बालविवाह, बहुपत्नीत्व, विधवा प्रथा, जातीभेद, जाचक चालीरीती यांच्या विरोधात आवाज उठविला व हळू हळू त्या प्रथा संपुष्टात आल्या.प्रत्येक काळात अडचणी निर्माण होतात मात्र पुढील काळात समाजसुधारक जन्माला येतात ते समाजाला समजावतात. शक्य नाही झाले तर विरोध करतात. तसेच घडत गेलेले आपणांस पहायला मिळते.हिंदू धर्मात ‘लग्न’,’विवाह’ असे शब्द रूढ आहेत,शीख धर्मात ‘आंनद कारज’ इस्लाम धर्मात ‘ निकाह ‘ बौद्ध धर्मात ‘ मंगल परिणय ‘ख्रिश्चन धर्मात ‘पवित्र विवाह असे शब्द मिळतात.

विवाह, लग्न यासाठी शब्द किती ही असले तरी एक बाब महत्वाची ती म्हणजे कायद्याने वयात आल्यानंतर लग्न संस्कार, विवाह संस्कार होणे महत्वाचे.पूर्वी शिक्षणाच्या सोयी सुविधा नव्हत्या. शिक्षण हे सर्वासाठी खुले ही नव्हते लोक खेडोपाड्यात, डोंगर कपारीत, डोंगर माथ्यावर रहात असत दळणवळणाची साधने रस्ते यांची ही दुरावस्था असायची. शिक्षणापासून लोक दूरच असायचे.यामुळे मुले मुली वयात आली की समाज,नातेवाईक, आई-वडील यांच्याकडून त्यांच्या विवाहाच्या अनुषंगाने चाचपणी सुरू व्हायची. वडील धारी मंडळीचा, आजोबा, मामा, काका यांचे शब्द डावलण्याची लोकांच्यात, तरूणांच्यात हिम्मत नसायची. एक आदरयुक्त भीती असायची. आई वडीला समोर त्यांचे तोंड उघडले जायचे नाही. त्यांचा मान राखला जायचा. मुलगा मुलीला पहायला जायचा नाही. फक्त ठराव व्हायचे. मुलगी ला मुलगा व मुलाला मुलगी दाखवविण्याचे, पहाण्याचे प्रकार कमी होते.मुलींचे प्राथमिक पर्यंत च शिक्षण असायचे. नंतरच्या काळात हे पहाण्याचे प्रकार सुरू झाले. उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधामुळे मुली शिकू लागल्या. मुलींच्या शाळा महाविद्यालये सुरू झाली आणि मोठ्या संख्येने मुली शिकू लागल्या. लोक शहरांकडे नोकरी व्यवसाय यामुळे राहू लागले .उच्च शिक्षण, नोकरी चे आकर्षण वाढू लागले. ग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट शिक्षण व्हायला लागले. शहरी जीवनाचे आकर्षण मुलां मुलींना वाढू लागले शेतीचे आकर्षण कमी होऊ लागले .वर हवा नोकरी करणारा, गावाकडे घर शेती असणारा पण शहरात राहणारा. अशा संकल्पना दृढ होऊ लागल्या. आई वडील, पालक पाहुणे यांचे महत्त्व कमी होऊ लागले. पालक मुलामुलींच्या पसंतीस संधी देऊ लागले.पूर्वी मुला मुलीच्या वयात पाच,दहा, बारा वर्षांपर्यंत अंतर असायचे. पण अलिकडे तेही अंतर कमी होऊन दोन तीन वर्षापर्यंत आलेले आहे .तरच लग्नास होकार येऊ शकतो.शिवाय मुलगी मुलांपेक्षा अधिक शिकली असेल तर मुलगी लग्नास होकार देत नाही व आई-वडीलांकडून ही होकार येत नाही.शिक्षण,नोकरी, शेती, बंगला, गाडी, मुलामुलींची पॅकेज, सरकारी नोकरी ,वयातील अंतर, शहरात फ्लॅट अशा किती तरी गोष्टी मधून लग्न जुळविता जुळविता लोक मेटाकुटीस येतात. शहरी निवासामुळे अपार्टमेंट मध्ये राहणे यामुळे लोक एकाकी पडतांना दिसत आहेत. आपली नोकरी व्यवसाय यामधून नातेसंबंध कमी होतांना दिसत आहेत. वाढत्या मुलां मुलींच्या, पालकांच्या अपेक्षा.वाढलेली शिक्षणे यामुळे वयाची अट १८ -२१ हे प्रमाण राहिलेले नाही. अलिकडे १० वी १२ वी पर्यंत चे शिक्षण सोडून द्या. मुली पोस्टग्रॅज्युएट ते ग्रॅज्युएट आहेतच त्यातच नोकरी साठी बी.एड; एम.एड;एम.ई.नेट सेट परीक्षा पास,बी. ए.एम.एस,बी.एच.एम.एस. होण्यासाठीचे प्रयत्न पास झाले तर नोकरी, पर्मनंट इत्यादी अनेक बाबी समोर येत राहतात.तर काही समाजातील मुली खूप शिकलेल्या आहेत मग त्या पात्रतेचा मुलगा मिळेलच असे नाही.यामुळे वय वाढते. आठवी, नववी ,दहावी, आकरावी पासून सुरू झालेले नैसर्गिक चार्मिंग कमी होत जाते. सौंदर्य घटण्याची ही शक्यता असते यामुळे विवाह जुळणी होईपर्यंत वय वाढतच जाते मग २५,२६,२७,२८,२९,३० कधी कधी ते ही पार होते आणि काही काही वेळा खूप अवघड होते त्यातच वाढती महागाई ,टेंम्पररी नोकरी, मर्यादित वेतन ,ते ही सुट्टी सोडून मिळत असते.अशावेळी एकट्याचा खर्च भागविणे अवघड होते.लग्न झाले तर काय होणार यामुळे मुले लग्नाचे विचार ही सोडून देण्याची शक्यता नाकारता येत नाही.उशिरा लग्न झालेच तर पुढे काही समस्याही निर्माण होत असतात.

म्हणून विवाहा च्या बाबतीत वधू वर पालक मंडळी आणि खासकरून आई वडील यांचे रोल फार महत्वाचे असतात. प्रत्येक आई वडील यांना वाटत असते मुलीला चांगला मुलगा मिळावा, चांगली सुन मिळावी. यासाठी प्रत्यक्ष आई वडिलांचे निर्णय फार महत्वाचे असतात, इतरांचे गौण.अलिकडे मुलामुलींची वाढलेली शिक्षणे, नोकरी ची अपेक्षा,पसंती यामध्ये दोन्हीं बाजूंच्या वेगवेगळ्या अपेक्षा यामुळे आणखीनच वेळ होत जातो वय वाढू लागते आणि नंतर या गोष्टीची माहिती पाहुणे, मित्र यांच्या मार्फत बाहेर पसरली जाते.की त्यांना असे स्थळ पाठविले होते,तसे पाठविले होते काही रिस्पॉन्स नाही. मग दाखविणारांनी काय करायचे. त्यातच काही लोक वैयक्तिक पातळीवर भावी- वधू-वर यांची माहिती एकत्र ठेवतात. कोणी स्थळा बाबत विचारणा केल्यास नावे पत्ते देतात, येण्या जाण्याचे पैसे घेतात. काही चहा पाण्यासाठी पैसे घेतात. ठरलेच तर पोशाख किंवा काही रकमेची मागणी ही करतात. लोक नाही म्हणत नाहीत .त्याच प्रमाणे वधू -वर सूचक केंद्रे ही आहेत, त्यामाध्यमातून ही विवाह संस्काराचे कार्य चालू आहे. ते वधू-वर पालक मेळाव्यांचे आयोजन करतात. यामध्ये प्रत्यक्ष भावी वधू – वरांच्या भेटी होतात. आज वधू-वर सूचक केंद्रांची ही गरज आहे.त्यांची ही वार्षिक वर्गणी, मेळाव्यातील नोंदणी फी अशा प्रोसेस मधून जावे लागते.

विवाह हा एक संस्कार आहे .तो योग्य वेळेत पार पाडायला हवा. यासाठी मुलां- मुलींच्या दोन्हीं बाजू भावी वधू-वर पाहुणे या सर्वांनी दक्ष राहून या जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचे असते.यामधील महत्वाची बाब म्हणजे योग्य जुळणी, योग्य निर्णय, काही काही बाबतीत अडजेस्टमेंट, माफक अपेक्षा ठेवल्या तर हा संस्कार पार पाडणे सर्व जुळून येते.यासाठी जाता -जाता, योगा- योगाने काही गोष्टी शक्य होतात. हे जरी खरे असले तरी कुटूंबामध्ये बैठक होऊन काही बाबी निश्चित ही करणे गरजेचे असते.पण हे जर शक्य झाले नाही तर कुटूंबातील सदस्यांचे ही विचार पटत नाहीत. चांगली नोकरी,बिजनेस, पॅकेज,शेती, घर,बंगला देखना देखनी,कुळ,पत्रिका अशा बाबतीत सांगड घालता यायला हवी.कारण भविष्यात काय होणार हे कोणाला ही काही सांगता येत नाही.मात्र वर्तमानात योग्य पहाणी होणे गरजेचे.तसेच आई वडील यांची भूमिका महत्वाची, जर नसतील तर जे कोणी पालक असतील त्यांची जबाबदारी आहे की योग्य् सांगड ,वेळ घालून या संस्कारास पूर्णत्व देणे. अलिकडे खूप मुले विवाहासाठी प्रयत्न करत आहेत पण ते यशस्वी होत नाहीत, मग डिप्रेशन मध्ये जातात, अबोल बनतात, मानसिक दृष्ट्या कमकुवत होतात.म्हणून आई-वडीलांनी सावध राहून,मुलां मुलींनी समजून घेऊन योग्य वयात, वेळेत हा संस्कार पार पाडला तर “सोनेपे सुहागा है” निसर्गाने आनंद,दिलेला आहे तो योग्य वेळेत घ्यावा असेच वाटते आहे.

प्रा.डाॅ.दिलीपकुमार कसबे
स.गा.म.काॅलेज,कराड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!