अपमतलबी पणालाही काही मर्यादा असावी.

बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांच्या विचार संघटनेचे त्यांच्या अनुयांयी कार्यकर्त्यांना काही देणे घेणे राहिले नाही. जो तो आपला आपमतलबीपणा, अहंकार आणि आपले नेतेपण उजळविण्यासाठी एकाधिकारशाही, हुकूमशाही आणि घराणेशाहीची हुकमत गाजवत बाबासाहेबांच्या विचारांचा, प्रतीकांचा आणि संघटनेचा निरोधासारखा वापरच करीत आहे. पक्षांतर्गत संविधानानुसार निवडणुकीचा देखावा निर्माण करून एकच एक नेता हेच तर भारतीय राज्यघटनेचे विरोधक आहेत. बाबासाहेबांनी तर रिपब्लिकन पक्षाचा सरसेनापती सारखा नेता कसा असावा याचे निकष देताना दर निवडणुकीत सांघिक प्रणालीने बदलता असणारा नेता हा अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा निकष लावला आहे. आम्ही या निकषाकडे व पक्षाच्या संविधानाबाबत दुर्लक्ष केल्यामुळे बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेवर आज नामशेष होण्याची पाळी आलेली आहे.
आपल्यावरील आरोपातून बचाव करण्यासाठी नाहक बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेकडे व नेत्यांकडे अंगुलीनिर्देश करीत असतात. यात बाबासाहेबांच्या पक्षाला सोडून गेलेल्याचाच भरणा जास्त आहे. चुकीच्या आपमतलबी व बेईमान नेते, पदाधिकारी यांना वठणीवर आणण्याची, त्यांची हकालपट्टी करण्याची आणि योग्य नेत्याची निवडणूकीद्धारा निर्वाचित करून पक्ष संघटनेचे शकट चालविण्याची तरतूद पक्षाच्या संविधानात असताना पक्ष संघटना सोडून जाऊन वेगवेगळ्या समांतर पक्ष संघटना काढून बाबासाहेबांच्या पक्षाला आणि समाजाला लाचार आणि कमजोर कोणती आवश्यकता आहे?
कोणी कोणाकडेही जावू द्या स्वतः बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेसाठी एकनिष्ठ राहिले पाहिजे. प्रथमतः स्वतापासून आणि स्वताहून सुरूवात करावी लागते. मी स्वतः पुढाकार घेऊन बाबासाहेबाचे पक्ष संघटना स्वीकारले तर बाबासाहेबांच्या पक्ष संघटना एका सभासदाने वाढणार आहे. मात्र आता कसे आहे, आपण बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेशी बेईमानी करायचे आणि दुसऱ्याला स्वाभिमान आणि निष्ठेचा पाठ शिकवायचा. अशाचे बाबासाहेबांच्या पक्ष संघटना थोड्याच वाढणार आहे?
उदाहरणार्थ- भारत देश नावाच्या संघटनेबाबत प्रमुखांनी भारतीय संविधानाला दुर्लक्षित करून आपली मनमानी केली, चुकीचे धेय्य धोरणे राबविली तर आपण त्यांच्या विरोधात तत्संबंधीत यंत्रणेकडे दाद मागतो, संसदेत व रस्त्यावर उतरून मोर्चे, धरणे, आंदोलन, बंदची हाक देऊन रान उठवितो आणि त्यांच्या विरोधात जनमत तयार करून अशा प्रमुखांना व त्यांच्या सहकाऱ्यांना वठणीवर आणण्याचा व योग्य नेत्याची निवडणूकीद्धारा निवड करून आपल्या देश नावाच्या संघटनेचा प्रमुख बनवितो आणि पाच वर्षांकरिता देशांचे शकट चालविण्याची धुरा सोपवितो. मात्र कोणत्याही परिस्थितीत एका नेत्याच्या बेजबाबदारपणाला उत्तर म्हणून कोणताही समुह देश नावाच्या संघटनेला सोडून जात नाही. फुटीरतावादाचे समर्थन करत नाहीत. खिंडार पाडण्याचे देशद्रोह्यासारखे कृत्ये करीत नाही. अशी कृत्ये करणारे देश नावाच्या संघटनेबाबत प्रामाणिक असू शकणार आहे काय? मग हीच प्रक्रिया बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेसाठी लागू होत नाही काय ? हा बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेचा देशद्रोह्यासारखा संघटनाद्रोह नव्हे काय?
आपण हे सर्व भारतीय राज्यघटनेला सामोर ठेवून आणि सर्वोच्च प्रमाण मानून देश नावाच्या संघटनेचे शकट चालवित असतो. मग बाबासाहेबांच्या आदर्श आणि प्रेरणादायी पक्ष संघटना चालविण्यासाठी पक्ष संघटनेसाठी पक्ष संघटनेच्या संविधानाला आपण एकनिष्ठ का राहत नाही? ईथे संविधानाला धुडकावून संविधानाला कवडीची किंमत न देणारा नेता आपला आदर्श कसा काय होऊ शकतो ? भारतीय राज्यघटना आपल्या सर्वांसाठी सर्वश्रेष्ठ आणि बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेचे संविधान आमच्या सर्वांसाठी कवडीमोल ही विसंगती बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते कोणत्या तोंडाने स्वीकारीत आहे? भारतीय राज्यघटना वाचविण्याच्या गप्पा हानणाऱ्यानी बाबासाहेबांच्या पक्षाला पक्षाच्या संविधानाला वाचविण्यासाठी कोणता पुढाकार घेतला आहे? बाबासाहेबांच्या पक्षांचे संविधान वाचविण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून काय योगदान दिले आहे? बाबासाहेबांच्या पक्ष संघटना म्हणजे बाबासाहेबांचे विचार नव्हे काय? बाबासाहेबांच्या पक्ष संघटना सोडून बाबासाहेबांची विचारधारा अन्य पक्ष संघटनेत कशी काय राहू शकते ? हा बनवाबनवीचा प्रकार बंद करण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते पुढे येणार आहेत की नाही? ज्या दिवशी बाबासाहेबांचा पक्ष संघटना आणि संघटनेचे संविधान वाचविण्यासाठी जो कार्यकर्ता पुढे येईल तोच बाबासाहेबांचा अनुयायी कार्यकर्ता भारतीय संविधान वाचविण्यासाठी योगदान देऊ शकणार आहे.
- अशोककुमार उमरे
रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत