महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

१० मार्च .. माता सावित्रीमाईचा स्मृती दिवस !

देश बदलण्याची ताकद जर कुणात असेल तर ती आहे बहुजन महामानव व महामातां मध्ये यापैकी एक दांपत्य म्हणजे फुले दांपत्य. या देशाला जसा अमानवीय वैदिक धर्माचा शाप आहे तसेच अनेक महापुरुष व महामाता यांच्या महान सामाजिक कार्याचे वरदान सुद्धा या देशाला लाभले आहे. जेव्हा महात्मा फुलेंनी १ जानेवारी १९४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली तेव्हाच काळाने आपली कुस बदलायला सुरू केले होती. आणि काळाने बदलता बदलता आपल्याला आजच्या आधुनिक काळात आणून ठेवले. तेव्हाच्या घोर अंधारात चाचपडणाऱ्या भारतीय समाजाला प्रकाशाचे किरण दिसू लागले होते. पण त्यासाठी हाडाच्या काड्या करणारे फुले दांपत्य होते. त्यांच्या काळात वैदिक धर्माच्या कालसर्पाने भारतीय समाजाला एक प्रकारचा भयंकर विळखा मारून ठेवला होता. त्यातून भारतीय समाजाला सुटायचे असेल तर शिक्षणा शिवाय दुसरा पर्याय नाही, हे फुले दांपत्याने ओळखले आणि शिक्षणाचा पाया रचला.

शिक्षण कार्यात म. फुले इतकाच सावित्री माईचा देखील तेवढाच वाटा आहे किंबहुना काकणभर जास्तच. कारण ज्या काळात स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडून जाण्याची परवानगी नव्हती त्या काळात माईने आपल्या अंगावर बहुजनांच्या शिक्षणासाठी रस्त्यावर दगड/माती/शेणाचा मारा झेलला. फुले दांपत्याने ज्या वाड्यात पहिली शाळा उघडली तो भिडे वाडा आजही साक्ष देत उभा आहे. म्हणून खऱ्या अर्थाने बहुजनांसाठी ज्ञानदात्री माता सावित्री ठरतात. विद्येची काल्पनिक देवी सरस्वती नव्हे ती असती तर त्याचा एक तरी सक्षम पुरातत्त्वीय पुरावा या भारत भूमीवर असता पण तसा कोणताही पुरावा सापडत नाही. नसेल तर ती विद्येची देवी कशी काय ठरू शकते? म्हणून बहुजन आया बायांनो लक्षात घ्या. विनाकष्ट तुमच्या पदरात ज्ञानाचे दान टाकणारी आद्य शिक्षिका माता सावित्री होय. आज त्या माऊली मुळेच तुमच्या गळ्यात डॉक्टरचा टेथस्कोप आहे. इंजिनिअरची कॅप तुमच्या डोक्यावर आहे. भारतीय राजमुद्रा असलेली आय पी एस उच्च अधिकाऱ्याची सन्मानाची व दराराची कॅप तुमच्या माथ्यावर आहे. लिहिण्यासाठी हातात पेन आहे. बोलण्यासाठी समोर माईक आहे. चित्रपटात चमकत्या चित्र तारका आहात. तुम्ही उडणखटोल्याचे चालक (पायलट) आहात. शत्रूच्या मनात धडकी भरण्यासाठी हवेत आडवे तिडवे फायटर फ्लाइट उडवत आहात. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर हातात मशीन गन घेऊन एखाद्या चट्टाना सारख्या उभ्या आहात. लढाऊ समुद्री जहाजावर कॅप्टन आहात. अंतरिक्ष निरिक्षणासाठी तुम्ही शास्त्रज्ञ कॅंप मध्ये बसला आहात तुम्ही. जिल्हाच्या/राज्याच्या कारभारी आहात. एवढेच नाही तर देशाच्या सर्वोच्च पदावर सुद्धा आहात. या व यासारख्या अनेक देणग्या तुम्हाला कुणी दिल्या असतील तर त्या ज्यांनी तुमच्यासाठी शिक्षण रूपी गंगा आणली ते म्हणजे फुले दांपत्य. आणि त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउच्च पदस्थानी विराजमान झालात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. म्हणून महापुरुष महामाता हेच आपले खरे दैवत आहेत. त्यांच्या जन्मदिनी व स्मृती दिनी त्यांच्या प्रतिमां समोर एखादं फुल ठेवून त्यांचे ऋणी व्हा.

वैदिक धर्माच्या काल्पनिक रामायणात वनवासी (हाच वनवासी शब्द ते आज आदिवासींना जोडू पाहत आहेत) सीता कुटीच्या बाहेर पडू नये म्हणून कुटीच्या दारासमोर लक्ष्मणाने आपल्या बाणाने जमीनीवर रेषा आखली होती तीच लक्ष्मण रेखा होय. तिच काल्पनिक रेखा धर्म मार्तंडांनी त्यांच्या खुळचट धर्म शास्त्राच्या आधारे बाईच्या कपाळावर कुंकवाच्या रूपात आडवी लकीर ओढली. अर्थ होता किंवा एक प्रकारचा संकेत होता की बाईने आपल्या मर्यादेच्या बाहेर जावू नये, धर्म शास्त्राच्या विरोधात जाण्याची जुर्रत करू नये. नाही तर मरण यातनांना जवळ करून आपले मरण जवळ करा. बाईच्या कपाळावरील आडव्या कुंकवाच्या रेषेचा हा संदेश होता. त्यांच्या धर्म शास्त्रांनी बाईच्या मर्यादा फक्त दाराच्या उंबरठ्या पर्यंतच सिमीत केल्या होत्या. पण माईंनी ती रेखा ओलांडून बहुजनांसाठी जे शिक्षण रूपी रोपटे लावले होते त्याचा आज डेरेदार वृक्ष झाला आहे. साऱ्या भारतभर त्याच्या शाखा पसरल्या आहेत. अर्थात त्यांच्या शिक्षण कार्यासाठी त्यांच्या पाठीशी एखाद्या पहाडा सारखे उभे होते म. क्रांतीबा फुले. खरं तर माईंनी धर्म शास्त्राची खुळचट मर्यादा ओलांडून आजच्या स्त्रिला मुक्त केले. त्या काळचे माईंचे स्रिमुक्तीचे कार्य आजही तेवढेच प्रासंगिक आहे. गरज आहे महिलांनी त्या कार्यात हिरिरीने भाग घेवून त्यांचे कार्य पुढे नेण्याचे.

सावित्रीमाई नंतर आपल्या विद्यार्थीनीं साठी कोणत्याही शिक्षिकेने/शिक्षकाने एवढे कष्ट उपसले नसेल. म्हणून माई देशाच्या आद्य शिक्षिका ठरतात. आणि म्हणूनच येणऱ्या नवीन केंद्र सरकारने ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन रद्द करून सावित्री माईच्या जन्म दिवसी म्हणजेच ३ जानेवारीला शिक्षिका दिवस घोषीत करावा. त्याचसोबत सावित्री माईंसाठी भारत सरकारने भारत रत्न देण्याची घोषणा करून भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात यावे. या निमित्ताने सर्व भारतीय शिक्षिकांचा सन्मान होईल. शिवाय भारतीय महिलांचा देखील सन्मान होईल कारण प्रत्येक माता ही आपल्या बाळाची प्रथम शिक्षिकाच असते. जर नवीन सरकारने ३ जानेवारी हा शिक्षिका दिवस ठरवला व माईंना सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला तर तो सर्व भारतीय शिक्षिका व महिलांचा सन्मान ठरेल व महिलांसाठी एक नवीन क्रांती दिवस ठरेल. दुसरे म्हणजे महात्मा जोतीराव फुले हे भारतीय घटनाकारांचे म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुवर्य आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रगुरू घोषित करावे. राष्ट्रसंत तुकडोजी महारांजा प्रमाणे. येणाऱ्या नवीन बहुजन सरकारने बहुजनांच्या या अल्पशा मागण्या मान्य कराव्याच.

१० मार्च १८९७ रोजी समस्त स्री वर्गाच्या गळ्यातील एक बहुमूल्य मणी निखळून पडला. म्हणजेच १० मार्च माता सावित्रीबाई चा स्मृती दिवस. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी नतमस्तक होवून त्यांना कोटी कोटी अभिवादन!

  • अशोक सवाई
    संपर्क: 91 5617 0699

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!