अंबाजोगाईत अतिक्रमणावर बांधकाम विभागाचा हातोडा

सार्वजनिक बांधकाम विभागाने अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणावर हातोडा फिरवला असून मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावरील संपूर्ण अतिक्रमणे काढण्यात येणार असून यात कोणाचीही गय केली जाणार नाही, अतिक्रमणे काढण्याची मोहीम सलग चार दिवस चालणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे बहुतांश अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली.
अंबाजोगाई शहरातील संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते – ‘स्वाराती’ रुग्णालय – यशवंतराव चव्हाण चौक या मुख्य रस्त्याचे नूतनीकरण होणार आहे. यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा सार्वजनिक बांधकाम विभागाला होत होता. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे काढली जाणार आहेत, अशी चर्चा होती. ‘या’ तारखेला अतिक्रमणे काढणार ? पुढच्या तारखेला काढणार ? रस्त्याचे काम कधी सुरु होणार ? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून अखेर शहरातील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत.
अतिक्रमणे काढताच मुख्य रस्त्यावरील पोल शिफ्टींगचे काम हाती घेण्यात येणार असून लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जेसीबी, मोठे क्रेन यासह विविध यंत्रसामग्री घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील यशवंतराव चव्हाण चौकापासून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. यावेळी बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी हजर होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत