‘ … देवाने मला इथे धाडले, सत्तेचा सारखा मनोप्रवास !!

रणजित मेश्राम
काही इश्वरीय कामासाठी देवाने मला इथे पाठविले .. ' असे मुलाखत देऊन या देशाच्या कर्णधाराने म्हणणे म्हणजे, या देशाची बहुसंख्य जनता श्रध्दभोळी आहे याचा पूरावा देणे आहे.
अन्यथा ऐन निवडणुकीत असे अशास्त्रीय विधान करण्याची हिंमत कर्णधाराने केली नसती. उलट या विधानाने राजकीय लाभ होईल असे त्यांना वाटले असेल. याचमुळे त्यानंतरच्या एका मुलाखतीत त्यांनी स्वतःला मी ‘अविनाशी’ आहे असे सांगण्याची पुन्हा हिंमत केली.
म्हणजे हा देश 'विज्ञाननिष्ठ' व्हावा असे जे स्वप्न पाहिले होते, त्याचे काय झाले हे यातून स्पष्ट होते. एकीकडे 'एआय' चे युग म्हणायचे व दुसरीकडे मानसिकतेची संस्कारितता पुन्हा वेगाने मागे न्यायची या पेचात हा देश आला आहे.
कर्णधार पूढे म्हणतात, माझ्यातील शक्ती ही साधारण नाही. देवाने खास शक्ती देऊन मला पाठवलं आहे. मी जे काही करत आहे ते देवानेच मला करायला सांगितले आहे. माझा जन्म जीवशास्त्रीय आहे असे मला वाटत नाही.
या म्हणण्याचा राजकीय लाभ मिळेल हे कर्णधाराला वाटणे हे महत्त्वाचे ठरावे. कारण जे जे संघ वा भाजपचे राजकीय विरोधक आहेत त्यांची स्वतःची मानसिकता 'हिंदू' या बिंदूवर गोंधळलेली असणे हे खरे चिंतेचे कारण आहे. त्यांना कोणती मनोभूमिका घ्यावी हेच नेमके न सूचणे ही चिंतेची बाब झालीय.
अदृश्य शक्ती, इश्वरीय शक्ती, इश्वर रुप या धारणा अमान्य करायच्या काय ? याचमुळे 'मौन' किंवा 'कुंपणप्रेम' पसंत केले जाते. एरवी 'प्रधानमंत्री' शब्दमान्य असतांना
‘पंतप्रधान’ शब्द भाषा सल्लागार समितीने सूचविला नसता.
‘ .. पंत ते पंतप्रधान .. !’ असा हा मनोप्रवास आहे.
बहुमताने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मग विरोधकांचे काय मत होते ते वाचायला मिळाले नाही. कुणी मागणीही केली नाही.
याच काळात मुंबई विद्यापीठाने 'मंदिर व्यवस्थापन' हा नवा अभ्यासक्रम सुरू केला. नागपूर विद्यापीठानेही तसेच पाऊल उचलले. भारतीय ज्ञान परंपरेचे शिक्षण देण्यासाठी हिंदू धर्म संस्कृती मंदिर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला.
आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक, भगवतगीता, मनुस्मृती, ऋषींची दीनचर्या, गुरुशिष्य परंपरा यांची ओळख अभ्यासक्रमातून करुन देण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एमसीईआरटी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा यानुसार जाहीर केला.
सत्ता मिळाल्यावर त्यांनी आपले काम प्रमाणिकपणे केले, हे विशेष !
जे जे, देशाचे कर्णधार, संघ, भाजप यांचे विरोधात आहेत त्यांची मानसिक निश्चिती कशी ? हिंदुत्व धोरणावर त्यांनी आपली मते स्पष्ट ठेवायला हवी. ती कळायला हवी.
त्या मुद्यांवर ‘मौन’ असणे केवळ अर्धी लढाई लढल्याचे होईल.
सत्ता आणि मानसिकता सोबत सोबत हव्या. त्या जुळ्या असाव्यात. सत्ता कशासाठी हे नेहमी स्पष्ट असावे.
तशी लोकमानसिकता घडवीत जाणे हे आद्यकर्तव्य ठरते !
‘सत्ता पालट’ सह ‘सोच पालट’ असावे हे याचसाठी ! याचमुळे !
० रणजित मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत